Site icon InMarathi

दैव देतं अन् कर्म नेतं; पैशांच्या राशीत लोळणारे ६ कोट्याधीश झाले दरिद्री…

businessman IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशातल्या सर्वाधिक श्रीमंत माणसांची यादी जाहीर होते तेव्हा त्यात कुणाकुणाची नावं आहेत याची आपल्याला उत्सुकता असते. ‘फोर्ब्स’ने काही दिवसांपूर्वी भारतातल्या १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली.

मुकेश अंबानी, शिव नाडर, गौतम अदानी यांच्यासोबत आणखी काही अरबपतींच्या नावांचा या यादीत समावेश आहे.

 

 

नोकरी करून पैसे कमावणारी आपल्यासारखी सामान्य मंडळी अशा व्यक्तींच्या संपत्तीचे आकडे पाहून थक्क होतात. आपल्या हयातीत कुठलीही व्यक्ती अब्जावधी रुपये कसे कमवू शकते याचा आपल्याला अचंबा वाटतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

इतकी प्रचंड मालमत्ता स्वतःच्या नावावर असलेल्या या व्यक्ती आपल्या व्यवसायात कशा प्रकारची धोरणं आखून इतक्या यशस्वी झाल्या हे समजून घेणं आपल्या आवाक्याबाहेरचं असतं. पण आज अव्वल क्रमांकाला असलेली व्यक्ती यानंतर काही वर्षांनीही अव्वल क्रमांकाला असेलच याची काही शाश्वती नाही. किंबहुना, बऱ्याचदा ती तशी नसतेच.

एकवेळ यशस्वी होणं सोपं असतं, पण मिळालेलं यश टिकवून ठेवणं महाकठीण असं आपण म्हणतो. गडगंज पैसा कमावलेल्यांच्या बाबतीतही हे लागू होतं. एकेकाळी करोडपती, अरबपती असलेली काही माणसं आजच्या घडीला कंगाल झालेली बघून आपल्याला आश्चर्य वाटतं.

 

 

माणसं अब्जावधी रुपये कसे कमावतात हे जितकं आपल्यासाठी अनाकलनीय असतं तितकंच त्यांना अशा प्रकारे दारिद्र्य येणं हेदेखील. पैशांच्या अफरातफरी, घोटाळे यांच्या बातम्या आपण ऐकतो, हे गलिच्छ राजकारण आहे हे आपल्याला कळतं. पण त्यातले बारीकसारीक तपशील आपल्याला कधीही कळू शकत नाहीत.

कधीकाळी पैशांच्या राशीत लोळणारे भारतातले ६ बिझनेसमन आपल्या कारकिर्दीत अशाच मोठ्या चुका केल्यामुळे आज दरिद्री झालेत. ते कोण आहेत हे पाहू.

१. सुब्रत रॉय :

 

 

एकेकाळी सुब्रत रॉय ही भारतातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होती. आजच्या घडीला मात्र त्यांची फारच दयनीय अवस्था झालीये. सुब्रत रॉय यांच्या मालकीच्या असलेल्या ‘सहारा ग्रुप’वर गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बळकावल्याचा आरोप आहे.

‘सहारा ग्रुप’ने गुंतवणूकदारांचे काही पैसे परत केले आहेत. पण अजूनही गुंतवणूकदारांचे हजारो करोडो रुपये परत करायचे बाकी आहेत. १० वर्षांपूर्वी सुब्रत रॉय अरबपती होते. मात्र आता त्यांची नेट वर्थ घटून अवघ्या १.५२ करोड रुपयांवर आली आहे.

२. ललित मोदी :

 

 

ललित मोदी हे ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) चे पहिले प्रेसिडेंट आणि कमिशनर होते. २००८ साली त्यांनी आयपीएलची स्थापना केली. २०१० सालापर्यंत त्यांनी या टूर्नामेंटचं यशस्वीपणे नेतृत्त्व केलं.

२०१० साली बीसीसीआयकडून ललित मोदींवर सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रींग चे आरोप झाल्यापासून ते भारतातून फरार आहेत. आज त्यांची नेट वर्थ केवळ ५.४१ मिलियन डॉलर (४१ करोड रुपये) झाली आहे.

३. नीरव मोदी :

 

 

गुजरातचा हिऱ्यांचा व्यापार आणि पीएनबी स्कॅममध्ये २ बिलीयन डॉलरचा घोटाळा करणारे नीरव मोदी २०१८ सालापासून भारतातून फरार आहेत. नीरव मोदी सध्या ब्रिटनमधल्या दक्षिण-पश्चिम लंडनमधील वॅन्ड्सवर्थ च्या जेलमध्ये गजाआड आहेत.

२०१७ साली नीरव मोदींची नेटवर्थ सुमारे १.८ बिलीयन डॉलर (१३,७१३ करोड रुपये) होती. नीरव मोदी यांनी ४ बिलीयन डॉलर (३०,४८० करोड रुपयांचं) कर्ज फेडायचं आहे.

४. अनिल अंबानी :

 

 

२००८ सालापर्यंत अनिल अंबानी ही जगातली ८ व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती होती. त्यावेळी त्यांची नेट वर्थ ४२ बिलियन डॉलर इतकी होती. मात्र कोणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही. अनिल अंबानींच्या बाबतीत काहीसं असंच झाल्याचं चित्र पहायला मिळतं.

१० वर्षांपूर्वीपर्यंत अनिल अंबानी दररोज अरबांच्या खाली बोलणी करत नसत. मात्र आज ते निर्धन झाले आहेत. बँकांचं कित्येक अरब रुपयांचं कर्ज त्यांना फेडता न आल्यामुळे त्यांनी स्वतःला दिवाळखोर म्हणून घोषित केलं आहे. आजच्या तारखेला अनिल अंबानींची संपत्ती शून्य आहे.

५. मेहुल चोकसी :

 

 

पीएनबी स्कॅममध्ये १४,००० करोड रुपयांचा घोटाळा करणारे मेहुल चोकसी यांच्याकडे २०१७ सालापासून एंटीगुआचं नागरिकत्त्व आहे. ते ‘गीतांजली ग्रुप’चे मालक आहेत ज्याची भारतात ४,००० स्टोरची रिटेल ज्वेलरी कंपनी आहे.

२०१८ सालापर्यंत मेहुल चोकसी यांची नेटवर्थ जवळपास १५० मिलीयन डॉलर (१,१४२ करोड रुपये) होती. २०२२ सालात ती घटून ती केवळ ३ मिलीयन डॉलर (२३ करोड रुपयांच्या) आसपास आली आहे.

६. विजय माल्या :

 

 

भारतातल्या १७ बँकांमधून ९,००० करोड रुपये घेऊन फरार झालेले ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ अशी ओळख असलेले विजय माल्या याचं नाव माहीत नसलेली व्यक्ती अभावानेच आढळेल. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे पाण्यासारखा पैसा होता. मात्र आजच्या घडीला त्या वैभवाची केवळ आठवण उरली आहे.

भारत सरकारने विजय माल्या यांना फरारी घोषित केलं आहे आणि भारतात असलेल्या त्यांच्या सगळ्या संपत्तीचा लिलाव केला आहे. २०२२ सालात विजय माल्या यांची नेट वर्थ १.२ बिलियन डॉलर आहे. ज्यातलं अर्ध्याहून अधिक कर्ज त्यांनी फेडायचं बाकी आहे.

वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी डिसेंबर २०२१ मध्ये सांगितलं होतं की जुलै २०२१ पर्यंत बँकांनी विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या संपत्तीची विक्री केल्यानंतर १३,१०९ करोड रुपयांची वसुली केली होती.

 

 

या दरम्यान भारत सरकारने नवे आकडे जाहीर करत म्हटलं की सरकारला आतापर्यंत विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांचे एकूण १८,००० करोड रुपये सापडले आहेत.

आपल्या देशात साधं दोन वेळचं अन्नही ज्यांच्या वाट्याला येत नाहीत अशी काबाडकष्ट करणारी असंख्य माणसं आहेत. एकीकडे ही अशी माणसं आणि दुसरीकडे सगळं काही मिळूनही पैशापायी मती गुंग झालेली काही माणसं.

‘दैव देतं आणि कर्म नेतं’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. वरच्या उदाहरणांइतकी या म्हणीची समर्पक उदाहरणं आणखी कुठली!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version