Site icon InMarathi

‘विरे दि वेडिंग’मधल्या उथळ फेमिनीजमपेक्षा ९०च्या या सिरियल्समधून खरी नारीशक्ती समोर येते!

feminism serials IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात की चित्रपट/मालिका या समाजाचं प्रतिबिंब असतात. मात्र आजच्या मालिका पाहिल्या तर हे तुम्हाला धादांत खोटं वाटेल. आजच्या मालिकांतल्या स्त्रिया या कट कारस्थानं करणार्‍या, साड्या आणि दागिन्यांची शोरुम वाटण्याइतपत सजलेल्या, बेगडी आणि खोट्या वाटतात.

आजच्या मालिकेतली खलनायिका जितकी क्रूर आणि खोटी वाटते तितकीच संघर्ष करणारी सोशिक नायिकाही खोटी वाटते. खरं तर हे चित्र अलिकडच्या दीड दोन दशकात बदललं आहे.

 

 

टेलिव्हिजनची आर्थिक गणितं आणि तो बघणारा प्रेक्षकवर्ग, तसेच या क्षेत्रात काम करणारी मंडळी (निर्माते, दिग्दर्शक, वाहिन्यांवरची सोकॉल्ड क्रिएटिव्ह हेड मंडळी) बदलली आणि टेलिव्हिजननं त्याचं इडियट बॉक्स हे नाव सार्थ केलं आहे.

भारतातल्या सुरवातीच्या काळात आणि नव्वदच्या दशकात मात्र हे चित्र नव्हतं. कारण सुरवातीच्या काळात या माध्यमाचं भान असणारे लोक यात कार्यरत होते. टीआरपी नावाचा राक्षस नव्हता की नफेखो रीची हाव नव्हती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्या काळात एखादी कलाकृती निर्माण केल्यासारख्या मालिका बनत असत. सशक्त कथानक, उत्तम अभिनय आणि नेटकं दिग्दर्शन हा या मालिकांचा पाया होता. म्हणूनच महिला पात्रं मध्यवर्ती असणार्‍या (आजच्या फ़ॅन्सी भाषेत प्रोटोगॉनिस्ट) अनेक उत्तम मालिका आणि एकाहूनएक उत्तम असे विषय हाताळले गेले होते.

आजच्या चित्रपट आणि मालिकांतल्या बेगडी फेमिनिझमहून वेगळा, अस्सल फेमिनिझम कोणताही आव न आणता या मालिकांतून दाखविला गेला. मुळात या प्रोटोगॉनिस्ट इतक्या ताकदीच्या होत्या की वरून कोणतीही कृत्रिम लिपापोती करण्याची गरजच नव्हती.

त्याच काही मालिकांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत!

पचपन खंबे लाल दिवार –

 

 

उषा प्रियंवदा यांच्या याच नावाच्या कथेवर आधारीत ही मालिका. मीता वसिष्ठ्ची मुख्य भूमिका असणारी ही मालिका खरंतर बंडखोर नायिका रंगवत नाही उलट शिक्षित, कुटुंबाची जबाबदारी असणारी मात्र पिचलेली नायिका यात दाखविली आहे.

आजच्या मालिकांत ही वेगळी का आहे? तर आज मालिकांचा जो एक साचा आहे त्यात कथानक कुठूनही सुरू झालं तरिही शंभराव्या भागापर्यंत जाण्याआधी मालिका “किचन पॉलिटिक्स” मधे गेलीच पाहिजे असा अलिखित नियम आहे. का? कारण पब्लिक को यही मंगता है, असं वाहिन्यांतून काम करणार्‍या क्रिएटीव्ह लोकांनी ठरवलं आहे.

म्हणूनच ही नायिका वेगळी ठरते कारण ती लग्नच करत नाही आणि हा निर्णय ती स्वत:च ठामपणे घेते. नवरा, सासू, जाऊ, नवर्‍याचं लफडं नसणारी ही मालिका आजच्या काळात तग धरुच शकणार नाही. म्हणूनच ही मालिका आता क्लासिक गटात गेलेली आहे.

सांस –

 

 

नीना गुप्ता लिखित दिग्दर्शित ही मालिका विवाहबाह्य संबंधावर आधारीत आहे. आज या संबंधांना जो उथळपणा आलेला आहे त्याला हटकून अशी ही अत्यंत संवेदनशिलपणे हा विषय हाताळणारी मालिका.

एखाद्या प्रौढ महिलेच्या आयुष्यात नवर्‍याचं लफड येतं आणि नवर्‍याला आता आपल्यात रस उरलेला नाही, आपलं नातं दिखाउ झालेलं आहे हे कळतं तेंव्हा तिचं या सगळ्यातून बाहेर पडणं मालिका चितारते.

शांती –

 

 

महिला पत्रकार शांतीच्या व्यावसायिक आयुष्यातल्या घडामोडींवरची ही मालिका नंतर नंतर कौटुंबिक नाट्याकडे सरकली. मात्र या मालिकेने मालिका विश्वात एक मैलाचा टप्पा गाठला.

अल्पविराम –

 

बलात्कारासारखा विषय छोट्या पडद्यावर संवेदनशिलपणे हाताळलेली ही मालिका. कोमात असलेल्या रुग्णावर हॉस्पिटलमधे बलात्कार होतो आणि या मालिकेचं कथानक घडतं.

पल्लवी जोशी ही त्याकाळातली सर्वात जास्त मानधन घेणारी छोट्या पडद्यावरची सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत होती.

तारा –

 

 

ही मालिका खर्‍या अर्थाने आधुनिक् शहरी बंडखोर स्त्रीचं चित्रण करणारी होती. यातली सर्व स्त्री पात्रं ही त्या काळात समाजाला अमान्य अशा सवयी असणारी आणि खरंतर अनैतिक वर्तन करणारी होती. अशा प्रकारची पात्रं कथेतून समोर आणणं आणि यात तडजोड न करता, बेगडी नैतिकता न दाखवता दीर्घकाळ शो चालविणं धाडसाचं होतं.

मात्र तेंव्हाचा मालिकांचा प्रेक्षकही कथांची उत्तम जाण असणारा होता.

हसरतें –

 

 

दळविंच्या अधांतर कादंबरीवर आधारीत ही मालिका त्रिकोणातल्या तिसर्‍या कोनाची गोष्ट सांगणारी गोष्ट होती. पती पत्नी और वो मधे खरंतर वो ही खलनायिका म्हणून बघितली जाते. मात्र हसरतें ही या वो चीच गोष्ट सांगते.

मुळ कांदबरीतल्या कथानकात बरेच बदल केले गेले. मात्र यातलं सावीचं पात्र शेफाली छायानं खूप कमालिचं साकारलं होतं. श्रीदेवीची डुप्लिकेट असा शिक्का असणार्‍या आणि त्यापायी तद्दन फुटकळ भूमिका साकारणार्‍या शेफालीचं करियर बदलायला कारणीभूत ठरलेली ही मालिका.

अस्तित्व… एक प्रेम कहानी –

 

 

वयानं मोठी नायिका आणि तिच्याहून दहा वर्षं लहान नायक अशी कथा असणारी ही मालिका प्रेक्षकांनी अगदी सहज स्विकारली. आणि नुसती स्विकारली असं नाही तर अगदी अखेरच्या भागापर्यंत प्रेमानं पाहिली.

डॉ. सिमरन हे पात्र घराघरात पोहोचलं होतं. निकी अनेजाच्या करियरमधली सर्वोच्च अशी भूमिका आहे. आजही निकीला डॉ. सिमरन म्हणूनच ओळखलं जातं.

आरोहण –

 

 

पल्लवी जोशी लिखित आणि दिग्दर्शित ही मालिका. ज्यात तिनं मुख्य भूमिकाही साकारली होती. या मालिकेत नौदलाच्या तीन कॅडेटवर कथानक फिरतं. याचं आणखिन एक वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका अवघ्या तेरा भागांची होती.

ज्या काळात म्हणजे १९९६ साली ही मालिका प्रसारीत करण्यात आली त्या काळात भारतीय नौदलात लढाऊ दलात महिलांना सहभागी होण्याची परवानगीही नव्हती.

एक पॅकेट उम्मीद –

 

 

एनडीटिव्ही इमॅजिन नावाची एक वाहिनी, जिचं अस्तित्व अल्पकाळ होतं. तिने एकाहून एक सरस अशी कथानकं सादर केली होती. त्यापैकीच एक ही मालिका.

नीना कुलकर्णी हिची मुख्य भूमिका यात होती. जगण्यासाठी संघर्ष करणार्‍या निन्म मध्यमवर्गीय महिलांना एकत्र आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न यात दाखविला गेला होता.

उडान –

 

 

या मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.

आयपीएस कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या कथेवरुन प्रेरणा घेऊन ही मालिका बनविण्यात आली. यात आयपीएस बनण्याची इच्छा असणार्‍या आणि मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर मात करत कष्टानं ध्येय गाठलेल्या महिलेची गोष्ट होती.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version