Site icon InMarathi

विराट-रोहित मधील तणावाचं कारण भारतीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल काळजी निर्माण करतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धत भारताने चांगली कामगिरी करून दाखवली. आपल्या संघाने सेमीफायनलपर्यंत बाजी मारली पण ऐनवेळी नशिबाचे पारडे न्यूझीलंडच्या दिशेने झुकल्याने आपण स्पर्धेच्या बाहेर पडलो.

 

Hindustan Times

ह्यावेळी जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि रोहित शर्मा तिघेही उत्तम फॉर्ममध्ये होते. तिघांनीही अतिशय चांगली कामगिरी केली. पण ह्याच बरोबर सगळीकडे अशीही चर्चा आहे की सध्या रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली असे संघात दोन गट पडलेत.

विराट आणि रोहित ह्यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे आणि ते चाणाक्ष क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यातून सुटलेले नाही. संघात सध्या वातावरण आलबेल नाही हे दोघांच्याही वागणुकीतून दिसून येत आहे.

रोहित शर्मा विराटला इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही पण त्याने आता विराटची पत्नी अनुष्का शर्माला सुद्धा इंस्टाग्रामवर अनफॉलो केले असल्याने ह्या दोघांमधील असलेल्या वादात भरच पडली आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि उपकप्तान रोहित शर्मा ह्यांच्यातल्या वादाची चर्चा वर्ल्ड कप संपल्यापासूनच सुरु झाली.

भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला तिथेच ह्या वादाची ठिणगी पडली. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा ह्यांना विश्वचषक स्पर्धेत जास्त सामने न खेळवण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली असे म्हटले जात आहे.

 

Times Now

रोहित आणि विराट ह्यांच्यात असलेल्या वादाची जवळजवळ सगळ्यांनाच कल्पना आली आहे. हा वाद मिटावा ह्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात आले पण आता ह्या वादाचे शीतयुद्धात परिवर्तन झाले आहे आणि ते युद्ध संपण्याचे नाव घेत नाहीये.

इंग्लंडबरोबर झालेल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर संघात एकमेकांवर दोषारोप सुरु झाले. पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडण्यात आले. पण गोलंदाजांचे असे म्हणणे होते की फक्त त्यांच्यामुळेच आपला पराभव झाला नाही.

त्या सामन्यात फलंदाजी, क्षेत्ररक्षण ह्या गोष्टी सुद्धा चांगल्या झाल्या नाहीत त्यामुळे फक्त गोलंदाजांवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे आहे. नुसतेच एकमेकांवर दोषारोप करण्या पेक्षा सर्वच बाजूंवर मेहनत घेतली पाहिजे असे संघातील काही खेळाडूंचे म्हणणे आहे.

 

India Today

विराट आणि कोच रवी शास्त्री ह्यांच्या काही निर्णयांवर रोहितच्या गटातील खेळाडूंना आक्षेप होता. संघाच्या काही निर्णयांना रोहितने विरोध केला आणि तेव्हापासून ह्या सगळ्या वादाला सुरुवात झाली.

नुकतेच रोहित शर्माने अनुष्का शर्माला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. पण विराटने मात्र अजूनपर्यंत रोहितला अनफॉलो केलेले नाही.

तो अजूनही रोहितला फॉलो करतोय पण तो रोहितच्या पत्नीला म्हणजेच रितिका सजदेहला मात्र फॉलो करत नाही.

अनुष्का रोहित आणि त्याच्या पत्नीला इन्स्टावर फॉलो करत नाही आणि असेही बोलले जात आहे की ह्या दोघांपैकी एकाने “फॅमिली क्लॉज” मोडल्यामुळे संघातील ज्येष्ठ खेळाडू त्याच्यावर नाराज आहेत.

 

India Today

मात्र रोहित आणि विराटने ह्याबाबतीत पूर्णपणे मौन बाळगले आहे. ह्या दोघांनीही त्यांच्यातील वादाबद्दल अजून पर्यंत तरी सार्वजनिक वक्तव्य केलेले नाही. तरीही भारतीय ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या कमिटी ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर्सचे असे म्हणणे आहे की जोवर संघातील खेळाडू स्वत: ह्या बाबतीत त्यांच्याकडे तक्रार घेऊन येत नाहीत किंवा त्यांना अधिकृतपणे काही सांगत नाहीत, तोवर ते ह्याबाबतीत काहीही हस्तक्षेप करू शकत नाहीत.

 

hindustantimes.com

ह्या दोघांच्या वादामुळे संघात फूट पडू नये आणि संघाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून बीसीसीआय हा वाद मिटवण्याचे प्रयत्न करीत आहे. ह्यांच्यातील शीतयुद्ध संपवण्यासाठी बीसीसीआयचे सीइओ राहुल जोहरी हे अमेरिकेला जाणार आहेत.

इंडिया टुडेशी बोलताना बीसीसीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “आताच्या काळात जेव्हा दोन व्यक्तींच्या खाजगी वादात त्यांचे सपोर्ट ग्रुप्स सुद्धा पडतात ,तेव्हा त्या वादाचे युद्धात रूपांतर होण्यास वेळ लागत नाही.

आपले हे दोन्ही खेळाडू हे समजूतदार व्यक्ती आहेत आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नक्कीच ही समस्या सुटेल.” बीसीसीआयचे असेही म्हणणे आहे की साध्याश्या मतभेदाला मीडियाने हवा देऊन मोठ्या युद्धाचे स्वरूप दिले आहे. प्रत्यक्षात इतके मोठे काहीही घडलेले नाही.

 

news18.com

बीबीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ह्या दोघांतील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले आणि संघातील खेळाडूंना आवाहन केले की कुठल्याही एका ज्येष्ठ खेळाडूने सोशल मीडियावर “संघात एकता आणि एकजूट अजूनही कायम आहे व संघात कुठलाही वाद नाही” अशी पोस्ट टाकावी.

पण अजूनही अशी कुठलीही पोस्ट संघाच्या कुठल्याही खेळाडूने टाकलेली नाही. संघातील खेळाडूंना सकारात्मक पोस्ट टाकण्यासाठी आवाहन करूनही असे घडलेले दिसत नाही. ह्याचाच अर्थ संघातले वातावरण सध्या चांगले नाही.

ह्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होणार ह्यात शंका नाही. क्रिकेट हा संघभावनेने खेळण्याचा खेळ आहे. ह्यात जर संघात दोन गट पडले तर प्रतिस्पर्धी संघ ह्याचा फायदा नक्कीच घेऊ शकतो.

 

India Today

खेळाडूंनी संघात असल्यावर आपापले वैयक्तिक वाद, हेवे दावे, इगो प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून एकजुटीने देशासाठी खेळणे आवश्यक आहे.

आता संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे ह्या खाजगी वादामुळे संघाची वाईट कामगिरी झाली तर त्याने सगळ्यांचेच नुकसान होणार आहे हे संघातील सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे.

शेवटी तुम्ही देशासाठी खेळत आहात, देशाचे प्रतिनिधित्व करीत आहात आणि करोडो लोकांचे डोळे तुमच्या खेळाकडे लागलेले आहेत म्हटल्यावर तुम्ही जबाबदारीने वर्तन करणे आवश्यक आहे हे जोवर खेळाडूंच्या लक्षात येत नाही, तोवर हा वाद मिटणे कठीण आहे.

 ===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version