Site icon InMarathi

“त्या पदार्थांचा” व्यापारी ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; थक्क करणारा प्रवास…

jijibhoy inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

कोण होता तो प्रसिद्ध, प्रचंड श्रीमंत भारतीय, ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात दारुच्या मोकळ्या बाटल्यांचा व्यापार करुन केली?

पुढे हाच व्यापारी व्यापारी जगतातील एक अध्याय बनून गेला. ज्यानं आपल्या कमाईचा भरपूर हिस्सा खुल्या दिलानं, खुल्या हातानं समाजासाठी दानही केला.

ती व्यक्ती दुसरं तिसरं कुणीही नाही, जगात आजही ज्यांचं नांव आदराने घेतले जाते ते जमशेदजी जीजीभॉय हे होते.

जमशेदजी जीजीभॉय यांचा जन्म गुजरात येथील नवसारी मध्ये झाला, पण खुद्द जमशेदजी मात्र स्वतःचं जन्मस्थान मुंबई सांगत. हे सांगण्यामागे त्यांचा विशेष हेतू होता.

 

 

इतकंच नव्हे तर त्यांनी आपलं नांवही जमशेदजी ऐवजी जमशेटजी असं केलं ज्यामुळे ते इतर गुजराती व्यापाऱ्यांसारखेच वाटावेत.

त्यांच्या एकंदरीत यशामागे पारसी समुदायाची एकी आणि धनिकता नक्कीच होती.

जमशेदजींचं लहानपण तसं दुःखातच गेलं. त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षांपूर्वीच त्यांच्या आई वडीलांचा मृत्यू झाला. जीजीभाॅय पारसी पंडीत होते पण, त्यांचे वडील कापड विणायचं काम करत. त्यांच्या निधनानंतर जमशेदजी मुंबईत आपल्या मामाकडे आले.

तिथंच त्यांनी दारुच्या रिकाम्या बाटल्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.आणि त्यांना अजून एक नांव मिळालं बाटलीवाला!!!!

वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी आपल्या मामाची मुलगी अवाबाई हिच्याशी लग्न केलं.जी त्यांच्यापेक्षा दहा वर्षानी लहान होती. याच कुटुंबासोबत ते पाचवेळा चीनला जाऊन आले.

या प्रवासातच खूप लोकांशी त्यांचा संपर्क आला. त्यापैकी एक होते डाॅ. विल्यम जाॅर्डन.

 

 

ही गोष्ट घडली ती अशी, फ्रेंच आणि ब्रिटनमध्ये युध्दाचा भडका उडाला होता. ब्रिटीशांनी फ्रेंच सैन्याला हिंदी महासागरापर्यंत पिटाळलं होतं. त्यावेळी जमशेदजी ब्रुन्सविक या व्यापारी नौकेत होते.

ही नौका पाॅईंट द गेलच्या किनाऱ्यावर होती. म्हणजे आजचा श्रीलंका. ब्रुन्सविकवर विशेष कर्मचारी किंवा चालकदल नव्हतं.

त्या बोटीवरील सर्व लोकांना बंदी बनवून दक्षिण आफ्रिकेत नेऊन सोडून दिलं. तिथून परतीचा रस्ता माहीत नव्हता, पण जमशेदजींनी तिथून परत येण्याचा निर्धार केला आणि त्यांना परत यायला चार महिने लागले.

या चार महिन्यांत त्यांचं आयुष्य पार बदलून गेलं.

प्रसिद्ध इतिहासकार जेस्सी पॅलेस्टिया लिहीतात, ब्रुन्सविकवर जमशेदजींची ओळख एका तरुण डॉक्टर सोबत झाली त्याचं नांव होतं विल्यम जाॅर्डन. या दोघांच्या मैत्रीमुळं त्यांचं आयुष्यच नव्हे तर इतिहास घडवला.

जेंव्हा जाॅर्डन आणि जीजीभाॅय भेटले होते तेंव्हा जाॅर्डनचं ईस्ट इंडिया कंपनीमधील डॉक्टर म्हणून काम संपत आलं होतं. त्याने एक आयात निर्यात गृह चालू करायचं ठरवलं होतं.

ते आयात निर्यात गृह आजही गौंगझोहू येथे अस्तित्वात आहे.

 

 

हे आयात निर्यात गृह छोट्या छोट्या कंपन्यांचा समावेश असलेली एक मोठी कंपनी आहे. जिचं भांडवल ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

जाॅर्डीनची कंपनी अत्यंत यशस्वीपणे विस्तारली होती. ज्यामुळे त्याने कमोडिटी मार्केटमध्ये एक विशेष स्थान प्राप्त केलं होतं. या व्यापारासह अजून एक व्यापार अतिशय फायदेशीर ठरत होता तो म्हणजे अफूचा व्यापार!

ज्यानं बहुतांश चिनी लोकांना अफूचा व्यसन लावलं होतं.

अफूचा व्यापार दुसऱ्या व्यापारातील कमोडिटी मध्येही त्याचा परिणाम दिसून आला होता, तो होता चहाचा व्यापार होय.

 

 

ब्रिटीश दरवर्षी चीनकडून दहा मिलीयन पाऊंड्सचा चहा खरेदी करत आणि हा व्यापार बंद होण्याची शक्यता अजिबात नव्हती कारण, ब्रिटीश चहाच्या प्रेमात होते नी चिनी अफूच्या!

यात हे दोन्ही पक्ष जास्तीत जास्त फायदा कमावण्यासाठी प्रयत्नशील होते. पण अडचण अशी होती की हा व्यवहार करताना दोघांकडेही रोख पैसे नव्हते.

त्यामुळे चांदीच्या बदल्यात ब्रिटिश चहा खरेदी करत होते त्यामुळं ब्रिटीशांचं सारं चलन चीनच्या घशात जात होतं आणि ब्रिटीश अर्थव्यवस्था कठीण काळाला तोंड देत होती.

त्यामुळेच ब्रिटीश अशा वस्तूच्या शोधात होते जी चीन त्यांच्याकडून चहाच्या प्रमाणात खरेदी करेल आणि अफूच्या रुपात ती वस्तू त्यांना सापडली.

ईस्ट इंडिया कंपनीची सर्वात मोठी वसाहत हिंदुस्थान होता, जिथं अफूचं पिक मुबलक प्रमाणात घेतलं जात होतं.  माळव्यात अफूचं पिक उत्पादन करुन मुंबई मधून चीनमध्ये आयात केलं जात होतं.

भारतातून एक माणूस अफू निर्यात करायचा आणि त्या व्यापारावरच तो गडगंज श्रीमंत झाला त्याचं नाव होतं जमशेतजी जीजीभाॅय!

 

 

जमशेदजींची पहीली व्यापारी पेढी तीन वेगवेगळ्या जातीच्या लोकांबरोबर चालू केली होती. त्यातील एक होते, मोतीचंद अमीचंद.

हे जैन समाजाचे होते आणि माळव्यातील अफू उत्पादकांसोबत त्यांचे चांगले लागेबांधे होते. दुसरे महंमद अली रोगे हे कोकणी मुस्लीम होते.

ज्यांचे पोर्तुगीज अधिकारी लोकांशी फार सलोख्याचे संबंध होते.

आपल्या वयाच्या चाळीशीत जीजीभाॅयनी दोन कोटींची माया गोळा केली होती. हिंदुस्थानच्या मोजक्या अतिश्रीमंत लोकांत त्यांची गणना होत होती. पण त्यांचं हे ध्येय कधीच नव्हतं.

जमशेटजी जीजीभाॅय यांच्या आयुष्याची विभागणी दोन भागात केली आहे.

पहील्या भागात ते रोमहर्षक आणि साहसी आयुष्य जगले होते. आणि दुसऱ्या भागात अतिशय कमी वयात सामाजिक कार्य करणारा एक महान मनुष्य ठरले होते.‌

हा काही योगायोग नव्हता की अपघातही नव्हता.

हे त्यांनी समजून उमजून आणि व्यवस्थित पध्दतशीर योजना आखून केलेलं काम होतं.

आपल्या महत्वाकांक्षेला एक निश्चीत आराखडा आखून त्यांनी आपलं एक विशिष्ट स्थान बनवलं जिथं सहजासहजी कुणीही सामान्य माणूस पोहोचणं अशक्य होतं.

 

 

जमशेटजी जीजीभाॅय यांच्या आयुष्यातील दुसरा टप्पा फारच मनोज्ञ आहे. त्यांचा थोरला मुलगा कुरसेटजी मोठा झाल्यावर त्यांनी आपलं लक्ष व्यापारातून काढून सामाजिक कार्यात सहभागी व्हायला सुरु केलं.

ज्या अफूच्या धंद्याला ते फायद्याची शिडी समजत होते ती त्यांनी आता व्यापारी वस्तू म्हणून पहायला सुरुवात केली. अफूच्या व्यापारापासून त्यांनी लांब राहणं पसंत केलं.

त्यांना आता पैशाची नाही तर लोकांमध्ये असलेल्या आपल्या प्रतिमेची काळजी होती.

जमशेटजी जीजीभाॅय यांना सामाजिक कार्य हा फार मोठा रस्ता होता जो त्यांचं नांव कायम तळपत ठेवणार होता. याच हेतूने त्यांनी आपलं बरंचसं धन दान करुन टाकलं.

१८५५ मध्ये जेंव्हा त्यांचं व्यापारी साम्राज्य विस्तारलं होतं तेंव्हा त्यांनी २४ कोटी रुपयांचा निधी दान केला.

त्यांच्या दातृत्वाची साक्ष आजही पुण्यातील पाणीपुरवठा आणि मुंबईतील जे.जे. काॅलेज आॅफ आर्ट्स, जे.जे.हाॅस्पीटल देतात. जे.जे. हाॅस्पीटल स्थापन करताना जाॅन लुकवेल किपलिंग यांची फार मदत झाली.

 

 

या हाॅस्पीटलच्या उभारणीमध्ये पैसा आणि जागा दोन्ही सढळ हाताने दिलं जीजीभाॅयनी.

त्यावेळी त्यांची इच्छा होती की हाॅस्पीटलमध्ये जातीनुसार कामे केली जावीत पण ब्रिटीश सरकारने यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे त्यांनी आपला सगळा हट्ट मागे घेतला पण काही बाबतीत मात्र ते बधले नाहीत.

ब्राह्मण लोकांना वेगळं स्वयंपाकघर वगैरे त्यांनी केलं.

त्यांच्या या दानधर्मामुळं त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरली. सन १८३४ मध्ये त्यांना भारताचा पहिला शांती न्यायदाता म्हणून ब्रिटिशांनी निवडलं. १८४२ मध्ये सर या पदवीनं त्यांना गौरवण्यात आलं.

सन १८५६ मध्ये त्यांनी केलेल्या भरीव सामाजिक कार्याबद्दल त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

इलस्ट्रेटेड लंडन न्यूजपेपरमध्ये मुखपृष्ठावर उल्लेखनीय बातमी छापली होती. १८५७ मध्ये व्हिक्टोरीया राणीने त्यांना First Baronet of India हा पुरस्कार दिला. हा सरच्या तोडीचा बहुमान होता.

जमशेटजींच्या प्रेरणेतून पारसी लोकांनी ४०० शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांना मदत केली.

जमशेटजी जीजीभाॅय यांच्यामुळे कितीतरी लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस आले. आज जीजीभाॅयना जाऊन १६० वर्षं झाली आहेत पण आजही ते समाजात आदर्श बनून राहिले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version