आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे लोटली आहेत. तथापि १० वर्षांपूर्वी झाले ते जणू काही कालच घडले आहे, असे जे लोक या हिंसेला सामोरे गेले त्यांना वाटते. या क्रूर घटनेचे ते साक्षीदार बनले होते आणि यात कोणी आपल्या जवळच्या लोकांना गमावले होते तर कोणाला आयुष्यभर जखमांची साथ लाभली.
काही असे आहेत, त्यांच्या जखमा बरे झाल्या तरीसुद्धा त्या दिवसाच्या मानसिक धक्क्यामुळे ते अद्यापही सावरले नाहीत.
आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे रेल्वे स्थानक हे २६/११ च्या हल्ल्यात भक्ष्य ठरले होते.
सर्वात मोठी जिवीतहानी इथेच झाली होती. एकूण झालेल्या हल्ल्यांपैकी हा तिसरा हल्ला होता. इस्माईल खान आणि मोहम्मद अजमल कसाब हे टॅक्सीने या ठिकाणी पोहोचले आणि या ठिकाणी आल्यावर शौचालयात जाऊन त्यांनी आपली शस्त्रे बाहेर काढली आणि सज्ज केली.
बाहेर आल्यावर आधी त्यांनी ग्रेनेड फेकले आणि मग अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली.
या हल्ल्याचे काही साक्षीदार आहेत ज्यांनी दहा वर्षांनंतर पुन्हा त्या नकोश्या आठवणी जागवल्या.
तो कुत्सितपणे हसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता. तो अजमल कसाब होता: देविका रोटावाना,
कसाबविरूद्ध साक्ष देण्यासाठी पुढे आलेली सर्वात तरुण साक्षीदार.
देविका ९ वर्षांची होती जेव्हा सीएसटी (आता सीएसएमटी )रेल्वे स्थानकावर अतिरेक्यांनी भयंकर हल्ला केला. यात तिच्या उजव्या पायाला गोळी लागली. टी सांगते, “मी बांद्रयाहून सीएसएमटी माझ्या वडिलांसोबत पुण्याला जाण्यासाठी आले होते. आम्ही सर्वजण फलाट क्रमांक १२वर आमच्या एक्सप्रेस ट्रेनची वाट पाहत होतो.
माझा भाऊ शौचालयात गेला होता आणि अचानक अचानक गोळीबार सुरू झाला. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने एकाच गोंधळ उडाला होता. प्रत्येक जण ओरडत पळत होता.
माझ्या वडिलांनी माझे हात धरले आणि इतर सर्व जणांसारखेच, आम्हा दोघांचे जीव वाचवण्यासाठी ते आडोसा शोधू लागले. मग त्या क्षणी, मला जाणवले की काहीतरी माझ्या पायाला लागले आहे आणि मला गंभीर त्रास होऊ लागला.
मी जमिनीवर पडले. तिथून पुढे अतिरेक्यांनी दाखवलेली क्रूरता सर्वांना ज्ञात आहे.
आता मी जिथे राहते तिथे लोक मला कसाब वाली लडकी, म्हणतात: देविका
“तुम्ही इथे येऊन २६/११ च्या हल्ल्यातील मुलगी” असे कोणासही विचारा, ते तुम्हाला माझ्याकडे घेऊन येतील, असेही तिने सांगितले. ते दिवस कसे होते आणि तिच्या कुटुंबाचे आयुष्य कसे बदलले हे सांगताना देविका सांगते,
“माझा उपचार चालू असताना माझा भाऊ माझ्याबरोबर होता. माझी शुश्रूषा तोच करत होता. त्याने शुश्रूषा करतांना ग्लोव्हज घातले नाही परिणामी त्याला संसर्ग झाला त्याच्या गळ्यात त्याला त्रास होऊ लागला.
आम्ही गरीब आहोत. माझ्यामुळे माझ्या भावाला यामुळे कायमचा रोग मिळाला. “एकदा देविकाची तब्येत सुधारली, तेव्हा कुटुंब राजस्थानला हलले. पण एके दिवशी त्यांना मुंबई पोलिसांकडून फोन आला.
“त्यांनी वडिलांना विचारले, देविकाने कसाबला पाहिले होते, ही साक्ष द्यायला ती येईल का? आम्ही कसाबला शिक्षा होण्यासाठी साक्ष दिली पाहिजे, असा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्या पायावर झालेले घाव अजूनही बरे झाले नव्हते. मी कुबड्या घेऊनच न्यायालयात गेले.
न्यायालयात कसाब न्यायाधीशांजवळ बसला होता, मी पाहिले आणि ताबडतोब त्याला ओळखले, “ती म्हणाली.”दहा वर्षे गेली आहेत. तरीसुद्धा, जेव्हा मी या घटनेकडे मागे वळून पाहते, तेव्हा त्या घटना माझ्या स्मृतीमध्ये अजूनही तशाच आहेत.
स्थानकाजवळ पोलिसांच्या दोन तुकड्या उपस्थित होत्या, परंतु त्यांनी काहीही केले नाही: सेबस्टियन डी’सुझा,
कसाबची प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारा छायाचित्रकार
“स्थानकाजवळ असणाऱ्या पोलिसांनी कसाब आणि इतर दहशतवाद्यांना ठार केले असते तर कित्येक जण वाचले असते,” असे सेबॅस्टियन डिसूझा उर्फ सबी यांनी सांगितले.
कसाबच्या क्लोज-अप फोटोसाठी सेबॅस्टियन डी’सुझा यांनी वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड जिंकला आहे.
“मी छायाचित्र काढण्यासाठी प्रयत्नात असतांना पहिल्यांदा रेल्वेच्या एका डब्यात गेलो, परंतु मला एक चांगला अँगल मिळाला नाही म्हणून दुसऱ्या डब्यात शिरलो आणि दहशहतवादी येतील याची वाट पाहत होतो, मला वाटतं, मी छायाचित्र घेत असतांना त्यांनी मला पाहिलं, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.”
“मी त्या रात्री काय केले ते मला आठवत नाही.” हा घटनाक्रम जुन्या चित्रपटासारखा आहे जो मला माझ्या स्मृतीपटलांमधून हटवायचा आहे, अशी भावना सेबॅस्टियन डिसूझा व्यक्त करतात.
अजमल कसाब व्हिडिओ गेम खेळणाऱ्या महाविद्यालयीन मुलासारखा प्रवाशांवर गोळीबार करत असतांना दिसला: बबलू कुमार दीपक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरच्या टर्मिनसवर बबलू कुमार दीपक रेल्वे उद्घोषक होते. स्टेशनवरील भयानक दहशतवादी हल्ल्याचे ते एक साक्षीदार आहेत.
स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून दीपक यांनी संपूर्ण घटना पाहिली आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती. ही घटना रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी घडली आणि १० वाजून ०१ मिनिटांनी नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळाली.
खरं तर बबलू कुमार दीपक हे भायखळा स्थानकावर कार्यरत होते, पण छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने त्यांना तिथे जाण्याचे सांगण्यात आले.
दुपारी आपली भायखळा स्थानकावरचे आपले कर्तव्य बजावून ते सीएसएमटी स्थानकावर आले.
“रात्री ९:३० च्या दरम्यान सागर एक्सप्रेस (मुंबई -हैद्राबाद) नुकतीच रवाना झाली होती आणि मुंबई – पुणे दरम्यान इंद्रायणी एक्स्प्रेस नुकतीच फलाटावर आली होती आणि मला फलाट क्रमांक १३ वरून मोठ्याने स्फोट झाल्याचा आवाज आला.
त्यानंतर बाहेरच्या फलाटावर संपूर्ण गोंधळ उडाला. मी लोकांना माझ्यासमोर खाली पडतांना पाहिले” कसाब कुत्सितपणे हसत होता आणि गोळीबार करत होता. दीपक सांगतात.
मोठ्याने आवाज झाला की बबलू कुमार दीपक अजूनही घाबरतात. फटाक्यांचा आवाज सुद्धा मला अस्वस्थ करून जातो कारण ते दहशतवादी हल्ल्याची आठवणी परत आणतात.
दीपक यांनी सांगितले की, “मी स्फोट झाल्यामुळे लोकांना फलाट क्रमांक १३ पासून दूर रहा असे सांगू लागलो.”
“मला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात राहिली होती की दहशतवादी गोळीबार करीत होते आणि तिथे असलेले हमाल बांधव जखमींना त्यांच्या जीवाला धोक्यात घालून जखमींना वाचवत होते. कसाबचा तो क्रूर चेहरा अजूनही माझ्या स्मृतीत ताजा आहे.”
मध्य रेल्वेने दीपक यांना बहादुर पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि सध्या ते भायखळा येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ लिपिक आहे.
एक दशक उलटल्यानंतर देखील २६/११ चा हल्ला अतिरेक्यांच्या निष्ठुर कृत्यामुळे या प्रत्यक्षदर्शींना सुन्न करून जातो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.