Site icon InMarathi

लैंगिक स्वातंत्र्य, नेपोटीजम, धार्मिक-जातीय द्वेष या कोषातून हिंदी सिनेमा कधी बाहेर पडणार?

bollywood movies IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

सध्याचे बॉलिवूड सिनेमे आणि त्यांची हाताळणी बघता हिंदी चित्रपटसृष्टि त्यांच्या कोषातून कधीच बाहेर पडणार नाही असंच प्रकर्षाने जाणवतंय. ज्यापद्धतीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीने एकहाती बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे ते बघता येणारा काळ हा हिंदी चित्रपटांसाठी बराच कठीण जाणार आहे हे निश्चित!

खरंतर बऱ्याच लोकांना ‘बॉलिवूड’ या नावाने चीड येते त्यामुळे आपण हिंदी चित्रपटसृष्टि असा उल्लेखच करुयात. पण या चित्रपटसृष्टीच कुरूप बॉलिवूडमध्ये रूपांतर करण्यासाठी या इंडस्ट्रीत काम करणारे कलाकारच जबाबदार आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

८३ सारखा बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होऊनसुद्धा अवघ्या काही दिवसात अल्लू अर्जुनच्या पुष्पाने त्याची दांडी गूल केली, ८३ हा सिनेमा म्हणून उत्तम आहेच पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात त्या सिनेमाला यश लाभलं नाही.

 

 

केवळ सिनेमागृहच नाही तर ओटीटीवरसुद्धा साऊथच्या सिनेमांचीच चर्चा होताना दिसत आहे. द ग्रेट इंडियन किचन, दृश्यम २, पासून ते अगदी ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या जय भीमपर्यंत सगळीकडे साऊथचे सिनेमेच आपल्याला पुढे दिसतील.

हिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण नुसती आशाच उराशी बाळगून आहोत.

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या प्रकर्षाने उणीव भासते ती उत्तम लेखकांची. काही हातावर मोजण्याइतके काही लेखक दिग्दर्शक आहेत, पण या इंडस्ट्रीमधली कंपूशाही त्यांना पुढे येउच देत नाही हेदेखील तेवढंच सत्य आहे.

बरं बायोपीक, रिमेक करून मन भरलं की लगेच ही लोकं त्यांचा मोर्चा त्यांच्या आवडत्या विषयांकडे वळवतात. लग्नबाह्य संबंध, sexual liberation, असे विषय हाताळून समाजातील एका मोठ्या घटकाला व्हिलन बनवण्यात यांची बाकीची शक्ति खर्ची होते.

 

 

हिंदी चित्रपटसृष्टी ज्यापद्धतीने त्यांची मतं लोकांवर लादते आणि इतरांना त्यांची मतं मांडू द्यायची संधी देत नाही त्याचा आता खरंच कंटाळा यायला लागला आहे म्हणूनच प्रेक्षकसुद्धा हिंदी सिनेमापासून लांब जाऊ लागला आहे.

दीपिका पदूकोणचा आगामी सिनेमासुद्धा अशाच विषयावर अतिशय उथळपणे भाष्य करणारा असून त्यातून फक्त याच सगळ्या गोष्टी प्रमोट केल्या जाणार आहेत हे आपल्याला त्याच्या ट्रेलरवरून जाणवतं आहेच.

नुकताच ‘बधाई हो’ फ्रेंचाइजमधला ‘बधाई दो’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यातसुद्धा हाच सगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आहे. सिनेमातली मुख्य नायिका ही लेसबीयन असून तिच्या भोवती हे कथानक फिरताना दिसतंय!

 

समाज अजूनही कसा याकडे tabboo म्हणून बघतोय, समाजाची मानसिकता किती वाईट आहे आणि हे असं आयुष्य जगणं म्हणजेच सगळंकाही हा असा एक प्रकारचा छुपा अजेंडा यातून प्रमोट करण्यात येतोय हे तर दिसतंच आहे.

आयुष्यमानच्या शुभ मंगल सावधानसारख्या सिनेमातसुद्धा असाच मुद्दा उचलला होता, नुकत्याच हॉटस्टारच्या humans या सिरीजमध्येसुद्धा अत्यंत निर्लज्जपणे असाच अजेंडा रेटण्यात आला आहे.

सोनम कपूरच्या ‘एक लडकी को देखा तो’ या सिनेमातूनसुद्धा आपल्यासमोर असंच चित्र तयार करण्यात आलं होतं. या अशा सिनेमातून भारतीय समाज किती मागासलेला आहे, त्यांची संस्कृति, कौटुंबिक मूल्यं हे सगळं किती थोतांड आहे हेच दाखवण्यावर सिनेमाच्या मेकर्सचा भर असतो!

आणि या अशा गंभीर विषयांना खास कॉमेडी टच देऊन लोकांपुढे का सादर केलं जातं हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे? भारतीय प्रेक्षक यापेक्षाही गंभीर विषय तितक्याच गंभीरतेने स्वीकारतो त्यामुळे यात उगाच मनोरंजनासाठी विनोदाच्या कुबड्या घेणं मलातरी पटत नाही!

 

 

खरंतर sexual liberation च्या कुबड्या घेऊन स्वतःचा propaganda सिद्ध करू पाहणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीला हे कधीच समजणार नाही कारण सध्या त्यांच्याकडे कंटेंट काहीच नाहीये.

या अशा गंभीर विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमात करणाऱ्या अभिनेत्यांचं तर मला फारच आश्चर्य वाटतं ते अशासाठी की हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये यांचं स्थान इथवरच आहे.

कोणताही मोठा बिग बजेट प्रोजेक्ट उचलून बघा त्यात तुम्हाला क्वचितच राजकुमार राव, आयुष्यमान खुरानासारखे कलाकार बघायला मिळतील. कारण यांना अशाच एक्सपेरीमेन्टल फिल्म्ससाठीच इंडस्ट्रीत वापरलं जातं.

 

 

नवाजूद्दीन, इरफान, मनोज वाजपेयीसारखे काही हातावर मोजण्याइतकेच लोकं स्वतःचं स्थान निर्माण करू शकतात, बाकी आयुष्यमान, राजकुमारसारखे अभिनेते हे असे सिनेमे करून करून त्याच साच्यात फिट बसतात!

फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की या कलाकारांना त्याचं काही सोयर सूतक नसतं, याचे सिनेमे फक्त काही बुद्धीजीवी क्रिटीक बघतात, त्यांचं तोंडभरून कौतुक करतात, बाकी देशातली अर्ध्याहून अधिक जनता यांच्या सिनेमाशी कनेक्ट होऊच शकत नाही, आणि यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टि आणि प्रेक्षक यांच्यातली दर दिवसागणिक वाढतच चालली आहे.

दाक्षिणात्य सिनेमे हे यांच्या संस्कृतिशी जोडलेले असतात आणि ही गोष्ट पदोपदी सिद्ध झालं आहे त्यामुळे अगदी उच्चभ्रू लोकांपासून तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांचे सिनेमे पोहोचतात, कौतुक होतं आणि ते छप्परफाड कमाईसुद्धा करतात!

 

 

असं नाही की हिंदीमध्ये हे सगळं शक्य नाही, हीसुद्धा एक फेज आहे आणि हे दिवससुद्धा जातील, पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांचा डंका वाजेल, पण नेपोटीजम, sexual liberation, जातीय द्वेष, धार्मिक अजेंडा या कोषातून हिंदी सिनेइंडस्ट्री बाहेर पडायला हवी!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version