Site icon InMarathi

प्रत्यक्ष आयुष्यात हलाखी, दुःख झेलूनही पडद्यावर मात्र सर्वांना हसवणारी ‘टुनटुन’

actress tuntun inmarathi feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आईबापाविना वाढलेली पोर.. आजूबाजूला फक्त नातेवाईकांचाच आधार.. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…निराशेत न जाता ती घरातून पळाली आणि पोहोचली थेट ‘मायानगरी मुंबईत’. यानंतर तिने कधीच मागे वळून नाही पाहिलं. लोकांना खळखळून हसवलं आणि सगळ्यांची लाडकी ‘टुनटुन’ झाली.

 

 

आजच्या पिढीला हे नाव कदाचित माहित नसावं, पण ‘टुनटुन’ या नावाने एका संपूर्ण पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. हे नाव ऐकलं, की चेहऱ्यावर आपसूकच एक स्मितहास्य येतं आणि मन त्या काळात ओढलं जातं.

तुम्हाला कळलं असेलच, हे नाव म्हणजेच अभिनेत्री उमा देवी अर्थात ‘टुनटुन’. या अभिनेत्रीचा आज स्मृतिदिन. बघूया त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी, किस्से आणि बरंच काही..

घरातून पळून गाठली मुंबई..

 

 

‘टुनटुन’ यांचं खरं नाव उमा देवी खत्री. त्यांचा जन्म युपीमधल्या एका गावात ११ जुलै १९२३ मध्ये झाला. जन्म झाल्या झाल्याच त्यांच्या आईने जगाचा निरोप घेतला. पुढे त्यांच्या वडिलांचीही हत्या झाली. आईबापाविना पोरकी झालेली पोर.. वयही लहान होतं. कुठे बघणार होती? कोणाकडे जाणार होती? सगळीच संकटं आ वासून समोर उभी होती.

उमाच्या काकांनी तिला सांभाळलं. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मुलीला संगीताची भयंकर आवड. घरातली सगळी कामं करून ही लहानशी पोर रेडिओवर गाणी ऐकत असे. जमेल तसा रियाज करत असे.

तिचा आवाज सुरेल होताच, दैवी देणगीच जणू. आवाजाने आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होत असे, सगळेजणं तिच्या आवाजाचं कौतुक करत. मनोमनी त्यांनी प्रसिद्ध गायिका होण्याचं स्वप्न रंगवलं होतं.

 

 

पण त्याकाळी मुलींच्या शिक्षणाचीच वा न वा होती, गाणं- रियाज या सगळ्या गोष्टी खूप लांबच्या होत्या, पण शेवटी ज्या गोष्टी विधिलिखित असतात त्या घडतातच. त्यांच्या नशिबात चंदेरी दुनियेत चमकणं होतं, त्यानुसार ते झालंच. त्यांची एक मैत्रीण मुंबईहून गावाला आली होती. त्यांच्यासोबत त्या मुंबईत निघून आल्या.

नौशादजी आणि ‘समुद्रात उडी मारेन’ ही धमकी… 

मुंबईत आल्यानंतर त्या थेट नौशादजींच्या बंगल्यावर पोहोचल्या. तिथे गेल्यावर जोरजोरात दरवाजा ठोकून त्या म्हणाल्या, की ‘तुम्ही मला गाण्याची संधी दिली नाहीत, तर मी समुद्रात उडी मारेन’. नौशादजींनी त्यांच्या आवाजाची एक छोटी चाचणी घेतली आणि गाण्यासाठी हिरवा कंदील दिला.

पहिला ब्रेक 

 

‘वामिक अजरा’ या चित्रपटासाठी त्यांनी आपला आवाज दिला. ‘अफसाना लिख रही हूं’, ‘आज मची है धूम’ या त्यांच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावायचं बाकी ठेवलं, पण पुढे त्यांच्या गायकीला उतरती कळा लागली.

गाणं बंद झाल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांना सतावत होता, पण यावेळीही नौशादजी त्यांच्या मदतीला धावून आले. नौशादजींनी त्यांना सांगितलं, की तुम्ही अभिनय ट्राय करा, पण तिथे उमा देवींनी एक अट ठेवली. ‘दिलीप कुमार असतील त्याच चित्रपटात मी काम करेन’ असं त्यांचं म्हणणं होतं.

१९५० साली आलेल्या ‘बाबुल’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. अर्थात, दिलीप कुमार सोबत होतेच. त्याकाळच्या सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं. ‘एक पहेली’, ‘उपासना’, ‘गरम मसाला’, ‘अपराध’, ‘आंखों आंखों में’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. त्यांनी जवळपास २०० हून अधिक चित्रपट केले.

हलाखीच्या परिस्थितीतून येऊन त्यांनी ज्याप्रकारे जगाला हसवलं, त्याला तोड नाही. आज त्या आपल्यात नसल्या, तरीही त्यांच्या अभिनयाने, सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात नक्कीच आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved 

Exit mobile version