Site icon InMarathi

ऑनस्क्रीन आलेल्या या ८ जोड्यांना लोकांनी ‘जोडे’ मारायचेच बाकी ठेवले होते!

bollywood pairs inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सर्वसाधारण चित्रपट म्हटलं की एक हिरो आला, एक हिरोईन आली, त्यांची प्रेमकहाणी आली, त्यांच्या एकत्र येण्यात खलनायकाने आणलेले अडथळे आले आणि मग त्या अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर नायक नायिका एकत्र येतात आणि शेवट गोड होतो. ह्या कच्च्या मसुद्यावर आधारित शेकडो चित्रपट सगळ्या भाषांमध्ये येऊन गेले.

एखाद्या चित्रपटात नायक नायिकेची जोडी इतकी परफेक्ट असते की लोक त्या जोडीला अक्षरश: डोक्यावर घेतात आणि मग त्याच जोडीचे अनेक हिट चित्रपट येतात कारण त्यांच्यातील केमिस्ट्री चांगली असते. बॉलिवूडमध्ये अश्या अनेक जोड्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत.

राज कपूर – नर्गिस, दिलीप कुमार – वैजयंतीमालापासून आमिर खान – जुही चावला, माधुरी दीक्षित – अनिल कपूर , शाहरुख खान – काजोलपर्यंत या जोड्या लोकांनी डोक्यावर घेतल्या.

 

 

परंतु कधी कधी हे गणित चुकते. दिग्दर्शक आणि निर्माते काही प्रयोग करायला जातात आणि त्यांचे हे प्रयोग सपशेल फसतात.

एखादा यशस्वी अभिनेता आणि यशस्वी अभिनेत्री यांना जोडी म्हणून ते चित्रपटातून रसिकांसमोर आणतात. पण मुळात त्या जोडीत काहीच केमिस्ट्री नसल्याने त्यांची जादू रसिकांवर चालू शकत नाही आणि चित्रपट चांगलाच आपटतो.

बघूया अशाच १० जोड्या ज्या दर्शकांच्या अजिबातच पचनी पडल्या नाहीत.

१. शाहिद कपूर आणि विद्या बालन :

 

 

शाहिद कपूर आणि विद्या बालन हे दोघेही अत्यंत गुणी अभिनेते – अभिनेत्री आहेत. त्यांच्या सिंगल चित्रपटांत त्यांनी रसिकांचे मन जिंकले आहे. विद्या बालनने तर अनेक पात्रे खूप सुंदर प्रकारे रसिकांच्या डोळ्यांपुढे रंगवली आहेत.

‘किस्मत कनेक्शन’ ह्या चित्रपटात मात्र त्यांची एकत्रित जादू काही चालली नाही. त्यांच्यातली केमिस्ट्री संपूर्ण चित्रपटात कुठेच दिसली नाही. किंबहुना विद्या आणि शाहिद ह्यांच्या वयातील अंतर हे चित्रपटात चांगलेच उठून दिसत होते अशीच चर्चा तेव्हा झाली.

२. रणबीर कपूर आणि सोनम कपूर :

 

 

रणबीर कपूर आणि सोनम कपूर हे स्टार किड्स आहेत. लहानपणापासूनच त्यांची ओळख आणि मैत्री आहे. त्यामुळे त्यांना एकत्र लाँच करण्याचा निर्णय संजय लीला भन्साळीयांनी घेतला. त्यांच्या “सावरिया” या चित्रपटाची तेव्हा खूप चर्चा रंगली होती. या चित्रपटासाठी भन्साळींनी कंबर कसून मेहनत घेतली होती.

चित्रपटातील गाणी खूप सुंदर होती आणि ती रसिकांना आवडली सुद्धा होती. पण चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.

टॉवेलमध्ये नाचणाऱ्या रणबीर कपूरची जादूसुद्धा चित्रपटाला तारू शकली नाही. लोकांना रणबीर-सोनम ही जोडी काही रुचली नाही. हा चित्रपट म्हणजे भन्साळींसाठी दु:स्वप्न ठरले.

३. आमिर खान आणि ट्विंकल खन्ना :

 

 

आमिर खान आपल्या चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण कधीकाळी त्यानेही टिपिकल मसाला बॉलिवूड चित्रपट केले आहेत. त्याचा ‘मेला’ चित्रपट म्हणजे टिपिकल मसाला बॉलिवूड चित्रपट आहे.

यशस्वी आईवडिलांची मुलगी असूनदेखील ट्विंकल खन्नाला तसेही बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळत नव्हते. त्यातून आमिर खान, फैजल खान यांच्याबरोबर चित्रपट केल्याने तरी चित्रपट यशस्वी होईल असे तिला वाटले असावे पण तसे काही घडले नाही.

४. शाजान पद्मसी – अजय देवगण :

 

 

शाजान पद्मसी – अजय देवगण या दोघांची जोडी ‘दिल तो बच्चा है जी’ या चित्रपटात दिसली होती. बॉस असलेला अजय देवगण स्वतःहून खूप लहान असलेल्या त्याच्या एम्प्लॉईच्या प्रेमात पडतो. अशी ह्या चित्रपटाची कथा होती. हे कथानक लोकांना आवडले नाही आणि ही जोडीही प्रेक्षकांना आवडली नाही.

५. अभिषेक बच्चन – दीपिका पदुकोण :

 

 

‘खेलें हम जी जान से’ ह्या आशुतोष गोवारीकरच्या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि दीपिका पदुकोण ही जोडी होती. चित्रपटाचा विषय खरं तर चांगला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान असणाऱ्या १९३० च्या चित्तगॉंग विद्रोहावर हा चित्रपट होता. मानिनी चॅटर्जी ह्यांच्या “डू ऑर डाय” या पुस्तकावर आधारित ह्या चित्रपटाचे कथानक होते.

यात अभिषेक बच्चनने क्रांतिकारक सूर्य सेन यांची भूमिका साकारली होती तर दीपिका पदुकोणने क्रांतिकारक कल्पना दत्तची भूमिका केली होती.

चित्रपटाची मांडणी म्हणावी तशी प्रभावी झाली नाही आणि हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. लोकांवर अभिषेक बच्चन आणि दीपिका पदुकोण ह्यांचा एकत्रित प्रभाव पडू शकला नाही.

६. शाहिद कापूर – आलिया भट्ट :

 

 

आलिया भट्टचे अनेक चाहते आहेत. शाहिद कपूर सुद्धा लोकांना आवडतो. पण ‘शानदार’ चित्रपटात हे दोघे एकत्र आलेले लोकांना काही फारसे आवडले नाहीत. या दोघांची काहीच केमिस्ट्री पडद्यावर दिसली नाही आणि चित्रपटही अयशस्वी झाला.

७. इम्रान खान आणि करीना कपूर :

 

 

इम्रान खान आणि करीना कपूर यांच्या वयात बरेच अंतर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मोठ्या पडद्यावर तर हे अंतर विशेष जाणवले. या दोघांचा “गोरी तेरे प्यार में” हा चित्रपट आला होता.

या चित्रपटात इम्रान खान करीना कपूरसमोर तिच्या लहान भावाप्रमाणे दिसत होता. त्यामुळे त्यांच्यात काही रोमँटिक केमिस्ट्री दिसणे अशक्यप्राय होते. म्हणूनच लोकांनी ही जोडी देखील नाकारली.

एकापाठोपाठ एक चित्रपट अपयशी झाल्यामुळे इम्रान खानने बॉलिवूडमधून जवळजवळ संन्यास घेतल्यात जमा आहे.

८. प्रियांका चोप्रा आणि उदय चोप्रा :

 

 

आडनाव एक असले तरी केमिस्ट्री असेलच असे नाही. याचे उदाहरण म्हणजे प्रियांका चोप्रा आणि उदय चोप्राचा ‘प्यार इम्पॉसिबल’ हा चित्रपट होय. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच या दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री दिसणे अशक्य होते.

म्हणूनच दर्शकांनी हा चित्रपट मनापासून नाकारला. आणि परत ही जोडी कधीच कुठल्या चित्रपटात एकत्र दिसली नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version