Site icon InMarathi

त्याने अभिनेत्रीच्या वेषात सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आणि बनला बॉलिवूडचा जम्पिंग जॅक!

jeetendra featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बॉलीवूडमधील ‘चिरतरुण’ व्यक्तींची यादी केली तर त्यामध्ये अवघे ७९ वयोमान असलेल्या ‘जितेंद्र’चं नाव अग्रक्रमी घ्यावं लागेल. अभिनयातील साधेपण, विशिष्ठ पद्धतीने, उड्या मारत नृत्य करण्याची पद्धत यामुळे जितेंद्र लोकांना नेहमीच आवडले.

‘ढल गया दिन, हो गयी शाम…’, ‘तोफा, तोफा..’, ‘नैनो मे सपना…’ सारखी गाणी तर आपण जितेंद्र यांच्या डान्स करण्याची पद्धत बघण्यासाठीच वारंवार बघत असतो असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

 

 

अमिताभ बच्चन, विनोद खन्नासारखे कलाकार बॉलीवूडमध्ये प्रस्थापित झालेले असताना जितेंद्रने कोणताही वारसा नसताना या क्षेत्रात आपल्या मेहनतीने कमावलेलं यश हे कौतुकास्पद आहे.

हिंदी सिनेमांमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त काम करणाऱ्या या कलाकाराच्या बॉलीवूड करिअरची सुरुवात ही व्ही. शांताराम या मराठी माणसाने दिगदर्शीत केलेल्या ‘नवरंग’ सिनेमातून झाली आहे हे फार कमी जणांना माहीत असेल.

छोट्या पडद्यावर स्त्री पात्रांवर केंद्रित असलेल्या ‘एकता कपूर’चे वडील जितेंद्र यांनी स्वतः मोठ्या पडद्यावर स्त्री पात्र साकारलं होतं ही कमालीची बाब आहे.

जितेंद्र यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली? जाणून घेऊयात :

जितेंद्र यांचा जन्म ४ एप्रिल १९५९ रोजी अमृतसर येथे झाला होता. त्यांचं मूळ नाव रवी कपूर हे आहे. त्यांचे वडील अमरनाथ कपूर हे बॉलीवूड ला ‘आर्टिफिशियल ज्वेलरी’ पुरवठा करणारे व्यवसायिक होते.

जितेंद्र यांनी आपलं शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं होतं. शालेय शिक्षणापासूनच राजेश खन्ना हे त्यांचे जवळचे मित्र होते. २०० सिनेमातून आपल्या अभिनयाची कला सादर करणारे जितेंद्र हे त्यांच्या ‘पांढरा टी शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पांढरे बुट’ या ‘मस्त बहारो का मै आशिक’ गाण्यात परिधान केलेल्या पोशाखामुळे नेहमीच ओळखले जातात.

 

 

जया प्रदा आणि श्रीदेवी सोबत त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली. पहिलं काम मिळण्यासाठी जितेंद्र यांना इतर कलाकारांसारख्या निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये चकरा माराव्या लागल्या नव्हत्या. त्यांचा संघर्ष जरा वेगळ्या प्रकारचा होता.

१९५९ मध्ये त्यांचे वडील अमरनाथ कपूर हे दिगदर्शक व्ही. शांताराम यांच्या सिनेमासाठी दागिने पुरवायचे. एके दिवशी त्यांनी व्ही. शांताराम यांना आपल्या मुलाला सेटवर येऊ देण्याची परवानगी मागितली.

 

 

आपल्या कामाबद्दल शिस्तबद्ध असलेले व्ही. शांताराम हे सेटवर कोण असावं आणि कोण असू नये याबद्दल नेहमीच सतर्क असायचे.

त्यांनी अमरनाथ कपूर यांना जितेंद्र यांना सेटवर आणण्यासाठी अशी एक अट ठेवली होती की, “तुमचा मुलगा जर सेटवर येणार असेल तर त्याला ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करावं लागेल.”

अमरनाथ कपूर यांनी ही अट मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी जितेंद्र यांना राजस्थान मध्ये सुरू असलेल्या ‘नवरंग’ च्या सेटवर पाठवण्याचं ठरलं.

‘तू छुपी है कहा…’ या गाण्यात संध्या यांचं स्त्री पात्र साकारण्याचं काम जितेंद्र यांना मिळालं होतं. सेटवर गाण्याचं शुटिंग करण्याआधीचा सराव सुरू झाला होता.

 

 

जितेंद्र हे रोज सेटवर जायचे आणि शुटिंग कसं चालते? त्यांचा रोल काय आहे? हे समजावून घेण्याचा प्रयत्न करायचे. सगळं सुरळीत सुरु होतं. पण, व्ही. शांताराम यांच्यावर प्रभाव पडण्याआधीच जितेंद्र यांनी एक अक्षम्य चूक करून ठेवली होती.

काय झालं होतं?

व्ही. शांताराम हे दिलेल्या वेळेचं काटेकोरपणे पालन करत असत. सिनेमाचं शुटिंग सुरू असताना जितेंद्र हे एका रात्री जेवणाच्या ठिकाणी उशिरा पोहोचले. व्ही. शांताराम यांना हे अजिबात पटलं नव्हतं.

त्यांनी सेटवरच्या लोकांना जितेंद्रला घरी पाठवून देण्यासाठी सांगितलं. व्ही. शांताराम यांनी लगोलग ‘मेकअप आर्टिस्ट’ला जितेंद्र यांना दुसऱ्या दिवशी तयार न करण्याचा आदेश देण्यात आले.

जितेंद्र यांनी झालेला प्रकार सांगण्यासाठी वडिलांना फोन केला. वडील आपल्याला समजावून घेतील अशी जितेंद्र यांची आशा होती. पण, वडिलांनी जितेंद्र यांचं म्हणणं अजिबात ऐकून घेतलं नाही आणि ते जितेंद्र यांना हाती आलेली संधी वाया घालवल्याबद्दल खूप रागावले.

आपलं करिअर घडण्याआधीच संपुष्टात येणार की काय या भीतीने रात्रभर जागेच राहिले. सकाळी ४ वाजता ते मेकअप दादाकडे गेले आणि रडत रडत त्यांना स्वतःला तयार करण्याची विनंती केली.

रोल नुसार तयार झाल्यानंतर जितेंद्र हे व्ही. शांताराम यांच्या खोलीसमोर जाऊन उभे राहिले. व्ही. शांताराम यांनी जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना जितेंद्र दिसले. जितेंद्र यांच्यावर झालेला मेकअप आणि त्यांना त्यांची कळलेली चूक बघून व्ही. शांताराम हे प्रभावित झाले. त्यांनी जितेंद्र यांना दुसरी संधी देण्याचं ठरवलं.

 

जितेंद्र यांनी हे तिथून पुढे नेहमीच व्ही. शांताराम यांना आपल्या कामातून प्रभावित करत गेले. जितेंद्र यांचं काम, शिस्त या कारणांमुळे व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना १९६३ मध्ये रिलीज झालेल्या सेहरामध्ये काम देण्याचं ठरवलं.

त्यानंतर १९६४ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीत गाया पत्थरोने’ मध्ये सुद्धा व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी दिली.

१९६७ मध्ये रिलीज झालेल्या ‘फर्ज’ या चौथ्या सिनेमानंतर जितेंद्र यांच्या करिअरची गाडी तिथून पुढे सुसाट धावायला लागली. येणाऱ्या काळात, आपल्याला मिळालेलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे करून जितेंद्र यांनी आपलं करिअर एका उंचीवर नेऊन ठेवलं.

 

 

हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल जितेंद्र यांना २००३ मध्ये ‘जीवनगौरव’ आणि २०१४ मध्ये सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version