Site icon InMarathi

भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव अभिनेता ज्याला उत्कृष्ट “अभिनेत्रीचा” पुरस्कार मिळाला!

nirmal pandey featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

एखाद्या पुरुष कलाकाराने स्त्री पात्राची भूमिका रंगमंचावर किंवा मोठ्या पडद्यावर साकारणं हे आपल्यासाठी नवीन नाहीये. ‘अशी ही बनवा बनवी’ या मराठी सिनेमात सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेले स्त्री पात्र हे मराठी सिनेमातील सर्वोत्तम प्रयोग म्हणता येतील.

पुरुष स्त्री पात्र करतांना वेशभूषा, केशभूषा करणाऱ्या सहकाऱ्यांचा सर्वात जास्त कस लागतो. हे लोक स्त्री पात्र उभं करतात आणि कलाकार ते पात्र जिवंत करतो.

 

 

ती मानसिकता अंगीकारणे, त्या आवाजात बोलणे, तसं वावरणे ही कला एका पुरुष कलाकाराचं कौतुक करण्यास भाग पाडणारी असते. टीव्ही शोज मधून विनोदी भूमिका साकारण्यासाठी उभं केलेलं स्त्री पात्रापेक्षा पूर्ण सिनेमात तसं वावरणं हे मोठं आव्हान आहे.

हे आव्हान लीलया पेलून एका हिंदी कलाकाराने चक्क आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकवला आहे. या गुणी कलाकाराचं नाव आहे ‘निर्मल पांडे’ आणि सिनेमा चं नाव होतं ‘दायरा’.

निर्मल पांडे यांनी सोनाली कुलकर्णी सोबत या सिनेमात साकारलेल्या स्त्री पात्रात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

निर्मल पांडे यांचा अभिनय इतका चांगला होता की, त्याची दखल फ्रांस फेस्टिवलने घेतली आणि ‘निर्मल पांडे’ यांना ‘सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीचा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

 

१९९७ मध्ये घडलेला हा विक्रम आजही अबाधित आहे. काय विषय होता ‘दायरा’चा? निर्मल पांडे यांना ही भूमिका कशी मिळाली? जाणून घेऊयात.

निर्मल पांडे यांचं नाव हे नेहमीच एक खलनायक म्हणून घेतलं जातं. सहा फूट उंची, लांब केस आणि भेदक नजर असलेले निर्मल हे त्यांच्या नजरेतून आणि आवाजातून सुद्धा अभिनय करायचे.

‘बँडिट क्वीन’ मध्ये विक्रम मल्लाह या डाकूचा रोल हा त्यांच्या करिअर मधील सर्वोत्कृष्ट रोल मानला जातो. ‘ट्रेन टू पाकिस्तान’ मधील त्यांच्या अभिनयाचंसुद्धा चित्रपट समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं.

बॉलीवूड मधील टिपिकल व्हिलन साकारण्यापेक्षा त्यांनी कलात्मक सिनेमात दमदार भूमिका साकारणं नेहमीच पसंत केलं.

अरबाज खानच्या मित्राची भूमिका असलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ मधील व्हिलनची छोटी भूमिकासुद्धा निर्मल यांनी प्रभावीपणे साकारली होती.

 

 

१० ऑगस्ट १९६२ रोजी नैनिताल येथे निर्मल पांडे यांचा जन्म झाला होता. अलमोरा येथे शालेय शिक्षण घेत असतांनाच निर्मल यांनी बॉलीवूड मध्ये अभिनेता होण्याचं स्वप्न बघितलं होतं. आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी निर्मल पांडे यांनी रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून सुरुवात केली.

अभिनयाचं वेड असल्याने निर्मल दिल्ली च्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रमा मध्ये भरती झाले. अलमोरा ते दिल्ली या प्रवासानंतर निर्मल पांडे हे नाव व्यवसायिक रंगभूमीवर प्रसिद्ध झालं होतं.

एनएसडीमध्ये सर्वोत्तम अभिनेता चा पुरस्कार मिळवळ्यानंतर निर्मल पांडे हे लंडनला गेले. लंडन स्थित ‘तारा थिएटर ग्रुप’ मध्ये काम करतांना निर्मल यांनी ‘हिर रांझा’, ‘अँटिजॉन’ यासारख्या १२५ नाटकांमध्ये काम केलं.

१९९६ मध्ये शेखर कपूर यांच्यासोबत निर्मल यांची झालेली भेट ही निर्मल पांडे यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. ‘बँडीट क्वीन’ मधील डाकू मल्ला च्या रोलसाठी त्यांनी मनोज वाजपेयी यांना फायनल केलं होतं.

पण, एका मित्राच्या सांगण्यावरून शेखर यांनी निर्मल पांडे यांचं काम बघितलं. त्यांना विक्रम मल्लाहच्या रोलचं निर्मल सोनं करतील असं वाटलं, आणि तसंच झालं. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

अमोल पालेकर हे त्या वेळी आपल्या आगामी ‘दायरा’ सिनेमासाठी एका सशक्त अभिनेत्याचा शोध घेत होते. निर्मल पांडे यांना ‘दायरा’ मध्ये ‘ट्रान्सवर्सटाईल’ म्हणजेच विरुद्धलिंगी व्यक्तीसारखं राहण्याची इच्छा असलेलं हे पात्र ऑफर करण्यात आलं होतं.

 

 

कोणताही संकोच न बाळगता निर्मल यांनी सोनाली कुलकर्णी सोबत हे पात्र मोठ्या पडद्यावर जिवंत केलं होतं. सोनाली कुलकर्णीने ‘दायरा’ मध्ये एका बलात्कार पीडित महिलेचा रोल केला आहे जिला इथून पुढे पुरुषांसारखं रहायची इच्छा असते.

तिमेरी मुरारी यांच्या कादंबरीवर बेतलेला हा सिनेमा एक संवेदनशील विषय असल्यामुळे प्रदर्शित करण्यात आला नव्हता. १९९६ मध्ये हा सिमेमा सर्वप्रथम फ्रांस फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आला होता.

‘दायरा’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सोनाली कुलकर्णी, निर्मल पांडेला विभागून सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीचा संयुक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

हे ही वाचा चाळीशी ओलांडली म्हणून काय झालं? जाणून घ्या चाळीशीनंतर यशस्वी झालेल्या माणसांबद्दल!

 

प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘टाईम्स’ मासिकाने सुद्धा सिनेमा आणि निर्मल पांडेच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं होतं. फ्रांसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

१९९७ मध्ये करिअरच्या सर्वोच्च स्थानावर असतांना निर्मल पांडे यांनी कौसर मुनिर सोबत लग्न केलं. हे लग्न चार वर्षच टिकलं आणि या घटनेनंतर निर्मल पांडे जास्तच संवेदनशील झाले होते.

२००५ मध्ये त्यांचं आणि अर्चना शर्मा यांचा विवाह संपन्न झाला. पण, हे लग्न सुद्धा फक्त पाच वर्ष टिकलं. या घटनेने खचलेल्या निर्मल पांडे यांचं १८ फेब्रुवारी २०१० रोजी वयाच्या केवळ ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.

 

 

निर्मल पांडेच्या अकाली निधनाने पूर्ण बॉलीवूडने हळहळ व्यक्त केली होती. “एक सशक्त अभिनेता आपल्यातून हरपला ज्याला अजूनही विविध रोल करता आले असते” अशी प्रतिक्रिया प्रत्येक दिगदर्शकाने त्यावेळी व्यक्त केली होती.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version