Site icon InMarathi

अपहरण असो किंवा २६/११ चा हल्ला, अदानी यांचं नशीब भलतंच जोरावर होतं…

adani featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हर्षद मेहताचा जगप्रसिद्ध घोटाळा उघडकीस आणणारी सुचेता दलाल कुणाचंही नाव न घेता एक ट्विट करते काय आणि मग अचानक देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती असणाऱ्या अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स अचानक कोसळतात काय, आणि मग पुन्हा वर येऊ लागतात काय…!! अदानी हे नाव सध्या तुफान चर्चेत आहे. कारण त्यांचं नाव जगातील ५ श्रीमंत लोकांच्या यादीत आले आहे.

गौतम अदानी या व्यावसायिकाचं नाव सध्या अनेकांच्या तोंडावर आहे. ‘एनी पब्लिसिटी इज या गुड पब्लिसिटी’ म्हणतात ना, त्याचा अनुभव सध्या हा उद्योजक घेतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कदाचित!

मागे सुचेता दलाल यांच्या ट्विटचा अदानी उद्योग समूहावर थेट परिणाम झाला, तेव्हा ‘त्यांचा पाय अधिक खोलात जाणार का?’ हा विषय चर्चेत आला होता.

 

 

प्रत्यक्षात मात्र या सगळ्याचा फार गंभीर परिणाम झालेला दिसून तरी आले नाही. याला अदानी यांचं उत्तम नशीब म्हणावं का, असा तुम्ही विचार करत असाल, तर जरा थांबा. सध्या सुरु आहे, तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे की आणखी काही हे जरी ठाऊक नसलं तरी अदानी यांचं नशीब किती जबरदस्त आहे, हे सांगणारे त्यांचे दोन अनुभव आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत…

===

हे ही वाचा – सुचेता दलालच्या एका ट्विटमुळे अदानी ग्रुपला करोडोंचं नुकसान: वाचा नेमकं काय झालं?

===

अदानी यांचं झालं होतं अपहरण…

आज भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक म्हणून गौतम अदानी प्रसिद्ध असले, तरी एक असाही काळ होता जेव्हा ते एवढे मोठे उद्योजक झालेले नव्हते. त्यावेळी म्हणजे १९९८ साली घडलेली ही घटना आहे.

 

 

नव्वदीच्या दशकात हळूहळू त्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमवायला सुरुवात केली होती. मीडियामध्ये सुद्धा हे नाव चर्चेत येऊ लागलं होतं. अशा उद्योगपतींचं अपहरण करून, त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा तो काळ होता. महम्मदपुरामध्ये गाडीने प्रवास करत असताना, त्यांच्या गाडीसमोर एक स्कुटर येऊन थांबली.

गाडीला पुढे जाऊ न देता काही लोकांनी त्यांना घेरलं. गौतम अदानी आणि त्यांच्यासोबत असलेले शांतीलाल पटेल यांचं अपहरण करण्यात आलं. सब इन्स्पेक्टर आरके पटेल यांनी याबद्दलचा FIR सुद्धा दाखल करून घेतला होता. तब्बल ९ जणांविरुद्ध यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या अपहरणाच्या मागे, फजलू रेहमान याचा हात असल्याचं म्हटलं जात होतं. हा गँगस्टर थेट दाऊदला टक्कर देणारा होता. त्यामुळे अशा व्यक्तीकडून अपहरण होणं ही जीवावर बेतणारी गोष्ट नक्कीच ठरू शकली असती.

अपहरणानंतर त्या दोघांनाही एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं होतं. आपल्या आयुष्यात ज्या भयानक घटना घडल्या, त्यातील ही एक असल्याचं, अदानी यांनी एका मुलाखतीत सुद्धा सांगितलं आहे.

 

 

२६/११ चा हल्ला जवळून अनुभवला!

अपहरण नाट्य घडून गेल्यावर दशकभरानंतर म्हणजेच नोव्हेंबर २००८ मध्ये त्याहूनही भयानक परिस्थितीचा सामना गौतम अदानी यांना करावा लागला होता. २६/११ च्या ताज हॉटेलवरील हल्ल्यात अनेक निष्पाप आणि सामान्य व्यक्तींनी प्राण गमावले आहेत, हे आपण सगळेच जाणतो. मात्र त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले गौतम अदानी यांचं नशीब मात्र बलवत्तर होतं.

तब्बल १६० पेक्षाही अधिक लोकांचा बळी या आतंकवादी हल्ल्याने घेतला होता. अनेक निष्पाप लोकांचा ज्या ताजमध्ये बळी गेला, त्याच ताज हॉटेलमध्ये त्याचवेळी उद्योगपती अदानी जेवण करत होते. अनेकांसारखंच, त्यांच्याही नशिबात त्या रात्री सुखाने जेवण करणं लिहिलेलं नसावं. मात्र, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ याचा अनुभव अदानी यांनी घेतला.

दुबईमधील एका उद्योजकांशी त्यांची मीटिंग सुरु असतानाच, दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु करत हॉटेल ताजमध्ये प्रवेश केला. अदानी यांनी हा गोळीबार ऐकला, होता मात्र एका विशिष्ट कोनात आणि उंचावर बसलेले असल्याने त्यांना हे दहशतवादी दिसले मात्र नव्हते.

 

 

 

पुढे भारतीय कमांडोंनी ताजमध्ये प्रवेश केला, अनेकांना सुखरूप ठेवण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांना बेसमेंटमध्ये घेऊन जाण्यात आलं. बेसमेंटमधील मिळेल ती जागा धरून प्रत्येकजण आपापले जीव मुठीत घेऊन बसला होता. अदानी यांचा मात्र देवावर विश्वास होता. एका मुलाखतीत त्यांनी असंही सांगितलं आहे, की इतरांनी सुद्धा देवावर विश्वास ठेवावा यासाठी धीर देणायचा प्रयत्नही ते करत होते.

नोव्हेंबर २६, २००८ ची ती काळी रात्र अदानी यांनी हॉटेल ताजच्या बेसमेंटमध्ये काढली होती. ते म्हणतात की त्यांना अवघ्या १५ फुटांवर मृत्यूचं दर्शन झालं आहे. अखेर सकाळी ९ च्या सुमारास ताजमधून त्यांची सुटका झाली होती. दैव बलवत्तर म्हणून गौतम अदानी त्यावेळी वाचले होते.

 

 

नियतीने पार यांच्यावर जीव ओवाळून टाकला आहे, असं म्हणायला हरकत नसावी, नाही का? जीवावर  बेतू शकणाऱ्या संकटांमधून वाचलेला हा उद्योजक आज भारतातीलच नाही, तर आशिया खंडातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत मोठ्या दिमाखात विराजमान आहे.

===

हे ही वाचा – पैशांच्या चणचणीमुळे शाळाही सोडणारा पठ्या असा बनला मुंबई एअरपोर्टचा मालक!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version