Site icon InMarathi

जर तो सैन्यात गेला असता, तर भारतीय प्रेक्षक एका उमद्या अभिनेत्याला मुकला असता!

jaideep featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सिनेसृष्टी – सगळ्यांचेच डोळे दीपवणारी एक लखलखती चंदेरी दुनिया. अगदी चार पाच वर्षांपूर्वीपर्यंत नावलौकिक मिळवण्याचं, आपल्यातल्या कलाकाराला जगासमोर आणण्याचं एकमेव स्थान म्हणजे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री होतं.

चित्रपट सृष्टीच्या या चंदेरी दुनियेत एकदा शिरलं, एकदा पाय रोवला गेला की अपनी तो निकल पडी असं असू शकतं. पण इथे पहिला ब्रेक मिळायलाच कितीतरी उंबरे झिजवावे लागतात. किती तरी लोकांच्या मागेपुढे करावं लागतं, किती तरी ऑडिशन्स द्यावे लागतात.

 

 

बाजारात दुसरा कुठलाच प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने इथे “टॅलेंट सॅच्युरेशन” व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजेच लाखो माणसं रोजच्या दिवसाला मुंबईत यायची सगळ्यांचं एकच स्वप्न, शाहरुख, अक्षय कुमार सारखा सुपरस्टार होण्याचं!

===

हे ही वाचा कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

===

पण संधी कमी आणि उमेदवार जास्त असल्याने ज्यांनी, बऱ्यापैकी आधीच आपली ओळख निर्माण केली अशा कालाकारांनाच संधी मिळत असे. यातून बिन वशिल्याचा एखादा कलाकार वर आलाच तर तो त्याच्या अतोनात मेहनत करण्याच्या तयारीचं आणि नशीबवान असल्याचं एक उदाहरण बनून राही.

पण नंतर OTT प्लॅटफॉर्म आले, त्यावर वेब सिरीज, चित्रपट, प्रदर्शित होऊ लागले आणि अनेकानेक संधी निर्माण झाल्या. अनेक कलाकारांची प्रेक्षकांशी नव्याने ओळख झाली.

जे आधीही फिल्म इंडस्ट्रीत होते पण त्यांच्या कलेला योग्य तो वाव मिळत नव्हता, योग्य दाद मिळत नव्हती असे अनेक कलाकार आता या मंचावरून नाव मिळवू लागले आहेत. त्यातलाच एक कलाकार म्हणजे जयदीप अहलावत.

 

 

आर्मी ऑफिसर बनण्याचं स्वप्न असलेला जयदीप कलाक्षेत्राकडे कसा वळला हि गोष्ट फार प्रेरणादायी आहे. मूळचा हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातील खारकर गावातील जाट शिक्षकांच्या कुटुंबात जन्मलेल्या जयदीपचं आर्मी अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं.

पण सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेत काही वेळा अयशस्वी ठरल्यामुळे त्याने कलाक्षेत्रात आपलं नशीब अजमावण्याचं ठरवलं. बालपणापासून नाट्याची आणि थिएटरशी संबंध आलेल्या जयदीपनं एका थिएटर समूहामध्ये काम करणं सुरु केलं पंजाब, हरियाणा येथे ह्या समूहाचे नाटकाचे प्रयोग होऊ लागले.

याच बरोबर आपली कला आणखीन खुलवण्यासाठी, योग्य प्रशिक्षण मिळावं म्हणून त्यानं फिल्म अँड थिएटर इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (FTII) मध्ये प्रवेश घेतला.

तिथे अभिनयाचे धडे गिरवणे, सराव करणे सुरू केले. आणि पुढे आपल्या कलेला वाव मिळावा व संधीच्या शोधात तो २००८ साली मुंबईला आला आणि २ वर्ष कठोर परिश्रम करून त्याला, अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला “आक्रोश” व अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला “खट्टा मिठा” ह्या दोन चित्रपटात सह कलाकार म्हणून काम मिळालं.

 

 

इंडस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या काही मोजक्या कालाकारांपैकी एक जयदीप आहे. त्यानं MA English ची पदवी मिळवली आहे.

“मी या क्षेत्रात पूर्ण नवीन होतो, कोणाशी बोलावं, कोणाला भेटावं, कुठे गेलं म्हणजे आपल्याला संधी मिळेल हे काहीच माहित नव्हतं. पण संधी हि घरबसल्या मिळत नसते हे मला पक्क ठाऊक होतं. म्हणून मी बाहेर पडलो, धडपड केली, भरपूर ऑडिशन्स दिले, इतकी सगळी तारेवरची कसरत करून कसा बसा मला एक चान्स मिळाला.”

यानंतर जयदीपकडे काम नाही असं झालं नाही पण मुख्य, वजनदार, प्रेक्षकांच्या आणि इतर दिग्दर्शकांच्या नजरेत येतील अशा भूमिका त्याला मिळत नव्हत्या.

===

हे ही वाचा स्वतःहून बॉलिवूडच्या ‘लाईमलाईट’ पासून दूर राहिलेला ‘सच्चा’ अभिनेता – के के मेनन

===

लस्ट स्टोरीज, रईस, विश्वरूपम, कमांडो, बाघी ३ अशा अनेक चित्रपटात त्याला काम मिळालं. बरेच काळाच्या मेहनती नंतर जयदीप अहलावत हे नाव प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला आलं ते गँग्स ऑफ वासेपुर आणि राझीच्या भारदस्त भूमिकांमधून.

 

 

गँग्स ऑफ वासेपुर या अनुराग कश्यपच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली पण जशी हवी तशी ओळख जयदीपला मिळाली नाही.

जयदीपनं अनुराग कश्यप, मेघना गुलजार, दिबाकर बॅनर्जी, राजू हिरानी, इम्तिआज अली, विशाल भारद्वाज अशा मोठ्या दिग्दर्शकांबरोबर सुद्धा जयदीपला काम करायची संधी मिळाली. पण करियर मध्ये जी उणीव त्याला वाटत होती ती ott प्लॅटफॉर्म्सनी भरून काढली.

इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेली बार्ड ऑफ ब्लड वेब सिरीज ज्यात जयदीपनं “शेहजाद तन्वीर” ची मुख्य भूमिका साकारली होती ती त्याची पाहिला महत्वाची भूमिका असलेली सिरीज होती. इथून सुरु झाला प्रवास प्रसिद्धीचा.

अनुष्का शर्मा प्रॉडक्शनची, ऍमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली वेबसिरीज “पाताल लोक” जयदीप साठी एक सुवर्ण संधी ठरली. इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीची मुख्य भूमिका जयदीपच्या वाट्याला आली. आणि फिल्म इंडस्ट्री जे स्टारडम आणि प्रसिद्धी त्याला देऊ शकली नाही ते सगळं ह्या एका वेबसिरीज ने त्याला मिळवून दिलं.

“ये एक नही, तीन दुनिया है। सबसे उपर स्वर्ग लोक जीसमे देवता रहते है, बीच में धरती लोक जीसमे आदमी रहते है, और सबसे नीचे पाताल लोक, जीसमे किडे रहते है।” असे भारदस्त संवाद असलेली हि भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली, कि एका रात्रीत आता जयदीपचं जग बदलून गेलं.

 

 

पाताल लोकचे दिग्दर्शन ज्यांनी केले ते अविनाश अरुण जयदीपचे कॉलेज काळापासून असलेले मित्र होते. जयदीपसारख्या सच्च्या कलाकाराला संधी न देणं हे त्यांना अजिबात पटणारं नव्हतं.

पाताल लोक मध्ये त्यांनी जयदीपला मुख्य भूमिका दिली व त्यानं आपल्या परखड अभिनयानं त्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून दिला. जयदीपला एकाच प्रकारच्या भूमिकांचा कंटाळा आहे. त्यामुळे तो भूमिका निवडताना त्यात सतत नाविन्य शोधात असतो.

जयदीपची कलाक्षेत्रासंबंधीची दूरदृष्टी पण त्याला चांगल्या भूमिका निवडण्यास सहाय्यक ठरते.

“पुढील काळात, फक्त आणि फक्त कथांच्या क्वालिटीवरच सिनेमे चालतील, कोणा एका चेहऱ्यामुळे नाही. प्रेक्षक वर्ग आता चिकित्सक, जिज्ञासू आणि विचारी होतोय त्यामुळे कथा जितकी चांगली तितका तो प्रोजेक्ट यशस्वी होईल” असं जयदीपला वाटतं. आणि त्याप्रमाणे जयदीपही स्वतःला घडवण्याच्या तयारीत आहे.

===

हे ही वाचा सिनेमातला हा ‘रॉकस्टार’ खासगी जीवनात कसा आहे? उत्तरं वाचून त्याच्या आणखी प्रेमात पडाल

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version