Site icon InMarathi

भारतीय उद्योग विश्वातील “चांडाळ चौकडी”ची विस्फोटक माहिती प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी

bad boys billionaire inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

दोन वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली नेटफ्लिक्सची Bad Boys Billionaire ही डॉक्युमेंट्री सिरिज ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाली.

देशातल्या ४ मोठमोठ्या बिझनेस टायकूनचे सर्वात मोठे घोटाळे यावर ही डॉक्युमेंट्री असून. विजय माल्या, नीरव मोदी, रामलिंगम राजू, आणि सूब्रतो रॉय ह्या ४ गडगंज श्रीमंत बिजनेसमनच्या घोटाळ्यांविषयी यातून विस्तृतपणे माहिती दिली गेली आहे.

जेंव्हा ह्या सिरिजचा ट्रेलर लॉन्च केला तेंव्हापासूनच आपल्या इथल्या बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२ सप्टेंबर ला ही सिरिज रिलीज सुद्धा केली जाणार होती. पण सूब्रोतो रॉय, मेहुल चोकसी, आणि रामलिंग राजू ह्यांनी या डॉक्युमेंट्रीच्या मेकर्स विरुद्ध कोर्टात पीआयएल दाखल केली आणि ठरल्या तारखेला ही डॉक्युमेंट्री रिलीज न होता प्लॅटफॉर्मवरुन काढली गेली!

आणि नंतर ही डॉक्युमेंट्री ३ एपिसोड सकट नेटफ्लिक्सवर रिलीज केली. सत्यम स्कॅम एपिसोडच्या याचिकेशी निगडीत कोर्टाने अजून निकाल दिला नसल्याने तो एपिसोड तात्पुरता तरी यातून वगळण्यात आला आहे!

 

 

मुख्यत्वे ही सिरिज फोकस करते विजय माल्या, नीरव मोदी आणि सूब्रतो रॉय ह्यांच्या कारकीर्दीवर. प्रत्येक बिझनेस टायकूनचा एक स्वतंत्र एपिसोड अशा अंगाने ३ एपिसोड मध्ये ही डॉक्युमेंट्री ह्या ३ बिझनेस टायकूनचा बऱ्यापैकी प्रवास कव्हर करते!

रॉकेट सिंग ह्या सिनेमात सुद्धा सांगितलं आहे बिझनेस म्हणजे फक्त प्रॉफिट, पैसा, प्रसिद्धी नाही. तर बिझनेस म्हणजे माणसं आणि त्याच्यासोबत जोडला गेलेला विश्वास.

ह्या ३ बिझनेस टायकून्सनी सुद्धा काही काळ हाच नियम फॉलो केला असेल.

पण कालांतराने त्यांची हाव, लालसा, स्वतःच श्रेष्ठ असल्याची गुर्मी इतकी शिगेला पोहोचली की या सगळ्यापुढे त्यांना ह्या इतर गोष्टी अगदी क्षुल्लक वाटू लागल्या आणि तिथेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातली घोडचूक केली.

ह्या डॉक्युमेंट्री मधले सगळेच बिझनेस टायकून काय घोटाळा करायचा म्हणून उद्योग क्षेत्रात आलेले नव्हते किंवा ते कुणा ऐऱ्या गैऱ्या कुटुंबातून सुद्धा आलेले नव्हते.

त्यांनी एका लिमिट पर्यंत त्यांच्या बिझनेस मधून स्वतः सुद्धा प्रॉफिट मिळवला आणि सामान्य लोकांना देखील त्या बिझनेसची सर्विस उपभोगता आली.

पण जेंव्हा ह्या बिझनेस टायकूननी स्वतःच्या हुशारीचा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापर केला त्या क्षणापासून त्यांनी उभं केलेलं गडगंज साम्राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागलं.

 

 

आणि म्हणूनच रतन टाटा आणि महेंद्र सारख्या बिझनेसमन बद्दल आजही लोकांच्या मनात एक आदर आहे.

कारण ह्या दिग्गजांनी कधीच स्वतःची नीतीमूल्य, राष्ट्रभक्ती, बाजूला ठेवून बिझनेस केला नाही किंवा कोणताही आडमार्गाचा अवलंब केला नाही. म्हणूनच आज त्यांचं नाव आणि त्यांचं ब्रॅंड अजूनही तसाच टिकून आहे.

त्यांच्या कंपन्यांनी सुद्धा वेगवेगळे चढ उतार पाहिले पण त्यासाठी लोकांच्या विश्वासाशी ते कधीच खेळले नाही! अगदी हेच ह्या डॉक्युमेंट्री मधून ठसठशीतपणे मांडायचा प्रयत्न केला आहे!

यातल्या प्रत्येक एपिसोडविषयी आणखीन विस्तृतपणे जाणून घेऊया! यातला पाहिला एपिसोडचं नाव आहे King Of Good Times विजय माल्याबद्दल.

लिकर बॅरन आणि brewing industry मधल्या UB ग्रुप चे चेअरमन वित्तल माल्या ह्यांचा मुलगा विजय माल्या जेंव्हा ह्या इंडस्ट्री मध्ये उतरला तेंव्हा सुद्धा भारतात दारू ह्या गोष्टीकडे एक टॅबू म्हणूनच पाहिलं जायच.

अशा वातावरणात आपल्या वडिलांची लेगसी आणि नवनवीन आयडिया यांच्या सोबतीने बंगलोर ह्या आयटी हब असलेल्या शहरात विजय माल्या ह्यांनी पहिलं पब चालू केलं जिथे जन्म झाला किंगफिशरचा.

 

 

९० च्या काळात क्रिकेटर्सना घेऊन टेलिव्हिजन वर केलेली “ऊ लाला ले ओ” ही जाहिरात आणि ती ट्यून आजही लोकांना चांगलीच लक्षात आहे.

लोकांना जरी त्याने मूर्खात काढलं असलं तरी किंगफिशर एअरलाईन्स ही फक्त दारूचा ब्रॅंड प्रमोट करण्यासाठी काढली हे त्रिभुवनातलं सत्य आहे.

इथवरच तो थांबला नाही तर फॉर्म्युला वन रेसिंग टीम, क्रिकेट टीम विकत घेऊन साऱ्या दुनियेवर स्वतःची पकड मजबूत करू पाहणारा माल्या हा त्याच्या flamboyant इमेज मध्येच इतका गुरफटलेला होता की नंतर नंतर त्याचं स्वतःला ब्रॅंड म्हणवून घेणं हे फार केविलवाणं वाटायला लागलं.

केवळ जाहिरात आणि शो बाजी यावरच त्याने आयडीबीआय आणि इतर स्टेट बँक कडून कर्ज पास करवून घेतली. जर खरच माल्याने त्याच्या बिझनेस मध्ये १ % जरी विश्वासहर्ता दाखवली असती तरी तो यातून बाहेर येऊ शकला असता.

पण पैशाचा हव्यास आणि डोक्यात गेलेली मस्ती ही कधीच कुणाचं भलं करत नाही हे सुद्धा अगदी निर्विवाद सत्य आहे.

तोट्यात चाललेली एअरलाईन्स, एम्प्लॉयीजना न दिलेला पगार, त्यांचा संप आणि यामुळे अचानक त्याच्या एका एम्प्लॉयीच्या बायकोने केलेली आत्महत्या, या सगळ्यामुळे माल्याचा खरा चेहेरा लोकांसमोर यायला लागला.

 

एवढं होऊन सुद्धा स्वतःच्या ६० व्या वाढदिवशी त्याने केलेलं ग्रँड सेलिब्रेशन हे त्याच्यातल्या निर्लज्ज माणसाचं दर्शन घडवतं.

केवळ लोकांना लाईफस्टाइल च्या नावावर उल्लू बनवणाऱ्या माल्याचे इंटरव्ह्यू आजही तुम्ही पहा, किंवा अगदी लंडनमध्ये जेंव्हा तो कोर्टातून बाहेर आला तेंव्हा त्याचा चेहरा पाहा.

आपण गुन्हा केल्याचा लवलेश सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार नाही.

कारण सामान्य लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करून त्यांच्याच पैशावर करोडो रुपयांची उधळण करून देशातून पसार झालेल्या माणसाकडून ह्या पश्चात्तापाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.

आणि नेमके हेच ह्या एपिसोड मध्ये इतकं स्पष्टपणे मांडलं आहे की माल्या बद्दल काडीचीही सहानुभूति तुम्हाला वाटणार नाही!

यातल्या दुसऱ्या एपिसोडचं नाव आहे Diamonds Aren’t Forever. नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की हा एपिसोड आहे डायमंड किंग नीरव मोदी याच्या बाबतीत.

याच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नीरव मोदीच्या एका मुलाखतीमधलंच एक वाक्य आहे “ज्वेलरी बिझनेस हा फक्त विश्वासावर चालतो!” पण नीरव मोदी बाबा त्यांनीच केलेलं हे स्टेटमेंट सोयीस्करपणे कसे विसरले याचं आश्चर्य वाटतं.

 

 

डायमंड बिझनेस साठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या सूरत शहरात आपल्या काकाच्या (मेहुल चोकसी) आणि वडिलांच्या ज्वेलरी बिझनेसमधून सुरुवात करणाऱ्या नीरव मोदीची स्वप्नं बरीच मोठी होती पण त्यासाठी निवडलेला मार्ग हा अत्यंत चुकीचा होता.

इतर २ बिझनेसमनच्या तुलनेत नीरव मोदी सौम्य एवढ्यासाठी वाटतो की ह्याने निदान पैशाचा घोटाळा करून लोकांना ऊंची ज्वेलरी तरी विकली.

शेल कंपनीच्या माध्यमातून होणारी हीऱ्यांची देवाणघेवाण आणि त्यातून वाढणारी त्यांची किंमत ह्याचा एवढा गैरफायदा कुणीच नसेल घेतला जेवढा नीरव मोदी ह्याने घेतला.

शिवाय बायको सुद्धा ह्याच क्षेत्रातली खानदानी श्रीमंत त्यामुळे कॉन्टॅक्ट्स आणखीन जबरदस्त वाढले.

पंजाब नॅशनल बँक च्या मुंबईच्या ब्रांचच्या काही ऑफिसर्सना पैसे खायला घालून letter of undertaking इश्यू करून मोदी ने अशी काही सेटिंग करून घेतली की ६ वर्ष कुणालाच ह्याचा थांगपत्ता लागला नाही.

 

 

तोवर ह्या महाशयांनी न्यू यॉर्क, लंडन, डल्लास, मॅनहॅटन सारख्या ठिकाणी स्वतःच जाळं पसरवायला सुरुवात केली. प्रियंका चोप्रा, लिसा हेडन पासून केट विन्सलेट पर्यंत प्रत्येक सेलिब्रिटी याच्या जाळ्यात अडकला जात होता.

अखेर जेंव्हा नीरव मोदीचे घोटाळे बाहेर यायला लागले तेंव्हा हे साहेब बरेच दिवस गायब होते, अचानक एके दिवशी एका पत्रकाराला परदेशात न्यू यॉर्क का लंडन इथे दिसले.

आजही नीरव मोदीच्या extradition साठी प्रयत्न चालू आहेत. पण पीएनबी बँकच्या एका सामान्य क्लर्कचं आयुष्य मात्र कायमचं उद्ध्वस्त झालं.

ह्या एपिसोड मध्ये त्या क्लार्कच्या डोळ्यात आलेलं पाणी आपल्याला हे सांगतं की ह्या देशात इमानदारी ही फक्त नावालाच उरलेली आहे.

आपण ह्या भ्रष्ट सिस्टिमला शिव्या घालतो पण ही सिस्टिम भ्रष्ट होण्यात आपला सुद्धा तितकाच मोठा सहभाग आहे ह्याची जाणीव आपल्याला हा एपिसोड बघताना होते!

यातला तिसरा एपिसोड तर सर्वात मोठ्या स्कॅम बद्दल आहे. त्याचं नाव म्हणजे “The world’s biggest family”. हा एपिसोड आहे सहाराश्री सूब्रतो रॉय यांच्या बद्दल.

फिर हेरा फेरी मधलं २१ दिवसात पैसे डबल करून देणारी लक्ष्मी चिट फंड वाली आठवते का? अशा कित्येक चिट फंडचा पाया रचणारे सूब्रतो रॉय.

 

 

९० च्या काळातील मुलांना टीव्ही वर लागणारी जाहिरात आठवत असेल ज्यात सूब्रतो रॉय आणि त्यांचे हजारो एजंट मनावर हात ठेवून सहारा प्रणाम करायचे, किंवा भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर सहाराचं नाव पाहिलं असेल.

अशा ह्या सहारा ग्रुपचे चेअरमन सूब्रतो रॉय. अतिशय गरीब लोकांकडून दिवसाच्या बेसिस वर काही ठराविक रक्कम गोळा करायचे आणि काही दिवसात ती रक्कम दुप्पट परत देऊ अशा आश्वासनावर सहारा च्या चिट फंड नी संपूर्ण देश काबिज केला.

देशातल्या बहुतांश लोकांनी सहाराच्या ह्या चिट फंड मध्ये इन्व्हेस्ट केले. सर्वप्रथम काही लोकांना दुप्पट पैसे मिळाले.

पण जसजसं एका पत्रकाराने ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला घेतली तेंव्हा असं लक्षात आलं की ही लोकं आता त्याच लोकांचे पैसे पुन्हा कोणत्यातरी वेगळ्याच चिट किंवा स्कीम मध्ये रीइन्व्हेस्ट करायला भाग पाडून हा सगळा पैसा स्वतःच उपभोगत आहेत.

कंपनी प्रायव्हेट सेक्टर मध्ये असल्याने यावर कुणीच काहीच बोलत नव्हतं पण जसं कंपनी पब्लिक सेक्टर मध्ये जाऊन लोकांकडून आणखीन कॅपिटल गोळा करणार असं समजल्यावर सहाराचे फासे पूर्णपणे फिरले.

एका मोठ्या इव्हेंट मधून रॉय आणि त्यांच्या असंख्य एजंटनी शक्तिप्रदर्शन करायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.

रॉय ह्यांचा aamby valley प्रोजेक्ट, तिथे असलेला स्वतःचा व्हाईट हाऊस सारखा दिसणारा महाल, आणि स्वतःच्या घरच्या लग्नात पाण्यासारखा ओतलेला पैसा बघून कित्येकांच्या भुवया उंचावल्या.

सीबीआय ची चौकशी झाली, त्यातही त्यांनी सीबीआयच्या डोळ्यात मस्त धूळफेक केली. तोंडाला काळं फासून सुद्धा कित्येक लोकांचे सहाराश्री काही काळ जेल मध्ये राहून बेल वर बाहेर आले.

 

 

आजही ते सहारा ग्रुपचे चेअरपर्सन आहेत. आणि आज त्यांच्याच चिट फंड मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या गरीब मजदूर वर्गातील लोकांची २ वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे.

ह्या डॉक्युमेंट्री मधला चौथा एपिसोड आहे तो सत्यम स्कॅम करणाऱ्या रामलिंग राजू ह्याच्यावर. सत्यम स्कॅम हा भारतीय उद्योग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या स्कॅम पैकी एक मानला जातो.

हैदराबाद इथे राजू ने त्याच्या भावाबरोबर चालू केलेल्या सत्यम कॉम्प्युटर्स ह्या कंपनीची वाढ आणि त्यावर लोकांनी निर्माण केलेले प्रश्न हे आजही अनुत्तरितच आहेत.

आयटी फील्ड मधून रियल इस्टेट मध्ये येऊ पाहणाऱ्या राजूचे मनसुबे काही ठीक नव्हते. हैदराबाद मेट्रोचा प्लॅन त्याला माहीत असल्याने बरेच घोटाळे करून मेट्रो रूट च्या आसपास त्याने बऱ्याच जमिनी विकत घेतल्या!

फेक प्रॉफिट, फेक सेल्स इनव्हॉईस, फेक बँक स्टेटमेंट या सगळ्या दीखाव्यावर राजूने सगळं साम्राज्य उभं केलं.

 

 

स्वतःच्या घरच्या सदस्यांच्या नावावर, मित्रांच्या नावावर, कंपनीत काम करणाऱ्या एम्प्लॉयीजच्या नावावर त्याने भरपूर जमिनी विकत घेतल्या. आणि सत्यम एक आघाडीची कंपनी आहे हे दाखवायचा खूप प्रयत्न केला.

पण हे सगळं फक्त कागदावर दाखवण्यापूरत होतं. सत्यम एकेकाळी ४ थी टॉप ची आयटी कंपनी होती. जेंव्हा हा सगळा घोटाळा बाहेर आला, तेंव्हा बऱ्याच जणांना अटक झाली.

रामलींग राजू आणि त्याच्या भावाला सुद्धा साडेपाच करोडचा फाईन लागला. शेयर मार्केट मध्ये सत्यमची सत्यमच्या शेयरची किंमत १७० रुपायांवरून ६ रुपयांच्या खाली आहे.

ह्यामुळे जवळ जवळ १४००० करोड पेक्षा जास्त नुकसान झालं. तसेच सत्यम मध्ये institutional invester असलेल्या एलआयसी ला सुद्धा ९५० करोडचा लॉस सहन करावा लागला.

तरी ह्या सिरिज मधून राजूचा हा एपिसोड वगळण्यात आला असून. राजू ने या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली आहे. पण लवकरात लवकर हा सुद्धा एपिसोड लोकांसमोर यावा अशी अपेक्षा करूया! 

 

 

नेटफ्लिक्स वर झालेली बहुतेक ही पहिलीच डॉक्युमेंट्री सिरिज असेल ज्यातून कोणताच चुकीचा अजेंडा पसरवला जात नाहीये. उलट ज्या गोष्टी जशा घडल्या तशाच यात मांडायचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो आहे.

भ्रष्ट सिस्टिम मधली लोकं, बिझनेसमन हे त्यांचे त्यांचे गुन्हे करून निसटून जातात अडकते ती तुमच्या आमच्या सारखी मध्यमवर्गीय नोकरदार वर्गातली, इमानदारीने टॅक्स भरणारी जनता.

हे चित्र जोवर बदलत नाही, जोवर आपलं सरकार ह्या लोकांना बाहेरच्या देशातून फरफटत आणून शिक्षा भोगायला लावत नाही, तोवर हे असे मोदी, माल्या, रॉय हे येतच राहणार.

माल्या, रॉय हजारो येतील आणि लोकांचे पैसे लुबाडून जातील, पण निदान टाटा सारख्या सच्च्या इमानदार उद्योगपतींसारखे आणखीन २ ३ उद्योगपती तयार झाले तर नक्कीच कदाचित हे चित्र बदलू शकेल, अशी आशा करुयात.

 

 

नेटफ्लिक्स वरची ही डॉक्युमेंटरी सिरिज एकदा आवर्जून बघाच. काहीतरी वेगळं आणि एक्सक्लूजिव्ह माहिती मिळेल एवढं नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version