बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र… त्याच्या जन्माची ‘ही’ कहाणी ठाऊक आहे का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदू पुराणातील कथा वाचताना सप्त चिरंजीव कोण आहेत हे समजतं. त्यासाठी एक श्लोक आहे.
अश्वत्थामा बलिर्व्यासः हनुमांश्च बिभीषणः।
कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥
अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमंत, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत असं मानलं जातं. यातील प्रत्येकाचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य आहे. हनुमान हा केवळ रामभक्त नव्हे, तर बालब्रह्मचारी सुद्धा मानला जातो.
धार्मिक कथा आणि पुराणं वाचली, तर अंजनी आणि वायूदेव यांचा मुलगा असलेला मारुती हा सर्वश्रेष्ठ रामभक्त होता हे लक्षात येतं. पण त्याशिवाय तो अखंड ब्रह्मचारी आहे अशीही मान्यता आहे.
आता गंमतीचा भाग असा, की लग्न ठरत नाही किंवा इतर काही अडचणी आहेत, असं सांगितलं तर काही धार्मिक उपाय सांगितले जातात त्यात मारुतीला तेल घालून येणं हा एक उपाय असतो. शनिवार हा हनुमंताचा दिवस मानला जातो. शनीची साडेसाती सुरू असेल तर हनुमंताची उपासना करायला सांगितले जाते.
भीमाचं गर्वहरण करण्यासाठी हनुमंताने माकडाचे रुप घेऊन त्याला शेपूट उचलायला सांगितलं होतं ही कथा तर सर्वश्रुत आहेच. राम रावणाच्या युद्धात लक्ष्मणाला जेव्हा इंद्रजिताने बाण मारुन मूर्छित केले, तेव्हा द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी ही औषधी वनस्पती आणायला हनुमान गेला होता. आणि वनस्पती ओळखता येईना म्हणून आख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आकाशातून येणारा मारुतीरायाच होता.
मारुतीरायाला एक मुलगाही होता हे तुम्हाला माहीत आहे का? आश्चर्याचा धक्का बसला? मारुतीराया तर बालब्रह्मचारी आहे आणि त्याला मुलगा कसा काय?
===
हे ही वाचा – रामभक्त “चिरंजीव हनुमान” आजही जिवंत आहेत का? मग ते राहतात कुठे?
===
नेमकं काय घडलं?
हो, हनुमानाला मुलगा होता हे सत्य आहे. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी रामाने वानरसेनेच्या मदतीने रावणाच्या लंकेवर स्वारी केली. अटीतटीच्या या युद्धात युध्दनीतीमधले सगळे डावपेच वापरले गेले.
रावण अतिशय मायावी राक्षस होता. हर तऱ्हेने त्याने राम लक्ष्मणाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले. अहीरावण महीरावण या आपल्या भावांना त्याने कपटाने राम लक्ष्मणांना पळवून न्यायला सांगितले.
अहीरावण महीरावण यांनी राम लक्ष्मणाला पळवून पाताळात दडवले. इकडे राम लक्ष्मण दिसत नाहीत म्हणताच वानर सेनेमध्ये खळबळ उडाली.
बिभिषण मात्र आपल्या भावाला पक्का ओळखून होता. राम लक्ष्मणाला कुठे दडवले असेल याचा त्याला अंदाज होताच. त्याने हनुमानाला राम लक्ष्मण कुठे असतील.. तिथं जायचा रस्ता सगळं सांगितलं.
हनुमान त्या सांगितलेल्या वाटेने पाताळलोकात पोहोचला. तिथं दरवाजावर एक वानर पहारेकरी म्हणून काम करत होता. त्याला पाहून मारुती थक्क झाला. कारण त्याचं रुप!!! मग आत जाण्यासाठी मारुती तयार झाला आणि मकरध्वजानं त्याची वाट अडवली.
त्यानंतर मग दोघांचे घनघोर द्वंद्व सुरू झाले. अर्थातच हनुमंत शक्तीची देवता आहे त्यामुळे तोच जिंकला. पण या पराक्रमी वीराला त्याची माहिती माहिती त्यानं विचारली.
त्याचे आई वडील कोण आहेत? असं विचारल्यावर मकरध्वजाने सांगितलं, पवनपुत्र हनुमान माझे वडील आहेत. हनुमंत पण चक्रावला. आपण तर लग्न केलं नाही. कधी आणि कसा जन्मला हा मुलगा?
===
हे ही वाचा – वाल्मिकींपेक्षाही श्रेष्ठ रामायण हनुमंताने लिहिलं होतं, पण या कारणाने ते नष्ट झालं
===
मकरध्वजाची जन्मकथा
तेव्हा मकरध्वजाने आपली जन्मकथा हनुमानाला सांगितली. सीतामाईच्या शोधासाठी हनुमान लंकेत आला. त्याने सीतेला शोधून काढले. नंतर तो रावणाचा मुलगा मेघनाद म्हणजेच इंद्रजीताच्या हाती लागला. त्याने मारुतीला रावणापुढे उभे केले.
त्यावेळी आपल्या शेपटीची वेटोळी बनवून मारुती रावणापेक्षाही उच्चासनी बसला. मग रावणाने त्याची शेपटी पेटवून द्यायची आज्ञा दिली. पेटवलेल्या शेपटीने हनुमानाने इकडून तिकडे घरावर उड्या मारुन लंकेतील घरे पेटवली.
या सगळ्या धावपळीत मारुती थकून गेला होता. घामेघुम झालेला मारुती आपली पेटलेली शेपटी विझवायला समुद्राजवळ आला आणि शेपटी बुडवताना त्याच्या घामाचे थेंब समुद्रात पडले. त्यातील एक थेंब एका मासोळीने गिळला. आणि त्या थेंबापासून मकरध्वजाचा जन्म झाला.
एकदा अहिरावणाच्या सैनिकांना एक मोठी मासोळी सापडली. ती मासळी कापली असता तिच्या पोटात माकडासारखा माणूस सापडला. सैनिक तो माणूस घेऊन अहिरावणाकडे गेले. अहिरावणाने त्याला पाताळलोकाचा पहारेकरी म्हणून नियुक्त केले.
ही कथा मकरध्वजाने सांगितल्यानंतर, हनुमानाने स्वतःची ओळख त्याला सांगितली.
पुढे मारुतीने त्याला बांधून टाकले आणि नंतर अहिरावण महिरावण यांचा वध करुन राम लक्ष्मणाला पाताळलोकातून सोडवले. नंतर रामाच्या आज्ञेनुसार मकरध्वजाला राज्याभिषेक करुन पाताळलोकाचा राजा जाहीर केले गेले.
अशी ही कथा हनुमानाच्या मुलाची. मकरध्वजाचे मंदिर गुजरातेतील बेट द्वारकाजवळ आहे. हे बाप लेकाचे एकमेव मंदिर आहे.
रामायण, त्या काळातील कितीतरी अद्भुत आणि चमत्कारिक, सुरस कथा आपल्याला आजही अचंबित करतात. ही मकरध्वजाची कथा त्यापैकी एक!!!
===
हे ही वाचा – होय! हनुमान ब्रह्मचारी नव्हता. त्याची एवढी लग्नं झाली होती!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.