Site icon InMarathi

नवरा त्रास देतोय? पंचायत भरवून वेगळ्या पुरुषाबरोबर लिव्ह-इन रहा, अजब प्राचीन प्रथा!

nata custom feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही वर्षांपुर्वी “लिव्ह इन रिलेशनशिप” हा शब्द उच्चारला गेला, तरी लोकांच्या भुवया उंचावल्या जायच्या. परदेशातील संस्कृती आपल्याकडेही रुजू पाहते आहे म्हणून अजूनही याबाबतीत नाकं मुरडली जातात.

आज काही मेट्रो शहरांमध्ये लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणारी जोडपी तुरळक का होईना परंतु दिसून येतात.

खरंतर एकमेकांच्या सोयीसाठी ही पद्धत अनुसरली गेली. एकमेकांचे स्वभाव ओळखण्यासाठी, लग्न केलं तर ते टिकवता येईल का हे पाहण्यासाठी देखील लोक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात.

कोणतीही जबाबदारी स्वीकारू लागू नये यासाठीदेखील लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपचा आधार घेतात.

 

आता सुप्रीम कोर्टाने देखील लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेला मान्यता दिली आहे. परंतु त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. केवळ मजेखातर चार-सहा महिन्यांचा सहवास असेल तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिप मानलं जाणार नाही, असं कोर्टाने नमूद केले आहे.

त्यानंतर काही तक्रारी झाल्यास त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, हे ही सांगितलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हे खूप वर्षांपासून सुरू असेल, त्यापासून त्या जोडप्याला संतती झाली असेल तरच त्याला लग्न मानण्यात येईल.

जरी लिव्ह इन रिलेशनशिप ही प्रथा परदेशातून भारतात आली असं अापण म्हणत असलो, तरी राजस्थानमध्ये ही प्रथा खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहे. या प्रथेला तिथे ‘नाटा’ असं म्हटलं जातं. राजस्थानातील भिल्ल समाजात नाटा ही प्रथा अस्तित्वात आहे.

तिथे मुख्यतः ही प्रथा सुरू झाली याचं कारण म्हणजे विधवा स्त्रियांना किंवा विधुर पुरुषांना आपला जीवनसाथी निवडण्याची संधी मिळावी.

अगदी ज्याचं लग्न झालं नाही, त्याने देखील असा पार्टनर शोधायला तिथल्या भिल्ल समाजाने कधीच आक्षेप घेतला नाही.

 

 

भिल्ल समाज हा त्याच्या शूर वृत्तीमुळे तिथे ओळखला जातो. तिथल्या राजे लोकांच्या सैन्यात यांचा समावेश असायचा. परंतु आता या समाजात शिक्षणाचा आणि सुधारणांचा अभाव असल्यामुळे अजूनही कट्टर जातीभेद मानला जातो.

जुन्या अनेक रूढी परंपरांचे पालन तिकडे केलं जातं नाटा प्रथा ही त्यातीलच एक.

या प्रथेनुसार, कोणताही विवाहित पुरुष किंवा महिला यांचं आपल्या साथीदाराशी पटत नसेल, तर स्वतःच्या मर्जीने त्यांना आपला जोडीदार निवडता येतो. त्यासाठी आधीच्या जोडीदाराला तलाक द्यावा लागतो.

अर्थात हे सगळं पंचायतीच्या संमतीने होतं. जर दोघांपैकी कोणालाही मुले असतील, तर त्यांची देखील काय व्यवस्था करायची हे पंचायतच ठरवते. जेणेकरून त्या दोघांच्या पुढच्या आयुष्यात कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये.

ब्राह्मण राजपूत आणि जैन या समाजाला सोडून तिथल्या गुर्जर समाजामध्ये ही प्रथा अस्तित्वात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोर्टकचेरी न करता परस्पर सामंजस्ययावर या प्रश्नावर तोडगा काढला जातो.

अजूनही या प्रथेला भिल्ल समाजातून पाठिंबा मिळतो. आता थोडसं प्रमाण कमी झालेलं असलं तरी ते पूर्णतः संपलेले देखील नाही.

 

या विषयी बोलताना भिल्ल समाजातील एका गावातील पंचायतीचे सदस्य बन्सीलाल खराडी म्हणतात,

“नाटा प्रथा चुकीची नाही उलट यामुळे महिलांचं सक्षमीकरण होतं. म्हणजे जर एखादा नवरा दारू पिऊन बायकोला मारत असेल, त्रास देत असेल तर या प्रथेमुळे तिला दुसऱ्या माणसाबरोबर आनंदी राहण्याचा अधिकार मिळतो.”

तिथे अशी अनेक उदाहरणे मिळतील ज्यामुळे लोक ही प्रथा पाळतात. पस्तीस वर्षांच्या इटली देवी या महिलेला तिच्या नवऱ्याने जाळायचा प्रयत्न केला, अजूनही त्या खुणा तिच्या शरीरावर आहेत. ती आता दुसऱ्या माणसाबरोबर राहते.

सेता नानोमो ही ५५ वर्षांची बाई तरुणपणीच एका लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमात पडली आणि ते दोघे आता एकत्र राहतात आता त्यांना दोन मुले देखील आहेत.

पंजा खराडी या ६१ वर्षाच्या माणसाला मात्र या प्रथेचा खूप फायदा झाला. त्याची पहिली बायको गेल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले, तिला पाच मुले झाली. थोड्याच दिवसात ती ही मृत्यू पावली. त्यांने तिसरे लग्न केले आता ती तिसरी पत्नी त्याच्या सगळ्या मुलांची काळजी घेते.

नाटा प्रथेचा असा फायदा काहीजणांना झाला असला, तरी या प्रथेमुळे भरडली गेली आहेत ती मुले. कारण त्यांना आपल्या आई-वडिलांचे प्रेम मिळत नाही. कुठल्यातरी नातेवाइकांकडे राहावं लागतं आणि लहान वयातच कामाला सुरुवात करावी लागते.

 

महेश आणि भुरी या दोन मुलांची मात्र या प्रथेमुळे कुचंबणा झाली आहे. कारण यांचे वडील वारल्यानंतर यांची आई यांना सोडून गेली. ते दोघेही आता आपल्या काका काकूंकडे राहतात.

अशा अनेक मुलांच्या कथा तिथे आहेत. कोण आजीकडे राहतं, कोणी मामा मामीकडे राहतं तर कोणी काकाकाकूंकडे राहतात.

म्हणूनच शान्ति देवींना ही प्रथा चुकीची वाटते, कारण आई-वडील जसं प्रेम आपल्या मुलांना देतील तसं इतर कोणीच देऊ शकणार नाही असं त्यांना वाटतं.

अजूनही तिकडच्या काही भागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा फारशा उपलब्ध नाहीत. बऱ्याच ठिकाणी रस्ता नाही, बसेस नाहीत त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. पाण्यात टायर ठेवून त्यावर बसून ही मुलं शाळेत जातात.

 

आता मात्र ही नाटा प्रथा वेगळंच रूप धारण करत आहे. आता मुलींना जबरदस्तीने एखाद्या बरोबर राहण्यास भाग पाडले जात आहे. परस्पर संमती आणि मनपसंत साथी निवडण्यासाठी सुरू झालेल्या या प्रथेने आता वेगळेच रूप धारण केले आहे.

आता तिथे महिलांची खरेदी-विक्री सुरू झाली आहे.

पहिल्यांदा ही प्रथा फक्त ठराविक क्षेत्रांमध्ये गावांमध्ये विशिष्ट समाजामध्ये अस्तित्वात होती. आता मात्र महिलांच्या खरेदी-विक्री खाली शहरांमध्ये देखील येत आहे.

म्हणजे महिलांवर अधिकार गाजवण्याचा साठीच आता या प्रथेचा वापर केला जात आहे. यामुळे होणाऱ्या सामाजिक नुकसानीला कोणतीही पंचायत लगाम घालू शकत नाहीये.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version