Site icon InMarathi

‘कसंतरीच होतंय’ या त्रासदायक ठरणाऱ्या आजारावर “हे” आहेत घरगुती रामबाण उपाय

confused girl inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेकदा आपल्या जीवाला बरं वाटत नाही. काही आजार वगैरे असतो असं नाही. पण कसंसच होतंय अशी तक्रार असते. हे कसंतरी वाटतंय म्हणजे काय हे नेमकं सांगता येत नाही. हिंदीत याला ‘जी मचलना’ असंही म्हणतात.

या कसंतरीच वाटतंयचा संबंध थेट आपल्या पोटाशी जुळलेला असतो. पोट स्वस्थ नसलं तर कसंतरी वाटू लागतं. मळमळ वाटणं, उल्टीसारखं वाटणं, पोट जड वाटणं, ढेकरं येणं, चक्करल्यासारखं वाटणं, जीभेला चव नसणं असे अनेक प्रकार यात आपल्याला जाणवू शकतात.

 

 

पोटाशी याचा संबंध असतो याचाच अर्थ पोटातल्या अपचनाशी असतो. जड जेवण, अवेळी जेवण किंवा इतर काही जंतुसंसर्ग यामुळे हे अपचन होऊ शकतं आणि अपचन झाल्यानंतर हे सर्व वरील प्रकार होऊन कसंतरीच वाटू लागतं.

गरोदरपणात स्त्रियांनाही पहिल्या काही महिन्यात हा त्रास होतो.

कारणं काहीही असोत, पण जेव्हा पोट बिघडून असं कसंतरीच वाटू लागतं तेव्हा आपल्या जीवाला चैन पडत नाही हे खरे. ताबडतोब यातून सुटका व्हावी असेही वाटते.

या अशा अपचनावर आणि कसंतरी वाटण्यावर ताबडतोब आणि घरच्या घरी करता येण्यासारखे बरेच उपाय आहेत. ते कोणते ते आपण पाहू या.

 

पोट आवळून झोपू नका 

 

 

सर्वात आधी म्हणजे झोपून राहू नका. पोटात जर थोडंसं दुखत असेल, किंवा पोट जड वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, तर पोट आवळून झोपू नका.

पोट आवळल्यामुळे पोटातील वायूला अभिसरणासाठी जागा राहणार नाही आणि त्यामुळे अधिक त्रास होईल. त्यापेक्षा स्वस्थपणे लोडाला टेकून बसा.

 

मोकळ्या वाऱ्यावर बसा 

 

 

खोलीतल्या खिडक्या, दारं उघडून टाका. एसी बंद करून मोकळं वारं रुममध्ये खेळू द्या. मोकळा प्रकाश आत येऊ द्या. ताज्या हवेने बरं वाटू लागायला मदत होते.

अनेकदा खोलीत कसकसले वास दाटलेले असतात. त्या वासाने अधिक मळमळू लागतं. खिडक्या दारं उघडून स्वच्छ, मोकळी हवा, उजेड घरात आल्यावर हे वास निघून जायला मदत होते. आणि प्रसन्नता वाढते.

 

मानेखाली उशी ठेवा

 

 

एखादी नरम, मऊ, थंड अशी उशी किंवा कपड्याची घडी मानेखाली दाबून काही मिनिटे ठेवा. त्याने तुमच्या अंगात ताप किंवा उष्णता असेल, तर ती कमी होण्यास मदत होईल. कारण अनेकदा अपचनाच्या, पोटाच्या त्रासाने ताप येण्याचीही शक्यता असते.

===

हे ही वाचा – व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच

===

अॅक्युप्रेशर घ्या –

 

 

अॅक्युप्रेशर ही एक चांगली थेरपी आहे. आपल्या शरीरावरच्या ठराविक, विशिष्ट पॉइन्ट्सवर दाब दिल्याने काही दुखण्यात आराम पडतो. हे पॉईंट्स प्रामुख्याने हातांच्या आणि पायांच्या पंज्यावर अधिक असतात.

तसेच डोकं, पाठ, पोट, कंबर आदी ठिकाणी देखील असतात. तुम्ही हे शिकून घेऊ शकता. किंवा डॉक्टरांच्या मदतीने थेरपी घ्या, पण योग्य माहिती नसेल तर करू नका.

 

ध्यान धरून एकाग्र व्हा किंवा दीर्घ श्वसन करा

 

 

आपले लक्ष एकाग्र करून काही काळ ध्यान धरून बसल्यानेही बरं वाटू लागतं. किंवा अशावेळी दीर्घ श्वसनाचा अभ्यास करा. त्यामुळेही लक्ष एकाग्र होऊन बरं वाटेल.

तसंच दीर्घ श्वसनाने शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळून शरीरातील चयापचय क्रियेत सुधारणा होऊन पोट हलकं होऊ लागेल.

 

लक्ष दुसरीकडे वळवा 

 

 

आपले लक्ष दुसरीकडे वळवा. एखादं पुस्तक वाचायला घ्या. एखादं संगीत ऐकायला सुरूवात करा. किंवा टिव्ही, सिनेमा इत्यादी बघायला सुरूवात करा. घरातलं एखादं हलकंफुलकं काम करायला घ्या, किंवा घरातील लहान मुलांबरोबर खेळ खेळा.

त्यामुळे तुमचं लक्ष तुमच्या कसंतरीच वाटण्यावरून चांगलं वाटण्याकडे जाईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम होऊन थोड्याच वेळात बरं वाटू लागेल.

परंतु अर्थात त्रास जर जास्त होत असेल, तर अशावेळी तुमचं इतर कुठेच लक्ष लागणार नाही. अशावेळी काहीतरी औषधच घ्यावं लागेल.

 

पाणी पीत राहा

 

 

जर पोट बिघडलं असेल, तर जास्त पाणी पिता येणार नाही. तरी देखील थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी पित राहा. अन्यथा तुम्हाला डिहाड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

साध्या पाण्याऐवजी कोमट पाणी प्या. त्याने अधिक बरं वाटेल. लिंबू पाणी घेऊ शकता. काही फ्रेश फ्रूट्सचा ज्यूस पिऊ शकता. त्याने हमखास बरं वाटायला मदत होते.

===

हे ही वाचा – हे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात! तुम्हाला कल्पना आहे का?

===

जास्मिन ग्रीन टी 

 

 

हल्ली मॉल्स आणि बरीच दुकानं यातून वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ग्रीन टी मिळतात. जास्मिन ग्रीन टी किंवा चमेली ग्रीन टी हा जेवल्यानंतर पचनासाठी चांगला ग्रीन टी आहे. पोटात गडबड असेल तर हा ट्राय करून बघा.

ग्रीन टी हा फक्त गरम पाण्यात चिमूटभर पावडर किंवा एक सॅशे टाकून डिप करायचा असतो. त्यात दूध, साखर इत्यादी टाकू नये.

 

लिंबू पाणी प्या 

 

 

अपचनावर लिंबू हा रामबाण उपाय मानला जातो. कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून तो प्या. ग्रीन टीमध्ये देखील लिंबू पिळून घेऊ शकता. त्याने ग्रीन टीचा स्वादही वाढतो.

पोट साफ न होण्याने, म्हणजेच बद्धकोष्ठतेमुळेही अस्वस्थ वाटून कसंतरी वाटू लागतं. अशावेळी गरम पाण्याबरोबर लिंबू घेतल्याने पोट साफ व्हायलाही मदत होते नि बरं वाटू लागेल.

 

आलं

 

 

लिंबाप्रमाणेच आल्याचा उपयोगही परंपरेने आपल्याकडे पचनासाठी केला जातो. आलं-लिंबू सोबत चोखल्यानेही बरं वाटेल. किंवा ग्रीन टीसाठी पाणी उकळताना त्यात थोडा आल्याचा तुकडाही ठेचून घालू शकता.

आलं टाकून आपला नेहमीचा साधा चहा प्यायल्यानेही मळमळ कमी होऊ शकते. परंतु दुधाच्या पदार्थाने अपचनात भर पडू शकते. त्यापेक्षा ग्रीन टी उत्तम.

जेवणात थोडं आलं किसून आणि त्यात लिंबू मीठ घालून चटणीसारखं रोज खाण्याची सवय ठेवली तर अपचनाचा प्रश्नच उद्भवणार नाही. अर्थात उष्ण ऋतूत याचे प्रमाण कमी ठेवायला हवे.

 

पुदिना 

 

 

आलं, लिंबाच्या सोबतच पुदिना हा देखील पचनासाठी उत्तम पदार्थ आहे.

ग्रीन टीमध्ये आलं, लिंबू सोबतच पुदिनाची सात आठ पाने चुरडून घातली तर त्याच्या वासाने फ्रेशही वाटते आणि पुदिना पोटातील पचन क्रिया सुधारायलाही मदत करतो.

 

थंड पेये, कोल्ड्रींक्स टाळा 

 

 

पूर्वी असं म्हटलं जायचं, की अपचन, गॅसेस यांचा त्रास होत असेल, तर आलं-सोडा, कोला इत्यादी कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आराम पडतो. परंतु कधी कधी उलटंही होऊ शकतं.

कोल्ड्रींक्समध्ये साखर असते. त्या साखरेने अधिक त्रास होऊ शकतो.

 

थोडंसं खाऊन घ्या

अनेकदा रिकाम्या पोटात गॅसेस वाढले तरी कसंतरी वाटू लागतं आणि अस्वस्थता येते. अशावेळी काहीतरी हलका आहार घेतला, भाताची पेज, एखादं फळ, टोस्ट इत्यादी तर पोटातल्या गॅसेसवर दाब येऊन ते निघून जातात आणि पोट हलकं वाटू लागतं.

 

 

त्यामुळे नक्की कशामुळे अस्वस्थ वाटतं त्याचे निरीक्षण करून कधी कधी काहीतरी खाऊन घेणे हा देखील अपचनावर उपाय ठरू शकतो.

 

ओवा

 

 

जीवाला बरं न वाटणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ, ढेकरं, पोटात दुखणं, मुरडणं या सगळ्यावर ओवा हा रामबाण उपाय ठरतो अनेकदा.

छोटा चमचा ओवा आणि काळं मीठ एकत्र करून चावून खाणे आणि त्यावर कोमट गरम पाणी पिणे यामुळे पचनक्रियेत चांगली सुधारणा होते आणि पोट हलके होऊन लगेच आराम पडतो.

===

हे ही वाचा – ही लक्षणं म्हणजे एका गंभीर समस्येची सुरुवात… अशा त्रासांकडे दुर्लक्ष करू नका

===

औषधं 

जर ही सगळी लक्षणे अधिक असतील आणि या सगळ्यानेही बरं वाटत नसेल तर काही औषधं घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ती घेऊ शकता.

विशेषतः गरोदरपणाच्या काळात जीवाला बरं न वाटणं, मळमळणं हे अनेक बायकांना होत असतं. त्यांच्यासाठी वरीलपैकी कोणतेही उपाय करताना त्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे उपाय करणं बरं.

कोणत्याही कारणाने होणाऱ्या मळमळ, अपचन, अस्वस्थता इत्यादीवर घरगुती उपायाने बरं वाटलं नाही, तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेणे हे अधिक चांगलं.

 

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version