आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
महानायक अमिताभ बच्चन यांचं आयुष्य म्हणजे लार्जर दॅन लाईफ. त्यांची प्रसिद्धी सगळ्यांनाच माहीत आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन या नावाचं गारूड संपूर्ण चित्रपटसृष्टीवर, इथल्या समाज मनावर आहे.
त्यांच्या याच प्रसिद्धीचा फायदा करून घेण्यासाठी राजकारणी मंडळी उत्सुक होती. आणि त्यांना तशी एक ऑफरही आली.
खरं म्हणजे ते आपल्या मित्रासाठी राजकारणात आले. त्याच्या इच्छेखातर त्यांनी लोकसभेवर निवडून जाण्यासाठी आपला निवडणूक अर्ज भरला. त्यांनी ती निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली देखील.
मात्र त्यामुळे काँग्रेसच्याच एका जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती. त्यांचं नाव हेमवतीनंदन बहुगुणा.
ते वर्ष होतं १९८४. इंदिरा गांधींची हत्या झाली होती, संपूर्ण देशभर काँग्रेसविषयी सहानुभूती होती. काँग्रेसचा विजय डोळ्यासमोर दिसत होता, तरीदेखील काही महत्त्वाच्या जागा अशा होत्या की जिकडे काँग्रेस जिंकून येईलच याची शाश्वती नव्हती.
–
- इंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं!
- ‘अपशकुनी हिरो’ म्हणून लोक बच्चनजींना टाळत होते तेव्हा या अभिनेत्याने दिली संधी
–
त्यापैकीच एक म्हणजे अलाहाबाद. जिथे हेमवती नंदन बहुगुणा यांचे वर्चस्व होतं आणि ती सीट काँग्रेससाठी महत्त्वाची होती. काँग्रेसची धुरा आता राजीव गांधी यांनी घेतली होती.
राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन हे लहानपणापासूनचे मित्र. राजीव गांधींनी आपल्या या मित्राला मदतीची हाक मारली. अमिताभ देखील तयार झाले.
राजीव गांधी यांनी अमिताभ यांना अलाहाबाद या त्यांच्या गावातून निवडणूक लढवायला सांगितली, कारण ती सीट काँग्रेससाठी खूप महत्त्वाची होती.
परंतु हेमवती नंदन बहुगुणा हे प्रचंड मुरलेले आणि कसलेले राजकारणी होते. एकेकाळी काँग्रेससाठी त्यांनी खूप काम केलं होतं पण आता ते काँग्रेस विरोधात निवडणूक लढवत होते.
अलाहाबाद हा त्यांचा लोकसभेचा गड. त्यांच्या व्यतिरिक्त तिकडे कोणी निवडून येईल याची शक्यताही नव्हती. तिथे लोक त्यांना खूप मानायचे. लोकांना मदत करण्यात त्यांची कारकीर्द गेली होती. त्यामुळे आपणच अलाहाबादमध्ये निवडून येऊ हा विश्वास देखील हेमवती नंदन बहुगुणांना होता.
म्हणूनच एक नवखा राजकारणी, सिनेस्टार- ज्याचा राजकारणाशी काहीही गंध नाही तो आपल्याला हरवू शकणार नाही, तसेच आपण केलेल्या कामाला लोक लक्षात ठेवतील हा विश्वास देखील बहुगुणा यांना होता.
त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या विरुद्ध अनेक घोषणाही तयार केल्या होत्या.
दम नही है पंजे मे, लंबू फसा शिकंजे में.
सरल नही संसद मे आना, मारो ठुमका गाओ गाना.
अमिताभ बच्चन यांनी त्या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे ती निवडणूक रंगतदार होणार यात शंका नव्हती संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं.
प्रचार करताना एकदा दोघांच्याही निवडणुकीच्या रॅलीज निघाल्या होत्या आणि एकाच वेळेस त्या दोन्ही रॅली एकमेकांच्या समोरासमोर आल्या.
आता आधी कोण पुढे जाणार यावरून तिथे थोडी कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. आपण रस्ता सोडायचा नाही यावरून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.
शेवटी अमिताभ बच्चन आपल्या गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांना जाऊन चरणस्पर्श केला आणि आशीर्वाद मागितला. हेमवती नंदन बहुगुणा यांनी त्यांना आशीर्वाद दिला.
त्यानंतर आमिताभ यांनी त्यांना पहिल्यांदा पुढे जायला सांगितले. त्यानंतर रॅलीज मार्गस्थ झाल्या. तिथे उभे राहिलेले लोक हे पहात होते. ही तशी छोटी कृती परंतु लोकांना अमिताभ बच्चन यांचं वागणंही आवडलं. त्यांचा सिनेमातला करिष्माही त्यांच्यासोबत होताच.
सुरुवातीला अटीतटीची वाटणारी ही निवडणूक पुढे-पुढे एकतर्फी वाटायला लागली. शेवटी अमिताभ बच्चन हे १८७००० हजार इतक्या प्रचंड बहुमताने निवडून आले.
त्यानंतर निराश झालेल्या हेमवती नंदन बहुगुणा यांनी राजकीय संन्यास घेतला. त्यांनी स्वतःला पर्यावरण संरक्षणाच्या कामात स्वतःला झोकून दिलं.
पुढे तीन वर्षांनी १९८७ ला अमिताभ यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. योगायोग पहा त्याच दरम्यान हेमवती नंदन बहुगुणा यांचा १९८९ साली मृत्यू झाला.
हेमवती नंदन बहुगुणा होते तरी कोण? ज्यांना हरवणं राजीव गांधींसाठी इतकं महत्त्वाचं होतं?
खरंतर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून हेमवती नंदन बहुगुणा यांचा राजकारणातील सहभाग दिसून येतो. सुरुवातीपासूनच ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. १९३६ ते १९४२ या काळात काँग्रेसच्या विद्यार्थी मोर्चा कडून त्यांनी अनेक चळवळीतून सहभाग घेतला.
नंतर १९४२ मध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्धच्या चलेजाव चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये ते उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य होते.
जनमानसावर त्यांची चांगली पकड होती. १९५८ मध्ये त्यांना पार्लमेंट सेक्रेटरी हे पद काँग्रेसकडून देण्यात आले होते.
उत्तरप्रदेशात काँग्रेसला अग्रणी भूमिका देण्यात हेमवती नंदन बहुगुणा यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. तिथल्या १९६७ सालच्या निवडणुकीनंतर त्यांना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री करण्यात आले. तो काळ काँग्रेससाठी खूपच उलाढालीचा होता.
इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसमध्येच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. शेवटी काँग्रेसचे विभाजन झाले एक इंदिरा काँग्रेस आणि दुसरी सिंडिकेट काँग्रेस.
चौधरी चरण सिंह यांनी काँग्रेस सोडली. त्रिभुवन नारायण सिंह आणि कामराज हे सिंडिकेट काँग्रेस कडे गेले तर हेमवती नंदन बहुगुणा आणि कमलापती त्रीपाठी हे इंदिरा गांधी बरोबर कायम राहिले.
१९७१ च्या निवडणुकीत हेमवती नंदन बहुगुणा हे खासदार झाले. आता त्यांना आशा होती की केंद्रात एखादं महत्त्वाचं मंत्रिपद त्यांच्या वाट्याला येईल. परंतु इंदिरा गांधींनी त्यांना दूरसंचार विभागातील उपमंत्रीपद दिले.
त्यामुळे हेमवती नंदन बहुगुणा नाराज झाले. तरीही ते इंदिरा गांधींशी एकनिष्ठ होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शेवटी इंदिरा गांधींनी त्यांना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीपद दिले.
१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात अचानक आणीबाणी लागू केली. त्यामुळे अनेक काँग्रेस सदस्य देखील चिडले होते. त्यावेळेस काँग्रेसमध्ये संजय गांधी यांचे देखील वर्चस्व दिसून येत होते.
यादरम्यान हेमवती नंदन बहुगुणा आणि इंदिरा गांधी यांच्यात मतभेद झाले. शेवटी १९७७ मध्ये हेमवती नंदन बहुगुणा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
बाबू जगजीवनराम यांच्यासोबत त्यांनी, ‘काँग्रेस फॉर डेमॉक्रॅसी पार्टी’ बनवली. त्या पक्षाचे एकूण २८ खासदार त्यावेळेस निवडून आले. पुढे त्यांचा पक्ष जनता दलात विलीन झाले.
चौधरी चरण सिंह जनता दलाकडून पंतप्रधान झाले. त्यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांना अर्थमंत्री केले.
–
- जेव्हा ‘करोडपती’ बिग बी कुमार विश्वास यांच्याकडे केवळ “३२ रुपये” मागतात तेव्हा…!
- ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ नितीन गडकरींनी अमिताभला झापलं…
–
१९८० मध्ये जनता दलामध्ये देखील बेबनाव झाला आणि अनेक लोकांनी जनता दल सोडून परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये हेमवती नंदन बहुगुणा देखील होते. शेवटी जनता दलाचे सरकार बरखास्त झाले.
१९८० मध्ये परत एकदा निवडणुका लागल्या. इंदिरा गांधींनी हेमवती नंदन बहुगुणा यांना काँग्रेसचे महासचिव पद दिले. हेमवती नंदन बहुगुणा यांनी त्या वेळच्या निवडणुकीत सर्वशक्तीनिशी काँग्रेसचा प्रचार केला. या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली.
हेमवती नंदन बहुगुणा हे गढवाल येथून निवडून आले. आता त्यांना वाटत होतं की आता तरी कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळेल परंतु इंदिरा गांधी यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं नाही.
हेमवती नंदन बहुगुणा यांनी काँग्रेस सोबत दगाबाजी केली होती याचा बदला इंदिरा गांधींनी घेतला. कुणाचाही अपमान करायची ही वेगळी पद्धत इंदिरा गांधी यांची होती.
शेवटी सहा महिन्याच्या आतच नाराज हेमवती नंदन बहुगुणा यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा तसेच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. १९८२ मध्ये त्याच जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ते अलाहाबाद मधून विजयी झाले.
इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर झालेली १९८४ ची निवडणूक मात्र त्यांना जड गेली. राजीव गांधींनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या विरोधात उभं केलं.
भारतीय राजकारणात एक महत्वाचे व्यक्तिमत्व असलेले हेमवती नंदन बहुगुणा, अमिताभ बच्चन यांच्या करिष्म्यासमोर मात्र स्वतःची राजकीय कारकीर्द वाचवू शकले नाहीत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.