Site icon InMarathi

प्रत्येक मंदिरासमोर, आवारात कासव असण्यामागचं कारण काय?

kaasav inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

जेव्हा जेव्हा माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात, कठीण प्रसंग येतात किंवा काही आनंदाचे प्रसंग येतात जसं लग्न, बाळाचा जन्म, मुंज या सर्व प्रसंगात आपण देवदर्शन करायला जातो.

थोडक्यात आयुष्यातील प्रत्येक चांगल्या वाईट दोन्ही वेळी आपण देवाला नमस्कार करायला विसरत नाही. पण एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या?

जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला कासव दिसतं. कासव ओलांडून मगच आपण देवदर्शन करायला जातो. कधी मनात विचार आला आहे का? की का हे कासव देवाच्या आधी तिथं असतं? त्याला ओलांडून मगच देवदर्शन करायला जातात.

हिंदू धर्मातील एकूण सणवार, परंपरा, रुढी, या फार विचारपूर्वक बनवल्या आहेत. मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत जे सोळा संस्कार केले जातात त्यातील देवदर्शन हा अविभाज्य भाग आहे.

 

 

कोणतंही चांगलं काम झालं, चांगली बातमी मिळाली की आपण घरात देवासमोर साखर ठेवतो. कारण त्याक्षणी उठून देवळात जाणं शक्य नसतं. पण तीच गोष्ट आपण जेव्हा देवाला सांगायला देवळात जातो तेव्हा तिथं आधी तुमची भेट कासवाशी होते.

शंकराचं देऊळ असेल तर नंदीची भेट घेऊन मगच पुढं देवाला नमस्कार करायला जातात. का असतात हे दोघे आधी? आज आपण हीच माहिती घेणार आहोत.

१. नंदी-

 

 

“शंकरापुढं नंदी” ही म्हण सर्वश्रुतच आहे. नंदी हा शंकराचं वाहन. शंकराच्या पुराणकथा वाचलेल्या तर तुम्हाला लक्षात येईल की, नंदी आणि शिव हे कायम सोबत असतात. म्हणजे नंदी तुम्ही आल्याची वर्दी देणार का देवाला? नाही.

तुम्ही नीट पहा, नंदी प्रतिक्षेत असलेल्या आसनात असतो. भारतीय संस्कृतीत प्रतिक्षा किंवा एखाद्या गोष्टीची वाट पाहणं हे फार महत्त्वाचे मानतात.

फार कष्ट न करता, विनासायास एखादी गोष्ट मिळाली तर तिची किंमत ठेवत नाही मनुष्य. पण तेच जर वाट पाहून पाहून मिळालं तर त्या वाट पाहण्याची किंमत त्या वस्तू किंवा व्यक्तीसाठी कायमस्वरूपी राहते.

मग देवदर्शन तर किती मौल्यवान आहे!!! थोडं थांब असंच सांगतो नंदी. नंदी शिवाकडून काही मागत नाही किंवा भक्तांनाही कशाला आडकाठी करत नाही. तो फक्त वाट पाहतो आणि याच गुणामुळे तो शंकराचा आवडता आहे.

 

 

तो भक्तांनाही थोडं थांबा असं सांगत असतो. तुम्हाला काहीच करायचं नसतं फक्त बसायचं असतं. ध्यान लावणं हा असाच एक प्रकार. नंदी जसं देवाचं ध्यान करतो तसं आपणही करावं ही त्यातील भावना.

नवविधा भक्ती मध्ये दास्य भक्ती हा एक प्रकार आहे. नंदीची भक्ती त्या प्रकारची असते. थोडक्यात अभिमान, गर्व सोडून साधेपणानं देवाची सेवा करावी त्यासाठी वाट पहा असं प्रतिकातून सांगितलं जातं.

नंदीप्रमाणं एके ठिकाणी बसून परमेश्वराची आराधना करा. त्या जगन्नियंत्याचं अस्तित्व जाणून घ्या. जागृत अवस्थेत ध्यान लावून बसा. ध्यान लावून त्या परमात्म्याशी एकरुप होणं म्हणजे तादात्म्य पावणे म्हणजे नंदीसारखं बसणे.

 

 

त्या अवस्थेत तुम्हाला त्या जगन्नियंत्याचं अस्तित्व जाणवेल. हा संदेश नंदीकडून घ्यावा यासाठी नंदीचं दर्शन आधी असतं.

२. कासव-

 

 

शंकर सोडून इतर सर्व देवांच्या देवस्थानात मूर्ति समोर कासव असतं. काय सांगतं हे कासव?

कासवाबाबत एक कथा सांगितली जाते, श्रीविष्णूंना कुंडलिनी जागृत होण्यासाठी कासवाने प्रार्थना केल्यावर विष्णूंनी त्याला आपल्या मंदिरात प्रवेशद्वारात स्थान दिले आहे. म्हणजेच कासवाला मिळालेले हे ईश्वरी वरदान आहे. जे त्याच्याकडे असलेल्या सत्वगुणामुळे मिळाले आहे.

कुंडलिनी जागृत होणे ही योगामधील सर्वात उच्च पातळीची साधना आहे. पूर्वजांनी जाणिवपूर्वक ठेवलेलं हे एक प्रतिक आहे. भगवद्गीता सांगताना श्रीकृष्णाने अर्जुनाला हा एक योग सांगितला आहे ज्यात हा एक गुण सांगितला आहे.

 

 

जसं कासव आपले पाय तोंड कवचात ओढून घेऊ शकतं तशी अवस्था मानवाला प्राप्त करता यावी. षड्रीपूंपासून इंद्रीयांना बाजूला करुन भगवंताच्या चरणी नतमस्तक होत आपल्या जागी ठाम राहणं कासव सांगतं.

जसे योगी लोक या भौतिक जगापासून अलिप्त राहून भगवंताच्या ठायी लीन होतात तशीच अवस्था भक्तांनी प्राप्त करायची वृत्ती ठेवावी.

मंदिरात प्रवेश करताना आपणही या भौतिक, मायावी जगापासून स्वतःला बाजूला सारून देवाच्या चरणी नतमस्तक व्हावे. भगवंताच्या पायी शरणागत भावाने मस्तक ठेवावे हे कासव सांगत असते.

काही ठिकाणी कासव आणि नंदी दोन्हीही असतात म्हणजेच कासवासारखं या मायावी जगापासून अलिप्त राहून नंदीसारखी साधना करुन देवाला नमस्कार करावा असा याचा अर्थ!

 

 

कासव शरणागत भावाचे प्रतिक म्हणून मानले जाते. मंदिरात ज्या सत्वगुणी लहरी असतात त्या शरणागत भावाने ग्रहण करावे असं कासव मानवाला सांगत असतं.

इंद्रीये मोकाट सोडून भगवंताची भक्ती होऊ शकत नाही. म्हणूनच कासवाप्रमाणे षड्रीपू जे काम क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि माया यांपासून अलिप्त होऊन भगवंताच्या दर्शनासाठी यावे.

यासाठी देवाला जाण्यापूर्वी प्रथम कासवाला नमस्कार करुन मग देवाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. हे षड्रीपू तामसी गुण आहेत. ते असताना ईश्वराची आराधना होऊ शकत नाही. यासाठी कासवासारखी स्वतःलाआकुंचन करुन घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

 

 

देवाच्या दारी गेलात तर तिथं प्रचंड सकारात्मक उर्जा असते. ती जाणवते.. फार संत्रस्त झाल्यावर माणूस मंदिरात जाऊन बसतो का? त्यामुळे मन शांत होतं. मंदिरात असलेली सकारात्मक उर्जा मनाचा दाह कमी करते.

या सकारात्मक लहरी ग्रहण करण्यासाठी कासव हे एक प्रतिक आहे ज्यामुळे माणूस त्याच्याप्रमाणे सत्वगुणी लहरी ग्रहण करून आपली आध्यात्मिक उन्नती करु शकतो.

हेच कारण आहे की ज्यासाठी कासवाचे स्थान मंदिरात प्रवेश करताना आधी असते.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version