Site icon InMarathi

या ५ लोकप्रिय नेत्यांच्या हत्यांबद्दल ऐकून आजही प्रत्येक भारतीय हळहळतो… वाचा

indira gandhi death inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येक राजकीय नेत्याचा राजकारणात येण्यामागचा काहीतरी उद्देश असतो. म्हणजे कुणाला देशासाठी काय करायचं असतं! कुणाला लोकांसाठी काही करायचं असतं!

कोणाला आपल्या मतदारसंघात काही बदल घडवायचे असतात!!

आपण पाहतो की, काही नेते हे उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर राजकारणात स्थिरावतात, मंत्रीपद मिळवतात आणि थोडफार विरोधी पक्षांना विरोध करत आपलं बस्तान बसवतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

परंतु काही काही नेते असे असतात की ते आपल्या कृतीने जनमानसावर आपला ठसा उमटवतात. त्यांच्या पाठीमागे त्यांचे अनुयायी तयार होतात.

 

 

असं असलं तरी संपूर्ण देशात त्यांची एक छबी निर्माण होते, त्यातूनच त्यांना अनेक हितशत्रूही निर्माण होतात.

पण ह्या शत्रुंचा विरोध हा तात्विक असतो तोपर्यंत ठीक आहे पण तो एका टोकाला गेला आणि व्यक्तीचा जीव घेण्यापर्यंत पोहोचला तर मात्र परिस्थिती कठीण होते.

भारतात अनेक राजकीय नेत्यांनी आपला जीव असा गमावलेला आहे, ज्यामुळे लोकांच्या मनात त्या नेत्याबद्दल हळहळ निर्माण झाली. आज अशीच ५ राजकीय व्यक्तिमत्वं पाहुयात.

१. महात्मा गांधी :

 

 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हे सगळ्यात मोठं नाव. असहकार, सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

भारताचे राष्ट्रपिता म्हणून ते ओळखले जातात, म्हणून लोक त्यांना बापू असंही म्हणतात. भारतासारख्या खंडप्राय देशात केवळ अहिंसेच्या बळावर ब्रिटिशांना हाकलून देणे तसं कठीणच.

परंतु गांधीजींनी देशातील सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपला लढा सुरू ठेवला आणि भारत स्वतंत्र झाला.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुठलाही रक्तपात गांधीजींनी घडवून आणला नाही. उलट जिथे हिंसा होईल त्याठिकाणी त्यांनी आंदोलनं मागे घेतली, म्हणून त्यांना महात्मा असं म्हटलं गेलं.

आजही जगभरातील लोक त्यांना महात्मा गांधी या नावानेच ओळखतात. आजही परदेशात कुठेही गेलं आणि आपण भारताचे रहिवासी आहोत असं सांगितलं तर लोक म्हणतात,

‘ओह, यू आर फ्रॉम महात्मा गांधीज कंट्री’. म्हणजे भारताची ओळख महात्मा गांधींचा देश अशी आहे.

स्वातंत्र्यानंतर ३० जानेवारी १९४८ या दिवशी गांधीजींची हत्या करण्यात आली. दिल्ली येथील सभेत सकाळच्या प्रार्थनेसाठी जाताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

 

 

त्यांची हत्या नथुराम गोडसे या युवकाने केली. नथुराम गोडसे हा हिंदू महासभेचा सदस्य होता, महात्मा गांधींची हत्या करण्यामागचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानची निर्मिती.

नथुरामच्या मते भारताची फाळणी ही गांधीजींच्या संमतीने झाली. जर त्यांनी परवानगी दिली नसती तर फाळणी टळली असती, परंतु गांधीजींनी फाळणीला विरोध केला नाही, आणि देशाचे तुकडे झाले.

हा राग मनात धरून त्याने एका युगपुरुषाला संपवले.

महात्मा गांधींची हत्या हा जगातल्या सगळ्याच लोकांसाठी एक मोठा धक्का होता. त्यांच्यासारख्या व्यक्तीबरोबर असं काही होईल असं कुणाच्याही स्वप्नात आलं नसेल.

महात्मा गांधी जर अजून जगले असते तर आजच्या भारताचे चित्र वेगळं असतं का असा प्रश्न काहींच्या मनात येतो.

परंतु ज्या माणसाने आयुष्यभर अहिंसेची कास धरली त्याचा अंत असा बंदुकीच्या गोळीने व्हावा याला काय म्हणावं!

२. इंदिरा गांधी :

 

 

भारताच्या पहिल्या तडफदार महिला पंतप्रधान. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या. त्यांचाही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता.

घरातूनच राजकारणाचे धडे गिरवत त्या भारतीय राजकारणात सक्रिय झाल्या. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्या भारताच्या पंतप्रधान झाल्या.

१९६६ ते १९७७ आणि १९८० ते १९८४ या काळात त्या भारताच्या पंतप्रधान म्हणून राहिल्या.

आपल्या विलक्षण व्यक्तिमत्वाचा जोरावर त्यांनी भारतातल्या जनतेच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं.

त्यांनी ‘गरीबी हटाव’ सारखे धडक कार्यक्रम त्यांच्या पंतप्रधान असतानाच्या काळात राबवले. पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशाची निर्मिती केली.

भारताच्या अणुचाचण्यांची सुरुवात त्यांच्या कारकीर्दीत झाली. अमेरिका-रशिया यांच्या शीतयुद्धाच्या काळात त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे रशियाची बाजू घेतली.

अत्यंत निडर स्वभावाच्या असलेल्या इंदिरा गांधीनी देशाच्या प्रतिमेला कुठेही धक्का न लागणाऱ्या अनेक भूमिका घेतल्या.

राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर आणीबाणी सुद्धा भारतात लागू केली. १९८० च्या दशकात पंजाबात खलिस्तानवादी चळवळीने मूळ धरले होते.

 

 

दहशतवादी संघटनांनी तिकडे आतंक माजवला होता, आणि हे सगळे दहशतवादी अमृतसर मधील सुवर्ण मंदिरात लपून राहिले होते. तिथूनच त्यांच्या दहशतवादी कारवायांची चक्रे फिरत होती.

शेवटी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सुवर्णमंदिरात सैन्य पाठवले आणि तिथल्या दहशतवाद्यांना बाहेर काढलं. याला “ऑपरेशन ब्लू स्टार” असं नाव दिलं आणि पंजाब मध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांनी केलेलं ऑपरेशन ब्लू स्टार पंजाबातील शीख समुदायाला रुचलं नाही. त्याबद्दल तिथल्या शीख समुदायाच्या मनात रोष होताच.

इंदिरा गांधींचे दोन अंगरक्षक सतवंत सिंग आणि बिआंतसिंग हे शीख होते. त्यांच्याही मनात ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल राग होता.

त्यांनी १ ऑक्टोबर १९८४ या दिवशी दिल्ली येथील सफदरगंज रोड येथील, पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या त्यांच्या घरात इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्या, आणि ब्लू स्टार ऑपरेशनचा बदला घेतला.

 

 

बियांत सिंगने त्यांच्यावर बाजूने तीन वेळा गोळ्या झाडल्या तर सतवंत सिंगने त्यांच्यावर ३० बंदुकीच्या फैरी झाडल्या.

तिथे असलेल्या दुसऱ्या सुरक्षारक्षकांनी बीआंत सिंग याला ठार मारले तर सतवंत सिंगला १९८९ मध्ये फाशी देण्यात आली. भारताच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या या पंतप्रधानांचा असा दुर्दैवी अंत झाला.

३. राजीव गांधी :

 

 

इंदिरा गांधींचे पुत्र म्हणून त्यांची सुरुवातीची ओळख होती. ते मुळात राजकारणात येण्यास कधीच उत्सुक नव्हते. ते पायलट होते. त्यांचे भाऊ संजय गांधी हे मात्र भारतीय राजकारणात होते.

परंतु विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इंदिरा गांधींनी राजीव गांधींना राजकारणात येण्यास भाग पाडलं.

इच्छा नसताना ते राजकारणात आले त्यानंतर थोड्याच दिवसात इंदिरा गांधींची हत्या झाली, आणि राजीव गांधी भारताचे पंतप्रधान बनले.

पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळल्यानंतर मात्र त्यांनी संपूर्ण लक्ष केवळ भारताच्या राजकारणावर केंद्रित केलं. आपल्या आईप्रमाणेच त्यांनीदेखील अनेक नवीन गोष्टी भारतात आणल्या.

भारताला नवीन तंत्रज्ञानाची ओळख राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत झाली. राजीव गांधींनी देखील आपल्या आईप्रमाणेच सोवियत युनियनशी सलोख्याचे संबंध ठेवले.

श्रीलंकेमध्ये एलटीटीई चा तामिळ बंडखोर प्रभाकरन याच्या कारवाया वाढलेल्या होत्या. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित व्हावी या कारणासाठी राजीव गांधींनी तिकडे शांती सैन्य पाठवले!

आणि हीच गोष्ट त्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरली. भारताने केलेल्या कारवाईमुळे एलटीटीला श्रीलंकेत पराभूत व्हावं लागलं.

याचाच राग मनात धरून थेईमनोजी राजरत्नम उर्फ धानु या एलटीटीईच्या कार्यकर्तीने, राजीव गांधी जेव्हा श्रीपेरंबदूर येथे प्रचारासाठी आले होते त्याच वेळेस त्यांना भेटायचं निमित्त करून तिकडे गेली!

 

 

आणि खाली वाकून नमस्कार करता करता स्वतःला लावलेल्या आरडीएक्स बॉम्बचा स्फोट केला. २१ मे १९९१ ला त्यांचा असा अंत झाला.

भावाचा अपघाती मृत्यू, आईची हत्या आणि राजीव गांधी यांची देखील हत्याच. एकाच घरातील लोकांना मृत्यूने इतक्या विचित्रपणे जवळ घेतलं हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.

४. फूलन देवी :

 

 

‘बँडिट क्वीन’ या नावाने ओळखली जाणारी फूलन देवी. नंतर जिने राजकारणात प्रवेश केला आणि आणि संसदेची सभासद झाली.

डाकू म्हणून तिची प्रसिद्धी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे तिच्या जीवनावर एक सिनेमादेखील निघाला आहे.

वयाच्या अठराव्या वर्षी तिच्यावर सगळ्या गावकऱ्यांदेखत सामूहिक बलात्कार झाला. हा बलात्कार गावातल्या उच्चभ्रू समाजातील म्हणजेच ठाकूर समाजातील लोकांनी केला.

त्यानंतर त्याचाच बदला घ्यायचा तिने निश्चय केला आणि ती डाकू झाली. १९८१ मध्ये तिने २२ ठाकुरांचे , बेहमाई गावात सामूहिक हत्याकांड घडवलं.

सगळ्या ठाकूरांना गोळ्या घालून ठार केलं आणि पोलिसांना शरण गेली.

१९९६ साली ती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला समाजवादी पक्षाची ती सभासद झाली आणि लोकसभेवर निवडून गेली.

 

 

२५ जुलै २००१ या दिवशी दिल्लीतील आपल्या घरात असताना तिची हत्या एका शेर सिंह राणा नावाच्या ठाकूराने केली.

तिने जे २२ ठाकुरांच हत्याकांड घडवलं होतं त्याचा बदला त्याने तिला मारून घेतला. नंतर तो पोलिसांना शरण गेला. फूलन देवीचं आयुष्य म्हणजे बदला घेण्याचा प्रवास असंच वर्णन करता येईल.

५. प्रमोद महाजन :

 

 

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचा अत्यंत संयमी, सुसंस्कृत आणि प्रभावी चेहरा म्हणजेच प्रमोद महाजन. २००१ ते २००३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते दूरसंचार मंत्री होते.

त्यांच्याच काळात भारतात मोबाईल फोन्स यायला सुरुवात झाली. त्यानंतरच भारतात मोबाईल क्रांती झाली. जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा ते भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस होते.

२२ एप्रिल २००६ या दिवशी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरात त्यांच्या लहान भावाने म्हणजेच प्रवीण महाजन याने प्रमोद महाजनांची गोळ्या झाडून हत्या केली.

त्याचं कारण हे कुटुंबातील कलह होतं. प्रवीण महाजनांनी, प्रमोद महाजनांवर जेव्हा गोळ्या झाडल्या तेव्हा ते जखमी झाले.

 

 

त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु तेरा दिवसांच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. ३ मे २००६ ला प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला.

प्रवीण महाजनला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली होती पण तुरुंगामध्ये त्याचा मृत्यू झाला.

प्रमोद महाजनांच्या जाण्याने महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात खरंच एक पोकळी निर्माण झाल. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा एक नेता त्यादिवशी देशाने गमावला.

घरच्या भांडणात प्रमोद महाजनांसारख्या उत्कृष्ट नेत्याचा करुण अंत झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version