Site icon InMarathi

कोरोनाचं संकट वाढत असताना त्यापेक्षाही भयंकर अशा “या” संकटानं शहरं पोखरायला सुरुवात केलीये

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोनाव्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत असतानाच आता जगाला नवीन एका संकटाची चाहूल लागतेय.. ते म्हणजे टोळधाड. ही

टोळधाड आली तर शेतातलं उभे पीक नष्ट होईल याची भीती आता सतावू लागली आहे. ही टोळधाड येण्यामागचं कारण म्हणजे क्लायमेट चेंज, आणि याचा फटका आफ्रिकेतील देशांना बसेल.

हे जे संकट येऊ घातले आहे त्याची सुरुवात २०१८ मध्ये झालेली आहे..

आफ्रिकेतील काही काही देशांमध्ये दुष्काळामुळे परिस्थिती आधीच गंभीर बनलेली आहे. त्यात कोरोनाचं संकट असतानाच आता ह्या टोळधाडीचं भयंकर संकट येऊ घातले आहे.

२०१८ मध्ये चक्री वादळ आलं होतं ज्याचं नाव होतं ‘मेकूनु’. या चक्रीवादळाचा तडाखा सौदी अरेबिया ओमान आणि येमेन या देशांना बसला होता.

 

al arabiya

 

या चक्रीवादळामुळे तिकडे मालमत्तेचे नुकसान तर झालंच. पण हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे, चक्रीवादळामुळे जो पाऊस पडला त्यामुळे तिथली वाळू ओली झाली.

ज्यामध्ये थोड्याशा वनस्पती उगवल्या आणि तिकडे हिरवळ तयार झाली. ज्यामुळे हे टोळधाडीचे किडे वाढण्यासाठी मदत झाली, कारण या किड्यांना खाद्य मिळालं, आणि बघता बघता किड्यांच्या झुंडीच्या झुंडी तयार झाल्या.

इथपर्यंत देखील परिस्थिती ठीक होती. एकदा का वादळ थांबलं आणि ती हिरवळ वाळून गेली आणि परत नेहमीसारखंच ऊन पडलं तर हे किडे आपोआप नष्ट झाले असते.

परंतु असं न होता ती हिरवळ वाळायच्या आतच अजून एक चक्रीवादळ तिकडे येऊन झेपावलं ज्यामुळे ह्या किड्यांचे प्रजनन होण्यासाठी आणखीन पोषक वातावरण निर्माण झालं.

दुसरं चक्रीवादळ आलं नसतं तर किड्यांची संख्या चारशे पटीने वाढली असती. ती आता ८००० पटीने वाढलेली आहे. अशी माहिती युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या तज्ञांनी दिली आहे.

 

the economic times

 

सहसा चक्रीवादळ आल्यानंतर अशा किड्यांच्या प्रजननासाठी अनुकूल काळ निर्माण होतो.

परंतु परिस्थिती बदलली आणि वातावरण पूर्वीसारखे झालं तर किडे मरून जातात किंवा स्थलांतर करतात, त्यामुळे त्यांचा तितकासा धोका जाणवत नाही.

परंतु हल्ली आखातामध्ये चक्रीवादळ येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. क्लायमेट चेंज मुळे कधीही पाऊस पडत आहे चक्री वादळ येत आहे तर कधी दुष्काळ पडत आहे.

त्यामुळेच या टोळांच्या झुंडी तयार होत आहेत. युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून असा इशारा देण्यात आला आहे, की या टोळ्यांच्या झुंडी जर वाढत राहिल्या तर २५ दशलक्ष लोकांच्या अन्नसुरेक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

इतकं मोठं नुकसान करणारे हे किडे आहेत तरी कसे?

या किड्यांना म्हणतात वाळवंटातील टोळधाड, डेझर्ट लोकस्ट. टोळधाडीतील हे सगळ्यात घातक किडे समजले जातात. पश्चिम आफ्रिका ते भारत या पट्ट्यात हे दिसून येतात.

 

dawn

 

साधारणपणे बोटाच्या २ पेरा एवढे असतात. हे जेव्हा संख्येने कमी असतात एकेकटे असतात त्यावेळेस त्यांचा फारसा धोका नसतो.

परंतु पावसामुळे हिरवळ वाढली की यांचं खाद्य तयार होतं. आणि मग हे किडे प्रचंड प्रमाणात प्रजनन करतात, ज्यामुळे यांच्या झुंडी तयार होतात.

जसजशा त्यांच्या झुंडी वाढतात, संख्या वाढते तसा त्यांच्या स्वभावातही फरक पडायला लागतो. ते अधिक आक्रमक होतात, त्यांचा रंग बदलतो.

सुरुवातीला करड्या रंगाचे असलेले हे किडे झुंडी मध्ये गुलाबी होतात आणि थोडे वयस्कर झाले की पिवळ्या रंगाचे होतात.

आणि एकदा झुंड तयार झाली की मग हे सगळे किडे एकत्रच आपलं खाद्य शोधण्यासाठी प्रवासाला निघतात आणि वाटेत येणारी शेतातली पिकं फस्त करत सुटतात.

या झुंडी किती मोठ्या असतात?

या झुंडी प्रचंड मोठ्या असतात. म्हणजे साधारण जर पाच किलोमीटरची झुंड असेल तर ५ किलोमीटर लांब आणि ५ किलोमीटर रुंद, इतक्या मोठ्या प्रमाणात हे किडे एकत्र असतात.

काहीकाही झुंडी या शेकडो किलोमीटर सुद्धा लांब असू शकतात. कधीकधी एक झुंडीची व्याप्ती एका मोठ्या शहाराएवढी असू शकते. जर वार्‍याचं वेग अधिक असेल तर यांचा प्रवास वेगाने होतो.

 

twitter

 

परंतु तरीही एका दिवसात ते १३०  किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात. कधी कधी जास्त देखील.

१९८८ मध्ये पश्चिमी आफ्रिका ते कॅरेबियन बीच ५००० किलोमीटर इतका प्रवास त्या टोळधाडीने फक्त १० दिवसात केला होता. यावरूनच कल्पना येईल की ते किती लांब पर्यंत प्रवास करू शकतात.

टोळधाड एकावेळेस किती लोकांचा अन्न खाईल?

२०१८ मध्ये जी टोळधाड तयार झाली, ती २०१९ मध्ये आफ्रिकेमधील टांझानिया, केनिया, युगांडा, येमेन, इथिओपिया, सोमालिया या देशांमध्ये धडकली आणि तिकडे पिकांचे नुकसान केलं.

२०१९ ला सोमालिया मध्ये एक चक्रीवादळ आलं आणि पाऊस पडला. त्यामुळे टोळधाडीला अजूनच पोषक वातावरण मिळालं आणि त्यांची संख्या वाढली.

या टोळधाडीतील एक किडा साधारण दोन ग्रॅम वजनाचा असतो आणि तो दिवस भरात आपल्या वजनाएवढे अन्न खाऊ शकतो. विचार करा टोळधाडीमध्ये लाखोंनी किडे असतात.

 

dainik bhaskar

 

संपूर्ण पिकांवर एखादी चादर पसरावी तसे हे किडे पसरून बसतात आणि अन्न फस्त करतात. एक टोळधाड एका वेळेस ३५००० लोकांचं अन्न खाऊ शकते. या

टोळधाडिंचं प्रजनन होऊन नवीन जी टोळधाड तयार होतात त्या तर अजूनच घातक असतात. त्या एका वेळेस ३५००० पेक्षाही जास्त लोकांचं अन्न खाऊ शकतात.

टोळधाड नष्ट करण्यासाठी काय उपाय करावे लागतील?

टोळधाड मारण्यासाठी सध्यातरी पेस्टिसाइड (केमिकल) फवारणी करणे हाच उपाय आहे ज्यामुळे हे किडे मरतील आणि नवीन उत्पन्न होणार नाही.

टांझानिया, युगांडा, इथिओपिया, येमेन, सोमालिया हे देश पाहिले तर हे गरीब देश आहेत त्यात दुष्काळाने परिस्थिती आणखीनच गंभीर झालेली आहे.

आता ह्या टोळधाडीचं संकट या देशांसमोर येऊन उभे ठाकले आहे.

त्यांना हवे असणारे केमिकल्स ही सध्या मिळणं दुरापास्त झाले आहे. कारण जगभर कोरोना व्हायरस मुळे प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

daily sabah

 

बऱ्याच देशातील वाहतूक सेवा हवाई वाहतूक, समुद्र मार्गाची वाहतूक सध्या बंद आहेत. त्यामुळे त्यांना हवे असणारे केमिकल्स मिळत नाहीत.

सध्या आग लावून, धूर करून, मोठे आवाज करून या किड्यांना पळवून लावलं जात आहे, तरीही हे संकट मोठं असून त्यांना मदतीची आवश्यकता आहे.

म्हणजे या लोकांपुढे सध्या दुहेरी संकट उभे ठाकले आहे कोरोना मुळे जिवाला धोका निर्माण झाला असून टोळधाडीमुळे अन्नपुरवठा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ज्यामुळे माणसाचं अन्न तर जाईलच पण जनावरांना लागणारा चाराही नष्ट होईल.

म्हणजे एकूण कोरोनामुळेच नाही तर उपासमारीनेही मरण्याची भीती आफ्रिकेतील लोकांसमोर आहे. परंतु माणूस अनेक कठीण प्रसंगातूनही मार्ग काढतो.

आफ्रिकेमध्ये टोळधाडीतल्या किड्यांना खाल्लं जातं. त्या कीड्यांमध्ये प्रोटीन्स देखील भरपूर असतात.

आफ्रिकेत त्या किड्यांपासुन बनणाऱ्या काही डीशेस प्रसिद्ध देखील आहेत. म्हणजे दुसरं काही मिळालं नाही तर या टोळांना खाण्याची वेळ लोकांवर येणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version