Site icon InMarathi

अजब लग्नाची गजब गोष्ट: कोरोनामुळे स्काईपवर लग्न आणि ऑनलाईनच शुभेच्छा!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाला आणि भारतातल्या सर्व लोकांचे जीवन त्यामुळे विस्कळीत झालं. सरकार कडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत की बाहेर पडू नका.

सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सध्या थांबवण्यात आले आहेत. आंतरराज्य वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. अगदी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये पण वाहतूक सुरू नाही.

अत्यावश्यक सेवा वगळल्यास बाकी सगळीकडे कुणालाही कुठेही जाण्यास मनाई आहे. कुणी बाहेर जायचा प्रयत्न केल्यास पोलिसांचे दंडुके खावे लागतात.

 

scroll.in

कोरोनामुळे लोकांच्या अनेक गोष्टींना ब्रेक लागलेला आहे. लोकांनी केलेले सगळे प्लॅनिंग सध्या फिस्कटलेले आहेत. खरंतर आता उन्हाळ्यात लोकांचे फिरायला बाहेर जाण्याचे म्हणजेच पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे प्लॅनस असतात.

त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे लग्नसराईचे दिवस असतात. सुट्ट्या असल्यामुळे सगळ्यांनाच लग्नाला येणे शक्य होईल हा त्यामागचा उद्देश असतो.

लग्नाच्या निमित्ताने सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि लग्न सोहळा आनंदात साजरा करतात.

मात्र आता करूना मुळे अशा लग्नांना देखील परवानगी नाही कारण सध्या सगळीकडे जमावबंदी संचारबंदी सुरू आहे.

सरकार कडून सगळ्या शाळा-कॉलेजेस ऑफिसेस प्रमाणेच सगळी लग्नाची कार्यालय, हॉल, लॉन्स बंद ठेवण्यात आलेली आहेत.

 

the financial express

 

सध्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने देखील बंद आहेत. अगदी ऑनलाइन सेवा देणाऱ्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या देखील फक्त अत्यावश्यक सेवेमधील गोष्टी देत आहेत.

त्यामुळे लग्नाची खरेदी देखील करता येत नाही.

कोरोना व्हायरसचा फटका हा, “यंदा कर्तव्य आहे” असं म्हणणाऱ्या मंडळींना देखील बसलेला आहे. कोरोनामुळे ठरलेल्या लग्नाच्या तारखा, हॉल बुकिंग, सगळं कॅन्सल करावं लागलेलं आहे.

त्यामुळे अनेकांचा हिरमोड म्हणा, भ्रमनिरास म्हणा झालेला आहे. तरीही काहीजण असे म्हणणारे असतात, ‘की रिसेशन हो या इन्फ्लेशन शादी तो होनी चाहिये.’

बस और क्या चाहिये!! आणि मग शेवटी खूप चर्चा, विचारविनिमय करून लग्न करायचं निश्चित केलं जातं. घरच्या लोकांना मनवलं जातं, येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून शेवटी लग्न पार पडतं.

असाच एक विवाह सोहळा या लॉक डाऊनच्या काळात हैदराबाद मध्ये पार पडला आहे.

 

the indian express

 

२८ वर्षांचा ‘नजफ नक्वी’आणि पंचवीस वर्षांची ‘सुलताना’ या दोघांनी सहा एप्रिलला लग्न केलं. त्यांच्या लग्नाची ही तारीख आधीच ठरलेली होती. परंतु मार्चमध्ये अचानक लॉक डाऊन लागू झालं, आणि आता पुढे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला.

एक तर अजूनही कोरोना व्हायरसवर कोणत्याही प्रकारचा उपाय मिळालेला नाही, म्हणून अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकलायचं किंवा ठरलेल्या तारखेला लग्न करायचं इतके दोनच पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यांनी दुसरा पर्याय निवडला.

सहा एप्रिलला त्यांनी त्यांचा ‘निकाह’ १६ लोकांच्या साक्षीने केला. पण फरक इतकाच होता, की यातले बरेच जण स्काईप किंवा व्हॉटसअपने या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

अगदी नजफची फॅमिली ही कानपूर मध्ये आहे. तेही अशा डिजिटल माध्यमातून या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. तर बाकीचे नातेवाईक कुणी बेंगलोरवरून तर कुणी इतर ठिकाणाहून हजर होते.

सुलताना आणि तिची फॅमिली हे हैदराबाद मध्ये त्यांच्या अपार्टमेंटमध्ये उपस्थित होते.

यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा हा निकाह लावला तो कानपूरच्या मौलानांनी. कारण लग्न करावं की नाही या द्विधा मनस्थितीत असल्यामुळे त्यांनी जेव्हा हैदराबादच्या मौलानांना या लग्नाविषयी विचारलं त्यावेळेस एकूणच सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य नव्हतं.

परंतु कानपूर मधले मौलाना यासाठी उपलब्ध झाले. दोन्ही कुटुंबीयांनी सरकार कडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्या होत्या आणि लग्न लागताना देखील covid-19 बद्दलच्या सगळ्या उपाय योजना अमलात आणल्या होत्या.

 

 

 

या लग्नाबद्दल बोलताना सुलताना म्हणते, “की लग्नाबद्दल खूप प्लॅनिंग आधीपासून केलेलं होतं. पण ते प्लॅनिंग आता फिस्कटतंय असं दिसल्यावर खूपच भ्रमनिरास झाला होता. पुढे जून मध्ये लग्न करावं का? असा विचार देखील आम्ही केला होता.

मात्र सध्याच्या परिस्थितीत जून तरी शक्य होईल का? असाही विचार मनात आला, आणि आम्ही शेवटी निकाह करण्याचा निर्णय घेतला. आणि ऑनलाईन निकाह करायचं ठरवलं.

इस्लाम मध्ये मौलानांचा साक्षीने निकाह करणे ही सगळ्यात पवित्र गोष्ट असते. नातेवाईक जमवणं आणि लग्नाच सेलिब्रेशन करणं हे गौण असतं. आणि आता असं वाटतंय की अत्यंत कठीण परिस्थितीत आम्ही आमचा निकाह केलेला आहे.

अगदी मी माझा ड्रेस देखील बिन मॅचींगचा घातला. ज्या दोन मौलानांनी त्यांचा निकाह लावला तेदेखील कानपूरहून असे व्हरच्युली कनेक्टेड होते.

नजफच्या म्हणण्यानुसार, “निकाह लागताना बरेच टेक्निकल प्रॉब्लेम्स आले. निकाह लागताना हे खरंच वाटत नव्हतं की आपण हे सगळं करत आहोत.

परंतु शेवटी संध्याकाळी आम्ही जेव्हा एकत्र जेवायला बसलो त्यावेळेस आम्हाला कळलं की ऑफिशियली आमचा निकाह झालेला आहे. माझ्या सासू सासऱ्यानींच दोघांच्या आईवडिलांची जागा घेतली आणि जबाबदारी पार पाडली.”

नजफ हा हैदराबाद मधील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो. ६ एप्रिलला देखील नजफ हा त्याच्या कामासाठी गेला होता, घरी यायला उशीर होत होता, मुहूर्ताची वेळ टळत होती.

मग गडबडीत घरी आल्यावर, नजफने जीन्स वर शेरवानी घातली आणि निकाहासाठी बसला. जेव्हा कॅमेरा सुलताना कडे गेला तेव्हा त्याने लगोलग पायजमा घातला.

निकाह लागताना सगळ्या आवश्यक त्या परमिशन घेण्यात आल्या होत्या. साफसफाई पाहिली गेली होती, तिथे प्रत्यक्षात जे लोक हजर होते त्या सगळ्यांनी मास्क घातलेले होते.

 

the indian express

 

आता लॉक डाऊन संपल्यावर मुलीची बिदाई आणि वलिमा हे जे विधी राहिले आहेत ते करण्यात येतील.

लग्नाबद्दल प्रत्येकाच्या काही कल्पना असतात, स्वप्नं असतात. पण कोरोनामुळे सध्या ती पूर्ण होऊ शकत नाहीत. तरीही तशा परिस्थितीत उपलब्ध होतील त्या साधनांचा वापर करून लग्न करण्यात येत आहे.

या लग्नाकडे एक सकारात्मक गोष्ट म्हणून बघायला हरकत नाही . कारण कोरोनावर मात करून आपण सुखी संसार करणार आहोत, हा विश्वास या जोडप्याने दाखवला आहे.

त्यांची हीच सकारात्मकता यातून प्रतीत होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version