Site icon InMarathi

दारूच्या नशेत थेट चेन्नईला जाऊन धर्मेंद्रने थांबवलं हेमामालिनी आणि जितेंद्रचं लग्न!

dharmendra inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकेकाळची आणि आजही त्या पदावर कायम असलेली हिंदी सिनेसृष्टीची तारका ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि ही मॅन म्हणून गाजलेला सुपरस्टार धर्मेंद्र यांची जोडी आजही तितकीच लोकप्रिय आहे.

या दोघांनी एकत्र बरेच सुपरहीट सिनेमे दिलेले आहेत.

धर्मेंद्र हेमाच्या प्रेमात होता. आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. हेमामालिनीलाही धर्मेंद्रचे आकर्षण होते. परंतु तो विवाहीत असल्याने ती निर्णय घेऊ शकत नव्हती.

 

 

तिच्या घरच्यांनाही तिचं धर्मेंद्रला भेटणं पसंत नव्हतं. ते तिला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत. शूटींगच्या वेळीही हेमाची अम्मा जया चक्रवर्ती नेहमी तिच्यासोबत असे. जेणेकरून धर्मेंद्रला तिच्याशी जवळीक साधण्याचे निमित्त मिळू नये.

आपल्या मुलीचे लग्न धर्मेंद्रशी होऊ नये म्हणून तिच्या पालकांनी खूप प्रयत्न केले. तिच्यासाठी इतर विविध स्थळं पाहिली. यात एक नाव जितेंद्रचंही आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज हेमामालिनीने वयाची सत्तरी पार केली आहे, आणि जितेंद्रही ७८ वर्षांचा झालाय. धर्मेंद्र आणि हेमामालिनीची प्रेमकहाणी सगळ्यांनाच ठाऊक आहे.

पण खरंतर हेमामालिनी आणि जितेंद्र लग्न करणार होते. हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.

जितेंद्र आज त्याची बालमैत्रीण शोभा सिप्पीबरोबर लग्न करून सुखाचा संसार करताना दिसतोय. त्यांच्या लग्नालाही आज जवळपास ४० हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.

 

 

 एकेकाळी जितेंद्र आणि हेमामालिनीचं लग्न चेन्नाई येथे संपन्न होण्याच्या मार्गावर असताना तिथे धर्मेंद्रने येऊन त्या लग्नात मोडता घातला होता. दारू पिऊन त्याने तिथे गोंधळ घातला होता आणि ते लग्न होण्यापासून थांबवलं होतं.

अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील फार कमी लोकांना ठाऊक असलेल्या या घटनेच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न-

हेमामालिनीच्या “बियॉन्ड ड्रीमगर्ल” या आत्मवृत्तात तिनेच लिहिल्याप्रमाणे तिचं आणि धर्मेंद्रचं प्रेमप्रकरण तिच्या आईला, जया चक्रवर्तीला पसंत नव्हतं.

कारण धर्मेंद्रचं आधीच लग्न झालेलं होतं आणि तो तीन मुलांचा बापही होता. त्या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचा एकच उपाय होता आणि तो म्हणजे तिचं कुणाशी तरी लग्न लावून देणं.

त्यासाठी जया चक्रवर्तींना जितेंद्र हा आपला जावई होण्यास योग्य वाटला होता.

जितेंद्रला हेमामालिनीबद्दल विशेष भावना असली, तरी हेमामालिनीचे मात्र त्याच्यावर प्रेम नव्हते. ती त्याला एक चांगला जवळचा मित्रच मानत होती आणि ते दोघे चांगले मित्र होतेही.

पण धर्मेंद्रला त्या दोघांची ही मैत्री पसंत नव्हती. कारण धर्मेद्रचे हेमामालिनीवर प्रेम होते. त्या दोघांची जवळीक त्याला आवडत नसल्याने त्याने एकदा त्या दोघांच्या सिनेमाचे शूट चालू असलेल्या सेटवर येऊनही हंगामा केला होता.

 

हेमाच्या आईने तिचं मन कसंबसं वळवून तिला एकदा जितेंद्रच्या आईवडीलांना आणि घरच्यांना भेटायला सांगितले. जितेंद्रच्या घरचे या लग्नाला अगदी आनंदाने तयार होते.

हेमा देखील आपल्या आईच्या आनंदासाठी या लग्नाला तयार झाली होती. कारण हेमाच्या आयुष्यावर तिच्या आईचा प्रभाव खूप होता.

हेमा आणि जितेंद्रच्या घरचे सगळे या झटपट लग्नासाठी म्हणून चेन्नाईला पोचले. या लग्नाची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती.

पण कुठून कोण जाणे माध्यमातल्या लोकांना याची कुणकुण लागलीच आणि एका वर्तमानपत्राने दुसऱ्या दिवसाच्या अंकात पहिल्या पानावर ही बातमी छापून टाकली.

ती बातमी वाचताच धर्मेंद्रचा पारा चढला, त्याने ती बातमी जितेंद्रच्या तेव्हाच्या मैत्रिणीला, शोभा सिप्पीला कळवली आणि ते दोघेही ताबडतोब विमान पकडून या दोघांचं लग्न थांबवण्यासाठी चेन्नाईला पोचले.

चेन्नाईला उतरून धर्मेंद्र जेव्हा हेमाच्या घरी पोचला, तेव्हा तिचे बाबा त्याच्यावर संतापले आणि रागवले. तो आधीच विवाहीत आणि तीन मुलांचा बाप असल्याने तिच्यापासून दूर राहण्यास त्याला बजावले.

परंतु त्यांचं न ऐकता तेव्हा थोडासा दारूच्या नशेत असलेला धर्मेंद्र हेमाला भेटण्यासाठी अडून राहिला. मला तिच्याशी एकटीशी बोलू द्या म्हणून पुन्हा पुन्हा सांगत राहिला आणि परत जाण्यास नकार देऊन तिथेच बसून राहिला.

शेवटी नाईलाज झाल्याने त्यांनी त्याला हेमाला एकांतात भेटायची परवानगी दिली आणि बाकी सगळे बाहेर बसून राहिले.

हेमाच्या आत्मवृत्तात, “बियॉन्ड ड्रीमगर्ल” या पुस्तकात त्या क्षणांबद्दल लिहिलंय, ते दो“घे जेव्हा एकांतात परस्परांना भेटले तेव्हा दोघेही भावनाशील झाले होते. धर्मेंद्र तिला हे लग्न न करण्याबद्दल सारखा विनवत होता.

तो एकदम विवश झाला होता. दुःखी झाला होता. हीच स्थिती बाहेर शोभाची होती. जेव्हा जितेंद्रने तिला आपला हेमाशी लग्न करण्याचा निश्चय सांगितला, तेव्हा ती देखील संतापली.

थोडक्यात दोन्हीकडची परिस्थिती दारूण आणि गुंतागुंतीची झाली होती.”

हेमा जेव्हा खोलीतून बाहेर आली तेव्हा ती गोंधळलेली होती. तिने बाहेर येऊन लग्नाचा निर्णय काही दिवस लांबवण्याची विनंती केली. परंतु तिचा हा निर्णय ऐकून जितेंद्र आणि त्याच्या घरचे संतप्त झाले.

 

 

त्यांनी तिला ताबडतोब काय तो निर्णय घेण्यास सांगितले.

त्या पुस्तकात पुढे लिहिल्याप्रमाणे, जेव्हा हेमाला हा निर्णय घेण्यास सांगितले गेले, तेव्हा तिने नकारार्थी मान हलवली. ते पाहून जितेंद्र खूप संतापला आणि आपल्या घरच्यांना घेऊन तिथून ताबडतोब निघून गेला.

त्यानंतर जितेंद्रने १८ ऑक्टोबर १९७४ रोजी शोभा सिप्पीशी लग्न केले. त्या दोघांना दोन मुलं झाली. निर्माती एकता कपूर आणि अभिनेता तुषार कपूर ही दोन जितेंद्रची मुलं आहेत.

 

मात्र धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न व्हायला त्यानंतरही बरीच वर्षे गेली. त्या दोघांचे लग्न हेमाच्या घरच्यांना मंजूर नव्हते. हेमाची आई जया चक्रवर्ती यांनी त्यानंतरही हेमासाठी दुसरी सुयोग्य स्थळे बघणे चालूच ठेवले होते.

विवाहीत आणि तीन मुलांचा बाप असलेल्या शिवाय तिच्याहून वयानेही बराच मोठा असलेल्या एका पंजाबी माणसाशी आपल्या मुलीचे लग्न व्हावे अशी हेमाच्या आईबाबांची इच्छा नव्हती.

परंतु काही ना काही कारणांनी हेमा आपलं लग्नं टाळत राहीली. आपल्या आईबाबांच्या विरोधात जाण्यास तीही तयार नव्हती. तिची मनस्थितीही गोंधळलेली होती. ती ठाम निर्णय घेऊ शकत नव्हती.

त्यानंतर बरेच वर्षांनी म्हणजे २१ ऑगस्ट १९७९ रोजी धर्मेंद्र आणि हेमाचाही विवाह झाला. दोघांना ईशा आणि आहना अशा दोन मुली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version