Site icon InMarathi

सलाम : कोरोनापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी फतेहपुर पोलिसांनी एकजुटीनं घेतलाय हा निर्णय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज संपूर्ण जग कोरोना व्हायरस ह्या भयंकर संकटाला तोंड देत आहे. ह्या व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या दिवसांत दिसत नाहीत, संसर्ग झालेला कळत नाही.

त्यामुळे जेव्हा लक्षात येतं तोवर उशीर झालेला असतो, आज काल मलेरिया, डेंग्यु, फ्ल्यु ह्यांसारख्या आजारांवर औषधं, लसी उपलब्ध आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचे निदान लवकर होऊ शकते.

पण, कोरोनाचं निदानच उशीरा होतं आणि त्यात भर म्हणजे अजूनही त्यावरती जालीम उपाय किंवा औषधं, लस मिळत नाहीये.

कोविद – १९ हा संसर्गजन्य रोग आहे. इतक्या जलद गतीने पसरला की कोणाला काही कळायच्या आत बळी जायला सुरुवात झाली होती. मग सुरु झाला ह्या विषाणू विरूद्ध मनुष्याचा लढा!

 

wall street

 

ह्या विषाणूने लहान-मोठा, गरीब-श्रीमंत कोणताही भेदभाव मानला नाही. बरं ह्याहूनही भयंकर काय तर ह्याचा संसर्ग झालेल्या व्यक्ती जवळ कोणीही जायचे नाही.

त्याच्या जवळची, नात्यातली, जीवाभावाची कशीही, कोणतीही व्यक्ती कोविद-१९ च्या संसर्ग झालेल्या व्यक्तीजवळ जाऊ शकत नाही.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्यांच्या परीने इलाज करतात, पण ती व्यक्ती संपूर्णपणे “क्वारंटाईन” मध्ये. कोणीही त्या व्यक्तीजवळ जायचे नाही, लांबूनच बघायचे.

१४ ते १५ दिवस लागतात सगळे रिपोर्ट्स् वगैरे यायला! तोपर्यंत (आणि रिझल्टस् पॉझिटिव्ह आले तर नंतरही) कोणालाही त्या संसर्ग झालेल्या व्यक्तीजवळ जाऊ दिले जात नाही.

अगदी एकटे, एका खोलीत २४ तास, डॉक्टर्स, नर्सेस् येतील तेवढेच काय ते मनुष्य दर्शन!

 

the news

 

कोरोनाचा संसर्ग म्हणजे प्रतिकार शक्ती कमी पडली तर मृत्यु अटळ आहे. बरं, मृत्युनंतरही त्या व्यक्तीची अवहेलना थांबत नाही. त्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिली जात नाही.

बेवारस असल्यासारखे अंतिम संस्कार होतात. (इटलीमध्ये तर तेही नाही झाले, कीड्या-मुंग्यांसारखी माणसे मरून पडली होती). ह्या अती भयंकर, जीवघेण्या आणि संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या व्हायरस विरूद्ध लढायला सगळे देश आपापल्या परीने कटीबद्ध झालेत.

खरं तर प्रगत देशही ह्यापुढे हतबल झाले. बलाढ्य देशांचे पंतप्रधान देखील ह्यापुढे हरले. अक्षरशः रडले, भावनाविवश झाले. आपल्याच लोकांना असे मरून पडलेले बघताना कोणाला सहन होईल?

प्रगत, प्रगतीशील आणि अप्रगत देश कोणा-कोणाला ह्या व्हायरसने सोडले नाही. ह्या व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा दिवसें दिवस वाढतच आहे. एवढेच नाही तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या देखील चिंताजनक आहे.

भारत देखील अचानक झालेल्या ह्या महामारीला तोंड देण्यसाठी सज्ज झाला. सुरुवातीला गोंधळेलेले, हडबडून गेलेले सर्वच जण आता ह्या रोगाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत!

 

loksatta

 

सरकार कटीबद्ध झाले आणि ह्याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. टी.व्ही, रेडिओ आणि इतर प्रसार माध्यमांमधून, जाहिरातींमधून ह्याविषयी माहिती आणि घ्यावयाची खबरदारी (prevention is better than cure) ह्याचा प्रसार वेगाने करण्यात येत आहे.

२० सेकंद सनिटायझर, साबण इत्यादीने हात धुणे, थोड्या- थोड्या वेळाने गरम पाणी पिणे ह्या गोष्टी तर करायच्याच, पण सरकारने टोटल लॉकडाऊन जाहिर केलाय.

कोणीही बाहेर पडायचं नाही. सगळे व्यवहार ठप्प! कंपन्या बंद, रेल्वे, वाहने सर्व सर्व बंद! काहीही करून ह्या कोरोना व्हायरसची साखळी तोडायचीच असा निर्धार करून सगळे सुशिक्षित, भारतीय कटिबद्ध होऊन सरकारला सहकार्य करत आहेत.

सगळे आपापल्या परीने ह्या कोरोना व्हायरस विरूद्ध लढायला तयार झाले आहेत.

उत्तर प्रदेशतील आग्रा येथील फतेहपुर सिक्री येथील पोलिस ठाणे येथे तैनात असणार्या जवळ जवळ ७५ पोलिस कर्मचाऱ्यांनी ह्या कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

 

livemint

 

ह्या पोलिसांनी चक्क मुंडण केले आहे. ह्यामध्ये येथील SHO (स्टेशन हाऊस ऑफिसर) ह्यांचाही समावेश आहे.

कोणाची आहे ही संकल्पना?

तर ही संकल्पना ह्याच पोलिस स्टेशन मधील स्टेशन हाऊस ऑफिसर भूपेंद्र सिंह बलियान ह्यांची!

काय आहे ह्याचे कारण?

भूपेंद्र सिंह बलियान ह्यांना मुंडण करण्याचे कारण विचारले असता त्यांनी पुढील कारणे सांगितली.

* महत्त्वाचे कारण म्हणे हा संसर्गजन्य रोग आहे, ह्याचे विषाणू कोठेही असू शकतात. हात, पाय एवढेच नाही तर केसांमध्येही हे विषाणू असू शकतात.

ड्युटीवरून घरी गेल्यावर आम्ही हात-पाय धुतो पण केस धुवत नाही, त्यामुळे केसांतून इन्फेक्शन होऊ शकते. मुंडण केल्याने ही इन्फेक्शनची शक्यता नाहीशी झाली.

* आपण कोरोना विरूद्ध लढण्यासाठी कटीबद्ध आहोत. कोरोना विरूद्ध लढायला आम्ही एकजूट आहोत हे आम्हाला दाखवायचे होते.

सरकारला सर्वतोपरी सहाय्य करण्यात यावे ह्यासाठी आम्ही देखील आमच्या परीने जनजागृती करण्यास तयार आहोत.

हे आम्ही आमच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

 

navpradesh

 

* तिसरे कारण म्हणजे टोटल शटडाऊन मुळे सर्व न्हावी घरीच आहेत, सर्व हेअर कटिंग सलोन्स बंद आहेत, त्यामुळे सर्व पोलिसांचे केस वाढत होते, जे नियमांच्या विरूद्ध आहे.

एका मिटिंग मध्ये SSP साहेबांनी सर्वांना विचारले काही त्रास असेल तर सांगा, त्यावर आम्ही त्यांना हा हेअर कटिंग सलोन बंद असून केस वाढत असल्याचा त्रास सांगितला!

त्यावर उपाय म्हणजे हेअर ड्रेसर ला बोलावून सगळ्यांचे केस कापण्यात यावेत! त्याप्रमणे झालेही! हेअर ड्रेसरला बोलावण्यात आले आणि आम्ही सगळ्यांनी एकजूटीने मुंडण केले असे भूपेंद्र सिंह बलियान ह्यांनी सांगितले.

पोलिसांच्या ह्या एकजूटीचा संदेश देण्यासाठी वापरण्यात आलेल्या युक्तीला सर्व स्तरातून वाहवा मिळत आहे. सर्वजण ह्या फतेहपुर सिक्रीच्या पोलिसांच्या ह्या मुंडण करण्याच्या युक्तीचे कौतुक करत आहेत.

 

navbharat times

 

आज ह्या भयानक संकटाला तोंड देण्यासाठी सगळेजण कटीबद्ध झालेत, सगळे तयार झालेत. पण ह्या सळ्यांमध्ये पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस आणि सरकारी कर्मचारी हे अविरत काम करत आहेत.

नागरिकांचे सर्वतोपरी रक्षण करणासाठी अहोरात्र झटत आहेत. आपल्या देशबांधावांचे रक्षण करण्यासाठी ही सर्व माणसे आपल्या प्राणांची पर्वा न करता कार्यरत आहेत.

खरंच सलाम ह्यांच्या कार्याला, देशभक्तीला आणि देशबांधवां प्रती असलेल्या तळमळीला!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version