लॉकडाऊनमुळे नात्यातला गोडवा हरवतोय? – तो टिकवण्याचे हे ८ रोमॅंटिक फंडे ट्राय कराच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना व्हायरस किंवा कोविद-१९ च्या ह्या आकस्मिक संकटामुळे संपूर्ण जगभरात एकच गोंधळ उडाला आहे. इतक्या झपाट्याने हा सर्वत्र पसरला आहे की सगळे हवालदिल झाले आहेत.
चीनमधल्या वूहान मध्ये उद्भवलेला हा विषाणू हा हा म्हणता सर्व जगभर पसरू लागला आणि लोकं किडया – मुंग्यांसारखी मरू लागली आहेत.
त्यात हा जीवघेणा, संसर्गजन्य रोग असल्याने कोणीही नातेवाईक पेंशंटच्या जवळही जाऊ शकत नाही, इतकच काय तर अंत्यसंस्कारही नीट होऊ शकत नाहीत, कारण तेच!

संसर्ग झालेल्याच्या जवळ कोणीही जायचं नाही.
सर्वत्र भयाण, भयावह परिस्थिती उद्भवली आणि आपल्याकडे ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून काळजी घेण्यास सुरूवात झाली १५ मार्च पासून!
तेव्हा जाहिराती, मिडिया, रेडिओ, टि.व्ही. सगळीकडे जमेल तसे ह्याबद्दल काळजी घेण्याच्या उद्घोषणा करण्यात येत होत्या. पण आठवड्याभरातच परिस्थिती अजून गंभीर होऊ लागली.
पंतप्रधानांनी २२ मार्च रोजी लॉकडाऊन जाहिर केला आणि आता तर १४ एप्रिल पर्यंत सगळं बंद! “टोटल लॉकडाऊन” जाहिर झाले सर्वत्र.
आणि ह्या लॉकडाऊनची अंमलबजावणी नीट होण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले, काही काही ठिकाणी तर मिलिट्री जवानांना बोलवण्यात आले. रेल्वे बंद, वाहने बंद, विमानांची उड्डाणे रद्द!
जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडी आहेत, बाकी सर्व, सर्व बंद. खाजगी कंपन्या, उद्योग-व्यवहार सगळं बंद!

परिणामी सर्व कुटुंब घरात जणू काही नजरकैदेत असल्यासारखं! पण ही हवीहवीशी वाटणारी नजरकैद असणार हो ना? सगळं कुटुंब घरात २४ तास किती मस्त ना!
मुलांना त्यांची आई-बाबा खूप वेळ वाट्याला आले, सगळ्यांना एकमेकांमधील गुण नव्याने कळले, स्वयंपाकघरात उपलब्ध वस्तूंमध्ये नव – नवीन प्रयोग सगळं सगळं कलपनातीत आहे हे!
पण, जी जोडपी कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी आहेत किंवा काही अन्य कारणाने एकत्र नाहीत त्यांची खूपच पंचाईत झाली आहे.
आधी एकमेकांना आठवड्या, २ आठवड्यात भेटता येत होत पण आता? आता फक्त फोनवर खुशाली कळवायची, व्हिडिओ कॉल वर समाधान मानायचं!

पण, किती दिवस असं चालणार? ह्या भयावह परिस्थित धीर द्यायला, आधार द्यायला आपला जोडीदार प्रत्यक्ष जवळ हवा असं वाटणं साहजिकच आहे.
कधी कधी तर इतकी हतबलता येते की चिडचिड, उदास, हताश वाटणे, नकारात्मक विचार येणे किंवा इतकी उद्विग्नता येते की काहीही करून जोडीदाराला भेटायला जावं असं वाटतं हे साहजिकच आहे.
पण, हे थोड्या दिवसांसाठीच आहे, सगळं सुरळीत, सुरक्षित झालं की आपल्याला हवं तेव्हा जोडीदाराला भेटता येईल. थोडा धीर धरा!
सगळं नीट होईल. तोपर्यंत आपल्या नात्यातला गोडवा जपून ठेवण्यासाठी हे भन्नाट फंडे बघूया…चला तर मग, टिकवूया आपल्या नात्यातला गोडवा!
१. फोन – व्हिडिओ कॉल द्वारे संवाद :

सगळ्यात पहिलं तर अर्थातच ख्याली-खुशाली साठी आपल्याकडे असणारे मोबाईल आणि व्हिडिओ कॉल साठी निरनिराळे ऍप्स् आहेतच!
रोजच्या रोज आपली ख्याली-खुशाली आपल्या जोडीदाराला कळवा, व्हिडिओ कॉल द्वारे त्यांच्याशी “लाइव्ह” संवाद साधा जेणे करून आपली खुशाली समजून जोडीदाराला हायसे वाटेल.
२. योग्य संवाद :
आत्ताच्या गंभीर परिस्थितीमध्ये हलकाफुलका संवाद करा जोडीदाराशी! तणाव येईल असे संभाषण शक्यतो टाळा. त्याच्या कार्याबद्दल, आरोग्याबाद्दल चौकशी करा.
एखाद्या चित्रपटाविषयी माहिती द्या ज्याने जोडीदाराचा वेळ जाईल आणि तणाव दूर होईल. थोडक्यात काय तर आत्ताच्या तणावपूर्ण वातावरणात मनावरचा ताण कमी होईल असेच संभाषण ठेवा.
३. वाद-विवाद टाळा :

जोडीदाराशी संभाषण करताना हे लक्षात घ्या की दोघेही तणावात आहेत त्यामुळे जोडीदाराशी शांतपणे संभाषण करा!
शक्यतो त्याच्या कलाने घ्या, भांडण होईल, काही त्रास होईल असे वागणे-बोलणे टाळा.
लक्षात घ्या की आत्ता जोडीदाराला तुमच्या प्रत्यक्ष असण्याची गरज आहे पण, परिस्थितीमुळे ते शक्य नाहीये त्यामुळे शक्यतो वाद – विवाद, भांडणे टाळा.
एकमेकांना धीर द्या की हे दिवस थोडेच आहेत आणि लवकरच भेट होईल.
४. जोडीदाराला आश्चर्याचा सुखद धक्का द्या :
आपले मूल्यांकन करण्याची हीच योग्य संधी आहे, स्वतःमधील त्रुटी, उणीवा समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करा आणि जोडीदाराला सरप्राइज द्या.
आपले कलागुण फोनवरून, व्हिडिओ कॉल द्वारे त्याला दाखवून द्या. एखादी गोष्ट जर आपण करावी, शिकावी असे जर वाटत असेल तर ती शिकून त्याला दाखवा, त्याला नक्कीच आवडेल हे सरप्राइज!
त्याचा ताण कमी होण्यास ह्याची नक्कीच मदत होइल.
५. जोडीदाराचे आपल्याला किती महत्त्व आहे हे दाखवून द्या :

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण जोडीदाराशी संवाद साधत आहात तेव्हा कृपया “मल्टीटास्किंग” टाळा. फोनवर बोलणे असेल किंवा व्हिडिओ कॉलिंग असेल आपल्या जोडीदारालाच पूर्ण वेळ द्या!
दुसरे कार्य करणे शक्यतो टाळा. जोडीदार तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्याला दाखवून द्या!
त्याला ह्या तणावपूर्ण परिस्थितीत त्याचे महत्त्व दाखवून देणे ही गोष्ट त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल.
६. फोटो :
आपले चांगले फोटोज् तर जोडीदाराला नेहेमीच दाखवत असाल पण, आता असे काही ऍप्स् आहेत ज्यामुळे आपल्याला आपले साधे फोटोज् मजेशीर करता येतात!
पाठवा असा एखादा गंमतीशीर फोटो जोडीदाराला! ह्या तणावपूर्ण परिस्थितीत त्याच्या चेहेऱ्यावर नक्कीच हसू येईल. प्रयत्न करा, जोडीदार नक्कीच स्माईल करेल!

त्याचा ताण थोड्या वेळासाठी का होईना कमी होईल!
७. ”मिस यू” :
ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराला तुम्ही “मिस” करत आहात हे मोकळ्या मनाने सांगा.

पण हे सांगताना तुम्ही दुःखी आहात असे भासवू नका, फक्त जाणीव करून द्या, आपल्या जोदीदाराला आपली गरज आहे ही भावना हे दिवस पार करायला मदत नक्कीच करेल.
मोकळ्या मनाने हे कबूल करा की तुम्हाला जोडीदाराची कमी भासत आहे, आठवण येते आहे.
८. निराशाजनक बोळणे टाळा :

जोडीदाराशी संवाद साधताना त्याच्याशी निराशाजनक संवाद टाळा. त्याला आशा वाटेल असेच बोला. थोडेसे ‘रोमॅंटिक’ बोलणे जोडीदाराला नक्कीच सकारात्मक ऊर्जा देईल.
जोडीदार लांब आहे हे लक्षात घेऊन त्याला तुमचे त्याच्यावर किती प्रेम आहे हे सांगा. त्याला किंवा तिला “I Love You” म्हणा.
ह्या लॉकडाऊन च्या दिवसात जर जोडीदार लांब असेल तर त्याचा किंवा तिचा ताण-तणाव कमी करण्यास ह्या गोष्टी नक्कीच मदत करू शकतील.
प्रयत्न करून बघा, हा दुरावा नक्कीच थोडा तरी सुसह्य होईल!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.