Site icon InMarathi

फटकळ वाटणाऱ्या “नाना पाटेकर” यांच्या स्वभावाचे हे पैलू वाचून नक्कीच थक्क व्हाल!

nana patekar inmarathi 15

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

नाना पाटेकर म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक हरहुन्नरी कलाकार. अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण करून चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणारा एक मनस्वी कलाकार.

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, परोपकारी माणूस अशा ‘नाना’ भूमिका वठवणारे नाना पाटेकर कायम कोणत्यातरी कारणाने चर्चेत राहतात. मग ते त्यांचं सिनेमातील काम असो किंवा सिनेमातली कॉन्ट्रोव्हर्सी असो.

सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान तर आपण सगळे जाणतोच.

 

 

नानांचा जन्म  १९५१ सालचा. त्यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर. नाना हे त्यांचं टोपण नाव. घरची परिस्थिती तशी हलाखीचीच. अगदी वयाच्या ९ व्या वर्षांपासून त्यांनी काम करायला सुरुवात केली.

काम काय तर, रस्त्यावरचे झेब्रा क्रॉसिंग पेंट करणे, सिनेमाचे पोस्टर चिटकावणे. त्यात त्यांना ३५ रू आणि एकवेळचे जेवण मिळायचे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

नाटकाचं वेड असणाऱ्या नानांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रशिक्षण घेतलं. परंतु विजयाबाई मेहता यांच्या नाटकांमध्ये केलेल्या कामांमुळे अभिनयाला धार आली असं नाना मानतात.

 

 

विजयाबाईंनी लावलेली शिस्त आणि कामाचं चोखंदळपणा यामुळे त्याचा पुढच्या आयुष्यात खूप फायदा झाला असं नानांचं म्हणणं आहे. त्यामुळेच डायलॉग कसे फेकायचे, कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा! हे नीट समजलं.

म्हणूनच त्यांचे हिंदी सिनेमातले डायलॉग्स गाजले. कुठलीही भूमिका नाना अगदी समरसून करतात.

 

 

मग तो त्यांचा ‘थोडासा रुमानी हो जाये’ या सिनेमातील गाण्यात बोलणारा बारिशवाला असो, प्रहारमधील कॅप्टन असो, क्रांतिवीरमधील तरुण असो किंवा परिंदा मधील थंड डोक्याचा अण्णा असो. नटसम्राटमधील त्यांची भूमिकाही खूप गाजली.

 

त्यांचं सगळ्यात जास्त गाजलेलं नाटक म्हणजे ‘पुरुष’. विजय तेंडुलकर लिखित ह्या नाटकात नानांनी खलनायकाची भूमिका केली होती. मात्र त्यामध्ये नाना जेव्हा रेप सीन करायचे त्यावेळेस त्यांना टाळ्या पडायच्या आणि ही गोष्ट नानांना खटकली.

त्यांनी ते नाटक करणं बंद केलं. कारण समाजातील चुकीच्या गोष्टींवर टाळ्या पडणं योग्य नाही असं नानांचं मत होतं.

नानांचं नाटकातलं काम पाहून स्मिता पाटील यांनी त्यांना सिनेमात काम करण्याचे सुचवलं. त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नानांचा प्रवेश झाला. नानाने स्मिता पाटील यांच्याबरोबर ‘गमन’ या सिनेमात काम केलं.

 

 

मराठीतील ‘भालू’ , ‘माफीचा साक्षीदार’ हे त्यांचे काही सुरुवातीचे चित्रपट. तर हिंदीमधील अंकुश, प्रतिघात, परिंदा , प्रहार ,क्रांतिवीर, अब तक छपन्न, अपहरण हे त्यांचे काही चित्रपट.

सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान नानांचं कुणाशीतरी एकदा भांडण होतंच, अगदी त्यांच्या सिनेमाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये देखील, ‘एकदा भांडण होऊ शकेल’ असा क्लॉज असतो.

परिंदाच्या वेळेस देखील विधु विनोद चोप्रा बरोबर त्यांची फायटिंग झाली. परिंदाच्याच शुटिंगदरम्यान नाना भाजले गेले, ते बरे होईपर्यंत एक वर्ष शूटिंग थांबवण्यात आलं.

 

 

प्रहार हा सिनेमा नाना पाटेकर यांनी स्वतः दिग्दर्शित केला होता. त्यासाठी त्यातील भूमिका निभावण्यासाठी त्यांनी तीन वर्षे लष्कराचे प्रशिक्षण घेतलं होतं.

या सिनेमानंतर नाना दरवर्षी आर्मीमध्ये सर्विस करण्यासाठी जायचे. अगदी त्यांनी कारगिल युद्धात ही जाऊन सैन्याला मदत केली होती.

 

 

नानांनी स्वतःचा सिनेमा कधीही थिएटरमध्ये जाऊन पाहिला नाही. त्यांनी त्यांचा स्वतःचा एकही सिनेमा पाहिलेला नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा टीव्हीवरंच एखादा जुना सिनेमा ते पाहतात.

नानांचं लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झालं पण तो यशस्वी विवाह नव्हता, त्यांचा घटस्फोट झाला. नानांचं नाव दीप्ती नवल, मनिषा कोईराला यासारख्या अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं.

नानांनी देखील त्यावेळी कधीही त्यांच्याबरोबर असलेलं आपलं नातं लपवलं नाही.

 

नानांना एकच मुलगा त्याचं नाव मल्हार, याला देखील अभिनयाची आवड आहे. पण म्हणून कोणत्याही दिग्दर्शकाकडे त्याच्यासाठी शब्द टाकायचा नाही असे नानांनी ठरवले आहे.

जे काय करायचे आहे ते त्याने स्वतःच्या हिमतीवर करावे आणि मिळवावे असं नानांचं म्हणणं आहे.

नानांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट दिग्दर्शक,ऊकृष्ट सहाय्यक अभिनेता, उत्कृष्ट खलनायक असे सन्मान मिळाले आहे. तसेच २०१३  मध्ये त्यांच्या सिनेमातील कारकिर्दीसाठी भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री ‘देऊन सन्मान केला.

 

 

महाराष्ट्र सरकारने सिनेमातील योगदानाबद्दल त्यांना ‘राजकपूर पुरस्कार’ दिला. त्यावेळेला महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती होती म्हणून नाना पाटेकर यांनी त्या पुरस्काराचे दहा लाख रुपये तिथेच दुष्काळग्रस्त लोकांसाठी दिले.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या होत होत्या आणि मग ती कुटुंब उघडी पडायची. संवेदनशील नानाला ही परिस्थिती पाहवत नव्हती. म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचे ठरवले.

आणि मकरंद अनासपुरे याच्याबरोबर “नाम” या संस्थेची स्थापना केली. याद्वारे निधी उभारला जाऊन, अशा कुटुंबांना पंधरा हजार रुपये मदत दिली जाऊ लागली.

 

 

आणि ही मदत फक्त आर्थिक नव्हती, तर त्या कुटुंबातील शेतकऱ्याच्या विधवेला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीन देऊन मदत केली जायची.

शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उभारला जायचा. अशा कुटुंबांना मानसिक आधाराची जास्त गरज असते म्हणून या कुटुंबांमध्ये नाना स्वतःचं स्टारडम विसरून अगदी एक सामान्य शेतकरी असल्यासारखे वावरायचे.

 

 

जेणेकरून त्या कुटुंबांना आपल्या सोबत कोणीतरी आहे, त्याचा आधार आहे असे वाटेल.

नानांनी मुंबईत घर घेतलं होतं त्याची किंमत एक लाख होती.आता त्या घराची किंमत साडेतीन कोटी झाली आहे. परंतु तरीही नानांना मुंबईतल्या गर्दीत राहण्यापेक्षा पुण्यातल्या घरी किंवा गोव्यातल्या घरी राहायला जास्त आवडतं.

नाना आपल्या मित्रांना अडचणीच्या वेळी कधीही मदत करायला तयार असतात. आपले खास मित्र दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या मदतीसाठी नानाने स्वतःचे घर गहाण ठेवले.

 

 

आणि त्यांना आर्थिक अडचणीतून सोडवले, नंतर चंद्राने त्यांचे घर त्यांना दिलेच पण त्याबरोबरच एक स्कूटर देखील गिफ्ट म्हणून दिली.

असे आहेत नाना पाटेकर. एक मोकळंढाकळं व्यक्तिमत्व, आपलं जीवन अत्यंत मनस्वीपणे जगणारा कलावंत, पण त्याबरोबरच सामाजिक भान जपणारा कलाकार.

तसं पाहिलं तर सिनेमातल्या हिरो यासाठी लागणारा चेहरा नाना पाटेकर यांचा अजिबातच नाही. पण केवळ अभिनयाने आपल नाणं खणखणीत वाजवून त्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version