Site icon InMarathi

या गावात लोक फक्त शिट्टीनेच संवाद साधतात! जाणून घ्या, भारतातील ‘व्हिसलिंग व्हिलेज’ बद्दल!

whistling village inmarathi 4

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

शिट्टी वाजवणे ही जरी एक कला असली तरी आपल्या समाजात त्याच्याशी एका प्रकारची नकारात्मकता निगडित आहे. भरल्या घरात शिट्टी वाजवणाऱ्यास घरातील ज्येष्ठांकडून हटकले जाते.

तरीही अनेकवेळा आपल्याही नकळत आपण शिट्टी वाजवतोच, कधी मन प्रसन्न असेल तेव्हा तर कधी उगाच. खासकरून तरुण मुलांकडून एखादी शीळ घालून आपल्या मित्राला विशिष्ट संकेत दिले जातात.

 

history tv18

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याने विशिष्ट प्रकारचे आवाज काढून योग्य तो सांकेतिक संदेश मावळ्यांपर्यंत पोचवल्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात.

आज मात्र आपल्याकडे संवादाची अनेक साधने आहेत. पक्ष्यांचे आवाज काढण्याची गरज आणि कला दोन्ही उरलेली नाही.

पण समजा….आजच्या काळातही शिट्टी वाजवत तुम्हाला इतरांशी संवाद साधायचा आहे असं सांगितलं तर? वाटली ना अगदी अगम्य आणि अशक्य कल्पना?

 

trover.com

 

ही कल्पना नाही तर भारताच्या सुदूर पूर्वेकडील मेघालय राज्यात खरोखरच असे एक गाव आहे जिथे शिट्टी हा रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य भाग आहे. चला तर जाणून घेऊया या अद्भुत गावाविषयी आणि त्यांच्या ह्या मजेशीर परंपरेविषयी.

मेघालयातील खासी पर्वत रांगांच्या कुशीत वसलंय एक गाव ज्याचं नाव आहे कॉन्गथोंग. इथल्या इतर गावांसारखीच कॉन्गथोंग वरही निसर्गानं आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे.

वनराई आणि धबधब्यांनी नटलेल्या ह्या गावाविषयी फारशी कुणाला माहिती नाहीये. इथे एक फार अनोखी परंपरा आहे. इथल्या प्रत्येक माणसाला त्याच्या नावासहित, शिट्टीच्या एका विशिष्ट आवाजाने ही ओळखलं जातं.

अनेक पिढ्यांपासून ही संस्कृती इथल्या गावकऱ्यांनी जतन केलेली आहे. इथल्या लोकांचे जीवन शेती आणि शिकार ह्यावर अवलंबून आहे.

बाळ गर्भावस्थेत आईच्या पोटात असतानाच, प्रत्येक आई एक विशिष्ट धुन ठरवते आणि ती धुन शिट्टीतून वाजवत असते.

 

 

बाळ जन्माला आल्यानंतर आई आणि इतर सारेच, ही आई ने तयार केलेली धुन त्या बाळा समोर वाजवत राहतात जेणेकरून त्या बाळाला त्या शिट्टीचा पक्की ओळख व्हावी.

आणि अशा प्रकारे केवळ नावच नाही तर ही धुन सुद्धा इथल्या माणसाची ओळख बनते. ह्यात खास गोष्ट अशी आहे की एका माणसासाठी असलेली धुन केवळ त्याच्या साठीच असते, ती दुसऱ्या कुणासाठी परत वापरली जात नाही. 

अगदी ती व्यक्ती मरण पावल्यानंतरही त्याची धुन पुन्हा दुसऱ्यासाठी वापरली जात नाही. ह्या गावाची लोकसंख्या आहे ६०० ते ७००. म्हणजे इथे साधारण ६०० ते ७०० प्रकारच्या शिट्ट्या वाजवल्या जातात.

 

 

एखाद्याला जर आईकडून मिळालेली धुन बदलायची असल्यास तशी मोकळीक असते. मुळात आई ने बनवलेली ही धुन असते साधारण अर्ध्या किंवा एका मिनिटाची, परंतु गावकरी केवळ सुरवातीचे ५-६ सेकंद वाजवून एकमेकांना हाक मारतात.

आपापसात बोलताना नावांचा उल्लेख न करता ही धुन च वापरतात.

इतरांना ऐकताना कदाचित सर्व शिट्ट्या सारख्याच वाटू शकतात परंतु गावकऱ्यांना प्रत्येक शिट्टीमधील फरक नेमका ओळखता येतो. बहुतेक वेळा ह्या शिट्टीची धुन प्रेरित झालेली असते पक्ष्यांच्या किलबिलाटातून.

 

 

ह्या शिट्ट्या वाजवण्याची ही पद्धत कुठून बरं सुरु झाली असावी? ह्याचे उत्तर निसर्गात असेल का? पर्वताची दाटी असलेल्या ह्या भागात नावाने हाक मारली तर ती दुसऱ्यापर्यंत पोहोचायला पुष्कळ वेळ लागू शकतो किंवा पूर्ण शब्द समोरच्या पर्यंत पोचणार ही नाही कदाचित.

परंतु शिट्टीचा आवाज मात्र वाऱ्या बरोबर वेगाने पसरत असावा आणि त्यातूनच ह्या अनोख्या कल्पनेचा अविष्कार झाला असावा.

इथल्या गावकऱ्यांची अशी समजूत आहे की, जंगलात फिरणाऱ्या आत्म्यानी जर कुणाचे नाव ऐकले तर ती व्यक्ती आजारी पडू शकते आणि म्हणून नावा ऐवजी ह्या शिट्ट्यांचा वापर ते एकमेकांना हाक मारण्यासाठी करतात.

केवळ एकमेकांना हाक मारण्यासाठी नाही तर इतर वेळीही या शिट्टीचा उपयोग इथले रहिवासी कसा करतात ते पाहू.

 

लग्न जमवणे :

उन्हाळ्याच्या मोसमात पौर्णिमेच्या रात्री सारे गावकरी शेकोटी भोवती जमतात आणि तरुण मुले आपआपली धुन शिट्टीतून वाजवतात. जो सगळ्यात उत्तम शिट्टी वाजवेल त्याचे लग्न ठरते त्या गावातील सर्वात सुंदर मुलीशी.

संकट समयी :

 

straitstimes

 

संकटात सापडल्यास शिट्टी वाजवून एकमेकांना सावध करता येते तसेच मदतीला धावून जाता येते. चोर दरोडेखोरांच्या हल्ल्यात शिट्टी वाजवून इतरांना सावध केल्याने चोर पळून गेल्याच्या सुरस कथा इथे ऐकायला मिळतात.

शिकार करताना :

रानावनातून शिकार करताना शिट्टी वाजवून एकमेकांशी संवाद साधता येतो आणि तो ही आजूबाजूच्या कुणालाही सुगावा न लागू देता.

मेघालय ची राजधानी शिलॉंग पासून केवळ ५५ किमी वर वसलं आहे कॉन्गथोंग. ही एक अतिशय शांत, संथ गती असलेली आणि जगा पासून वेगळी अशी जागा आहे. इथे जाण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ उत्तम आहे.

मेघालयात कधीही पाऊस पडू शकतो म्हणून इथे जाताना एक दोन दिवस अधिक हाताशी असलेले कधीही चांगले. इथले गावकरी अतिशय आदराने आणि प्रेमाने एकमेकांशी वागतात.

त्यांची छोटी छोटी गवताने शाकारलेली घरे, शेती आणि निसर्गाशी जोडलं गेलेलं नातं सगळंच पाहण्या सारखं आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या गोष्टी त्यांच्याच शब्दात ऐकण्यात वेगळीच मजा आहे.

 

 

शिलॉंग शहरातून इथे कारने जाता येऊ शकतं. युरोप आणि अमेरिकेतून अनेक संशोधक ह्या अतिशय रंजक अशा परंपरेचा आभास करण्यासाठी येत असतात. अलीकडच्या काळात इथे होम स्टे ही तयार झाले आहेत.

गेल्या अनेक शतकात संवादाचे माध्यम म्हणून विविध भाषा संपूर्ण जगात वापरल्या गेल्या, काळाच्या ओघात नवनवीन संवादाची माध्यमे विकसित होत गेली तसच अनेक माध्यमे लोप पावली.

एकविसाव्या शतकातही ही शिट्ट्यांची परंपरा ह्या गावाने टिकवून ठेवली, ह्याचे संपूर्ण श्रेय इथल्या गावकऱ्यांचेच आहे.

उत्तरपूर्वेकडील सात राज्ये आपल्या फारशी परिचयाची नसतात, एकूणच हा डोंगराळ भाग आहे, त्यामुळे आपल्याच देशातील ह्या भागाची आपल्याला माहिती नाही, परंतु त्यांच्याकडे ही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पाहून आपण थक्क होऊन जातो.

 

negreensummit

 

वेगाने होणाऱ्या शहरीकरणात आपल्या परंपरा टिकवून ठेवणं आपल्याच हातात आहे ही फार मोठी शिकवण कॉन्गथोंग आपल्याला देत आहे.

वैविध्यतेने नटलेल्या ह्या भारत देशात इतक्या अनोख्या रीतीने जगणारे हे गाव आहे, तेव्हा जर कधी मेघालय ला गेलात तर ह्या शिट्ट्यांच्या गावाला आवर्जून भेट द्या. तुम्हाला एक जगावेगळा अनुभव नक्की मिळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version