Site icon InMarathi

को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बुडण्यामागील अक्राळविक्राळ गुन्हेगारी साट्यालोट्याचा प्रकार उघडकीस..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सहकारी बँकेत व्याज जरी जास्त मिळत असले तरीही गेल्या काही वर्षांत सहकारी बँकांत इतके मोठे मोठे घोटाळे झालेत की सहकारी बँक अचानक कधीही बंद पडू शकते अशी परिस्थिती आहे.

आता नुकतेच मुंबईस्थिती पंजाबी अँड महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत.

बँकेची सद्दयस्थिती बघता ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध लागू केल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्जे देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत.

लोकांचा कष्टाचा पैसा हा सहकारी बँकांत खरंच सुरक्षित आहे का?

फिक्स्ड डिपॉझिटवर सहकारी बँकांत व्याज एक टक्क्याने जास्त मिळते. पण आकडेवारी बघितल्यास असे लक्षात येते की २०१२-१३ साली अनेक सहकारी बँका बंद पडल्या.

ह्यातील बऱ्याच बँका ह्या महाराष्ट्रातील होत्या. २००८-०९ सालात देशातील १९ सहकारी बँका बंद पडल्या होत्या. हे आकडे बघितल्यास सहकारी बँकात पैसे ठेवायचेत की नाही हा प्रश्न पडतोच.

 

The Financial Express

आपल्या पैश्यांच्या सुरक्षिततेविषयी मनात प्रश्न उभे राहतात. सहकारी बँकेत व्याज जरी तुलनेने जास्त मिळत असले तरीही गेल्या काही वर्षांत सहकारी बँकांत इतके मोठे मोठे घोटाळे झालेत की सहकारी बँक अचानक कधीही बंद पडू शकते अशी भीती लोकांना वाटू लागली आहे.

एका बाजूला रिझर्व्ह बँकेने नवीन बँकिंग लायसन्स देण्यासाठी कडक नियमावली लागू केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र पीएमसी बँक चालवणारे एचडीआयएलचे डायरेक्टर मात्र त्यांची बँक ज्या प्रकारे चालवत होते ते बघितले तर कुणालाही धक्का बसेल.

पीएमसी म्हणजेच पंजाब अँड महाराष्ट्र बँक सध्या संकटात सापडण्याचे मोठे कारण म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सध्या दिवाळखोरीच्या गर्तेत अडकले आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे.

त्यांची जवळजवळ ३५०० कोटींची संपत्ती तसेच दहा बँक खाती सध्या गोठवण्यात आली आहेत. पीएमसी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर जॉय थॉमस यांना निलंबित करण्यात आले आहे.

एचडीआयएलने पीएमसी बँकेकडून भरमसाठ कर्ज घेऊन ते बुडवले आहे. त्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग वाधवान ह्यांना अटक झाली आहे.

 

Moneycontrol

बँकेने नियमबाह्य आणि चुकीचे भरमसाठ कर्ज देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एचडीआयएल व्यतिरिक्त पीएमसी बँकेने अनेक बड्या बड्या कंपन्यांना भरमसाठ कर्जपुरवठा केला आणि त्यापैकी एकूण ४४ मोठ्या खात्यांनी हे कर्ज बुडवले आणि बँक आर्थिक संकटात सापडली.

ह्या ४४ मोठ्या खात्यांपैकी १० खाती ही एचडीआयएल आणि वाधवान ह्यांची आहेत.

पीएमसी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी २००८ ते २०१९ ह्या काळात भांडुप येथील पीएमसी बँकेतील काही खात्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसतानाही ही खाती रिझर्व्ह बँकेपासून लपवून ठेवली होती. कमी कर्ज रक्कमेचा खोटा आणि बनावट अभिलेख रिझर्व्ह बँकेपुढे सादर केला.

बँकेचे संचालक आणि पदाधिकारी ह्यांच्या अश्या भ्रष्ट धोरणामुळे बँकेला तब्बल ४३५५. ४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

ह्या पैश्यांतूनच हे गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ह्या गैरव्यवहारात एचडीआयएल कंपनी आघाडीवर होती. एचडीआयएलच्या संचालकांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून हा सगळं घोटाळा केला आहे. त्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता त्या रक्कमेचा स्वतःच्या खाजगी कारणांसाठी वापर केला आणि बँकेची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.

एचडीआयएल आणि पीएमसी बँक ह्यांच्यात जवळचे संबंध असण्याचे कारण म्हणजे पीएमसी बँकेचे चेअरमन वर्यम सिंह हे होते. वाधवान आणि एचडीआयएलशी संबंधित अनेक कंपन्यांचे वर्यम सिंह डायरेक्टर होते.

पीएमसी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर टीव्हीवर चक्क खोटे बोलले. इतक्या मोठ्या घोटाळ्याची आणि ठेवीदारांच्या कष्टाच्या पैश्याची अफरातफर झालेली असताना त्यांनी चुकीची माहिती दिली.

असेही सांगितले की वर्यम सिंह ह्यांनी २०१५ सालीच एचडीआयएलमधून राजीनामा दिला. पण खरं तर एचडीआयएल आणि बँक ह्यांच्यात घोटाळा उघडकीस येईपर्यंत घनिष्ठ संबंध होते. आणि बँकेची अशी वाईट अवस्था हा त्याचाच मोठा पुरावा आहे.

 

Yes Punjab

बँकेचे एमडी असे जाहीरपणे अर्धसत्य सांगत आहेत आणि त्यांना असे करण्याची परवानगी देणारे सरकार आणि नियामक मंडळ हे ठेवीदारांची घोर फसवणूक करीत आहेत.

आता सरकारनेच ठेवीदारांना उत्तरे देणे आवश्यक आहे. तसेच संपूर्ण संचालक मंडळच बदलून टाकणे, दोषींवर कारवाई करणे आणि ठेवीदारांना त्यांची कष्टाची पुंजी परत मिळवून देणे हे सरकारचे काम आहे.

पीएमसी बँकेच्या ह्या घोटाळ्यामुळे चांगल्या सुरु असलेल्या सहकारी बँकांवर सुद्धा परिणाम होत आहेत कारण ठेवीदारांना आपापल्या कष्टाच्या पैश्यांची काळजी आहे. त्यांना आपला पैसा सुरक्षित हवा आहे.

ठेवीदार जर आपापला पैसा सुरक्षित राहावा म्हणून चांगल्या सुरु असलेल्या सहकारी बँकेतून आपले पैसे काढून घेणार असतील तर परिस्थिती आणखी बिघडणार आहे.

सर्व बँकांचे नियमन करणाऱ्या रिझर्व्ह बँकेने खरं तर नव्या बँक परवान्यांसाठी अतिशय कठोर नियमावली लागू केली आहे. पण पीएमसी बँकेबद्दल मात्र रिझर्व्ह बँकेकडून असा हलगर्जीपणा कसा काय झाला? एक तर रिझर्व्ह बँकेला ह्या सगळ्याची कल्पनाच नव्हती.

एचडीआयएल व पीएमसीचे एकमेकांशी किती घनिष्ठ संबंध आहेत हे माहित असून देखील रिझर्व्ह बँकेने त्यावर काहीच आक्षेप घेतला नाही. रिझर्व्ह बँकेच्या ह्या नियमनाच्या अपयशामुळे आज हजारो मध्यमवर्गीय ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत आणि त्यांची रात्रीची झोप उडाली आहे.

 

Moneylife

१२ जानेवारी २०१५ रोजी चरणजीत सिंह ह्यांचे निधन झाल्यानंतर पीएमसी बँकेच्या बोर्डाने वर्यम सिंह ह्यांची नवे चेअरमन म्हणून पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२० सालापर्यंत नियुक्ती केली.

२००९ साली वर्यम सिंह ह्यांचे नाव एचडीआयएल ग्रुपच्या प्रमोटर ग्रुप मध्ये होते. २०१५ साली त्यांनी एचडीआयएल मधून राजीनामा दिला तरी त्यांचे एचडीआयएल आणि एचडीआयएलच्या अनेक कंपन्यांशी जवळचे संबंध होते.

वर्यम सिंह ह्यांचे वाधवान ह्यांच्याशी फार जुने संबंध आहेत. १९९७ साली त्यांना डीएचएफएलचे डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

त्यांनी २००९ साली डीएचएफएलमधून राजीनामा दिला आणि एचडीआयएलमधून २०१५ साली राजीनामा देण्याआधी वर्यम सिंह ह्यांनी एचडीआयएलच्या अनेक कंपन्यांचे डायरेक्टर म्हणून नऊ वर्षे काम केले होते.

एचडीआयएलची एक कंपनी असलेली ब्ल्यू स्टार रिएल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीत सिंह ह्यांचा फक्त एकच शेअर होता.

पण ह्या शेअरची किंमत बघितली तर लक्षात येते की वर्यम सिंह आणि एचडीआयएल ह्यांचे किती जवळचे संबंध आहेत.

त्याचप्रमाणे सिंह हे पीएमसीचे चेअरमन असताना ते ब्रॉडकास्ट इनिशिएटिव्ह्ज लिमिटेडचे प्रमोटर सुद्धा होते. कंपनीच्या मार्च २०११ च्या ड्राफ्ट लेटर मध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. सिंह ह्यांच्यासह राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि अशोक कुमार गुप्ता ह्यांची नावे सुद्धा प्रमोटर्सच्या यादीत होती.

 

The Hindu Business Line

Zaubacorp वर दिलेल्या माहितीनुसार वर्यम सिंह एकूण १८ कंपन्यांचे डायरेक्टर होते आणि त्यापैकी बहुसंख्य कंपन्या ह्या वाधवान ह्यांच्याशी निगडित आहेत.

ह्याचाच अर्थ असा की वर्यम सिंह आणि बँकेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांचे पैसे असे बड्या धेंडांवर अगदी सहज उडवले आणि ह्या मोठमोठ्या कंपन्यांनी घेतलेले सगळे कर्ज बुडवून मध्यमवर्गीय ठेवीदारांच्या कष्टाच्या पैश्यांवर संकट आणले.

सहकारी बँकेचे पदाधिकारी जर असे खाजगी हितसंबंधांतून नियमबाह्य कर्जवाटप करत असतील आणि नंतर ती बँक बुडवून मोकळे होत असतील तर मध्यमवर्गीय ठेवीदारांनी आता सहकारी बँकेकडे पाठ फिरवावी की काय असाच प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात आल्याशिवाय रहात नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version