Site icon InMarathi

काश्मीरवरील भारतीय दावा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ५)

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आधीचा भाग इथे वाचा: कश्मीर विलीनीकरणाबाबत नेहरूंची अनिच्छा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ४)

कश्मीर समस्येची सुरूवात व त्यावरून दोन्ही देशात झालेल्या संघर्षाची सुरूवात आपण पाहिली आहे. आता सत्तर वर्षे झाली त्याला पण समस्या अजूनही आपल्याजागी कायमच आहे. या समस्येचा काही तोडगा आहे का? असलाच तर तो कसा असू शकेल? तो शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.

प्रथमतः भारतीय दृष्टिकोनातून आपण या प्रश्नाचा विचार करुयात.

जम्मू व कश्मीर हे राज्य भारताचे अतूट अंग आहे अशी गेली सत्तर वर्षे भारताची याबाबतीत आधिकृत भुमिका आहे. आणि भारतातील कुठल्याही पक्षाचे सरकार ते यावरच कायम राहिलेले आहे. भारत कश्मीरबाबतीत कधीही तडजोड करणार नाही. कारण कश्मीर ताब्यात ठेवण्यासाठी भारताने आजपर्यंत भरपूर सैनिकी व आर्थिक किंमत चुकवलेली आहे. त्यामुळे जम्मु कश्मीरवर भारताचं कुठलंही सरकार कधीही तडजोड करणार नाही लोक त्यांना तसे कधीही करु देणार नाहीत.

इथे मी फक्त भारताच्या ताब्यातील कश्मीरबाबतीत बोलत आहे. भारताने ज्या दिवशी म्हणजे 1947 साली पहिल्यांदा शस्त्रसंधी स्विकारली तेव्हापासून भारत त्यापुढे एक इंचही गेलेला नाही. 1947, 1965, 1971, 1999 ला संधी मिळूनही भारताने पाकव्याप्त कश्मीर मिळवण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. का केले नाहीत? या पूर्वीच्या भागात, या विषयी असलेले भारताचे धोरण सविस्तर पणे मांडलेले आहे. भारतास तेव्हाही हा भाग नकोच होता आणि आजही नकोच आहे हे स्पष्ट आहे. फक्त कुठलेही सरकार किंवा राजकीय पक्ष हे सांगण्याची जोखीम घेऊन स्वतःला देशद्रोही सिद्ध करण्याची संधी विरोधात असणाऱ्या लोकांना देणार नाही. राजकीय दृष्टीने जागरूक असलेल्या नागरिकांनी ते आपल्या याविषयी असलेल्या धोरणातून अप्रत्यक्षपणे समजून घ्यावे.

“1995/ 96 साली अखंड जम्मू कश्मीर भारताचा भाग आहे.” व पाकव्याप्त कश्मीर परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी अशा आशयाचा एक ठराव भारतीय संसदेने सर्वसम्मंतीने पास केलेला आहे. तो निव्वळ प्रतिकात्मक स्वरूपाचा आहे. पाकव्याप्त कश्मीर भारताचा भाग आहे व एक दिवस हा भाग भारतात समाविष्ट होईल – अशाप्रकारची वक्तव्य आपले सर्वपक्षीये वेळोवेळी करत असतात. ती निव्वळ दिशाभुल करणारी व राजकीय प्रचाराचा भाग मात्र असतात. कारण याबाबतीत सत्य सांगणे हे राजकीय दृष्टीने कुणाच्याही फायद्याचे नसल्यामुळे राजकीय नेते असल्या शौर्य गर्जना आधूनमधून करत असताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतात.

पण याचबरोबर भारतीय कश्मीरबाबतीत भारत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही हे ही तितकेच सत्य आहे.

भारताने हे आपल्या कृतीतूनही जगाला दाखवून दिलेले आहे. 1965च्या युद्धात कश्मीरात पाकिस्तानी सैन्याची सरशी होत असताना ती रोखण्यासाठी भारताने पाकिस्तानी सीमाही पार केली होती. जम्मू व कश्मीरातील भूगोल व धार्मिक जनसंख्या ही पाकिस्तानला अनुकूल आहे आणि याचा लाभ घेऊन जर पाकिस्तान तिथे भारतास कमजोर करण्याचा प्रयत्न करेल तर भारतही आंतरराष्ट्रीय सिमा पार करण्यास कचरणार नाही हाच संदेश यातून तेव्हा शास्त्री यांनी दिला होता.

याचबरोबर आपण कश्मीरवरील भारतव पाकिस्तान यांच्यातील लढाई ही काही फक्त जमीनीसाठीच नाही हे ही लक्षात ठेवले पाहिजे. त्यास एक धार्मिक किनारही आहे आणि ती पाकिस्तानच्या अस्तित्वाशी व त्यांच्या प्रासंगिकतेशीही निगडित आहे.

कश्मीरात जर पाकिस्तानी दावा आपण मान्य केला तर तो भारतीय धर्मनिरपेक्षतेचा पराभव व जीनांच्या द्विराष्ट्र सिंद्धांताचा विजय मानला जाईल. यापुढची गोष्ट भारतातील उरलेल्या वीस कोटी मुसलमानांनाचा वकील म्हणून पाकिस्तान आपल्या समोर उभा ठाकेल. हे धर्मयुद्ध भारताच्या अतंर्गत भागात येईल. त्यामुळे कश्मीरवर भारत आपला ताबा कधीही सोडणार नाही. युद्ध कधीही आपल्या भुभागावर लढायचे नसते हा युद्धाचा महत्त्वाचा सिद्धांत असतो. या धर्मयुद्धाविरोधातील युद्धात या सिद्धांताचे पालन करण्यासाठी भारताचा कश्मीरावर ताबा असणे अत्यावश्यक नाही गरजेचे ठरते. तांत्रिकदृष्ट्या जरी जम्मू व कश्मीर भारताचा भाग असले तरी तेथील बहुसंख्य असलेल्या मुस्लीम समुदयाने भारतास कधीही आपला देश मानलेले नाही. भारताच्या मुख्य भुमीचं या धार्मिक युद्धापासून रक्षण करण्यासाठी कश्मीरात भारतीय सैन्य आणि भारतीय जनतेस किंमत चुकवत रहावेच लागणार आहे.

सोव्हिएत विघटनानंतर व 26/11नंतरच्या घटनाक्रमाने जागतिक राजकारणावर दूरगामी परिणाम केलेले आहेत. भारत, पाकिस्तान आणि त्यांच्यातील कश्मीर प्रश्न हाही यापासून अलिप्त राहिलेला नाही. या घटनाक्रमांनतर अमेरिकेचे पाकिस्तानशी असलेले संबध, अमेरिकेचे भारताशी असलेले संबध यात फारच मोठा फरक पडलेला आहे. या प्रश्नांच्या सोडवणूकीत हेही महत्त्वाचे आहे.

याचबरोबर यास अजून एक अँगल आहे. पाक-चीन संबधाचा!

स्रोत

पाकिस्तान व चीन यांना जोडणारा काराकोरम राजमार्ग पाकिस्तान व्याप्त कश्मीर मधून जातो. या भारताच्या शत्रू देशावर नजर ठेवण्यासाठीही भारतास कश्मीर व त्यातील सियाचिन डोंगर महत्त्वाचे आहेत. कश्मीरचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे आहे त्याच्या सीमा भारताच्या या दोन्ही शत्रूदेशाशी लागतात हेही महत्त्वाचे आहे. सियाचीन हे युद्धक्षेत्रही याच कश्मीरात येते. सियाचीनवरुन आपल्याला पाकिस्तानी व चीनी सैन्य यांच्यावर नजर तर ठेवता येते. तेव्हा कश्मीर हे सामरीकदृष्टीनेही भारतासाठी तितकेच महत्त्वपूर्ण आहे.

जम्मू काश्मीर वरील पाकिस्तानी दावा पुढील भागात बघुयात.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

 

Exit mobile version