Site icon InMarathi

असा तयार केला जातो अर्थसंकल्प…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

२०१८-१९ साठी चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०१८ रोजी संसदेत सादर केला जाणार असल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण हा अर्थसंकल्प तयार कसा केला जातो आणि काय त्याची प्रक्रिया आहे ते जाणून घेऊया…!

आतापर्यंत दरवर्षी मुख्य बजेट आणि रेल्वे बजेट असे दोन बजेट सादर व्हायचे पण मोदी सरकारने दोन वर्षापूर्वी सप्टेंबर मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार मागच्या वर्षी पासून रेल्वे बजेट हे मुख्य बजेट मधेच सादर करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थ खात्यात स्वतंत्र विभाग आहे. सामान्यपणे बजेट ची तयारी आदल्या वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सुरु होते, म्हणजे बजेट ची तयारी ते सादरीकरण यासाठी वर्षातील पाच ते सहा महिन्यांचा कालावधी यात जातो.

स्रोत

सर्वात आधी सर्व मंत्रालयांना, राज्यांना आणि स्वायत्त संस्थांना पुढच्या वर्षीच्या खर्चाचा आराखडा सादर करण्याची सूचना दिली जाते आणि हा आराखडा मिळाल्यानंतर मंत्रालयांशी त्यावर सल्लामसलत केली जाते. याचबरोबर शेतकरी, व्यापारी, उद्योगपती, अर्थतज्ज्ञ आणि सामान्य लोकांचं मत घेतलं जात. (हे मत कितपत ऐकलं जातं हा वेगळा मुद्दा !)

साधारणपणे डिसेंबर महिन्यात अर्थसंकल्पाचा first cut म्हणजेच कच्चा आराखडा तयार केला जातो. हा कच्चा आराखडा नेहमी निळ्या कागदावरच बनवला जातो. बऱ्याच बैठकांनंतर हा आराखडा फायनल केला जातो आणि मग अर्थमंत्र्यांकडून कर प्रस्तावावर (Tax proposal) निर्णय घेतला जातो.

अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घेतली जाते. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मंत्रिमंडळाला थोडक्यात बजेट मधील तरतुदींविषयी सांगितलं जातं. अर्थसंकल्पीय भाषणाबरोबर हा अर्थसंकल्प राज्य सभेत मांडला जातो.

या भाषणाचे दोन भाग असतात –

१) सर्वसाधारण आर्थिक सर्वेक्षण आणि धोरण

२) कर प्रस्ताव

त्यानंतर या अर्थसंकल्पावर सभासदांच्या भाषणानंतर विनियोजन विधेयक (Appropriation Bill) मांडलं जातं आणि त्यावर मतदान घेतलं जातं. अर्थातच या सगळ्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो.

 

indianexpress.com

हे अर्थसंकल्प लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात संमत व्हावं लागतं आणि ते सादर केल्यानंतर ७५ दिवसांच्या आत राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण होते…!

बजेट संबंधी काही महत्वाच्या गोष्टी:

* भारतीय राज्यघटनेत बजेट नावाचा शब्द नाही. कलम ११२ नुसार सरकार ‘Annual Financial Statement’ सादर करतं ज्यालाच बजेट म्हटलं जातं.

* बजेट हे काही मोजक्या अधिकारी आणि नोकरवर्ग यांच्याकडून तयार केलं जातं.

* बजेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी कॉम्प्युटर्स सर्व networks पासून तोडली जातात.

* अर्थ खात्याच्या इमारतीच्या तळघरात असलेल्या छापखान्यात बजेट ची छपाई केली जाते.

* बजेट तयार करणाऱ्या आणि छापणाऱ्या सर्व स्टाफ ची राहण्याची सोय अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक मध्ये केली जाते.

* बजेट संसदेत सादर केल्यानंतरच या स्टाफला घरी जाण्याची परवानगी दिली जाते.

* या सर्व स्टाफ च्या हालचालींवर आणि फोने कॉल्स वर आयबी कडून बारीक नजर ठेवली जाते. आणि त्यांना देण्यात येणाऱ्या खाण्याची तपासणी केली जाते.

* बजेट सीक्रेट ठेवण्यासाठी पत्रकारांना अर्थ मंत्रालयात येण्यास मनाई केली जाते.

 

indianexpress.com

या सर्व गोष्टी करण्यामागे कारण हे असते की बजेट सदर होण्याच्या आधी त्याची गोपनीयता कसोशीने पाळली जावी. हे बजेट एकदा संसदेत सादर झाल्यानंतर ते अर्थखात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येते.

सादर होत असताना अनेक न्यूज चॅनेल त्याचे थेट प्रक्षेपण करतात. लोकसभा टीव्ही या शासकीय वाहिनीवरही बजेट चे थेट प्रक्षेपण असते.

भारतासारख्या खंडप्राय देशाचा वार्षिक अर्थसंकल्प म्हणून आपल्या बजेटला अनन्यसाधारण महत्व आहे.

===

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version