Site icon InMarathi

जम्मूतील मुस्लिमांचा एक समुदाय ३७० रद्द झाल्याबद्दल खुश असण्यामागचं कारण….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

भाजपा सरकारने अचानकपणे धक्का देत जम्मू आणि काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आणि जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ३५ अ व ३७० कलम अचानकपणे रद्द झाले. सरकारच्या ह्या निर्णयावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.

देशातील बहुतांश जनतेने ह्या निर्णयाचे स्वागतच केले.

पण काही लोकांचे ह्या निर्णयावरून गळे काढणे अजूनही सुरूच आहे. त्यांच्या मते काश्मिरी जनतेचा विचार न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मिरी जनता ह्या निर्णयाला कदापि मान्यता देणार नाही.

business-standard.com

पण असे असूनही जम्मू काश्मीर येथे गेली अनेक शतके वास्तव्य करून असलेले गुज्जर, बकरवाल ह्या जमातीच्या लोकांनी मात्र सरकारच्या ह्या निर्णयाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. त्यांनी सरकारच्या निर्णयाला पाठींबा देत आनंद व्यक्त केला आहे.

गुज्जर बकरवाल समाजाच्या लोकांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की सरकारने आता जम्मू व काश्मीरमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. खास करून सीमेजवळील जी संवेदनशील गावे आहेत,तिथे शांतता कायम राहण्यासाठी आणि कुठलेही धार्मिक दंगे भडकू नयेत ह्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी ह्या समाजाच्या लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या जम्मू शहरातील निर्बंध उठवण्यात आले असले तरी काश्मीर खोऱ्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी म्हणून अजूनही राजौरी, पूंछ ,किश्तवाड़-डोडा ह्या भागात फोन वापरण्यावरील निर्बंध अजूनही कायम आहेत.

kashmirobserver.in

ईद सणानिमित्त काही निर्बंध उठवण्यात आले होते पण अजूनही व्हॉइस कॉलिंगवरील निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत.

राजौरीमध्ये वास्तव्य करणारे मोहम्मद झुबान ह्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की,

“सरकारने घेतलेला हा निर्णय उच्चस्तरीय आहे. आणि ह्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. पण आम्हाला धार्मिक दंगे भडकण्याची भीती वाटते आहे. काही समाजकंटक नक्कीच काहीतरी घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नांत असू शकतील.

सरकारने शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आम्ही कायम येथे शांततेतच वास्तव्य केला आहे आणि आम्हाला हीच शांतता कायम राहावी असे वाटते. ”

राजौरी येथे पूर्वी काही अप्रिय घटना घडल्या असल्याने तेथे अजूनही जमावबंदी लागू केलेली आहे. ईदसाठी थोड्या काळासाठी ही बंदी उठवण्यात आली होती पण परत जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

businesstoday.in

सीमेलगतच्या भागात वास्तव्य करणाऱ्या हुसैन ह्या व्यक्तीने इंडिया टुडेशी बोलताना असे सांगितले की ,”मला सरकारने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे पटलेला आहे. मी ह्या निर्णयाला पाठिंबा देतो. ह्यामुळे ह्या भागाचा विकास होऊ शकेल.

पण नेत्यांनी मात्र शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. फोनवरील असलेली बंदी आता उठवली गेली पाहिजे. ही बंदी उठवली तर आम्हाला आमच्या कुटुंबियांशी संवाद साधता येईल.”

सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घोषित केला तेव्हा आरएस पुरा ह्या सीमेलगतच्या गावातील गुज्जर, बकरवाल ह्या मुस्लिम समाजातील लोकांनी तिरंगा फडकावून त्यांचा आनंद साजरा केला.

ह्या समाजातील लहान मुले देशभक्तीपर घोषणा देत होती आणि नमाज पढून झाल्यानंतर त्यांनी मिठाई वाटून आणि खाऊन त्यांचा आनंद व्यक्त केला.

गावचे मुख्य असलेले लियाकत अली म्हणाले की,

“गेल्या पन्नास वर्षांपासून आमच्या समाजाने भेदभावच सहन केला आहे. आता अखेर आमच्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कुणीतरी असेल. आमच्या समाजातील मुलांचे चांगले शिक्षण झालेले नाही त्यामुळे जर कदाचित आरक्षण मिळाले तर आमच्याही समाजाची प्रगती होऊ शकेल.”

ह्या भागात वास्तव्य करणारे गुज्जर लोक हे दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करतात तर बकरवाल समाजातील लोक हे पशुपालन करतात. ते मेंढपाळ आहेत.

oneindia.com

आरएस पुरा ह्या गावातील सर्वात ज्येष्ठ नागरिक असलेले आणि सर्वात जुने रहिवासी असलेले कासीमुद्दीन म्हणतात की, “आम्ही जेव्हा दुधाचा व्यवसाय करतो तेव्हा आम्हाला अजिबातही काही फायदा होत नाही. आमच्या गुरांचा सांभाळ करणे सुद्धा आम्हाला कठीण जाते. सरकारने आम्हाला चांगला भाव मिळवून द्यावा. ”

गुज्जर समाजाला अनुसूचित जमाती /अनुसूचित जाती ह्यांच्यात स्थान देण्यात आले असल्याने ते आरक्षणास पात्र आहेत.

पण जम्मू काश्मीर राज्याला स्वतंत्र दर्जा असल्याने त्यांना इतकी वर्षे आरक्षणाचे फायदे मिळत नव्हते. त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना जमीनधारक, सरकार आणि खाजगी हॉटेल्स वगैरे ह्यांच्यावर अवलंबून राहावे लागते.

बकरवाल समाज हा भटक्या विमुक्तांचा आहे. ह्यांचे पूर्वज हे मूळचे पीर पंजाल आणि हिमालयात वास्तव्याला होते. आजही हे लोक मेंढपाळ आहेत आणि काश्मीर खोऱ्यात वास्तव्याला आहेत. त्यांच्या व्यवसायावरून त्यांचे नाव बकरवाल असे पडले.

बकरी वाले म्हणजेच बकऱ्या शेळ्या पाळणारे ते बकरवाल असे त्यांचे नाव पडले. गुज्जर आणि बकरवाल ह्यांचा इतिहास, संस्कृती, भाषा आणि वंश एकच असल्याचे सांगितले जाते.

scroll.in

गुज्जर आणि बकरवाल ह्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार सुद्धा गेल्या अनेक शतकांपासून चालू आहेत. त्यामुळे त्यांचा समाज एकच आहे. आजवर त्यांना आरक्षणाचे कुठलेही फायदे मिळू शकले नाहीत त्यामुळे त्यांचा समाज हा मागे राहिला आहे.

आता मात्र जम्मू काश्मीरचा विशेष दर्जाच काढून टाकण्यात आल्याने सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना मिळणारे आरक्षणाचे लाभ त्यांनाही मिळू शकतील आणि त्यामुळे त्यांच्या समाजाची आर्थिक व सामाजिक प्रगती होऊ शकेल. म्हणूनच त्यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत आनंद साजरा केला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version