Site icon InMarathi

सुट्टी “फुल एन्जॉय” करायची आहे? कोकणातील या १० जागांपैकी कुठेही जा…

konkan-coast-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा…’ समुद्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर दृश्य येतं खळखळणार्‍या लाटा आणि भणभणारा वारा! समुद्राकडे पाहिलं की, असं वाटतं कसा आणि कुठवर पसरला आहे हा?

या लाटा आपण बघत नसलो तरी अविरत अशाच येत असतील? रात्रीच्या वेळी पण लाटा उसळत असतील का? पण कोणी बघो न बघो त्याचा उद्योग अविरत सुरू असतो.

दूरवर समुद्राकडे बघत बसलं तर तास दोन तास असेच निघून जातात आणि समुद्राच्या पोटात आपली सारी दु:ख, चिंता आपोआप मिटून जातात. मन शांत शांत वाटतं. त्या अथांग लाटा खूप काही शिकवून जातात.

समुद्राच्या लाटांबरोबर येणारे निर्माल्य किंवा अन्य काही असलं तर ते बाहेर फेकलं जातं, त्यातून अशीच शिकवण मिळते की, जे काही छान आहे ते ठेवा आणि बाकीचं बाहेर फेकून द्या.

रात्रीच्या मंद चांदण्यात समुद्राकडे बघत बसलं तर अभूतपूर्व आनंद मिळतो. खरंच समुद्र खूप काही देऊन जातो आपल्याला. लहान मुलाला तो अवखळ मित्र वाटतो. त्याच्यात डुंबण्याचा तो आनंद घेतो.

युवकांना ‘रुपेरी वाळूत, माडाच्या बनात ये ना…’ अशा गाण्याप्रमाणे अवखळ जोडीदाराचा भास समुद्रात होतो. मध्यम वयाच्या माणसांना अगदी भिजायला आवडत नसलं तरी पाण्यात पाय बुडवून तरी समाधान मिळतं.

 

 

सध्या कोरोनाच्या संकटामुळे सहल, मनमोकळी सफर, धम्माल या गोष्टी काहीशा दूरावल्या आहेत.

हे संकट कधी सरेल? पुन्हा सगळं कधी सुरळीत होईल याबाबत शाश्वती नाही, पण थोडा संयम बाळगुया.

एकदा सारं काही सुरळीत सुरु झालं की मग तुमची धांदड उडायला नको म्हणून तुमच्या या खास सुट्टीची बकेट लिस्ट आत्ताच तयार करा.

तर वृद्ध किंवा ज्यांना डुंबायला आवडत नाही त्यांना समुद्र किनारी बसलं तरी तितकंच प्रफुल्लित वाटतं. एकंदर काय तर समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद हा अवर्णनीय आहे.

समुद्र म्हटलं की कोकण! महाराष्ट्रातील कोकण भागाला समुद्रकिनारपट्टीची देणगी आहे. ही खूप प्राचीन आहे. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. पर्यटकांच्या प्रवासाचे इथे सार्थक होते.

तिकडचं वातावरणही अजूनही फारसं व्यावसायिक नाही. तिकडे घरगुती राहण्याच्या सोई किंवा जेवणाच्या सोई खूपशा प्रमाणात आहेत. मोठी मोठी हॉटेल फार कमी प्रमाणात आढळतात.

कोकणात मांसाहारी विशेषत: मासे खाणार्‍यांची चंगळ होते.

कोकणात जाण्यासाठी सर्वांत उत्तम वेळ म्हणजे जानेवारी व फेब्रुवारी महिना. या वेळी तिथलं वातावरण खूप छान असतं. म्हणजे खूप उकाडा पण नसतो आणि थंडीही नसते आणि त्या वेळी सुट्ट्या नसल्याने थोडा स्लॅक सिझन असतो.

दिवाळी सुट्टी किंवा मे महिन्यात कोकणात हल्ली बर्‍याच प्रमाणात गर्दी होते. या वेळी काही मोठ्या बीचवर वॉटर स्पोर्ट, उंट, घोडे, बोटींग असे मनोरंजनाची साधने उपलब्ध केलेली आहेत.

 

 

 

समुद्राचं वर्णन वाचून वाटतंय ना लगेच बॅग भरावी आणि समुद्राच्या सान्निध्यात चार क्षण निवांत घालवावे मग वाट कसली बघताय? चला उचला बॅग आणि प्रयाण करा आणि असे कोणते सागरी किनारे आहेत त्याची माहिती पुढे वाचा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. अलिबाग :

मुंबई, पुण्यात राहणार्‍या, पैसेवाल्या लोकांचं शनिवार-रविवारचं अलिबाग हे आवडतं ठिकाण आहे. १७ व्या शतकात स्थापन झालेल्या या शहरात जुने किल्ले, चर्च, सभास्थाने आणि मंदिरे आहेत.

अलिबागचा मुख्य समुद्रकिनारा अतिशय आकर्षक नसला तरी बहुतेक लोक सभोवतालच्या किनार्‍याकडे जातात. रिसॉर्टपासून साध्या घरगुती राहण्याच्या सोईपर्यंत अनेक ठिकाणी राहण्याची सोय आहे.

मुंबईपासून अंतर : सुमारे १०० किलोमीटर, प्रवास वेळ : ३ तास

 

२. काशीद :

अलिबागपासून थोडं पुढे काशीद समुद्रकिनारा आहे. तो थोडा वेगळा आहे, पण त्याची लोकप्रियता वाढत आहे. या लांबच लांब समुद्रकिनार्‍यावर कॅस्युरीना वृक्ष, स्नॅक स्टॉल आणि हॅमक्स अशा वृक्षांच्या रांगा आहेत.

या एरियात एक अभयारण्य आणि जंजिरा किल्ला आहे. सुट्टी नसताना, समुद्र किनारा रिकामा असताना त्याचा वेगळाच प्रभाव पर्यटकांवर पडतो. घरगुती राहण्याची सोय आणि काही प्रमाणात हॉटेल या भागात आहेत.

मुंबईपासूनचे अंतर : सुमारे १३० किलोमीटर, वेळ ४ तास

 

 

३. दिवेआगर :

दिवेआगर हा फारसा प्रसिद्ध नसलेला समुद्रकिनारा आहे. खरंतर तो मुंबईपासून फारसा दूर नाही. पण तिथे जाण्यासाठीचा मार्ग घनदाट जंगलातून आहे.

जंगलातून तुम्ही मार्ग काढत जाताना एक मोठा समुद्र किनारा तुमचं स्वागत करेल. इथे एक्सोटिका बीच रिसॉर्ट, नारळाच्या झुडपात इंद्रधनुष्य कॉटेज अशी हॉटेल्स आहेत.

जी स्वस्त आणि चांगली आहेत. शहरामध्ये सोनेरी मूर्ती असलेलं गणपती मंदिर होतं, परंतु चोरांनी २०१२ मध्ये मूर्ती चोरली तेव्हापासून तिथे चांदीची मूर्ती ठेवण्यात आली.

मुंबईपासून अंतर : सुमारे २०० किलोमीटर, जाण्यासाठी लागणारा वेळ सुमारे ५ तास

 

 

४. श्रीवर्धन :

श्रीवर्धन समुद्रकिनार्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे बसण्यासाठी केलेली बाकडी, लाइट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ सार्वजनिक शौचालये जी भारतात समुद्र किनारी दुर्मीळ आहेत.

समुद्र किनारी असं नाही तर आपल्याकडे सर्वच भागात स्वच्छ शौचालये दुर्मीळ आहेत. लोकं स्वच्छता ठेवत नाहीत. तो विषय वेगळाच आहे. पण या सोई इथे छान आहेत, पण एक त्रुटी या भागात आहे ती म्हणजे किनारा घरांपासून खूपच लांब आहे.

मुंबईपासून अंतर : सुमारे २०० किलोमीटर, प्रवासाला लागणार वेळ ५ तास

 

 

५. हरिहरेश्‍वर :

बरेचसे लोक श्रीवर्धनमधील शंकराच्या देवस्थानाला भेट द्यायला येतात आणि मग तिकडे जवळच असलेल्या हरिहरेश्‍वरला जातात. समुद्रकिनार्‍यालगतच प्रदक्षिणा मार्ग आहे.

किनार्‍यालगतचा खडकाळ भाग ओहोटीच्या वेळी दिसून येतो. हा समुद्र किनारा मंदिराच्या उत्तरेस आणि दक्षिणेस दोन भागात विभागलेला आहे.

मुंबईपासून अंतर : सुमारे २१० किलोमीटर, प्रवासाला लागणारा वेळ ५ तास

 

६. मुरुड :

मुरुडचा समुद्र किनारा हा कोकणपट्टीवरील खूप मोठा समुद्र किनारा आहे. हॉटेल आणि घरगुती राहण्याच्या सोई तिथे खूप आहेत.

सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण या किनार्‍यावरचं म्हणजे डॉल्फिन आहे.

विशेषत: थंडीत ते वारंवार दिसतात. उत्तरेला पुढे थोडेसे हरणेचा बीच आहे. तिथे माशांची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. तिथूनच सुवर्णदुर्ग किल्ल्याला देखील जाऊ शकता. हे ठिकाणसुद्धा पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे.

मुंबईपासून अंतर : २४० किलोमीटर, जाण्यासाठी लागणारा वेळ ६ तास

 

 

७. गणपतीपुळे, मालगुंड

गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा व गणपतीचं देऊळ प्रसिद्ध आहे. या बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे शांत समुद्रकिनारा हवा असेल तर हा बीच उपयोगी नाही. तुम्हाला जर शांत बीच हवा असेल तर तिथून जवळच मालगुंड बीच आहे.

गणपतीपुळेच्या दक्षिणेस असलेला आरेवारे बीचचा समुद्रकिनारा पण खूप छान आहे. तिथलं दृश्य खूपच मनमोहक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हा समुद्र किनारा आहे. आणि पर्यटकांचं विशेष आकर्षणाचा ठिकाण आहे.

मुंबईपासून अंतर : सुमारे ३४० किलोमीटर, सुमारे 8 तास.

 

 

8. तारकरली, मालवण आणि देवबाग

तळ कोकणातील म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पर्यटकांचं विशेष आवडतं ठिकाण आहे, पण इकडे जाण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो. आणि कोकणातल्या घाटाचा थोडा त्रास होऊ शकतो.

ज्याला प्रवासाचा त्रास होत नाही, त्यांना घाटाचं सौंदर्यही पाहायला मिळतो. ते अतिशय मनमोहक असतं. या बीचवर गेल्यावर गोव्याची आठवण येते. खूप ठिकाणी बीचजवळ राहण्यासाठी खूप छान सोय आहे. देवबाग येथे एक बेट तयार करून तिथे वॉटर स्पोर्ट आहेत.

त्यामुळे समुद्र किनार्‍यावरील शांतता अढळ राहिली आहे.

मुंबईपासूनचे अंतर :५०० किलोमीटर, लागणारा वेळ १७ तास

 

 

९. भोगवे :

भोगवेचा समुद्र किनारा हा तसा निर्जन भाग आहे. कार्ली नदी या अरबी समुद्राला मिळते. देवबाग बीचपासून म्हणजेच काही अंतरावरूनही हा बीच दिसून येतो, परंतु त्या परिसरातील तारकरलीच्या अतिप्रसिद्धीमुळे हा बीच दुर्लक्षित राहिला आहे.

पण ज्याला अतीव शांतता आणि निसर्ग याचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी नक्की तिकडे जाऊन पाहावं. तिथे मासेसुद्धा छान मिळतात.

मुंबईपासूनचे अंतर : सुमारे ५० किलोमीटर, लागणारा वेळ १७ तास

 

 

१० वेंगुर्ला :

गोव्यापासून अर्ध्या तासावर वेंगुर्ला बीच आहे. वेंगुर्ला समुद्रकिनार्‍याला सभोवताली टेकड्या आहेत. लाइट हाउस, जेटी म्हणजे जिथे मच्छीमार मोठ्या प्रमाणावर होते हा परिसर ‘बर्न आयलँड’ म्हणूनही ओळखला जातो. जिथे पक्षी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ंहोते.

मुंबई पासून अंतर : अंदाजे ५२० किलोमीटर, प्रवासासाठी लागणारा वेळ साडेदहा तास

 

 

तर असे हे १० समुद्र किनारे आहेत. मासे खाणार्‍यांसाठी हे समुद्रकिनारे म्हणजे पर्वणीच आहे. ताजी मच्छी इथे मिळते.

समुद्र किनारा म्हटलं की, आणखीन एक ठिकाण अनिवार्य आहे की ज्याचं नाव घेतल्याशिवाय ही माहिती पूर्णच होऊ शकत नाही ते म्हणजे गोवा. हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे, पण ते सर्वश्रुत असल्याने त्याची वेगळी माहिती देण्याची गरज नाही.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version