Site icon InMarathi

विकिपीडियाचा फाउंडर म्हणतोय.. “झुकरबर्गसारख्या लोकांनी इंटरनेटची वाट लावून टाकलीय!”

mark larry inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

तुमच्याकडे वायफाय आहे का हो? तुम्ही फेसबुक वापरता ना? तुम्ही व्हाटस्अ‍ॅप वापरता ना? या प्रश्‍नांना आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला नेहमीच सामोरे जावे लागते.

वायफाय नाही? अरे बापरे, मग तुम्ही कसं राहू शकता? असेही प्रश्‍न समोरच्याला पडतात. मग समोरचा लगेच विचारतो बरं मग तुमचा मोबाईल डाटा तरी चांगला 4जी आहे का? तुम्ही अनलिमिटेड नेट वापरता ना?

जर याचं उत्तर ‘हो’ आलं तर मग ठीके! म्हणजे तुम्ही माणसात आहात असं समजलं जातं. जर तुम्ही इंटरनेट वापरत नसाल तर फारच आऊटडेटेड वगैरे आहात असं समजलं जातं.

या १०-१२ वर्षांतील ही प्रगती आहे. याच्या आधी आपल्या मूलभूत गरजांव्यतिरिक्त टीव्ही, एखादी छोटीशी टू व्हिलर अशा गरजा होत्या, पण आता आपली गरज अगदी छोटी झाली आहे.

 

Nones Notes

बाकी काही नसलं तरी चालेल, पण हातात मोबाईल असणं आणि त्यात असंख्य अ‍ॅप असणं हे गरजेचं झालं आहे. ‘मुठ्ठी में है तकदीर हमारी’ या गाण्याप्रमाणे सगळं जग आपल्या हातात सामावलंय.

खरंच हा अँड्रॉइड फोन आणि त्याला रिलेटेड अ‍ॅप नसले तर आपलं जीवन अगदी बेचव होऊन जाईल अशी कधी आहे सध्याच्या जगाची.

सध्याचे युवक-युवती तर याच्या आहारी गेले आहेतच, पण आश्‍चर्य असे आहे की, मध्यम वयाचे किंवा अगदी वयस्कर लोक, लहान मुलंसुद्धा या नेटच्या आहारी गेली आहेत, महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नेटच्या अधीन गेल्या आहेत.

खरं तर आबालवृद्ध नेट वापरण्यात सुशिक्षित झाले आहेत म्हणून आनंद व्हायला पाहिजे.

पण विकिपिडियाचे सहसंस्थापक ज्यांनी इंटरनेटची निर्मिती केली अशा लॅरी सेंगर यांनी हल्लीच एका मुलाखतीत म्हटलं आहे की, ‘‘मार्क झुकेरबर्गसारख्या लोकांमुळे इंटरनेटची पुरती वाट लागली आहे.’’ ते असं का म्हणतायत ते पाहुया.

२००१ मध्ये लॅरी सेंगर यांनी विकिपीडियाची स्थापना केली. आणि त्यानंतर सुमारे दोन दशकांत इंटरनेटचा हा जो काही विकास झाला आहे त्यामुळे लॅरी सेंगर नाराज आहेत.

 

TNW

एका मुलाखतीत ते म्हणाले २००१ मध्ये जेव्हा त्यांनी विकिपीडियाची स्थापना केली तेव्हा इंटरनेटचा हेतू सुंदर आणि आदर्शवादी होता. जरी नेट कनेक्शनमध्ये थोडा प्रॉब्लेम होता, कधी नेट स्लो असायचं, कधी नेटच नसायचं तरी तो एक चांगला काळ होता.

आता ज्या पद्धतीने इंटरनेट बदलत आहे, आणि ते ज्या दिशेने जात आहे त्यामुळे ते नाखूश आहेत.

‘हे खरंच आश्‍चर्यकारक आहे.’ असं त्यांनी या आठवड्यात एका मुलाखतीत सीएनबीसीला सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार फेसबुक आणि ट्वीटरसारख्या सोशल मिडिया कंपन्या त्यांच्या शक्तीचा गैरवापर करीत आहेत. वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षिततेचे उल्लंघन करीत आहेत.

मार्क झुकेरबर्ग सारख्या लोकांवर त्यांनी टीका केली. फेसबुकला ‘खूप नियंत्रणाची गरज आहे.’ असे विधान त्यांनी केले.

सेंगर यांनी या विकेंद्रीकृत नेटवर्कबद्दल बोलताना नाराजी व्यक्त केली. त्यांचं म्हणणं असं आहे की, फेसबूक आणि ट्वीटरसारख्या कंपन्या युझरच्या म्हणजेच ते अकाऊंट वापर करणार्‍याचा डेटा अयोग्य पद्धतीनं वापरतात.

त्यांच्या सुरक्षेबद्दल काळजी घेतली जात नाही. कंपन्यांचा फायदा होण्यासाठी वापरकर्त्याचा वैयक्तिक डेटा वापरून ते नियमांचे प्रचंड उल्लंघन करत आहेत.

 

The Economist

ते असं म्हणाले,

‘‘ते आपले अनुभव शेअर करू शकतात, आपण जे पाहात असतो ते नियंत्रित करू शकतात, आपण ते पाहतो आणि त्यांच्या अ‍ॅपचा अनिवार्य भाग होऊन जातो.’’

आपल्या मताशी कोणी सहमत आहे का हे पाहण्यासाठी सेंगरने या आठवड्यात ‘सोशल मिडिया स्ट्राईक’ सुरू केला. त्याच्या स्वत:च्या ब्लॉगवर ‘डिजिटल स्वातंत्र्य’ अशी पोस्ट टाकली.

त्यांनी लिहिलं नेटचं असणारं विशाल डिजिटल साम्राज्य बदलण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्या या घोषणेवर शुक्रवारपर्यंत २४,००० स्वाक्षर्‍या होत्या. म्हणजे अनेक लोक त्यांच्याशी सहमत आहेत.

विकिपीडियाचे सहसंस्थापक सध्या जे एव्हरपीडिया नावाच्या ब्लॉकचेन एनसायक्लोपीडिया नेटवर्कचे सीआयओ आहेत.

ते या इंटरनेटच्या तंत्रज्ञानावर हल्ला करणारे पहिलेच व्यक्ती नाहीत तर वर्ल्ड वाईड वेबचे संस्थापक टिम बर्नर्सली यांनी अलीकडेच ‘कॉन्ट्रॅक्ट फॉर द वेब’ जारी केले आहे. ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी अधिक कारवाईची आवश्यकता आहे असे मत मांडले आहे.

सेंगर यांनी फेसबुक चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यांबद्दल बोलताना म्हटलं की, कंपनीसाठी त्यांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे, त्यांचा हेतूसुद्धा प्रामाणिक असेल, पण युझर्सच्या डाटा गोपनीयतेबद्दल आणि सुरक्षेबद्दल त्यांनी खूप चिंता व्यक्त केली.

 

Prezi

आणि हा अधिकारी कंपनीच्या शक्तीचा गैरवापर करत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

‘‘मार्क झुकेरबर्गसारख्या लोकांकडून किंवा सिलिकॉन व्हॅलीमधील आजच्या कोणत्याही कार्पोरेट अधिकार्‍याकडून इंटरनेट तयार केले गेले नसते,’ असे ते म्हणाले.

जगभरातील सरकार आणि नियंत्रकांद्वारे बिग टेकची वाढती मागणी असूनही, फेसबुक किंवा ट्वीटरसारख्या कंपन्या त्याला जुमानत नाहीत. सेंगर यांची खात्री पटली आहे की, कायदा हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे.

प्रकाशनाच्या वेळी फेसबूकने सीएनबीसीला टिप्पणी दिली नाही, ट्वीटरनेही टिप्पणी नाकारली.

सेंगर यांनी म्हटले आहे की,

‘‘अनेक नियमांमुळे स्पर्धकांना बाजारात प्रवेश करणे कठीण होऊ शकते आणि शेवटी फेसबुकसारख्या मोठ्या कंपन्यांना फायदा होतो. मुक्त भाषण आणि ऑनलाइन नियंत्रित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर त्यांनी चिंता व्यक्त केली.

‘सरकार जरी यात गुंतले तरी त्यांची आवड ही वैयक्तिक लोकांसारखी नसते, असे सेंगर म्हणाले.

 

Marketing Mind

सेंगर अशा इंटरनेटची मागणी करत आहेत की, ज्यामुळे युझर्सच्या डेटावर नियंत्रण राहील. ‘फ्री इंटरनेटमुळे’ इंटरनेटमुळे अशा गोष्टींना जास्त जोर येतो असे त्यांचे म्हणणे आहे.

तर मंडळी आपण खूष होतो जेव्हा फेसबुकवर आपल्या ओल्ड मेमरीतील फोटो शेअर केले जातात किंवा तुम्ही जूनमध्ये काय केले, जुलै मध्ये काय केले, ही व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे मग तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा अशा अनेक गोष्टी तुम्हाला सुचवल्या जातात, दर्शविल्या जातात.

त्यामुळे आपली काळजी कोणीतरी करतंय असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात ती तुमच्यावर ठेवलेली नजर आहे.

सतत नेटच्या माध्यमातून कुणीतरी तुमच्यावर नजर ठेवत असतं आणि आपण काय करतो, लोकेशन द्वारे आपण कुठे जातो याचा डेटाही ठेवला जातो.

 

Broadband 4 Europe

तेव्हा सावध व्हा. नेटचा वापर काळजीपूर्वक करा. सेंगर यांच्या बोलण्यातील हाच गर्भितार्थ असावा.

नेटवरून माहिती मिळावी या चांगल्या हेतूने त्यांनी इंटरनेट सुरू केले होते, त्याची प्रगती झालेली त्यांना नक्कीच आवडली असती, पण ती अशा तर्‍हेने झाल्याने ते नाराज झाले आहेत.

आणि तेही खरंच आहे कारण यात वैयक्तिक माहिती चव्हाट्यावर येऊ शकते. तेव्हा बी केअरफूल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version