Site icon InMarathi

त्याचे एक्झिट पोल इतके ‘परफेक्ट’ ठरले की निकाल पाहून त्याला आनंदाश्रू आवरले नाहीत!

pradeep guptainmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा दिला त्यांनी अचूक अंदाज. आणि जेव्हा हा अंदाज खरा ठरला तेव्हा भावनातिरेकाने त्यांच्या डोळ्यांतुन पाझरले आनंदाश्रू.

कोण आहेत हे विश्लेषक? ज्यांनी भारतीय जनता पार्टी किती जागा जिंकून सत्तेत येईल याचे केले होते अचूक भाकीत??या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर-प्रदीप गुप्ता. कोण आहेत हे प्रदीप गुप्ता? चला घेऊया माहिती प्रदीप गुप्ता यांच्या विषयी.

प्रदीप गुप्ता आहेत “अक्सिस माय इंडिया” या निवडणुकांच्या निकालांचे भाकीत वर्तविणाऱ्या एका संस्थेचे अध्यक्ष.

 

buissness.com

फक्त निवडणूकच नाही तर इतर गोष्टीत देखील सर्व गोष्टींचे अचूक विश्लेषण करणारी ही संस्था आहे. प्रदीप गुप्ता हे या संस्थेचे अध्यक्ष. इंडिया टुडे ही वृत्तवाहिनी आणि माय अक्सिस यांनी एकत्र येऊन खूप मोठी मोहीम राबवून आणि अहोरात्र मेहनत घेऊन एनडीए स्वबळावर सत्तेत येईल असे भाकीत वर्तवले.

अखेर २३ मे ला निवडणुकीच्या निकालात इंडिया टुडे आणि माय अक्सिस यांनी बाजी मारली.

भारतातील लोकसभेच्या महानिवडणुकीचे पडघम वाजले आणि मीडिया हाऊसेसनी लगेच भारतभर सर्व्हे करायला सुरुवात केली. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?सत्ता कोणाकडे जाणार?

विद्यमान खासदार पुन्हा आपले नशीब अजमावून बघत असताना आपल्या जागा राखतील की पडझड होईल?

भारतातील निवडणूक दोन मुख्य पक्षात लढली गेली. राजकीय पटलावर सध्या अस्तित्वात असलेले बीजेपी सरकार म्हणजेच एनडीए आणि मागील २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात सपशेल गडगडलेली काँग्रेस सरकार प्रणित आघाडी म्हणजेच युपीए.

 

NewsClick

हेच प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे होते. बाकी राज्याराज्यामध्ये आपले अस्तित्व हरवून बसलेल्या प्रादेशिक पक्षांची एक आघाडी म्हणजे महागठबंधन पण या रिंगणात उभे होते. महागठबंधनचे अस्तित्व तसे नगण्यच होते.

मुख्यत्वे लढत होती एनडीए म्हणजे मोदी सरकार आणि युपीए म्हणजे काँग्रेस आणि सहयोगी पक्ष यांच्यातच.

प्रत्येक चॅनेलने आपल्यासोबत राजकीय विश्लेषकांची मोठी फौज जमा केली होती आणि त्यांनी राज्यनिहाय कोणाला किती जागा मिळतील आणि केंद्रात कोणाला बहुमत मिळेल याची आडाखे बांधायला सुरवात केली, आणि मतदानपूर्व अंदाज झळकू लागले.

१९ मे ला मतदान संपल्यावर सर्व वृत्तवाहिन्यांनी आपले ‘पोस्ट पोल’ अंदाज त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित केले.

न्यूज १८ चॅनेलच्या अंदाजानुसार एनडीए ला ३३६ जागा, यूपीएला ८२ तर इतरपक्ष व अपक्ष मिळून १२४ असा अंदाज वर्तवला होता. टाइम्स नाऊच्या अंदाजानुसार एनडीए ३०६, युपीए १२२, इतर १०४ अशा जागा मिळतील.

इंडिया टुडे- माय अक्सिस यांचा अंदाज होता, एनडीए ३३९ ते ३६५, युपीए ७७ ते १०८ , इतर ६९ ते ९५.

एबीपी नेल्सन यांचा अंदाज होता, एनडीए २७७, युपीए १३०, इतर १३५.

 

inmarathi.com

न्यूज २४ चाणक्य यांचा आडाखा होता, एनडीए ३५०, युपीए ९५, इतर ९७.

रिपब्लिक आणि सी व्होटर यांच्या अंदाजानुसार एनडीए २८७, युपीए १२८, इतर १२७ असे जागा मिळतील.

हे सर्व आकडे प्रसिद्ध झाले आणि लगेच त्यावर महाचर्चा सुरू झाल्या. पक्ष प्रवक्ते आणि राजकीय निरीक्षक यांच्यात जुगलबंदी सुरू झाली.

सर्वांच्या अंदाजात एनडीए ला जास्त जागा मिळतील असे दिसत असतानाही प्रत्येक पक्ष आपणच बहुमतात येणार याची छातीठोकपणे ग्वाही देत होता.

हे सर्व घडत असताना इंडिया टुडे आणि माय अक्सिस यांनी एनडीएला झुकते माप दिलंय, पैसे घेऊन मुद्दाम दिशाभूल करणारे अंदाज त्यांच्याकडून दिले जात आहेत असा आरोप काही पक्षांकडून करण्यात आला.

बाकी चॅनेल्सच्या अंदाजानुसार त्रिशंकू लोकसभेचे अंदाज वर्तविण्यात येत होते आणि अर्थातच त्यामुळे अनेक पक्षांच्या नेत्यांना आकांक्षांचे पंख फुटले. बैठकांवर बैठका घेण्यात येऊ लागल्या.

 

static.dnaindia.com

चंद्राबाबू नायडू,शरद पवार,मायावती,ममता बॅनर्जी, यांच्या नावाची चर्चा पंतप्रधान पदासाठी होऊ लागली.जवळपास सर्व चॅनेल्सवरून या चर्चा होत असताना त्यांचे अंदाज देखील वरखाली होत होते.

इंडिया टुडे आणि माय अक्सिस मात्र आपल्या मतांवर ठाम होते पण काही काळासाठी त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाईट वरून रिझल्ट हलविले होते.

१९ मे ला शेवटचे मतदान झाल्यावर इंडिया टुडे आणि माय अक्सिस यांनी आपल्या अंदाजांचे जोरदारपणे समर्थन केले. हा सॅम्पल सर्व्हे करताना त्यांनी आठ लाखांपेक्षा जास्त लोकांशी बोलून आपला निष्कर्ष मांडला होता.

माय अक्सिस ची टीम दिड महिन्यांपेक्षा जास्त काळ लोकांमधे मिसळून त्यांचे अंदाज ऐकत होती. लोकांचा कल कोणत्या पक्षाकडे जास्त आहे याचे विश्लेषण करत होती.

अखेर २३ मेचा दिवस उजाडला. सकाळपासून मतमोजणीस सुरवात झाली. लोक श्वास रोखून निकाल ऐकत होते. मोजणीच्या फेरी नुसार निकाल वरखाली येत होते. मात्र सर्वत्र बीजेपी आघाडी घेताना दिसत होती.

संध्याकाळ पर्यंत विजयी उमेदवारांची नावे घोषित होऊन बीजेपी बहुमतात येऊन ते सत्तेत येणार हे स्पष्ट झाले.

 

India.com

इंडिया टुडे वर महाचर्चा चालू असतानाच जेव्हा त्यांनी माय अक्सिस सोबत केलेल्या सर्व्हेचा अंदाज तंतोतंत खरा ठरला तेव्हा माय अक्सिस चे अध्यक्ष प्रदीप गुप्ता यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. अक्षरशः त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.

निवडणुका जाहीर झाल्या आणि इंडिया टुडे वृत्तवाहिनी बरोबर काम सुरू झाल्यापासून अविरतपणे प्रदीप गुप्ता यांनी आपल्या टीम बरोबर काम करण्यास सुरुवात केली.

सर्व्हे सुरू झाल्या बरोबर टीम मेंबर्स बरोबर सतत बैठका घेऊन त्यांच्या कडून येणारी प्रत्येक माहिती पडताळून त्याची नोंद करायची, आधीची माहिती आणि नंतर नव्याने हाती येणारी माहिती यांचे विश्लेषण करायचे हे काम विश्रांती न घेता सुरू ठेवायचे अशा प्रकारे त्यांनी आपली कामाची दिशा ठरवली होती.

त्यातही प्रत्यक्ष मतदान करून आलेल्या मतदात्यांशी बोलून हाती आलेले अंदाज मतदानपूर्व अंदाजांशी ताडून, त्याचे काटेकोरपणे विश्लेषण करून संध्याकाळी ६ वाजता ‘फायनल रिझल्ट्स’ म्हणजेच अंतिम भाकीत त्यांनी समोर ठेवल्यावर गदारोळ झाला.

पैसे घेऊन खोटे आकडे फुगवून सांगितले जात आहेत असा आरोप होत असताना देखील प्रदीप गुप्ता ठाम होते.

ते सेफॉलॉजिस्ट म्हणजेच विश्लेषक म्हणून स्वतः काढलेल्या निष्कर्षावर ठाम राहिले आणि अखेर त्यांचे भाकीत तंतोतंत
खरे ठरले.

“मला माझ्या टीमने प्रामाणिक आणि आक्रमकपणे केलेल्या कामावर विश्वास होता. प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता. कोणता प्रश्न विचारायचा आणि माहिती मिळवायची याचे ट्रेनिंग आम्ही आमच्या ५०० जणांच्या टीमला दिले होते. सलग ४० दिवस केलेल्या मेहनतीचे हे फळ होते.”

ही प्रतिक्रिया होती प्रदीप गुप्ता यांची.

 

 

अँकर राहुल कंवर म्हणाले

“आमच्यावर खूप मोठी टीका झाली, लोकांनी खूप ऐकवले पण खरं सांगायचं झालं तर लोकांना इतरांनी चुकीच्या दिशेने वळवले होते. परंतु आम्हाला माय अक्सिसच्या टीमवर पूर्ण विश्वास होता. आमच्या भाकितानुसार बीजेपी पूर्ण बहुमत घेणारी ‘सिंगल लारजेस्ट पार्टी’ ठरली.”

विरोधी पक्षातील राजकीय पुढाऱ्यांचे आणि इतर वृत्तवाहिन्यांचे त्रिशंकू सरकारचे अंदाज खोटे ठरवित इंडिया टुडे आणि माय अक्सिस यांनी बाजी मारली हे निश्चित.

प्रदीप गुप्तांची मेहनत फळास आली याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या ५०० जणांच्या टीमचे अभिनंदन.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version