Site icon InMarathi

प्रकाश आंबेडकर साहेब, तुम्हाला मा रामदास आठवले ‘गल्लीबोळातले’ नेते वाटतातच कसे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

शनिवारी रात्री सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर प्रवीण गोसावी या आंबेडकरी चळवळीतीलच एका माथेफिरुने हल्ला केला. प्रवीण गोसावी हा सुद्धा रिपाईचाच कार्यकर्ता आहे.

रिपाईच्या अनेक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला आहे. तो अंबरनाथ येथे बांधकाम व्यवसायिक आहे.

दलित समाजाचे नेतृत्व करत असलेल्या रामदास आठवले यांच्याशी प्रवीण याचे मतभेत होते, त्यांची कोणतीही भूमिका त्याला पटत नव्हती. या कारणातून त्याने शनिवारी आठवले यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यानंतर सर्व माध्यमातून आठवले यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया देत हल्ल्याचा निषेध केला.

 

 

वैचारिक मतभेद हे काही राजकीय, सामाजिक जीवनात नवीन नाहीत, पण त्या कारणासाठी एखाद्या नेत्यावर किंवा व्यक्तीवर हल्ला करणे चूक आहे. आणि त्याचे समर्थन विचारी लोकांनी करणे त्याहून चूक आहे.

रामदास आठवले यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर दिसून येईल की अत्यंत तळागाळातल्या, गरीब दलित जनतेचे ते प्रतिनिधीत्व करतात.

सुरुवातीपासून रस्त्यावर उतरून धडाडीने काम करण्याचा, दलितांच्या हक्कासाठी वैयक्तिक स्वार्थ विसरून रात्रंदिवस झटण्याची त्यांची वृत्ती आजही कायम आहे.

रामदास आठवले यांच्या याच कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी पोस्ट विकास वाघमारे यांनी लिहिली आहे. आठवले यांचा संघर्ष जाणून घेण्यासाठी ती पोस्ट इनमराठीच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

===

एखाद्या नेत्याने घेतलेली भूमिका नसेल आवडली तर सोडून द्या, निर्णय नसेल पटला तर सोडून द्या. नेता मोठा कशाने होतो तर त्याच्या पाठीमागे असलेलं जनमत, कामाची तळमळ आणि भूतकाळातला प्रचंड संघर्ष…..

 

youtube.com

काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मारहाण झाल्याचे समजले आणि दुखः झालं. खरंतर एखाद्याची भूमिका नाही आवडली तर त्यांना आपलं मानणं सोडून द्यायला हवं. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या दलित नेत्याला एक चापट लावून तुम्ही कोणतं दिव्य कार्य करणार आहात.

ज्यांनी समाजाला एका लयीत जोडून ठेवलं त्यांना तुम्ही ही कोणती शिक्षा देणार आहात.

दलित आणि इतर समाज म्हणून जेव्हा समाजात काही गोष्टी घडतात तेव्हा रामदास आठवले यांची प्रतिक्रिया ही दलितांच्या विरोधात नसते मात्र दोन्ही समाजाला सोबत घेऊन दलितांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाउल असते.

गेल्या अनेक वर्षांपासून आठवले नावाचं वादळ ऐकून होतो. महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या माध्यामातून त्यांनी आपला राजकीय अजेंडा जाहीर करून धाडसाने निर्णय घेतला असेल आणि तेवढ्याच धाडसानं निर्णय बदललाही असेल मात्र कधी राजकारण करण्यासाठी समाजात आग ओतण्याचं काम या पँथरने केल्याचं ऐकलं नाही.

खऱ्या अर्थाने दलित, वंचित आणि शोषित घटकांवर अन्याय होतो तेव्हा रामदास आठवले आवाज देताना पाहिलंय.

 

 

रामदास आठवले नावाचा नेता एका रात्रीत तयार झालेला नाही, कुण्या मिडीयाने डोक्यावर घेऊन तयार केलेला नाही, कुणाच्या पाठीमागे फिरून तयार झालेला नाही तर खेड्यापाड्यात दलित समाजाच्या वाड्यावस्तीत फिरून एक एक पँथर जमा करून त्यांच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवण्याचं काम यांनी केलं.

साधारण घरातून घोंघावत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदापर्यंत मारलेली मजल ही त्यांच्या इतिहासजमा झालेल्या संघर्षाचे आणि कार्याचे मोल आहे.

गावागावात आठवले साहेब अंगार है अशा घोषणा बाहेर पडताना पाहिल्या तेव्हा त्या फाटक्या माणसाची उंची तुम्हाला आम्हाला लक्षात येते.

लित समाजाला इतर नेत्यांनी काय दिलं आणि आठवलेंनी काय दिलं हे समजून घ्यायचं असेल तर आठवलेंचा संघर्ष जाणून घ्या. आपलं काम ही आपली आयडेंटीटी असली पाहिजे आणि तशी आयडेंटीटी आठवलेंनी तयार केली.

 

 

दलित समाजाच्या मागण्या आणि उत्कर्षासाठी तळमळत उन्हात बसण्यापेक्षा भाजपाच्या सोबतीने जाऊन एखादं मंत्रिपद घेऊन समाजाला जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला तर रामदास आठवले याचं बिघडलं कुठं?

दलितांच्या हितासाठी सातत्याने काम करून झोपडपट्टीतल्या दलितांचे प्रतिनिधित्व करणारे रामदास आठवले यांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा कार्यकर्ता आठवतो.

कारण देशाला बळ दिले पाहिजे म्हणत चुकीचे ते चुकीचे आणि बरोबर ते बरोबर म्हणण्याची ताकद रामदास आठवले ठेवतात.

नेमकं हेच दलितांचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांना पचनी पडत नाही आणि मग अशाप्रकारचा हैदोस मांडला जातो…

कदम मिलाकर चलना होगा
बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते,
आग लगाकर जलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा।

रामदास आठवले यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध आणि रामदास आठवले यांना शुभेच्छा ! लगे रहो….

===

अशा नेत्यावर हल्ला होणे दुर्दुवी आहे. त्याहून शरमेची बाब म्हणजे भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी या हल्ल्यावर दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक आहे.

या हल्ल्याबद्दल विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणतात, “गल्लीबोळातल्या नेत्यावर असे हल्ले होत असतात.” प्रकाश आंबडेकर यांची ही भूमिका संतप्त करणारी आहे.

 

nagpurtoday.in

एकतर गल्लीबोळातला नेता कोण आणि मास लीडर कोण हे त्या नेत्याला असलेल्या सामान्य लोकांच्या पाठींब्यावरून आणि त्या नेत्याच्या लोकप्रियतेवरून ठरत असते.

या बाबतीत प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले या दोन नेत्यांची तुलना केली तर सहज लक्षात येईल की आंबेडकर यांच्यापेक्षा रामदास आठवले यांना तळागाळातील दलित समाजाचा जास्त पाठींबा आहे.

हा नेता आपल्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरतो, तुरुंगात जातो याबद्दल दलित समाजाला खात्री आहे.

 

dnaindia.com

असे असताना प्रकाश आंबेडकर यांनी आठवले यांची गल्लीबोळातला नेता म्हणून संभावना करणे म्हणजे आठवले यांच्या पाठीशी असलेल्या दलित समाजाचा अपमान आहे.

आठवले आंबेडकर या दोन गटात आणि नेत्यांतही मतभेद आहेतच. ते समोर ठेवुन चर्चा करणे हा एक मध्यम मार्ग असतो.

पण राजकीय विरोधकावर हल्ला झाल्यानंतर त्याचे असे समर्थन करणे आंबेडकर यांना शोभणारे नाही हे मात्र खरे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version