Site icon InMarathi

दलित असल्यामुळे पक्षात मताला किंमत नसल्याचे सांगत भाजपच्या दलित खासदाराचा राजीनामा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

दलित सवर्ण हा वाद काही भारताला नवीन नाही. जातीच्या ठराविक कंपूत अडकलेला समाज त्या जातीच्या झुंडीचा भाग कधी बनून जातो हे त्यालाही कळत नाही. आणि असं झालं की कधीच न तुटणाऱ्या भिंती उभ्या राहतात.

या सगळ्यात संविधानिक मूल्य, समानता वगैरे कागदावरच्या गोष्टींचे किती भान राहत असेल ते असो.

सध्या ही चर्चा करण्याचे निमित्त म्हणजे उत्तर प्रदेशातील भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी दिलेला राजीनामा. दलित असलेल्या सावित्रीबाई यांनी ‘भाजप समाजात जातीच्या आधारावर फूट पाडण्याच्या प्रयत्न करत आहे” असे कारण देत राजीनामा पुढे केला आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘हनुमान दलित होते’ असे वक्तव्य केले तेव्हाच सावित्रीबाई यांनी या वादात उडी घेतली.

योगी यांच्या त्या वक्तव्यावर आक्रमक होताना ‘हनुमान दलित होते आणि मनुवादी असलेल्या श्रीरामाचे गुलाम होते’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

 

dnaindia.com

गेल्या काही कालात त्यांनी भाजपच्या राम मंदिराच्या अजेंड्यावर अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजप राम मंदिराच्या मुद्द्याचे राजकारण करत असून देशातील गरीब कष्टकरी जनतेला राम मंदिराचा काहीही फायदा होणार नाहीये, तसेच राम मंदिर म्हणजे देशातील तीन टक्के ब्राह्मणांची पोटे भरण्याचा उद्योग असल्याचे त्यांनी म्हटले होते.

राम जर खरच देव असते तर अयोध्येत आतापर्यंत राम मंदिर उभे राहिले असते या त्यांच्या वक्तव्यानंतर बरीच उलटसुलट चर्चा रंगली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण भाजपचा राजीनामा देत असल्याचे सावित्रीबाई फुले यांनी संगीतले.

“आजपासून माझा आणि भाजपचा काहीही संबंध नसेल, मी दलित असल्यामुळे पक्षात माझ्या आवाजाला कोणतीही किंमत नव्हती. दलित आणि त्यांच्या हक्कांच्या बाबतीत भाजव फक्त भाषणबाजी करत आहे. अशा परिस्थितीत संविधान अबाधित राहण्यासाठी मी लढत राहीन.”

अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

news18.com

खासदारकीचा कार्यकाळ त्या पूर्ण करणार आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील दलित खासदाराने असे कारण देऊन राजीनामा देणे भाजप नेतृत्वासाठी चिंतेची बाब आहे.

भाजप दलितविरोधी असून फक्त मतांसाठी दलितांच्या हक्कांची भाषा करतो हा आरोप काही नवीन नाही.

सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर भाजपवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे हे वेगळे सांगायला नकोच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version