Site icon InMarathi

रुळांवर माणसे दिसत असून देखील चालक ट्रेन का थांबवू शकत नाहीत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई येथील रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन रुळावरून घसरली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मागे औरंगाबादजवळ एक भीषण रेल्वे अपघात झाला होता . कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात गावाकडे जाणाऱ्या, रुळावर झोपलेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडले होते.

काही वर्षांपूर्वी अमृतसरला देखील असाच एक मोठा अपघात झाला होता आणि त्या दुर्दैवी अपघातात ६१ लोकांना जीव गमवावा लागला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दसऱ्याला रावणदहनाचा कार्यक्रम सुरु असताना अनावधानाने लोक रेल्वेच्या रुळांवर गेले. मोबाईलमध्ये रावणदहनाचा कार्यक्रम रेकॉर्ड करत असतानाच रुळावर जालंधर- अमृतसर गाडी आली.

फटाक्यांच्या आवाजात कुणालाच रेल्वेचा मोठा हॉर्न ऐकायला आला नाही आणि अनेक लोक रेल्वेखाली चिरडून ठार झाले.

नवज्योत कौर सिद्धू ह्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी होत्या. त्यांनी हा अपघात झाल्यानंतर रेल्वेच्या ड्रायव्हरलाच दोष देत प्रश्न उपस्थित केला, की ट्रेनच्या ड्रायव्हरने शेकडो लोक समोर दिसत असताना देखील ट्रेनचा वेग कमी का नाही केला?

 तेव्हा सामान्य माणसाच्या मनात हाच प्रश्न वारंवार उभा राहिला, की इतके लोक समोर दिसत असून सुद्धा ड्रायव्हरने गाडी का थांबवली नाही?

आपण सायकल थांबवतो किंवा गाडीचा ब्रेक दाबून झटक्यात गाडी थांबवतो तशीच ट्रेन थांबवता येते का? बस, ट्रक आणि ट्रेनच्या ब्रेकमध्ये काही फरक असतो का?

 

 

ट्रेनमध्ये सुद्धा बस आणि ट्रकप्रमाणेच एयर ब्रेक असतात. ट्रेनमध्ये एक पाईप असतो ज्यात जास्त प्रेशरखाली हवा भरलेली असते. ह्या हवेने नायलॉनचा ब्रेक शू पुढे मागे होतो. ब्रेक शूचे रेल्वेच्या चाकांवर घर्षण होऊन चाक थांबते.

आपल्या देशात ज्या ट्रेन्स आहेत त्यांच्यात सामान्य स्थितीत कायम ब्रेक लागलेलाच असतो. गाडी पुढे न्यायची असेल तर ब्रेकच्या पाईपमध्ये प्रेशर तयार करून ब्रेक शू चाकापासून वेगळा केला जातो.

तेव्हाच गाडी पुढे सरकू शकते. आपल्या देशातील रेल्वेच्या ब्रेक पाईपमध्ये ५ किलोग्रॅम प्रति स्क्वेअर सेंटीमीटर इतके प्रेशर असते.

हे ही वाचा –

===

 

 

ट्रेन केव्हा सुरु होईल तसेच केव्हा थांबेल हे लोकोपायलटच्या हातात नसते. लोकोपायलटला सिग्नल्सचे सक्तीने पालन करावे लागते. लोकोपायलट एकतर सिग्नलच्या हिशोबाने चालतो किंवा गार्डच्या सूचना फॉलो करतो. गार्ड व लोकोपायलट हे दोघे मिळून ठरवतात की ब्रेक मारायचा की नाही!

खरे तर ट्रेन वेगात चालवणे ब्रेक लावण्यापेक्षा तुलनेने सोपे आहे. गाडी दीडशे किलोमीटर प्रति तास चालवणे हे गाडी इमर्जन्सी ब्रेक लावून थांबवण्यापेक्षा जास्त सोपे आहे. गाडी योग्य वेळी योग्य ठिकाणी ब्रेक मारून थांबवणे हे काम कठीण आहे.

ज्यांना ट्रेनच्या ब्रेकचे हे मेकॅनिजम ठाऊक आहे ते लोक गमतीत असेही म्हणतात की, लोकोपायलटला ट्रेन चालवण्याचा नाही तर योग्य प्रकारे ब्रेक मारण्याचा पगार दिला जातो.

 

 

गाडीला जोपर्यंत हिरवा सिग्नल मिळत असतो तोपर्यंत गाडी अविरोध आपल्या ठरलेल्या वेगाने पुढे जात असते.

आपल्या देशात ट्रेन जास्तीत जास्त १६० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते. जेव्हा लोकोपायलटला दोन पिवळे दिवे लागलेला सिग्नल दिसतो तेव्हा तो गाडीचा वेग कमी करतो.

 

 

यासाठी ट्रेनमध्ये दोन ब्रेक्स असतात. एक ब्रेक इंजिनसाठी असतो आणि दुसरा ब्रेक संपूर्ण डब्यांसाठी असतो. ट्रेनच्या प्रत्येक डब्याच्या प्रत्येक चाकाला एक ब्रेक दिलेला असतो आणि हे सर्व ब्रेक्स आपापसात जोडलेले असतात.

जेव्हा लोकोपायलट ब्रेकचे लिव्हर फिरवतो, तेव्हा ब्रेक पाईपमधील हवेचे प्रेशर कमी होऊ लागते. तसेच ब्रेक शू व चाक ह्यांच्यात घर्षण होऊ लागते.

एका पिवळ्या लाईटच्या सिग्नलनंतर लोकोपायलट आणखी जोरात ब्रेक मारतो. ह्यानंतर जर गाडीला एकामागून एक पिवळेच सिग्नल्स मिळत राहिले तर गाडी हळू हळू पुढे जात राहते आणि जर गाडीला लाल सिग्नल मिळाला तर लोकोपायलट काहीही करून सिग्नलच्या आधी गाडी थांबवतो.

 

 

जर लोकोपायलटने लाल सिग्नल मिळूनही गाडी पुढे नेली तर ती रेल्वेमध्ये गंभीर चूक समजली जाते आणि ह्या प्रकाराची चौकशी होते. लाल सिग्नल नसतानाही गाडी केवळ आपत्कालीन स्थितीतच थांबवली जाते.

भारतीय रेल्वेचे लोकोपायलट त्याला आपत्कालीन स्थिती दिसल्यास इमर्जन्सी ब्रेक मारून गाडी थांबवू शकतात.

सामान्यपणे ज्या ब्रेकने गाडी थांबते तोच ब्रेक इमर्जन्सी ब्रेक म्हणून वापरला जातो. ब्रेकचे लिव्हर एका विशिष्ट सीमेपेक्षा जास्त ओढल्यास गाडीला इमर्जन्सी ब्रेक लागतो. परंतु इमर्जन्सी ब्रेक मारल्यानंतर सुद्धा गाडी त्याच ठिकाणी थांबू शकत नाही.

जर २४ डब्यांची गाडी १०० किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने जात असेल आणि लोकोपायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला तर ब्रेक पाइपमधील प्रेशर पूर्णपणे संपेल आणि गाडीच्या प्रत्येक चाकावर असलेला ब्रेक शू व चाक ह्यांच्यात संपूर्ण ताकदीने घर्षण होईल.

 

123RF.com

 

असे होऊन सुद्धा गाडी लगेच थांबू शकत नाही तर ८०० ते ९०० मीटर पुढे जाऊनच थांबेल. तसेच ट्रेन जर मालगाडी असेल तर तिच्यात किती वजन आहे त्यावर ती किती वेळात पूर्ण थांबू शकेल हे अवलंबून आहे.

मालगाडीला जर इमर्जन्सी ब्रेक लावला तर ती ११०० ते १२०० मीटर पुढे जाऊन मगच थांबू शकेल.

अमृतसरच्या अपघाताच्या वेळी जी डेमू (DEMU डिझेल इंजिन मल्टिपल युनिट) गाडी होती तश्या प्रकारच्या गाडीला इमर्जन्सी ब्रेक लावल्यास ती कमीत कमी ६५० मीटर पुढे जाऊन मगच थांबेल.

तुम्ही जर डब्यात असलेली इमर्जन्सी चेन खेचली तर ह्याच प्रकारे ट्रेन थांबते. ब्रेक पाईपमधील प्रेशर झटकन कमी होऊन पूर्ण ताकदीने ब्रेक लागतात.

जर असे असेल तर गाडीच्या समोर कुणी आल्यास लोकोपायलट गाडी का थांबवत नाहीत?

आतापर्यंतचा लेख जर तुम्ही मन लावून वाचला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल, की लोकोपायलटला जर कोणी गाडीसमोर आले म्हणून गाडी थांबवायची असली तर त्याला ते लांबूनच दिसणे आवश्यक आहे.

हे ही वाचा –

===

 

 

सामान्यपणे जेव्हा असे अपघात होतात तेव्हा लोक, गाड्या किंवा जनावरे अचानकपणे गाडीसमोर येतात आणि अशावेळी लोकोपायलट तात्काळ गाडी थांबवू शकत नाहीत. कारण इमर्जन्सी ब्रेक लावण्याइतका वेळच त्यांच्याकडे नसतो.

जरी इमर्जन्सी ब्रेक लावला तरीही गाडी थांबायला जेवढा अवधी लागतो तेवढ्या वेळात रुळावर असलेल्या व्यक्तीला, जनावराला किंवा वाहनाला गाडीची धडक बसतेच.

आपल्याला वाटते तसे रूळ काही लांबच लांब सरळ रेषेत नसतात. रस्ता जसा वळणावळणाचा असतो तसेच रुळांवर सुद्धा वळणे असतात. जर रुळांवर वळण असेल तर पुढचे दिसणे कठीण असते.

जर गाडी वेगात असेल तर अगदी लहानसे वळण असले तरी पुढचे दिसणे अवघडच असते.

 

 

अश्या वेळी रुळांवर असलेली व्यक्ती किंवा जनावर लोकोपायलटला अगदी जवळ आल्यावर दिसतात आणि तो गाडी थांबवू शकत नाही कारण अश्या वेळी इमर्जन्सी ब्रेक लावणे सुद्धा कठीण असते.

रात्रीची वेळ असेल तर लांबचे दिसणे अधिकच अवघड असते. रुळांवर रस्त्यांसारखे लाईट नसतात त्यामुळे जिथपर्यंत ट्रेनच्या इंजिनचा लाईट जाईल

तिथपर्यंतच लोकोपायलटला दिसू शकते. अशा वेळी जर रेल्वेच्या रुळांवर लोकांचा मोठा जमाव जरी असला तरी लोकोपायलटला तो केवळ एक किलोमीटरच्या अंतरावरूनच दिसू शकेल.

 

 

त्यावेळी इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवणे अतिशय कठीण असते. अशावेळी लोकोपायलटच्या मदतीला येतो तो ट्रेनचा मोठ्ठा हॉर्न! लोकोपायलटला जर असा जमाव अचानक दिसला तर तो सारखा हॉर्न देतो जेणे करून तो जमाव रुळांवरून बाजूला होऊ शकेल.

अमृतसरच्या अपघातात ट्रेनच्या लोकोपायलटने सतत हॉर्न देऊन सुद्धा लोकांना धडक बसलीच कारण लोकांचे येणाऱ्या ट्रेनकडे लक्ष नव्हते. फटाक्यांच्या आवाजात त्यांना ट्रेनच्या हॉर्नचा आवाजच ऐकायला आला नाही.

कुठलाही लोकोपायलट जाणूनबुजून कुणालाही ट्रेनखाली चिरडून मारून टाकत नाही. त्याला शक्य असले तर तो ट्रेन थांबवण्याचे आणि समोरच्याचा जीव वाचवण्याचे शक्य तेवढे प्रयत्न करतो.

 

 

साधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे की इमर्जन्सी ब्रेक लावल्याने गाडी रुळांवरून घसरण्याची भीती असते. पण हा एक गैरसमज आहे.

ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन व रीसर्च डेवलपमेंट स्टॅण्डर्डायजेशन ऑर्गनाइज़ेशन (आरडीएसओ) ह्यांनी स्पष्ट केले आहे की गाडी रुळावरून घसरते कारण गाडीच्या चाकांत किंवा रुळामध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो.

इमर्जन्सी ब्रेक लावल्याने गाडी सहसा रुळांवरून घसरत नाही. गाडी रुळांवरून घसरण्याची कारणे वेगळी आहेत. गाडीत इमर्जन्सी ब्रेकचे प्रयोजनच ह्यासाठी दिले आहे की आपत्कालीन स्थितीत कमीत कमी वेळात सुरक्षितपणे गाडी थांबवता यावी.

अमृतसरच्या अपघातात लोकांचा जमाव हा मेन लाईनवर उभा राहून रावणदहनाचा कार्यक्रम बघत होता. मेन लाईनवर गाड्या आपल्या ठराविक वेगात धावतात. अशावेळी गाडी थांबवायला काही अवधी लागतोच.

एकतर रात्रीची वेळ होती, त्यामुळे लोकोपायलटला लोकांचा जमाव लांबून दिसणे शक्यच नव्हते.

मेन लाईन असल्याने गाडी ९२ किलोमीटर प्रति तास ह्या निर्धारित वेगाने धावत होती. रेल्वे बोर्डचे चेअरमन अश्वनी लोहानी ह्यांनी सांगितले, की जेव्हा लोकोपायलटला रुळावर लोक उभे असलेले दिसले तेव्हा त्याने वारंवार हॉर्न वाजवून लोकांना सावध केले तसेच इमर्जन्सी ब्रेक सुद्धा लावले.

 

 

जेव्हा लोकांना गाडीची धडक बसली तेव्हा गाडीचा वेग ६८ किलोमीटर प्रति तास इतका होता. इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतर सुद्धा गाडी ६२५ मीटरपर्यंत थांबत नसल्याने तोवर अनेक लोक गाडीखाली चिरडले गेले होते.

आता लोक हॉर्न देऊन सुद्धा ऐकत नसतील, रुळावरून बाजूला होत नसतील तर त्या लोकांच्या दुर्दैवी मृत्यूसाठी लोकोपायलटला दोष देणे चुकीचे आहे. आपण कुठे आहोत, काय करतोय, कुठे उभे राहणे असुरक्षित आहे हे आपले आपल्यालाच कळणे आवश्यक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version