Site icon InMarathi

लाईट जातात म्हणजे नेमकं काय? वीज वितरण कर्मचाऱ्यांचे युद्धप्रसंग माहित असायला हवेत

wireman-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती परिमंडल

===

पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली? का जाते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते.

 

 

परंतु, वीज का गेली, का जाते, याचे उत्तर बहुतेकांना माहीत नसते. “वीज जाते आणि येते”, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे.

पावसाळा आणि वीजपुरवठा यांचे नाते सर्वांनीच गृहित धरलेले असते. अर्थात, विजेशिवाय जगण्याची कल्पना करणे शक्य नाही, इतके तिचे महत्त्व वाढलेले आहे. त्यामुळे वीज गेली की, आपल्या संतापाचा पारा चढतो. परंतु वीज जाते, हे वास्तव आहे.

तर आज जाणून घेऊयात “वीज जाते आणि येते” यामधील गोष्ट…

१. यंत्रणा जोखमीची

रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. विजेची यंत्रणा अशी आहे की, ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाचा धोका असतो.

मोबाईल किंवा टेलिफोनचे तसे नाही. त्याचे एकदा कनेक्शन घेतले की, त्याची सेवा संबंधित कंपनीला एका ठिकाणी बसून चालू किंवा बंद करता येते. तीही कोणत्याही  जोखमीशिवाय. वीज यंत्रणा त्याला अपवाद आहे.

रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येते, तेव्हा कोणीतरी त्या पावसात-अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे.

 

 

२. सारा पसारा उघड्यावर

पारंपारिक अथवा अपारंपारिक स्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून निर्माण झालेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही.

त्यासाठी लाखो किलोमीटर वीजवाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला ‘ग्रीड’ म्हणतात. हा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते.

 

 

चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात. तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरता मर्यादित असतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळवारे व आकाशातील विजेचा कडकडाट सर्वांनी अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यांमधून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज… दोन्हींमध्ये प्रचंड ऊर्जा असते.

 

 

आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की, घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण, उच्च दाबामुळे ती जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. नव्हे, तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते.

===

हे ही वाचा – जगभरातील सर्व प्रसिध्द इमारती एका तासासाठी का होतात ‘लाईट्स ऑफ’! जाणून घ्या…

===

३. हानी टाळण्यासाठी यंत्रणा

दुसरी बाब म्हणजे वीज खांबात विद्युतप्रवाह उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा ते उन्हामुळे किंवा विद्युतप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात.

 

 

त्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपात्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.

४. बिघाड शोधणे जिकिरीचे

जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात.

वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते.

 

 

तथापि, बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड काही खांबांदरम्यान सापडतो.

५. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

लष्करातील जवानाला युद्धाचा सराव दररोज करावा लागतो. परंतु, युद्ध करण्याची वेळ सहसा येत नाही.

इथे मात्र वीज कर्मचारी रोज युद्धभूमीवर असतात. चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ बांधूनच त्यांना खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारची काळजी घेऊनही वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात.

 

 

परंतु, मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की, एखाद्याच्या जिवाचे मोलही आपण ध्यानात घेत नाही. वीज जाते आणि येते, यादरम्यान काय होते? याचा विचार आपण जेव्हा करू त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाही.

वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये?

१. आपल्या घरात ईएलसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे. जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.

२. अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.

३. वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.

४. वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.

५. विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.

६. वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.

७. बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.

८. विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाला अथवा १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version