Site icon InMarathi

खरं वाटणार नाही, पण यशस्वी लोकांना कायम भीती वाटते! कशाची? वाचाच

navajuddin inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणसाला ‘सुख’ सुद्धा टोचते अशा अर्थाची म्हण आपण ऐकतो. दुःखात तर जीवाला टोचणी लागलेलीच असते. पण सुखी असतानाही आपल्याला सतत अनामिक भीती असते.

ती म्हणजे मी जी स्वप्ने पाहतोय ती सत्यात उतरतील ना? किंवा काही अभद्र घडून जे यश मी मिळवलंय, जे सुख मी उपभोगतोय ते कोणी माझ्यापासून घेऊन तर जाणार नाही ना?

अशावेळी आपण समोर असलेल्या यशाची चवही नीट चाखू शकत नाही. आयुष्यात खूप उंचीवर जाणाऱ्यांनाही बरेचदा खूप भीती वाटत असते. कसली ना कसली भीती त्यांना सतत आतून पोखरत असते.

 

 

खरंतर कित्येक आघाड्यांवर लढून आपण यश संपादन केलेले असते. अशावेळी आपली माणसे आणि आपले चाहते आपल्याला नावाजतात, आपल्याकडे आदर्श म्हणून पाहतात. यशाच्या शिखरावर पोचताना मात्र असंख्य भीतींना सारूनच यश मिळवता येते.

‘यशाच्या आधीची भीती आणि यशानंतर वाटणारी भीती’ ह्याचा ‘केपेबल’ माणसांना कायम त्रास होत राहतो.

अर्थातच ही भीती मनाचा खेळ असते. पण तरीही अगदीच काही फुटकळ नसते. आजू बाजूच्या माणसांच्या जीवनात घडलेल्या गोष्टींवरूनही आपण निष्कर्ष बांधतो. काही गोष्टी आपल्या जीवनाशी जोडतो.

दुसऱ्यासारखे आपल्याही आयुष्यात घडेल आणि तेही वाईट असेल तर मेंदूचा भुगा नक्की.. तर कोणकोणत्या भीती यशापर्यंत पोचायला दूर कराव्या लागतात? आणि कोणत्या भितीमुळे  यश पचवणे कठीण होते..?? पाहूया तर

१. आयुष्यात अयशस्वी होण्याची भीती

सगळ्यात कॉमन भीती म्हणजे हीच.. कोणत्याही कामाला सुरुवात करताना ९०% माणसांना तरी पाहल्यांदा असेच विचार येतात. मी जे काम हातात घेतलंय ते पूर्ण करायच्या आधीच त्यात यश मिळणारच नाही ह्या निगेटिव्ह विचारांनी मन ग्रासले जाते.

 

 

ह्या भीतीमुळे एकतर आपण सुरुवातच करत नाही आणि आयुष्यात खूप मोठ्या अनुभवाला मुकतो.

आणि जर सुरुवात केलीच तर सतत स्वतःवरच अविश्वास दाखवल्याने कायम चूका करत राहतो. जे ह्या भीतीला मनातून काढून, बेधडकपणे कार्यास सुरुवात करतात ते यशाच्या शिडीवर चढण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात करतात.

२. न्यूनगंड बाळगणे

न्यूनगंड कसलाही असो तो माणसाला कायम मागेच खेचतो. त्यातून आपण जे काही कार्य हाती घेतले असेल त्या क्षेत्रातील दिग्गजांना पाहून त्यांचा आदर्श घेण्याऐवजी आपण त्यांच्या बरोबर आपल्या कौशल्याची तुलनाच करत राहिलो तर संपलो.

त्यापेक्षा आपणही युनिक आहोत. त्या दिग्गजांसारखेच आपणही उंचीवर पोहचू. वेगळ्या पद्धतीने काम केले तर काय झाले? ध्येय गाठले गेले की यश आपलेच. अशी भावना बाळगणारे मात्र यशाची दुसरी पायरी हमखास चढतात.

 

 

३. लोकांच्या पुढे स्वतःला नेऊ न शकणे

लहानपणी ज्यांना स्टेज फिअर म्हणजेच मंचाची भीती होती ती मुले सतत कोणत्याही कार्यक्रमात मागे राहत असत. कोणी आपल्याला पाहत तर नाही ना? ही भीती त्यांना कधीच पुढे येऊ देत नाही. पण जो रुबाबात पुढे येऊन मंच गाजवतो तो खरा भाव खाऊन जातो.

असेच काहीसे आपल्या बाबतीत होते. प्रेझेन्टेशन असेल, क्लायंट मीटिंग असेल तर भीतीपोटी अशा गोष्टी टाळल्या ती संधी आपल्या पासून हिरावली जाऊ शकते. आणि आपल्या समोर दुसऱ्याचे यश पाहणे नशिबी येते.

त्यामुळे लोकांसमोर स्वतःला प्रेझेंट करायची भीती मनातून काढली तर यशाची तिसरी पायरी नक्की..!

 

masterclass.ted.com

 

४. एकटेपणाची भीती

चार-दोन लोकांत वावरलो तर आपल्या कल्पना चोरल्या जातील की काय?

ह्या भीतीने माणसे एकटे राहणे पसंत करतात. मग त्या एकटेपणाची त्यांना भीती वाटू लागते. यश संपादन केल्यावर आपल्यावर जळणारे आपल्याला सोडून जातील आणि तेव्हाही आपण एकटे पडू अशी भीती ज्याला वाटते तो पुन्हा अधोगतीस लागतो.

 

 

त्यापेक्षा सगळ्यांना हाताशी धरून पुढे चालण्याची हिम्मत ठेवली तर यशाची चौथी पायरी चढलोच समजा..!

५. लक्ष्मी गमावण्याची भीती

लक्ष्मी कमवायची कशी आणि कमावलेली टिकवायची कशी..? सतत डोक्याला लागलेला भुंगा म्हणजे पैसा संपला तर? किंवा हातात काहीच नाही आणि कुठूनतरी आणून तो कामात गुंतवला आणि अजूनच कंगाल झालो तर?

या भीतीपोटी पैसे असतानाही आपल्या कामात आपण तो पुरेसा गुंतवत नाही आणि मग परिणाम आले की, मानसिकरित्या खचायला होते. त्यापेक्षा योग्य तो पैसा लावून जीवतोड मेहनत घेण्याची तयारी दाखवणारे मात्र यशाच्या पाचव्या पायरीवर चढतात.

 

 

६. बदलांची भीती

माणसाला सगळ्यात अवघड काही वाटत असेल तर, आपल्या सोईस्कर मार्गाला सोडून आडवळणाने जाणे. आयुष्यात काही करत असताना वेगवेगळे बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. सरधोपट मार्गाने सतत चालणे धोक्याचे असते. आपण कुठेही पोहचत नाही.

 

 

एक तर असा मार्ग सगळ्यांनी वापरून पुसट केलेला असतो आणि आपणही तोच स्वीकारला तर अभूतपूर्व यशाला मुकतो. आपल्या कार्यात जर वातावरण, वेळ काळ पाहून बदल करण्याची भीती बाजूला सुरू शकलो तर आपण यशाच्या सहाव्या पायरीवर सहज पोचतो.

७. लोक काय म्हणतील?

ह्या भीतीने जवळपास सगळेच ग्रासलेले आपल्याला भोवताली दिसतात. काम काहीही असो, क्षेत्र कोणतेही असो पण ज्याला त्याला पर्वा, ‘लोक काय म्हणतील?’ ह्याचीच..! पण असे लोक दुतोंडी असतात.

आपल्या अपयशावर तर आपल्याला यथेच्छ नावं ठेवतील पण, आपल्या यशातुन पण काहीतरी खोट काढण्यास ते मागे पुढे पहात नाहीत. अशा लोकांचा आपल्या कामावर आणि मनावर किती परिणाम होऊ द्यायचा.? मूर्खपणाचं ठरेल तो..!

ही साधीशी गोष्ट लक्षात घेतली तर यशाची सातवी पायरी काही अवघड नाही.

८. असुरक्षिततेची भावना

आपल्यापेक्षा कोणी वरचढ ठरत असेल तर, आपण त्याच्या बरोबरीत कुठेच पुरेसे पडणार नाही. माझ्या कामाचं चीज होण्यासाठी बाकीच्यांना खाली पाडलं तर बरं.. असेच वाटत राहून आपण आपल्यावर अन्याय करत राहतो.

 

 

सतत मनामध्ये आपल्या पुढे कोणी जाईल अशी असुरक्षिततेची भावना बाळगणे म्हणजे अपयशाला निमंत्रण. आपल्याच कामावर लक्ष केंद्रित न केल्याने अधोगतीला जाण्यापेक्षा ही भावनाच मनातून काढून टाकली तर आपण यशाची आठवी पायरी चढली समजा..

९. वय निघून जाण्याची किंवा मृत्यूची भीती

माझ्या शिखरावर पोहोचेपर्यंत मी म्हातारा झालो किंवा मरूनच गेलो तर आतापर्यंतचे अथक परिश्रम वाया जातील. अशी भीती तुम्हा आम्हाला नक्कीच वाटत असते. वय अस्ताकडे झुकल्यावर काही गोष्टी करण्याचे बळ आपल्यात नसेल. यश तर जाऊच द्यात पण साधे काम करण्याचीही आपल्यात शक्ती नसेल.

 

 

बरे म्हातारे नाही झालो पण त्या आधीच मेलो तर..? भित्या पोटी ब्रह्म राक्षस उगाच म्हणत नाहीत.

नववी पायरी चढायची आहे ना.?? तर पुसून टाका असले विचार. कल किसने देखा है? आज मे, वर्तमान मे जिओ..

१०. यशाचीच भीती वाटणे

खूप जणांना असे वाटते की, ज्या यशाची मी स्वप्ने पाहतोय त्यासाठी मी योग्य नाही. चुकून मी यशस्वी झालोच तर पुढे काय करू? मला ते झेपणार नाही. यांच्याबरोबर आलेल्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करू शकणार नाही.

 

 

असे समजून, प्रयत्न बंद करून, आपण कूप मंडुक बनतो आणि आहे तिथेच राहतो. जे आपल्याला मिळवायचं आहे त्याचीच भीती वाटून कसे चालेल? मनातून ही भीती हद्दपार झाली तर आपण यशाची शेवटची आणि दहावी पायरी चढतो.

यश अपयश हे आपल्या मानण्यावरच असतं. अपयश ही सुद्धा यशाची पायरी आहे असेही म्हणतात. कारण अपयश आले तरच आपण बरेच काही शिकतो. शिकत शिकत आपण पुढे जातो. ह्याच गोष्टींमुळे कधी न संपणारे, अबाधित, अभूतपूर्व यश आपण संपादन करतो आणि ते कायम राखतो..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version