Site icon InMarathi

विचारवंत विश्वंभर चौधरींनी वाजपेयींना दिलेली श्रद्धांजली अटलजींची खरी उंची दाखवून देते

Atal-Bihari-Vajpayee-inmarathi

responsiblecorporate.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रदीर्घ आजारानंतर काल दिल्लीतील एम्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. धुरंधर राजकारणी, प्रतिभावंत कवी, कठोर शासक या आणि अशा अनेक भूमिका समर्थपणे वठवत असताना भारताच्या राजकारणावर वाजपेयी यांनी छाप सोडली.

अजातशत्रू असलेल्या वाजपेयी यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या समर्थकच नव्हे तर विरोधकांनीही शोक व्यक्त केला. त्यांच्या आठवणींनी अनेकांना भावना अनावर झाल्या.

 

indianexpress.com

त्यांचे ओघवते वक्तृत्व, कवित्व, राजकारण यांच्यावर बोलले जाईल तितके थोडे आहे. त्यांचे केवळ असणे हेच धीर देणारे होते अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. माध्यमात बोलताना भावनांना वाट करून दिली.

त्यापैकीच एक उद्बोधक प्रतिक्रिया होती ज्येष्ठ विचारवंत श्री विश्वंभर चौधर यांची.

श्री विश्वंभर चौधरी

इनमराठी च्या वाचकांसाठी ही प्रतिक्रिया खाली देत आहोत..

===

तडफदार अटलजींचे पहिले भाषण मी वयाच्या चौदाव्या वर्षी (१९८५, मला नीट आठवत असेल तर) औरंगाबाद येथे ऐकले. संध्याकाळी ७ वाजताची सभा होती, धोती आणि नेहरू सदरा (किंवा लखनवी झब्बा असावा) अशा अस्सल भारतीय वेशात अटलजी स्टेजवर आले. मेरे भाईयो और बहनो.

धीरगंभीर खर्जात भाषणाची सुरुवात आणि मग पुढचा दीड तास कसा गेला कळलंच नाही. माझ्यासारख्या नववीतल्या मुलापासून सभेतल्या सर्वात विद्वान माणसापर्यंत सर्वजण अक्षरश: स्तब्ध होऊन भाषण ऐकत होते. हा प्रसंग मनात आजही ताजा आहे.

अटलजींची अनेक भाषणे मी पुढल्या काळात ऐकली. ते मला भाषणातले पं. भीमसेन जोशीच वाटत. पंडितजींची मैफिल जसे पडल्याचे ऐकिवात नाही तसेच अटलजींचे भाषण पडल्याचे ऐकिवात नाही!

निसर्गदत्त मधुर पण गंभीर आवाज, भारदस्त शब्द-योजना, भाषणात एकाच पट्टीतील खालच्या ‘सा’ पासून वरच्या षड्जा पर्यंत लीलया आणि समयोचित फिरणारा गळा, एखाद्या गवयालाही साधणार नाही असा खर्ज, चेहऱ्यावर अत्यंत समर्पक हावभाव अन् अतिशय परिणामकारक तरीही पूर्णत: सहजभाव असलेले हातवारे..

 

bbc.com

वाक्याची लय वाढली की होणारी डोळ्यांची उघडझाप आणि वाक्याच्या शेवटी डोळे मिटून गाठली जाणारी सम, एखादा ख्याल चालला आहे असे वाटावे अशी लय, विलम्बितातून द्रुत मध्ये गेले तरी मात्रांचा मेळ समेवर आले की मोजून घ्यावा… विराम (पॉज) घेण्याची पद्धत अशी की कदाचित आणखी एखाद्या मागच्या किंवा पुढच्या शब्दावर हा विराम चाललाच नसता, तो इथेच हवा अशी श्रोत्याची खात्री व्हावी.

आशय आणि अभिव्यक्ती दोन्हींनी संपन्न असलेलं असं भाषण जगातील फारच थोडे वक्ते करू शकतात.

गांभीर्य, संकीर्णता, प्रसंगावधान, विनोद, मिष्कीलपणा, खोडकरपणा, कठोराघात, वाणी माधुर्य अशी उत्तम वक्त्याला लागणारी सर्व शस्त्रे अटलजींच्या भात्यात स्वत: होऊन हजर असत.

भाषणात बोचरी टीका असेल पण ‘वार’ करणं अजिबात नाही. सुसंस्कृतता आणि शालीनता यांनी ओतप्रोत भरलेलं अन्य भाषण करणं सोपं आहे पण “राजकीय” भाषण करणं अवघड, पण ते त्यांना लीलया साधता आलं. सभ्यतम भाषेत कठोरतम टीका कशी करायची याचा वस्तुपाठ म्हणजे अटलजी.

राजकीय भाषणातही अलंकारिक शब्द वापरता येतात, विद्वत्ता देखील सरळ सोप्या पण परिणामकारक शब्दात व्यक्त होऊ शकते, या दोन्ही गोष्टी त्यांच्या भाषणात दिसत.

आधी बोलणारा वक्ता कोणीही असो, त्याच्या भाषणाचा प्रभाव अटलजींचे भाषण सुरु झाले की २-३ मिनिटात संपलाच म्हणून समजावे. एखादा हुकमी घोडेस्वार ज्याप्रमाणे लगाम हातात घेताच घोड्यावर लगेच नियंत्रण करून घोडा अक्षरश: आपल्या ताब्यात ठेवतो, तसे अटलजी सभा आपल्या ताब्यात ठेवत.

 

inancialexpress.com

संसदेत विरोधी पक्षातील अटलजी म्हणजे तुकारामांनी म्हटलेले “मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे” याची मूर्तीमंत प्रचीती! मला आठवतं तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी अनेक खाती स्वत:कडे ठेवली होती. त्यावर संसदेत बोलतांना अटलजी म्हणाले

“देश को रक्षा मंत्री नही है, प्रधानमंत्री रक्षा मंत्री है, देश को शिक्षा मंत्री नही है, प्रधानमंत्री शिक्षा मंत्री है”

यातलं रक्षा-शिक्षा यमक अत्यंत सहजतेने जुळवून आणावं ते त्यांनीच, संसदेत असं काव्यरुपात मांडण त्यांना सहज साध्य होतं. बाबरीच्या वेळची भाषणं मात्र अजिबात न आवडणारी होती.

संसदेत तेव्हा रामायण या लोकप्रिय मालिकेतील दोन कलाकार दीपिका (सीता) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) निवडून आले होते. एका विषयावर (मला वाटते अयोध्येतील राम मंदीर) बोलताना अटलजी रंगात आले होते आणि समोरून कॉंग्रेस सदस्य मात्र त्यांना सतत डिवचत होते.

कॉंग्रेस सदस्य म्हणत

“सीता आपके बाजु मे बैठी है, और रावण भी आपकेही बाजू मे बैठे है”

अटलजींनी ते ३-४ वेळा ऐकलं, मग अचानक त्यांचा तो प्रसिद्ध पॉज घेऊन म्हणाले

“हां हां मुझे मालूम है सीता मेरे बाजुमे बैठी है, रावण भी मेरे बाजुमे बैठे है, लेकिन वानर सेना मे इतना शोर क्यों हो रहा है भाई?”

आणि संपूर्ण सभागृह अर्थातच हास्यकल्लोळात बुडालं..

 

india.com

विरोधी पक्षालाही आदर वाटावा असा हा नेता होता. सुसंस्कृत आणि शालीन. अभिवादन.

===

हे पण वाचा:

वाजपेयी आणि कलाम यांच्या दूरदृष्टीमुळे अमिरेकेच्या नाकावर टिच्चून भारत झाला “अण्वस्त्रसज्ज”

वाजपेयींचं ३ वाक्यांचं पत्र आलं आणि एका दिग्गजाची पंतप्रधान पदाची उमेदवारी कट झाली!

या ७ असामान्य गोष्टींकरता अटल बिहारी वाजपेयी भारतीयांच्या सदैव स्मरणात राहतील

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version