Site icon InMarathi

जेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनिमाला कापून काढतात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“शिवयरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप” असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जात असतं. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाप्रतापी, कुशल रणनितीकर, प्रजाहितदक्ष, जाणता राजा ह्या विशेषण रुपी अलंकारांचे ते अधिपती होते.

आजही असंख्य भारतीयांचा मनात शिवरायांचा इतिहास एका स्वप्रकाशीत, कधीही न विझणाऱ्या दिव्यासारखा सामावलेला आहे.

महाराज आज ही असंख्य अबलवृद्धांचे प्रेरणा स्थान आहेत. मराठी प्रांतात जन्मलेल्या प्रत्येकाला महाराजांचा इतिहास तोंडपाठ आहे.

 

 

मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज, लोकांना त्यांचा बुद्धीचातुर्य व प्रजाहितदक्षतेमुळे गेल्या साडे तीनशे वर्षांपासून स्मरणात आहेत.

महाराजांच्या शौर्याच्या कथा एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे वारशाचा स्वरूपात दिल्या जात आहेत.

===

हे ही वाचा – चीनकडे डोळे रोखून पहाणारे छत्रपती शिवाजी महाराज : “मराठा इन्फन्ट्री” ची कमाल…!

 

हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा ‘हंबीरराव मोहिते’!

===

आज आम्ही तुम्हाला महाराजांच्या इतिहासातील एक असा प्रसंग सांगणार आहोत ज्यात एका युद्धात अगदीच तोकडी ३५० संंख्या असलेल्या मावळ्यांनी, दहा हजारांपेक्षा जास्त सैन्यबळ असणाऱ्या आदिलशहाला धूळ चारली होती.

चला आपण आज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मूठभर मावळ्यांनी गाजवलेल्या धाडसी पराक्रमाची माहिती घेऊयात.

१० नोव्हेंबर  १६५९, स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला होता आणि स्वराज्याचं रक्षण केलं होतं. यामुळे आदिलशाहीला मोठं नुकसान झालं होतं आणि एक जबर धक्का पोहचला होता.

दुसरीकडे स्वराज्यातील मावळ्यांना बळकटी मिळाली होती आणि शिवरायांच्या धोरणांना दिशा मिळाली होती. शिवरायांनी हाती आलेल्या संधीचा फायदा घेत आदिलशाहीच्या ताब्यातील गडकोट ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती.

वासोट्याचा किल्ला जिंकल्यावर मराठा सैन्याची घोडदौड सुरु झाली आणि मराठे पन्हाळ्याचा दिशेने निघाले होते.

 

 

मराठ्यांना एका एका युद्धात मिळणाऱ्या दिग्विजया मुळे बिजापूरचा आदिलशहा खडबडून जागा झाला. त्याने त्यावेळी आदिलशाहीचा सेनापती रुस्तम जमानला मराठ्यांना रोखण्यासाठी पाठवलं, सोबत १० हजार सैनिक आणि हत्तीबळ देऊ केलं होतं.

सोबतच आदिलशाहीचे काही प्रमुख लढाखु सरदार फाजल खान, मलिक इतबार, याकूब खान,अंकुश खान, हसन खान आणि संताजी घाटगे ह्यांना देखील पाठवले होते. एवढया मोठ्या प्रचंड सैन्यबळाला घेऊन रुस्तम जमान पन्हाळ्याचा दिशेने निघाला होता.

दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नेताजी पालकर, सरदार गोदाजीराजे, हिरोजी इंगळे, भिमाजी वाघ, सिद्धी हिलाल, महाडिक हे सरदार आणि ३५०० मावळ्यांचे सैन्य होते. शिवरायांनी सैन्याची कमान स्वतःच्या ताब्यात घेतली होती.

 

===

हे ही वाचा – श्रीमंत बाजीराव पेशवे : एकही लढाई न हारता मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकविणारा योद्धा

===

शिवराय २७ डिसेंबरच्या रात्री सैन्याला घेऊन मिरजेला पोहचले होते.

 

 

दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथे रुस्तम जमानच्या सैन्याशी मराठ्यांची गाठ पडली. रुस्तम जमानच्या सैन्यात मोठं मोठे हत्ती होते ज्यांना त्याने सर्वात पुढे ठेवले. मागे त्याचे दहा हजार सैन्य आणि सरदार होते.

पण महाराजांनी आधीच आखून ठेवलेल्या रणनीतीनुसार मराठे निघाले, मराठ्यांचा मूठभर सैन्याने बघता बघता रुस्तम जमानचे चांगल्यात चांगले प्रशिक्षित सरदार आणि सैनिक कापले. रक्ताचा वर्षावाने करवीर नगरी न्हाहुन निघाली. मराठ्यांच्या पराक्रमापुढे आदिलशाहीच्या सैन्याची दाणादाण उडाली.

७ हजाराहून जास्त रुस्तम जमानचे सैन्य या युद्धात मारलं गेलं. मराठा सरदारांनी पराक्रम गाजवत आदिलशाहीला गुढगे टेकायला भाग पाडले. रुस्तम जमानच्या धूर्त नीतीला मराठ्यांनी उडवून लावत आपल्या शौर्याने संपूर्ण दक्खन दणाणून सोडला होता.

आदिलशाहीचे अनेक सरदार धारातीर्थी पडले. अनेक शरण आले आणि अनेक धूम ठोकून पळाले.

या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा डंका संपूर्ण दक्खनात गुंजू लागला. यानंतर महाराजांना संपूर्ण दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रवर वर्चस्व प्राप्त झालं होतं. काहींच कालावधीत महाराजांनी आदिलशाहीवर आजून जोरदार प्रहार करत मोठ्या किल्ल्यांवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

कोटी रुपयांचा दारुगोळा जप्त केला. अनेक हत्ती, घोडे, हिरे, माणके, सोने, नाणे, चांदी, किल्ले, शस्त्रास्त्रे स्वराज्याचा अधिपत्याखाली आले. ज्यामुळे स्वराज्याची आर्थिक स्थिती सुधारली, स्वराज्यातील सामान्य नागरिक सुखी झाला.

एवढ्यावरच न थांबता महाराजांनी आपली घोडदौड सुरूच ठेवली बघता-बघता अत्यंत चाणाक्ष पणे त्यांनी पन्हाळा आणि खेळणा किल्ला ताब्यात घेतला. हा किल्ला ताब्यात घेण्याची कथा पण तेवढीच रंजक आहे. यातून महाराजांच्या नेतृत्व कौशल्याची व बुद्धीचातुर्याची ओळख होते.

 

 

कोल्हापूरच्या विजयानंतर ताब्यात आलेल्या मोठ्या प्रदेशांमुळे, ते एका नव्या साम्राज्याचा निर्मितीकडे वळले होते. त्यांनी आदिलशाही ला त्रस्त करत आजून भूप्रदेश कब्जा करण्यास सुरुवात केली होती.

खेळणा किल्ला ताब्यात घेण्याचा महाराजांचा मानस होता पण नुकत्याच झालेल्या युद्धामुळे सैन्य थकलेलं होतं. शिवाय खेळणा किल्ला लढून ताब्यात घेणं इतकं सोपं नव्हतं. त्यामुळे किल्ल्यावर चढाई करणे शक्य झाले नाही.

यावर महाराजांनी आपलं बुद्धीचातुर्य दाखवत एक योजना आखली.

या योजनेनुसार काही मराठा सरदार किल्ल्यावर गेले आणि त्यांनी तेथील किल्लेदाराला थाप मारली कि त्यांना मराठ्यांचा सैन्यात काम करायचं नाही, त्यांना आदिलशाहीचा सेवक व्हायचे आहे. तो किल्लेदार बरोबर जाळ्यात अडकला, त्याने या मराठा सरदारांना सैनिक म्हणून नोकरी वर ठेवलं.

या संधीचा फायदा उचलत आधीच आखलेल्या योजनेनुसार मराठा सैनिकांनी किल्ल्यावरच्या सैनिक तळांची माहिती मिळवली. बरोबर योजना आखत त्यांनी दुसऱ्या दिवशीच उठाव केला. या उठावात त्यांनी अनेक उचकप्त्या केल्या ज्यामुळे किल्ल्यावर गदारोळ माजला.

सैन्य सैरभैर झालं याचा फायदा घेत त्यांनी आधीच शिकारीवर झडप घालून बसलेल्या वाघासारख्या बसलेल्या मराठा सैनिकांना इशारा केला आणि मग त्यांनी आक्रमण करत खेळणा किल्ला ताब्यात घेतला.

या गडाच्या विशालतेमुळे व भव्यतेमुळे महाराजांनी याचं नामकरण विशालगड केलं.

 

 

या सर्वात कोल्हापूरचा युद्धाने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. आदिलशाहीचे त्या युद्धात कंबरडे मोडले होते. अनेक शूर सरदारांची टोळी, धन संपत्ती तसेच ७ हजार सैनिक त्यांनी या युद्धात गमावले होते.

या उलट मराठ्यांनी १ हजार सैनिक गमावले, पण त्याचा मोबदल्यात स्वराज्याची पताका आकाशात वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचवली होती.

आदिलशाही या पराभवानंतर अत्यंत कमकुवत झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मुघलांच्या दिल्ली दरबारी गुंजूं लागले होते.

या युद्धानंतर व शिवरायांच्या वाढत्या साम्राज्याची दखल घेत औरंगजेबाने दक्खन कडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळेच या युद्धाला इतिहासात इतकं महत्व आहे.

कोल्हापूरच हे युद्ध मराठ्यांचा इतिहासात स्वर्ण अक्षराने लिहलं आहे. अनेक वीरांनी या युद्धात बलिदान दिले परंतु स्वराज्याला देशात एक मानाचे स्थान मिळवून दिले होते. या युद्धामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्व कौशल्याची व बुद्धीचातुर्याची ओळख संबंध विश्वाला झाली होती.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version