Site icon InMarathi

तामिळनाडूच्या राजकारणाची अजब अपरिहार्यता: नेता नाही तर “अभिनेता” करणार नेतृत्व

filmstars-inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

द्रमूक पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याचं, एम .करुणानिधींचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. द्रविड चळवळ आता कदाचित पूर्वी इतकी जोमात उदयास येईल ही आशा संपुष्टात आली. एकंदरीत दक्षिणेच्या राजकारणात कार्यकर्ते जीव ओवाळून टाकतील असा नेताही आता राहिलेला नाही.

करुणानिधींच निधन अमर्याद पोकळी निर्माण करणारी घटना असली तरीही इतर बऱ्याच अंशी पुन्हा एकदा बदलाची नांदी निर्माण करणारी आहे हे नक्की. या बदलांचा अंदाज घ्यायचा असेल तर मुळात द्रविड चळवळीची सुरुवात व इतिहास ठावूक असण महत्त्वाचं आहे.

 

timesnownews.com

संपूर्ण तमिळनाडू आणि दक्षिण भारतावर गेली शतकभर प्रभाव असणाऱ्या या चळवळीची सुरवात १९२५ साला पासून जरा जोरात झाली. पेरियार अर्थात एस .एल. रामासामी यांच्या नेतृत्वाखाली ‘द्रविडनाडू’ ही संकल्पना जोर धरू लागली.

द्रविड संकल्पना ही मुळात ब्राम्हण वर्चस्ववाद (तथाकथित किंवा वास्तविक) ला विरोध आणि पर्यायानं बहुतांश हिंदू वा वैदीक चालीरीतींना विरोध याच स्वरुपात सुरु झाली आणि वाढली.

ब्रिटीश राजशासनात दक्षिण भारत अगदी श्रीलंकेतल्या जाफनापर्यंत स्वतंत्र देश म्हणून द्यावा अर्थात द्रविडनाडू याच झेंड्याखाली अशी मागणी देखील याच संघटनेकडून झाली.

पुढे १९४८/४९ ला अधिकृतरीत्या पेरियार यांनी अण्णादुराई आणि करुणानिधीसारख्या कट्टर द्रविडींना घेवून ‘द्रविड कळघम (DK)’ या संघटनेची अधिकृतरीत्या स्थापना केली. पुढे पेरियार आणि अण्णादुराई यांच्या वाद होऊन अण्णादुराईनी ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ ही नवीन राजकीय संघटना तयार केली. या वाद मागचं कारण होतं भारताचं स्वातंत्र्य.

भारताला मिळालेल स्वातंत्र्य ही पेरियार यांच्या मते वाईट बातमी होती.

आता स्वतंत्र द्रविडनाडू हि संकलपना कधीच अस्तित्त्वात येवू शकणार नाही अशी त्यांची धारणा झाली होती. या विरुद्ध स्वातंत्र्याचं स्वागत अण्णादुराईनी केलं. १९४६ पासून या वादाची ठिणगी पडली .

 

indiatvnews.com

१९४९ ला अण्णादुईरानी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. पुढे १९६७ साली अण्णादुराईचा द्रमुक पहिल्यांदा सत्तेत आला आणि अण्णादुराई मुख्यमंत्री झाले. पुढे १९६९ ला मुख्यमंत्री असतानाच त्याचं कर्करोगानं निधन झालं. परिणामस्वरूप तत्कालीन द्रमुकचे मोठे नेते या नात्याने करुणानिधी DMK चे सर्वेसर्वा झाले.

मधल्या काळात, १९५३ च्या आसपास तमिळ चित्रपट सृष्टी मधले सगळ्यात मोठा नायक MGR म्हणजेच एम.जी.रामचंद्रन यांची DMK मध्ये सभासदत्व स्वीकारलं.

उमदा नायक म्हणून प्रचंड लोकप्रियता असणा-या MGR ना DMK मध्ये स्वत:भोवती महत्वांकित वलय निर्माण करायला फारसा वेळ लागला नाही. आणि यामधुनच DMK च्या विघटनाची ठिणगी पडली.

१९७२ साली करुणानिधी आपल्या मुलाला, मुथू ला एकाच वेळी चित्रपट आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर प्रस्थापित करण्यासाठी हालचाली करत होते. त्यासाठी त्यांनी MGR ना सगळ्या आघाड्यांवर एकाकी पाडायला सुरवात केली.

पुढे MGR नी १९७२ ला ही घुसमट फोडत ‘अण्णा द्रमुक’ या पक्षाची स्थापन केली. नंतरच्या काळात त्याचं नाव ‘अखिल भारतीय अण्णा द्रमुक’ असं झालं. पुढे MGR मुख्यमंत्री झाले, जयललितांचा उदय-अस्त आणि आता करुणानिधींच निधन हा प्रवास आपल्यास ठावूक आहेच.

 

siasat.com

DMK किंवा AIADMK असेल मुळात कॉंग्रेस नंतर प्रादेशिक आघाड्यांवर प्रचंड यश मिळवणारा पहिला पक्ष होता. अण्णादुराई हे स्वतंत्र तामिळनाडू राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले होते.

यावरून या पक्षाच्या लोकप्रियते बाबत अंदाज यावा. एकंदरीत हा सगळा राजकीय प्रवास तामिळनाडूचा या सगळ्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मुळात तो स्वतंत्र असा उरतच नाही.

या सगळ्या राजकीय इतिहासाला एक सिनेमेटीक अंग आहे. तामिळनाडूचा तो एक अविभाज्य घटक आहे.

DMK चे पेरियार सोडले तर दोन मोठे नेते, एक अण्णादुराई आणि एम. करुणानिधी हे दोघे हि तमिळ सिने सृष्टीत अगदी शेवट पर्यंत कार्यरत होते. अण्णादुराई हे पत्रकार म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी १९४८-१९७८ पर्यंत एकूण १० चित्रपटांसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखक म्हणून काम केलं.

१९४९ ला आलेला “वेलैकरी” हा लेखक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. अण्णादुराई याव्यतिरिक्त करुणानिधी सुद्धा वयाच्या २० व्या वर्ष पासून जुपिटर चित्रसंस्थेसाठी कथा-पटकथाकार म्हणून कार्यरत राहिले.

१९४७ ला आलेला ‘राजकुमारी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट होता. चित्रपट लेखक म्हणून करुणानिधी यांची कारकीर्द बरीच प्रदीर्घ राहिली. अगदी याच दशकाच्या सुरवातीला आलेला, २०११ च्या ‘पोन्नार शंकर’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा.

१९४७ ते २०११ इतकी प्रदीर्घ कारकीर्दत त्यांनी बरेच ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. १९५२ चा मनोहरा, १९६९ चा पुमपुहारा, पराशक्ती असे अनेक चित्रपट गल्ल्यांवर आणि समीक्षकांच्या पसंदीस उतरले.

 

indiablooms.com

द्रविड चळवळीला आणि पर्यायानं तामिळनाडूच्या राजकारणातल्या महत्वाच्या नेत्यांच पाहिलं पर्व हे लेखकांचं राहीलं. पण दुसऱ्या पर्वात मात्र अभिनेत्यांच वर्चस्व राहीलं. दुसऱ्या फळीतले नेते हे प्रामुख्याने तमिळ सृष्टितली नावाजलेली नावं होती. MGR हे तमिळ सृष्टीतले त्यावेळचे सगळ्यात देखनं आणि उमंद व्यक्तिमत्व होतं.

१९३८ ला आलेल्या ‘सती-लीलावती’ या चित्रपटातून त्यांची कारकीर्द सुरु झाली. पुढे १९५३ ला द्रमुक मध्ये सभासद होईपर्यंत MGR हे NTR यांच्यासारखच प्रचंड वलय असणारं नाव झालं होतं.

MGR यांची कारकीर्द करुणानिधी इतकीच प्रदीर्घ आहे. १९३८-१९७८ जवळपास ४० वर्ष त्यांनी नायक ते चरित्र अभिनेता म्हणून काम केलं. या काळात त्यांनी ३ वेळा मुख्यमंत्रीपद्सुद्धा उपभोगलं आहे.

===

हे पण वाचा:

ब्राह्मण वर्चस्ववाद विरोधी चळवळीचा आणखी एक बुरूज ढासळला

===

त्यानंतर जयललिता या पर्वाचा उदय झाला. त्यांची प्राथमिक कारकीर्द हि MGR यांच्या मुळे अभिनेत्री अशीच सुरु झाली होती. मुख्यमंत्री आणि राजकारणी म्हणून जयललिता यांचा कार्यकाळ सगळयांनाच ठावूक आहे.

 

latestly.com

दक्षिणात्य राजकारणाचा सिनेमा हा अविभाज्य घटक आहे. निदान तेलुगु आणि तमिळ प्रांतात तरी प्रामुख्याने. तेलुगुत NTR (नंदामौरी तारका रामराव) नायक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे नेते होते. त्याचा फायदा त्यांच्या परिवाराला आजही होतोय. तामिळनाडू मध्ये त्या प्रमाणात खाजगीकरण झालं नाही.

अर्थात याला करुणानिधी अपवाद आहेत. करुणानिधींची अमर्याद महत्वाकांक्षा ही मुळात द्रविड चळवळीच्या मुख्य तत्वांच्या विरुद्ध होती.

मुळात पेरियार यांचा राजकीय पक्ष म्हणून संघटनेचा वापर करायला विरोध होता यामागचं कारण नंतर उत्पन्न होऊ शकणारी लालसा हे हि होतचं. MGR आणि करुणानिधींचा वादामागच हेही एक कारण आहे.

तामिळनाडूच्या राजकारणावर अगदी स्वतंत्र राज्याच्या पहिल्या दिवसा पासूनच सिनेमा आणि त्यांच्यातल्या व्यक्तीचा प्रभाव राहिला आहे. स्वतंत्र तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री अण्णादुराई झाले हे सुद्धा बरंच काही सूचित करतं. त्यांची चित्रपट कारकीर्द वर दिली आहेच.

आज करुणानिधिंच्या जाण्यानं द्रविड चळवळीतलं शेवटचं महत्वाचं मोठं नेतृत्व संपलं आहे. त्यांच्या मागेही अनेक पक्षश्रेष्ठी आहेत पण द्रविड चळवळीत त्यांना इतर पुर्वंजांप्रमाणे लोकप्रियता मिळेल का हा प्रश्नच आहे.

 

globintel.com

जयललिता-करुणानिधी नंतरच्या तमिळनाडूत एकाच वेळी चित्रपट आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर लोकप्रियता आणि स्वीकाहर्यात असणारं नेतृत्व नाही.

मुळातच लोकप्रियता असणारी मंडळी एकतर पूर्णपणे राजकारणी आहेत किंवा पूर्णपणे सिनेमामधली. म्हणूनच लेखाच्या सुरवातीलाच करुणानिधींच्या जाण्यानं एका बदलाची सुरवात होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

===

हे पण वाचा:

तमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता?

करुणानिधींचा अंत्यसंस्कार “मरीना बीचवरच” का झाला? हा बीच एवढा खास का आहे?

===

आता या पुढच्या तमिळनाडूत एकतर संपूर्ण राजकारणी असलेल्यांना नेता म्हणून स्विकारण हा एक पर्याय राहतो किंवा कमल हसन , रजनीकांत सारख्या प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश करणे  महत्वाचे ठरणार आहे.

एकंदरीत कोणत्याहि बाजूनं द्रविड चळवळ पुन्हा तिचे वैभवशाली दिवस बघू शकेल का हा प्रश्न निर्माण होतो आहे. जयललिता – करुणानिधी नंतरच द्रविड राजकारण काय वळण घेतं हे काळच सांगू शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version