Site icon InMarathi

प्रेतासोबत झोपायला आवडणारा जगातील सर्वात क्रूर हुकुमशहा…

amin-executions-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेतासोबत झोपणारा हुकुमशहा हे शीर्षक वाचूनच तुम्हाला धडकी भरली असेल. असा एक विकृत हुकुमशहा होऊन गेला यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही.

४ ऑगस्ट १९७२ मध्ये युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन यांनी युगांडामध्ये अनेक वर्षांपासून राहणार्‍या ६०००० आशियाई लोकांना अचानक देश सोडून जाण्याचा आदेश दिला आणि यासाठी केवळ ९० दिवसांची मुदत देण्यात आली.

ईदी अमीन पूर्वी युगांडाचे हेवी वेट चॅम्पियन होते. त्यांचे वजन १३५ किलो होते व सहा फुट चार इंच एवढी त्यांची उंची होती. १९७१ साली मिल्टन ओबोटे यांची सत्ता उखडून ते सत्ताधीश झाले.

४ ऑगस्ट १९७२ रोजी ईमी अमीन यांना एक स्वप्न पडले आणि त्यांनी टोरोरोमध्ये सैनिकांच्या अधिकार्‍यांना सांगितले की,

“अल्लाहने त्यांना आपल्या देशातून सर्व आशियाई लोकांना हाकलवायला सांगितले आहे. आशियाई लोकांनी युंगाडाच्या लोकांसोबत चांगले संबंध स्थापन केले नाही, उलट युगांडाला लुटणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे.”

 

जरी त्यांनी अल्लाहचे नाव घेतले असले तरी ते सत्य नव्हते. कारण अमीन यांच्या राजकारणावर आधारित ‘गोस्ट ऑफ कंपाला’ या पुस्तकात जॉर्ज इवान स्मित लिहितात की,

“आशियाई लोकांना देश सोडून जाण्यास प्रवृत्त करण्याची प्रेरणा त्यांना लीबियाचे हुकुमशहा कर्नल गद्दाफीकडून मिळाली आहे.

गद्दाफी यांनी त्यांना सल्ला दिला होता की जर त्यांना त्यांच्या देशावर पकड ठेवायची असेल तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्यांचे पूर्ण नियंत्रण असले पाहिजे.”

त्यांच्या या आदेशाची बातमी सर्वत्र पसरली. या बातमीने ब्रिटन सुद्धा अस्वस्थ झाले. अमीन यांची समजूत काढण्यासाठी ब्रिटनचे मंत्री जियॉफ्री रिपन यांना पाठवण्यात आले. सुरुवातीला रिपन यांना भेटण्यास अमीन टाळाटाळ करत होते.

अधिकार्‍यांनी समजवल्यामुळे ते रिपन यांना भेटायला तयार झाले. पण या भेटीत कोणताच लाभ झाला नाही.

अमीन आपल्या निर्णयावर ठाम होते. भारतातर्फे विदेश सेवेचे अधिकारी निरंजन देसाईंना पाठवण्यात आले. तिकडच्या परिस्थितीबद्दल निरंजन देसाईंनी सांगून ठेवलंय की,

“जेव्हा मी कंपाला पोहोचलो तेव्हा तिकडची परिस्थिती अक्षरशः वाईट होती. तिकडचे अनेक नागरिक आपल्या आयुष्यात कधी देश सोडून गेले नव्हते.

प्रत्येक व्यक्तीला आपल्या सोबत केवळ ५५ पाऊंड आणि २५० किलो वजन घेऊन जाण्यास अनुमती होती. कंपालाच्या बाहेर राहणार्‍या लोकांना या बाबतीत माहिती सुद्धा नव्हती.”

 

 

निरंजन देसाई याविषयी सविस्तरपणे सांगतात की,

“काही श्रीमंत लोक आपले पैसे व दागिने देशाबाहेर घेऊन जाण्यास यशस्वी झाले. जग फिरण्यासाठी फर्स्ट क्लास टिकिट सीओद्वारे हॉटेल बुकिंग आधीच करुन ठेवणे हा सर्वोत्तम पर्याय लोकांनी निवडला.

हा मिसिलेनियस चार्ज ऑर्डर नंतर मागे घेतला जाऊ शकतो. म्हणून काहींनी तर आपल्या गाडीच्या कार्पेट खाली दागिने लपवून केनियाला पाठवले.

काही लोकांना असं वाटलं की ते पुन्हा युगांडाला येऊ शकतात म्हणून त्यांनी आपले दागिने लॉन किंवा बागेत गाडून टाकले.

काही लोकांनी तर बॅंक ऑफ बरोडाच्या स्थानिक शाखेच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवले. त्यापैकी काही लोक जेव्हा १५ वर्षांनंतर युगांडाला पोहोचले तेव्हा दागिने सुरक्षित होते.”

युगांडातून लंडनमध्ये गेलेल्या गीता वॉट्स सांगतात,

“आम्हाला केवळ ५५ पाऊंड घेऊन जाण्यास अनुमती होती. एअरपोर्टवर आमचे सामान सुटकेस उघडून अक्षरशः फेकून देत होते. कारण सुटकेसमधून कुणी दागिने तर घेऊन जात नाही ना, हे त्यांना तपासायचे होते.”

“माझ्या बोटात अंगठी होती. ती निघत नव्हती. म्हणून माझ्या बोटातून ती अंगठी कापून काढली. हे करत असताना युगांडाचे सैनिक आमच्या भोवती बंदुका रोखून उभे होते.”

 

 

एअरपोर्टवर जाताना पाच रोड ब्लॉक्सवर नागरिकांना तपासलं जायचं. सैनिक त्यांच्याकडील सामान सुद्धा लुटत होते. अमीन सरकारचे भ्रष्ट मंत्री आणि सैनिक अधिकारी सामान लुटत होते. सामान्य युगांडाच्या नागरिकांना काही मिळाले नाही.

लुटलेल्या संपत्तीला ते सांकेतिक भाषेत ’बांग्लादेश’ म्हणायचे. कारण त्या काळी बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, असं देसाई सांगतात.

’गोस्ट ऑफ कंपाला’ या पुस्तकात जॉर्ज इवान स्मिथ लिहितात की,

“अमीन यांनी आशियाई लोकांचे दुकान व हॉटेल आपल्या सैनिक आणि अधिकार्‍यांना देऊन टाकले. या अधिकार्‍यांना आपलं घर सुद्धा चालवण्याची शिस्त नव्हती. मग फुकटात मिळालेले दुकान व हॉटेल कसे चालवणार.”

“ते त्यांच्या आदिवासी प्रथेनुसार आपल्या कुटुंबातील लोकांना बोलवून सांगायचे की तुम्हाला जे हवे ते घेऊन जा. कुठून माल खरेदी करायचा, एवढी सुद्धा अक्कल त्यांना नव्हती. याचा परिणाम असा झाला की युगांडाची अर्थव्यवस्था कोसळली.”

 

अमीनच्या वेळी आरोग्य मंत्री असलेले हेनरी केयेंबो यांनी त्यांच्या ’अ स्टेट ऑफ ब्लड: द इनसाइड स्टोरी ऑफ ईदी अमीन; या पुस्तकात त्यांनी अमीनच्या अत्याचाराचे पाढे वाचले आहेत. अमीन यांच्या क्रूरतेची ओळख त्यांनी जगाला करुन दिली. ते लिहितात,

“अमीन केवळ आपल्या शत्रूंना मारत नव्हते तर मारल्यानंतर त्याच्या प्रेतासोबत विध्वंसक कृती करत होते. त्यांचे मूत्रपिंड, लिव्हर, नाक, ओठ आणि गुप्तांग काढून टाकण्यात यायचे.

१९७४ साली विदेश सेवाचे अधिकारी गॉडफ्री किगाला यांना गोळी मारुन त्यांचे डोळे काढण्यात आले व त्यांचे प्रेत जंगलात फेकून देण्यात आले.”

“अमीन मारलेल्या लोकांच्या प्रेतासोबत काही वेळ एकांतात घालवायचे. १९७४ साली ब्रिग्रेडियर चार्ल्स अरुबेंची हत्या करण्यात आली तेव्हा अमीन मुलागो इस्पितळाच्या शवागृहात गेले व त्यांनी पार्थीव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी उपचिकित्सक अधिक्षक क्येवावाबाएला प्रेतासोबत एकांत देण्यास सागितले.”

काही युगांडावासियांचे म्हणणे आहे की काकवा आदिवासींमध्ये असलेल्या प्रथेप्रमाणे ते शत्रूचे रक्त पित होते.

अमीन काकवा जातीचे होते. त्यांनी अनेकदा राष्ट्रपती व इतर लोकांसमोर मान्य केले होते की त्यांनी मानवी मांस खाल्ले आहे.

ते म्हणायचे की जेव्हा तुमचे सैनिक घायाळ होतात. अशा परिस्थितीत त्यांना मारुन त्यांचे मांस खाऊन तुम्ही जिवंत राहू शकता.

 

 

अमीन यांच्या काळात युगांडामधील भारताचे उच्च आयुक्त मदनजीत सिंह आपल्या “कल्चर ऑफ द सेपल्करे”मध्ये लिहितात,

“अमीनच्या घरात एक खोली अशी होती जिथे केवळ मलाच जाण्याची अनुमती होती. अमीनची पाचवी बायको सारा क्योलाबाला या खोलीत जायचे होते. तिने मला खोली उघडायला सांगितली.”

“तिने आग्रह केल्यामुळे मी ती खोली उघडली. त्या खोलीत एक रेफ्रिजरेटर ठेवले होते. जेव्हा तिने रेफ्रिजरेटर उघडले तेव्हा ती किंचाळली. त्यात तिच्या आधीच्या प्रियकराचे शीर ठेवले होते.”

साराच्या प्रियकराप्रमाणे त्यांनी इतक अनेक महिलांच्या प्रियकराचे शीर कलम केले होते. अमीनचे अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध होते. त्यांचे कमीतकमी ३० महिलांचे अंतपूर होते.

अमीनची चौथी पत्नी मेदीना एकदा त्यांच्या हातून मरता मरता वाचली. १९७५ मध्ये अमीनच्या कारवर गोळीबार झाला. अमीनला संशय होता की त्यांच्या बायकोनेच मारण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून त्यांनी मेदीनाला इतकं मारलं की त्यांचे मनगट तुटले.

अमीन यांनी ही कहाणी एखाद्या चित्तथरारक चित्रपटापेक्षाही भयंकर आहे. भारतासारख्या देशात राहून इतक्या क्रौर्याची कल्पना आपण करुच शकत नाही. पण हा विकृत हुकुमशहा जगाच्या इतिहासात होऊन गेला हे काळे सत्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

 

===

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version