Site icon InMarathi

पाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या “यशस्वी जयस्वाल”चं डोळे दिपवणारं यश… नक्की वाचा..

yashswi ipl

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लेखिका – ऍड. अंजली झरकर 

===

आयुष्य जगायला काय लागतं? प्रेम करणारे आई-बाप, राहायला आरामदायक घर, दोन वेळचं जेवण, रात्रीची उबदार झोप आणि मनसोक्तपणे सोशल मीडिया अनुभवण्यासाठी अनलिमिटेड नेट पॅक.

हे सुख बहुतांशी आपल्या सगळ्यांकडे असतं.

आपण जगतो, जगताना बऱ्याच अशा गोष्टी दिसतात ज्या आपल्याकडे नसतात. मग जगता जगता स्वत:ला आणि आयुष्याला कोसण्याचा प्रकार सुरु होतो.

 

 

नोकरी नाही, पैसा नाही, अजून चांगलं घर नाही, महागडे मोबाईल्स नाहीत.

अशामध्ये वडीलधाऱ्या माणसांनी आपल्यापेक्षा हलाखीत जीवन जगणाऱ्या माणसांचे उदाहरण दिले तर ती उदाहरणं आणि त्याबद्दल सांगणारे लोक यांचा राग येतो.

कारण आपल्यासाठी आयुष्य म्हणजे सरळ २+२= ४ असा खेळ असतो.

सगळ्या वस्तू विनासायास किंवा थोडेफार कष्ट करून मिळतात. त्यामुळे आपल्या म्हणण्याप्रमाणेच पुढचं आयुष्य सुद्धा जगता आलं पाहिजे असा आपला हेका असतो.

याउलट काही लोकांकडे ना घर असते, ना आई- वडील, ना पैसा, ना दोन वेळचं अन्न, ना कसली करमणूक! हेअसे लोक मग कशावर जगतात?

याचं उत्तर देता येईल –

असे लोक त्यांच्यात पेटलेल्या ध्येयाच्या ज्वालेवर जगतात.

Legends कधीच जन्माला येत नाहीत.  Legend घडत जातो; ठोकून- ठाकून, परिस्थतीचे फटके खावून… जेव्हा असा legend घडतो तेव्हा लोक त्याला “यशस्वी जयस्वाल” म्हणून ओळखतात.

 

 

मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. सुनील गावसकर असोत, सचिन तेंडुलकर असो, मुंबईने भारताला अनेक चमकदार खेळाडू दिले आहेत.

त्यांनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवलंय. मुंबईचा हा नावलौकिक स्वत:च्या शिरावर घेवून खेळण्यासाठी आता सज्ज होतोय “यशस्वी जयस्वाल” हा १८ वर्षाचा खेळाडू!

२०१९च्या युवा विश्वचषकात त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या प्रशिक्षकाला त्याच्यात ती चमक, तो जसबा दिसतो जो हर एका सामान्य व्यक्तीला असामान्य बनवू शकतो.

त्याने उपांत्य सामन्यात पाकिस्तान विरुद्ध शानदार शतक सुद्धा झळकावलं.

गोलंदाजाच्या मनाचा अंदाज घेवून त्याला फटकावणारा पहिल्या फळीतला अव्वल दर्जाचा फलंदाज असा लौकिक त्याने कमावलाय. त्याच्याकडून सगळ्यांनाच फार मोठ्या अपेक्षा आहेत.

त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीचं फळ म्हणून, आयपीएल २०२०करिता, त्याच्यावर तब्बल २.४ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. आज याच यशस्वीने आयपीएल पदार्पण केलं…

===

हे ही वाचा –

===

 

 

पण याच यशस्वीचा संघर्ष, ऐकला तर डोळे पाणावल्या शिवाय राहत नाहीत.

उत्तरप्रदेशातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या, आपल्या वडिलांचं तिसरं अपत्य असलेल्या, यशस्वीने क्रिकेट साठी ११ व्या वर्षी घर सोडलं. त्याला वडिलांनी कसलाही आक्षेप घ्यायचं कारण नव्हतं. कारण खाणारं एक तोंड कमी झालं तर त्यांना बरंच होतं.

 

 

यशस्वी मुंबईत त्याच्या काकांकडे राहायला आला. चाळीच्या १० बाय १०च्या घरात आधीच ७ माणसे दाटीवाटीने समावून घेणाऱ्या त्या खोलीत यशस्वीला जागा नव्हती. यशस्वीचा काका तेव्हा मुंबई च्या आझाद मैदानावरील मुस्लीम युनायटेड क्लबमध्ये मॅनेजर होते.

क्लबच्या मालकाला सांगून त्याने यशस्वीला मोकळ्या मैदानात एका छोट्या प्लास्टिकच्या तंबूत राहू देण्याची परवानगी मिळवली. वयाच्या ११ व्या वर्षी यशस्वी प्लास्टिक तंबूमध्ये राहायला गेला.

पण – नुसतं राहून भागणार नव्हतं. क्रिकेटचा खर्च भागवायचा तर काही काम तर केलं पाहिजे! म्हणून एका डेअरीमध्ये रात्रपाळी चं काम त्याने मिळवलं.

दिवसभर ग्राउंड वर सराव, खायची प्यायची सोय नाही, अनेक रात्री उपाशी राहायचं. उपाशी पोटी झोपी जाण्याची मोकळीक नव्हती… नाहीतर रात्रपाळीचं काम कोण बघणार…!

दिवस कष्ट करण्यात आणि रात्र उघड्या डोळ्यांनी टक्क बघण्यात निघून जायची.

फक्त ११ वर्षाचं मूल!! झोप सहन न झाल्याने एक दिवस डेअरीमध्ये गाढ झोप लागली. सकाळ उजाडली ती डेअरी मालकाच्या ओरडण्याने. यशस्वी त्याच्या सामानासकट डेअरी मधून बाहेर फेकला गेला.

आता जगायला आणि राहायला फक्त आझाद मैदान मोकळं होतं. उन असो, वारा असो की पाऊस; आझाद मैदानाच्या कोपऱ्यात उभा केलेला छोटासा तंबू म्हणजे यशस्वीचं सर्वस्व होतं.

आठवड्याच्या २००-३०० रुपयासाठी त्याला दिवस दिवस क्रिकेट मॅचेस खेळाव्या लागत. त्यातूनही भागायचं नाही म्हणून तो आझाद मैदानावर पाणीपुरी विकायचा. अशा वेळी अनेकदा त्याचे टीममेट्स तिथे येऊन त्याला चिडवायचे.

यावर “तुला अशा चिडवण्याचं कधी वाईट वाटलं का”? या प्रश्नावर तो साळसूदपणे म्हणतो;

“ नाही! कधीच नाही. बेघर होणं म्हणजे काय असतं याचा त्यांना अनुभव नव्हता. दिवस दिवस उपाशी राहणं कसं असतं त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी पाणीपुरी विकली नव्हती. त्यामुळे माझ्या वेदना त्यांनी समजून घ्याव्या अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून कशी ठेवणार?!”

आझाद मैदानात, ५ वर्षे छोट्याश्या तंबूमध्ये आई-वडिलांपासून दूर राहून यशस्वी संघर्ष करत होता.

उन्हाळ्यात तंबुचं प्लास्टिक प्रचंड तापलेलं असायचं. ते थंड करण्याची सोय नसायची. कधी काळी जेवण मिळालंच, तर ते तंबूमध्ये जपून मेणबत्ती लावून त्याच्या प्रकाशामध्ये खावं लागायचं.

अनेकदा डोळ्यात पाणी यायचं. अगदी हमसाहमशी रडण्यापर्यंत वेळ यायची. कधी घरच्यांची आठवण यायची.

मैदानाबाहेरची दुकाने रात्री बंद असायची. त्यामुळे साधं मलमुत्र विसर्जन जरी करायचं म्हटलं तरी त्याला बऱ्याचदा सकाळपर्यंत वाट पाहावी लागायची.

पोटात अन्न-पाणी आणि पाठीवर फिरणारा कसलाही आपुलकीचा हात नसताना, ध्येयाची आग त्याच्यामध्ये पेटत होती. हा मुलगा अन्न, वस्त्र, निवारा अशा कसल्याच मुलभूत गोष्टी स्वत:जवळ नसताना ही लढला, लढत राहिला.

स्वत:च्या कामगिरीने त्याने आपलं मुंबई संघातलं स्थान पक्क केलं. यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी यशस्वीच्या संघर्षात त्याला मदत केली.

 

 

मुंबईच्या कदमवाडी भागातील एका चाळीत तो राहू लागला. त्याच्यासाठी जणू तो स्वर्ग आहे. इतकी वर्षे तंबूत काढली. आज एक छप्पर आणि चार भिंती तर मिळाल्यात हेच माझं मोठं भाग्य असं तो म्हणत असे.

तब्बल ६ वर्षाच्या संघर्षानंतर यशस्वीची श्रीलंकेला जाणाऱ्या १९ वर्षाखालील भारतीय टीममध्ये निवड झाली.

“तुला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजाचा सामना करावा लागेल याचं तुला काही दडपण आहे का?” असा प्रश्न जेव्हा त्याला विचारला गेला, तेव्हा त्याने उत्तर दिलं ते असं

“सारं आयुष्य दडपण झेलण्यात गेलं. मी तर भरपूर रन्स काढणार आणि कुठल्याही गोलंदाजाचा यशस्वीपणे सामना करून दाखवणार. त्याचं मला दडपण नाही. पण आज रात्री, माझ्या पुढ्यात अन्न असेल की नाही या गोष्टीचं मात्र मला जरूर दडपण आहे!”

त्याचं हे म्हणणं त्यानं विश्वचषकात तंतोतंत खरं करून दाखवलं. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्यानं नाव मिळवलं.

 

 

इतक्या अचाट अडचणीमध्ये पुढे जाण्याचा त्याचा दृढनिश्चय, त्याचं खेळाबद्दलचं प्रेम, आणि बाह्य परिस्थती मधली अनेक वादळे झेलून सुद्धा न विझलेली हृदयातली आग त्याला आज इथपर्यंत घेवून आली आहे. तशीच ती त्याला अजून पुढे घेवून जाईल यात शंका नाही.

“यशस्वी जयस्वाल” हे नाव उद्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये धोनी आणि कोहली सारखेच मानाने झळकेल असा आत्मविश्वास आज आपल्याला यशस्वी देतो.

Hats off to you Yashasvi. आम्हाला तुझा अभिमान वाटतो!

 

हे ही वाचा –

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version