Site icon InMarathi

बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारणात कुणी कुणाचा कायम मित्र किंवा शत्रू असत नाही, असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत म्हणता येईल.

परन्तु ठाकरे आणि पवार यांच्या राजकीय विरोधाचे आणि वैयक्तिक जीवनातील मैत्रीचे किस्सेच वेगळे आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन धुरंदर.

दोघांची विचारसरणी वेगळी, काम करायची, राजकारणाची पद्धत वेगळी. दोघेही पक्षप्रमुख. पक्षांची कार्यपद्धती वेगळी. वेगवेगळ्या पक्षात असल्या कारणाने राजकीय विरोधक म्हणून दोघेही एकमेकांवर आपापल्या भाषणातून जाहीर टीका करत.

परंतु वैयक्तिक आयुष्यात ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते.

 

dnaindia.com

दोघांनीही आपापल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात सारख्याच कालावधीत केली. १९६६ ला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तर त्याच्या पुढच्या वर्षी काँग्रेसच्या तिकिटावर शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवली.

सुरवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे काँग्रेसचे हितचिंतक होते.

इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचेही त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत समर्थन केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर १९७७ च्या निवडणुकात त्यांनी काँग्रेससाठी प्रचारही केला.

१९८० ला अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. परंतु १९८२ ला जेंव्हा अंतुले ऐवजी बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री पदी बसवण्यात आले तेंव्हा शिवसेनेने आपली भूमिका बदलली.

सप्टेंबर १९८२ ला परळच्या कामगार मैदानावर घणाघाती भाषण करताना बाळासाहेब ठाकरे यांनी पुढचे मुख्यमंत्री हे शरद पवार असतील अशी भविष्यवाणी केली ती पुढे सहाच वर्षात पूर्ण झाली.

परंतु १९८५ नंतर शिवसेनेच्या भूमिकेत बदल होत गेला, काँग्रेस हितचिंतक असलेली सेना प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येऊ लागली.

महाराष्ट्रात ग्रामीण भागात शरद पवार तर मुंबई सारख्या शहरात शिवसेना यांनी आपापले वर्चस्व प्रस्थापित केले.

तत्कालिन पत्रकार किंवा राजकीय विश्लेषक सांगतात की, पवार आणि ठाकरे यांच्यातील ही छुपी युती होती असे देखील बोलले जायचे.

 

dnaindia.com

दोघांनीही एकमेकांच्या क्षेत्रात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाही.

अगदी अलीकडे २००७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेसशी युती न करता स्वतंत्र निवडणुका लढवून शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा केला.

राजकीय विरोधक असलेले हे दोन नेते नात्याने मात्र अगदी जवळ आहेत हे बऱ्याच जणांना माहितीही नसेल.

सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे भाचे आहेत.

आधीपासून असलेल्या घरगुती संबंधांना नात्यात बद्दलण्यासाठीचा पुढाकार देखील बाळासाहेबांनीच घेतला असे सांगितले जाते.

परदेशात शिकायला असणाऱ्या सदानंद सुळे यांची सुप्रिया पवार यांच्याशी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

अशावेळी पुढाकार घेऊन पवारांच्या कानावर ही गोष्ट घालून सुप्रिया व सदानंद यांचे लग्न लाऊन देण्यात बाळासाहेबांचा पुढाकार होता. जेंव्हा पहिल्यांदा सुप्रिया सुळेना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली.

शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा तर केला नाहीच परंतु बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सुप्रिया माझ्या मुलीसारखी आहे, ती स्वतः निवडणुकीला उभी राहतेय त्यामुळे तिच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका घेतली.

 

mumbailive.com

पण म्हणून राजकीय टीका करताना बाळासाहेब जाहीर भाषणात पवारांना ‘बारामतीचा म्हमद्या’ म्हणताना कचरत नसत हेही तेवढेच विशेष.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version