Site icon InMarathi

रोमन-अस्त, इस्लामी साम्राज्याचा उदय, वास्को-द-गामाचा भारतात प्रवेश, केवळ एका युद्धामुळे!

Fall of Constantinople InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

आपण इतिहासाचे ढोबळ मानाने तीन भाग करतो. एक प्राचीन, दुसरा मध्ययुगीन आणि तिसरा आधुनिक. भारतातील मध्ययुगाचा शेवट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, आणि तिथून पुढचा इतिहास हा आधुनिक इतिहास मानला जातो.

जागतिक इतिहासात मात्र मध्ययुगाचा शेवट होतो तो एका युद्धाने.

त्या युद्धाचा दिवस होता २९ मे १४५३. ही गोष्ट आहे त्या युद्धाची ज्याने पुढच्या इतिहासाची दिशा बदलली.

इसवी सन पूर्व २७ सालापासून चालत आलेले बायझनटाईन साम्राज्य शेवटच्या घटका मोजत होते. त्यांच्या राजधानीच्या शहराला, म्हणजेच कॉन्स्टेटीनोपालला मागच्या ५२ दिवसांपासून वेढा पडला होता. शहराच्या आत अडकून पडलेला सम्राट कोन्स्टंटाईन आपल्या सैन्याचं नेतृत्व मोठ्या धैर्याने करत होता.

कॉन्स्टेटीनोपाल हे भक्कम तटबंदीचे शहर. त्याच्या पासून प्रेरणा घेऊन युरोपात कित्येक शहरांनी स्वतःभोवती तशीच रचना उभी केली होती.

कॉन्स्टेटीनोपालचा पाडाव होणे ही तशी अशक्य गोष्ट. कारण १५०० वर्षे राज्य करणाऱ्या रोमन साम्राज्याने ह्या शहरावर केले गेलेले असे कित्येक हल्ले परतवून लावले होते.

 

कॉन्स्टेटीनोपालला वेढा देऊन बसलेला जो एकवीस वर्षांचा सुलतान मोहम्मद (दुसरा) हा आटोमन तुर्की साम्राज्यकर्ता कुशलपणे आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होता. त्याच्या आधी इ.स. ६७४ मध्ये विशाल युद्धनौकांच्या ताफ्यासह अरबांनी कॉन्स्टेटीनोपालवर चढाई केली होती.

चार वर्षे ते तटबंदीची भिंत ओलांडून जायचा प्रयत्न करत होते पण यश येत नव्हते.

६७८ मध्ये बायझनटाईन नौका तटबंदीच्या बाहेर आल्या आणि त्यांनी अरब जहाजांचा ताफा पाहता पाहता आगीच्या लोटांमध्ये बुडवून टाकला.

रोमनांच्या या शस्त्राचे नाव होते ‘ग्रीक फायर’. आग ओकणाऱ्या या विशिष्ट रसायनाने पाहता पाहता चित्र बदलून टाकले.

ग्रीक फायरचा वापर बाणांच्या टोकाला आग लावून करत असत. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही आग पाण्याने विझण्याऐवजी उलट अधिक पेट घेई. अरबांच्या जहाजाच्या ताफ्यातील एखादेच जहाज परत गेले असेल. बाकी सगळ्यांना तिथेच जलसमाधी मिळाली.

याच युद्धात अबू अय्युब अन्सारी याला आपला जीव गमवावा लागला. आजही कॉन्स्टेटीनोपालच्या या भिंतीबाहेर त्याचे थडगे आहे. तुर्क आजपण त्याला पवित्र ठिकाण मानतात.

 

त्या नंतर उमय्यद सल्तणीचा अमीर सुलेमान बिन अब्दुल मलिक हा तयारीनिशी इ.स. ७१७ मध्ये कॉन्स्टेटीनोपालवर चालून गेला.

२००० च्या जवळपास सैन्य घेऊन त्याने लढाऊ नौकांतून हल्ला केला. परंतु ग्रीक फायर चे उत्तर अजूनतरी अरबांकडे नव्हते. हे रसायन जहाजांना चिकटून बसे. आधी सांगितल्याप्रमाणे पाण्यावर ही पेट घेई. त्यामुळे हया वेळी देखील रोमानांनी अरबांचा सहज पराभव केला.

 

facingislam.blogspot.com

“त्या २००० जणांतील फक्त ५ जण परत आपल्या राज्यात जाऊ शकले” असे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर सुमारे ७०० वर्ष मुस्लिम राज्यकर्ते कॉन्स्टेटीनोपालकडे वळले नाही.

परंतु महत्वाकांक्षी असलेल्या सुलतान मोहम्मद याने कॉन्स्टेटीनोपाल जिंकायचे ठरवले आणि मागच्या ५२ दिवसांपासून तो इथे तळ ठोकून बसला होता.

समुद्रात उभ्या असलेल्या जहाजातून आणि जमिनीवरून शहराच्या भिंतीवर विशिष्ट ठिकाणी तोफांचा मारा करण्यात येत होता. खासकरून अशा ठिकाणी – जिथे भिंत कमजोर आहे.

 

दिड महिन्याच्या सततच्या माऱ्याने आता तिथे भगदाड पडायला आले होते. भिंतीच्या बाहेर वीस हजारच्या आसपास असलेले तुर्की सैनिक जथ्यांनी एकत्र येत होते. रात्रीच्या चांदण्यात हे दृश्य पाहता येण्यासारखे होते.

भरजरी वस्त्र घातलेला २१ वर्षीय सुलतान सफेद घोड्यावरबसून नेतृत्व करत होता. तटबंदीच्या आत रोमन सैन्य जे मागच्या दीड महिन्या पासून वेढ्यात अडकून पडले होते त्यांना कुठल्याही क्षणी युद्धाला तयार होते.

 

शहरात गोंधळ माजलेला होता. सामान्य नागरीकही आता मागे राहणार नव्हते. हा निकराचा लढा होता.

त्यांनी तटबंदीवर चढून खाली जमलेल्या सैन्यावर मोठाले दगड टाकायला सुरवात केली. शहरातील सगळ्या चर्चने आपल्या मोठमोठाल्या घंटा बडवायला सुरवात केली. याने जे झोपले होते ते उठून घराबाहेर आले. जे जागे होते ते तयारीला लागले आणि जे आधीच तयारी करत होते ते आणखी चेतले.

आज सर्व ख्रिश्चन पंथ आपापले हेवेदावे विसरून, मोठ्या संख्येने, त्यांच्या सगळ्यात मोठ्या चर्च – हाजिया सोफिया – मध्ये एकत्र जमा झाले होते.

भिंतीच्या बाहेरील सैन्य आता सुलतानाच्या आज्ञेची वाट पाहत होते, भलीमोठी सफेद पगडी धारणकेलेला तो सुलतान म्हणाला

“माझ्या मित्रांनो आणि मुलांनो, स्वतःला सिध्द करायची वेळ आलेली आहे, आक्रमण करा!”

 

नगारे, रणभेरी, तबले आणि बिगुलाच्या आवाजाने रात्रीच्या शांततेत एक हुंकार भरला. तुर्की सैन्याचा आवाज या आवाजातून मोठा होता…

आधीच ढासळत आलेल्या भिंतीवर त्यांनी शेवटचा हल्ला केला… पांढऱ्या शुभ्र कपड्यात हे तुर्की सैन्य असे लढत होते जणू ते परत जाण्यासाठी आलेच नाही आहेत.

त्यांचा आवेश आधीच गोंधळलेल्या परिस्थितीला आणखी भीतीदायक बनवत होता. शहराचे रक्षणकर्ते आणि तुर्की सैन्य यांच्यात जोराची लढाई जुंपली. सगळीकडे आगीचे साम्राज्य पसरत चालले होते. लोक सैरावैरा पळत होते.

रोमन सेनापती जबर जखमी होऊन मैदान सोडून पळाला होता. अशा वेळी आणखी काहीवेळ तग धरण कठीणभासत होते.

आता पहाट होत आली होती.

पहाटेच्या पहिल्या किरणाबरोबर “करकोपरा दरवाज्या”वर तुर्की सैनिकांनी उस्मानी झेंडा रोवला.

कॉन्स्टेटीनोपालचा पाडाव झाला होता!

 


११०० वर्षे जे जमत नव्हते ते आज शक्य झाले होते…!

कॉन्स्टेटीनोपालच्या लढाईने कोणत्याही शहराच्या संरक्षणाच्या ठोकताळ्यात मूलभूत बदल घडवून आणला.

आता जगातील कोणत्याही शहराच्या भिंती तोफांच्या पुढे अधिककाळ टिकणार नव्हत्या. मोठमोठाल्या तोफा आणि दारुगोळा याने मोठ्यात मोठ्या शहरावर देखील मात करता येणार होती. या शहराच्या पाडावाने इतिहासाची दिशाच बदलली. मध्य आशियायी सत्ता आता थेट युरोपात प्रवेश करू शकत होती.

 

या पराभवाच्या आत्मपरीक्षणातून युरोपात “नवनिर्मितीचा काळ” येणार होता. जग आधुनिकतेकडे वळणार होते.

तुर्कांच्या ह्या विजयाचा भारतावर असा परिणाम झाला की भूमार्ग बंद झाल्याने युरोपियन व्यापारी समुद्री मार्गाच्या शोधात निघाले आणि असाच एक खलाशी भारतात आला. तो वास्को-द-गामा. इ. स. होते १४४९.

एका युद्धाने काय काय बदलू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॉन्स्टेटीनोपालचा पाडाव.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version