Site icon InMarathi

तुमच्या लहानग्याला पाळणाघरात ठेवताना या महत्वाच्या बाबींचा विचार केलाय का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नव्या युगातील लोकांची जीवन जगण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपूर्वी लोक एकत्र कुटुंबीपद्धतीला प्राधान्य द्यायचे. त्यात मुलांचे संगोपन खूप चांगल्या पद्धतीने होत असे.

मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये मुलाचे संगोपन, पालन-पोषण ही एक मोठी जबाबदारी आहे. वर्किंग पॅरेंट्स साठी मुलांचा योग्य आणि सुरक्षितपणे सांभाळ केला जाणं ही मोठी समस्या आहे.

आज बहुतांश आई-वडील मुलांना पाळणाघरात ठेवतात. कितीतरी मुलांचा पाळणाघरात विकास चांगला होतो तर काही मुलांवर याचा विपरीत परिणाम होतो. तरीही आजच्या काळात पाळणाघर हा एक उत्तम पर्याय आहे.

 

 

जर पैशाचा प्रश्न नसेल तर घरीच सांभाळायला मदतनीस मुलगी किंवा आया ठेवणं हा पर्यायही चांगला आहे. आयाची व्यवस्था कोणत्याही विश्वसनीय संस्थेद्वारा सहज होऊ शकते.

आणि तिच्याबद्दल काही तक्रार असल्यास ती संबंधित संस्थेला आपण त्या आयाबद्दल तक्रार करून दुसऱ्या बाईची मागणी करू शकतो.

 

chittoornow.com

पाळणाघरामध्ये आपल्या मुलाला किंवा मुलीला ठेवायचं असेल तर त्याचे फायदे- तोटे आपल्याला आधीच माहीत असायला हवेत, नाही का ? तर जाणून घेऊयात पाळणाघराचे नेमके फायदे-तोटे.

फायदे –

१. शिस्त आणि सर्वांसाठी सारखे नियम :

पाळणाघराचे नियम सर्व आई-वडिलांसाठी सारखे असतात. यात कोणत्याही प्रकारची बेपर्वाई चालत नाही. तसंच सगळ्या मुलांना सुद्धा काही नियम पाळावे लागतात. यातून इतरांबरोबर सलोख्याची भावना वाढीस लागते.

२. मुलांची सुरक्षितता : 

पाळणाघराची सुरुवात लायसेंसशिवाय होऊ शकत नाही. इथे काम करणारे सर्व ट्रेनर अनुभवी आणि प्रशिक्षित असतात. त्यामुळे तुमची मुलं पूर्णपणे सुरक्षित असतात. इथे मुलांसाठी विविध खेळणी असतात. यातून मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास साधला जाऊ शकतो.

 

 

३. सोपा आणि सुटसुटीत पर्याय :

विभक्त कुटुंबांमध्ये मुलांना सांभाळायला कोणाची तरी मदत घ्यावी लागते. मात्र वैयक्तिक आया ठेवायची म्हटली तर ही सोय महाग पडते. त्या बाईला आपल्या जबाबदारीवर घरात ठेवावी लागते.

यात घर तिच्या अंगावर सोडून जाण्याची जोखीम असते. हा निर्णय घेणे कठीण असते. अशा वेळी आपण अगदीच विश्वासू बाई सोडल्यास कोणाचा विचार करू शकत नाही. त्यामुळे बहुतांश लोक पाळणाघराचा पर्याय निवडतात.

 

allegro.mncarpenters.net

 

४. जुळवून घेता येणं :

आजकाल आई- वडील नोकरदार असल्याने प्रत्येकाला एक किंवा फारतर दोन मुले असतात. त्यामुळे ती हट्टी असतात. पाळणाघरात मुलं मिळून मिसळून रहायला शिकतात. वाटून घ्यायला शिकतात.

 

 

त्यांचं एकमेकांशी चांगलं मैत्रीपूर्ण नातं निर्माण होतं. ते आपली खेळणी एकमेकांना देतात. अशा प्रकारे मुले ही समूहात राहताना आवश्यक असलेल्या गोष्टी सहज शिकतात. परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात.

५. वेगवेगळी कौशल्ये शिकतात :

पाळणाघरात मुलांना चित्रकला, नृत्य शिकवले जाते. गाणी म्हणून घेतली जातात. गोष्टी सांगितल्या जातात. नाटकं बसवली जातात. त्यामुळे मुलांना खूप गोष्टी करता येतात.

आई वडील मुलांसाठी इतकं सगळं करू शकत नाहीत. मुलांना इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्यामुळे आई-वडील ही खुश असतात. मुलं इतका वेळ काहीतरी करण्यात व्यस्त असल्याने त्यांचा मेंदू अधिक तल्लख होतो.

 

तोटे –

१. मुलांना साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता :

पाळणाघरात विविध प्रकारची मुलं असतात. तसेच विविध वयोगटातील मुलं असतात. त्यांच्याबरोबर मुलांचे खाणे-पिणे, खेळणे, झोपणे, अशा सगळ्या गोष्टी होत असतात.

जर कोणत्या मुलाला आधीपासूनच काही इन्फेक्शन असेल तर त्याची लागण इतर मुलांना होऊ शकते. कारण लहान मुलं साथीच्या रोगांना सेन्सिटिव्ह असतात. पाळणाघरात डॉक्टरांची सुविधा असते पण एवढ्या मुलांमध्ये लागण न होणे कठीण असते.

 

thebetterindia.com

 

. मुलांशी पालकांचं bonding न होण्याचा धोका :

जेव्हा आई-वडील आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत तेव्हा मुलांची तुमच्याशी असलेली जवळीक कमी होते. त्यामुळे मुले मोठी झाल्यावर त्यांचं तुमच्याशी न पटण्याचे प्रसंग येऊ शकतात.

 

 

चूक-बरोबरची शिकवण जी आई वडील मुलांना देऊ शकतात, ती पाळणाघरे देऊ शकत नाहीत. मुलांना नात्याचं महत्त्व वाटेनासे होते. ती त्यांच्या काल्पनिक दुनियेत रममाण व्हायला लागतात.

३. वेळापत्रकानुसार गोष्टी करण्याचा कंटाळा येऊ शकतो :

पाळणाघरात प्रत्येक गोष्ट वेळापत्रकात बसवली जाते. मुलांचे जेवण्याचे, खेळण्याचे रुटीन ठरवले जाते. आई-वडीलांची जरी याबद्दल तक्रार नसली तरी मुलांना या रोजच्या रुटीनचा कंटाळा येऊन ती चिडचिडी होऊ शकतात.

तुम्ही कोणत्या परिस्थितीत आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवताय हे तुमच्याइतकं चांगलं कोणालाच समजू शकत नाही. पण जर शक्य असेल तर तुम्ही घरच्यांनी वेळेचा असा ताळमेळ बसवा की तुमच्यातलं कोणी ना कोणी तुमच्या मुलाजवळ असेल किंवा आजी आजोबा जवळ राहत असतील.

घरी सी सी टीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही कामाला तुमच्या विश्वासातील, अनुभवी आया ठेऊ शकता.

 

 

आजकाल भरपूर कंपन्या मुलांसाठी क्रेचची सुविधा देतात. जर तुमच्या ऑफिसमध्ये अशी सोय असेल तर हा पर्याय उत्तम. यात मुलं तुमच्या नजरेसमोर राहतात आणि तुमच्या मुलालाही आईचं प्रेम मिळत राहू शकतं.

जर कोणत्या ऑफीसमध्ये पन्नासहून अधिक स्त्रिया असतील तर सरकारी नियमाच्या आधारावर, क्रेचची सोय उपलब्ध करून देणे हे ऑफिसवर बंधनकारक असतं. त्यामुळे तुम्ही तशी मागणी करू शकता.

मुलं मोठी झाली की त्यांना समजावता येऊ शकते. त्यांच्यासाठी बोर्डिंग स्कूलचा पर्यायही तुमची निवडू शकता. पण वयाच्या ५-७ वर्षांपर्यंत मुलांना आई वडिलांची जास्त आवश्यकता असते.

 

 

कारण तेव्हा ती अधिकाधिक वेळ घरी असतात. मुलं ही प्रत्येक आई-वडिलांची सगळ्यात मोठी जबाबदारी असते आणि ती तुमचा वारसा असतात. तुमची ठेव असतात.

त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज थोडं थांबावं लागलं, काही गोष्टींचा त्याग करावा लागला तरी ठीक. कारण तुमच्यासारखी त्यांची देखभाल फक्त तुम्हीच करू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version