Site icon InMarathi

महाराष्ट्रात आम आदमी पक्षाला space आहे का? : हेरंब कुलकर्णी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

केंद्र सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राजकीय पर्यायाची चर्चा सुरू आहे. “तिसरा पर्याय” ही चर्चा करताना आम आदमी पक्ष हा महाराष्ट्रात पुन्हा उभा राहू शकतो का? यावर एक तटस्थ चर्चा करायला हवी. अनेकांप्रमाणे मी स्वतः केजरीवाल यांच्याकडे खूप आशेने बघतोय. पण त्यांचे एककल्ली व un-predictive nature बघता काहीशी निराशा वाटते. तिथेही एक कंपू तयार झालाय.

योगेंद्र यादव यांना ज्या प्रकारे बाहेर काढलं आणि ज्या प्रकारे राज्यसभेत कुमार विश्वास आणि आशुतोष यांना तिकीट नाकारले ते बघता निराशा येते.

महाराष्ट्रात तर नेतृत्व नाही, प्रमुख जुने कार्यकर्ते दुखावलेत, ज्यांनी लोकसभा लढवली त्यांना पुन्हा जोडण्याचे प्रयत्न होत नाहीत.

साधी राज्याची कार्यकारिणी कशी आहे? कोण आहे त्यात? हे माहीत नाही. प्रवक्ते कोण आहे? हे कळत नाही. राज्यातल्या प्रश्नावर भूमिका मांडली जात नाही. यामुळे हृदय आप सोबत असूनही मन तिकडे जात नाही.

 

isvarmurti.com

वास्तविक कार्यकर्त्यांना सर्वात जवळचा पक्ष हाच आहे. दुसरे सामर्थ्य या पक्षाचे हे की त्यांनी सरकार अतिशय चांगले चालवून दाखविल्याने आम्ही केवळ स्वप्नाळू कार्यकर्ते नाहीत तर राज्यकर्ते बनू शकतो हा आत्मविश्वास दिला आहे. दिल्लीतील शिक्षण – आरोग्य – वीज या तीन मुद्द्यांवर जे काम करून दाखविले आणि निराधार पेन्शन २५०० केले (की जे पुरोगामी महाराष्ट्रात फक्त ६०० आहे) ते बघता या पक्षाला नक्कीच भवितव्य आहे. पण महाराष्ट्राचा विचार करताना पक्ष म्हणून तो राज्यस्तरावर उभा राहताना अजून जाणवत नाही.

राज्यात आज “भाजप नको आणि काँग्रेस ही नको” अशी मानसिकता असणारी मोठी संख्या आहे. ग्रामीण महाराष्ट्रात संघर्ष हा धर्मनिरपेक्षता विरुद्ध जातीयवादी असा नाही, तर “काँग्रेस राष्ट्रवादी चे सरंजाम दार विरुद्ध सामान्य लोक” असा आहे. त्यामुळे “मोदींविरुद्ध नाराजी, पण काँग्रेस राष्ट्रवादीविषयी प्रेम नाही” अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून तिसरा पर्याय ही स्पेस रिकामी आहे.

कम्युनिस्ट, शेतकरी संघटना व प्रकाश आंबेडकर हे मर्यादित होताना ती स्पेस अधिकच स्पष्ट होते आहे.

 

isvarmurti.com

म्हणून, २०१९ विधानसभा व २०२४ डोळ्यासमोर ठेवून आम आदमी ने पुढील काही गोष्टी करायला हव्यात :

१) महाराष्ट्रासारख्या राज्यात केवळ प्रामाणिकपणा असून चालत नाहीत तर सर्व प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. तुमचा वैचारिक पाया कोणता – हे स्पष्ट करावे लागेल.

तुम्ही समाजवादी की खुल्या व्यवस्थेच्या बाजूचे आहात? आरक्षणावर भूमिका काय? पाणीवाटप व शेतीच्या प्रश्नांची समज काय? दलित आदिवासी भटके या समाजाविषयी तुमचे आकलन काय? हे सर्वप्रथम स्पष्ट करावे लागेल.

२) पक्ष फेररचना करताना ज्यांच्यामागे लोक आहेत, जमिनीवर काम आहे त्यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व दिले पाहिजे व ते चेहरे ग्रामीण असले पाहिजेत.

३) शहरी व पांढरपेशा ही प्रतिमा बदलण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ते व सर्व जातीतील कार्यकर्ते व महिला यांना प्रमुख स्थान आवश्यक आहे.

४) महाराष्टातील जे प्रमुख लोकलढे सुरू आहेत त्यांच्याशी जोडून घेणे

५) लोकसभा निवडणूक ज्यांनी लढवली व जे नंतर दूर गेले ते का दुखावलेत हे समजून घेऊन चर्चा करणे

– असे अनेकविध उपाय करावे लागतील.

राज ठाकरे महाराष्ट्रातील असंतोषाचा चेहरा बनले होते, पण त्यांनी निराशा केली. त्या तरुणाईच्या असंतोषाचा चेहरा हा पक्ष ज्या प्रमाणात बनेल त्या प्रमाणात आप ला महाराष्ट्र स्वीकारेल.

पुणे – मुंबई – नाशिक या त्रिकोणाच्या पलीकडे जाऊन जो पक्ष बघेल, त्यालाच महाराष्ट्र स्वीकारेल अशी स्थिती आहे…

तुम्हाला काय वाटते याबाबत?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version