Site icon InMarathi

पळून गेलेल्या ‘प्रियकर’ जोडप्यांना आश्रय देणारे महादेव-मंदिर, जाणून घ्या.

Couple in Temple Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रेम ही एक अशी भावना आहे, जी काही लोक व्यक्त करतात, तर काही करत नाहीत. पण प्रत्येकालाच एकदा न एकदा आपल्या जीवनात प्रेम होते. मग या प्रेम करणाऱ्या जोडप्यांना एकत्र राहण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी कुटूंबियांना आणि इतरांना सामोरे जावे लागते.

त्यातच कधी-कधी ही जोडपी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. याची कितीतरी उदाहरणे तुम्ही चित्रपटांमध्ये पहिली असतीलच. पण पळून जाऊन देखील त्यांच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच जातात.

आपल्या मुलाने लग्न कुणाशी करावे हा निर्णय आजही बहुतांश घरांमध्ये पालकच घेत असतात. आणि प्रेमविवाह करण्याची इच्छा असणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाबतीत जर त्यांचा विवाहाचा निर्णय पालकांना मान्य नसेल तर पळून जाण्याचा मार्ग आजही पत्करला जातो.

खरेतर स्वतःला हव्या असणाऱ्या, स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी पळून जावे लागणे ही काही समाजासाठी अभिमानाची गोष्ट नाही. पण हेच आपलं सामाजिक वास्तव आहे.

 

favim.com

 

घर सोडून गेल्यानंतर नवीन ठिकाणी बस्तान बसवणे ही सोपी गोष्ट नव्हे. हे करताना कित्येक अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यातले सर्वात मोठे आव्हान म्हणजे निवारा. पण अशी काही ठिकाणे आहेत जिथे पळून गेलेल्या जोडप्यांना आश्रय दिला जातो.

हिमाचल प्रदेशातील शंगचुल महादेव मंदिर या निराश्रित जोडप्यांना आश्रय देण्यासाठी प्रसिध्द आहे.    

 

 

हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे. हिमाचल प्रदेशची प्राकृतिक सुंदरता आपल्याला या राज्याच्या मोहात पाडते.

शिमला, कुल्लू, मनाली यांसारखी बहुतेक लोकांची आवडती पर्यटनस्थळे येथे आहेत. हिमाचल प्रदेश प्राकृतिक सुंदरतेसाठी ओळखले जाते, तेवढेच ते तेथील परंपरेसाठी देखील ओळखले जाते.

शांघड गाव हे कुलूच्या सेंज व्हॅलीमध्ये आहे. पांडव काळापासून असलेल्या या शांघड गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

यातीलच एक येथील शंगचूल महादेव मंदिर आहे. येथे डलहौसीच्या खज्जरसारखेच सगळीकडे हिरवेगार आहे. शंगचूल महादेवाच्या सीमेमध्ये कोणत्याही जातीचे प्रेमी युगुल जर पोहोचले, तर जोपर्यंत ते या मंदिराच्या सीमेमध्ये राहतील तोपर्यंत त्यांचे कुणीही काहीही करू शकत नाही.

 

 

एवढेच नाहीतर प्रेमी जोडप्यांचे  कुटुंबीय देखील त्यांना काही बोलू किंवा करू शकत नाही. शंगचूल महादेव मंदिराचे सीमा क्षेत्र जवळपास १०० गुंठ्याचे मैदान आहे. या मंदिराच्या सीमेमध्ये जसे प्रेमी जोडपे पोहचते, तसेच त्यांना शंगचूल महादेव देवतेच्या शरणात आल्याचा मान मिळतो.

२०१५ मध्ये एप्रिलच्या सुमारास या शांघड गावातील काही घरांना आणि या शंगचूल महादेव मंदिराला आग लागली होती. या भयंकर आगीमध्ये हे मंदिर आणि चार घर पूर्णपणे जळाले  होते.

या आगीमध्ये मंदिरातील जवळपास दीड कोटी रुपयांची संपत्ती जळून गेली होती. ही आग खूपच भयानक होती. यामध्ये लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या शंगचूल महादेवाचा रथ वाचवला. त्यानंतर काही काळाने या मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले.

 

amarujala.com

आपल्या ऐतिहासिक वारश्याचे रक्षण करण्यासाठी या गावामध्ये पोलिसांना येण्यास देखील बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या मंदिराच्या परिसरात दारू, सिगारेट आणि चामड्याचे सामान घेऊन येण्यास देखील मनाई आहे.

कोणतेही हत्यार घेऊन येथे प्रवेश करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची भांडण येथे कुणीही करू शकत नाही.

एवढेच नाहीतर येथे कुणी मोठ्या आवाजामध्ये देखील बोलू शकत नाही. येथे फक्त देवतेचा निर्णय मान्य केला जातो.

येथे पळून आलेल्या आणि देवाने शरण दिलेल्या प्रेमी युगलांची असलेली घरगुती भांडणे आणि इतर काही प्रकरणे पूर्णपणे संपत नाहीत, तोपर्यंत या मंदिरातील पंडित प्रेमी युगालांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार करतात.

 

 

पांडवांनी घेतले होते शरण 

या गावामध्ये असे म्हटले जाते की, अज्ञातवासाच्या वेळी पांडव येथे काही काळापर्यंत थांबले होते. त्यानंतर काही काळाने कौरव त्यांचा पाठलाग करत येथे पोहोचले होते. तेव्हा शंगचूल महादेवाने कौरावांना थांबवले आणि सांगितले,

“हे माझे क्षेत्र आहे आणि जो कोणी माझ्याकडे शरण येतो, त्याचे कुणीही काही बिघडवू शकत नाही.”

हे ऐकल्यानंतर महादेवांच्या भीतीने कौरव परत माघारी गेले.

 

 

तेव्हापासून आतापर्यंत समाजाने नाकारलेल्या व्यक्ती किंवा प्रेमी जोडपे येथे महादेवाच्या शरणार्थ येतात आणि महादेव त्यांचे रक्षण करतात.

महादेव या प्रेम करणाऱ्या जोडप्यांवर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाहीत अशी आस्था आहे. सर्व वैयक्तिक प्रश्न आणि मिटल्यानंतर जोडप्यांना हव्या त्या ठिकाणी जाऊन राहण्याची मुभा असते.

या कारणामुळेच हे मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटक दूरवरून या मंदिरामध्ये महादेवांचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version