Site icon InMarathi

तिने ऑलिम्पिक्समध्ये जे करून दाखवलं, ते हजार पदकांपेक्षा अधिक मौल्यवान आहे!

shiny wilson im feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेटचं प्रचंड वेड असलेल्या आपल्या देशात मागील काही दिवसात नीरज चोप्रा यांना जाहिरातींमधून, विविध कार्यक्रमातून, सोशल मीडियावरून मिळालेली प्रसिद्धी ही कौतुकास्पद आहे.

भारतीय खेळाडूंना जर आपल्याकडून असंच प्रोत्साहन मिळत राहिलं तर येत्या काही वर्षात क्रिकेट प्रमाणे इतर स्पर्धात्मक खेळातही भारताचा झेंडा उंच फडकेल यात शंका नाहीये.

ऑलम्पिक खेळाचं उदघाटन होत असतांना भारताचा झेंडा घेऊन त्या मैदानावर फिरण्याचा मान मिळणे हा प्रत्येक खेळाडूसाठी बहुमान असतो. टीव्हीवरून ऑलम्पिक स्पर्धा बघणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं, की एक ना एक दिवस भारताचा हा झेंडा माझ्या हातात असावा आणि मी भारताचं प्रतिनिधित्व करावं.

१९९२ मध्ये झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिक स्पर्धेच्या शुभरंभाच्या वेळी ‘शायनी अब्राहम विल्सन’ या महिला खेळाडूला सर्वात पहिल्यांदा हा मान मिळाला होता.

 

 

‘शायनी अब्राहम विल्सन’ या महिला खेळाडूला हा सन्मान त्यांच्या मैदानावरूरील आणि मैदानाबाहेर असतांनाही खेळाला प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीमुळे देण्यात आला होता.

शायनी अब्राहम विल्सन यांनी एक धावपटू म्हणून ४ ऑलम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. शिवाय, ६ आशियायी स्पर्धांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता.

१९८४ मध्ये ‘लॉसएंजेलीस’ येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत त्या उपांत्य फेरीपर्यंत पोहचल्या होत्या. ८०० मीटर इतकं अंतर त्या २.०४.०९ मिनिटांत धावल्या होत्या.

१९८० च्या दशकात पी.टी. उषा आणि शायनी अब्राहम विल्सन या दोघीही भारतीयांना आपल्या खेळातून हे सांगत होत्या, की “या क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर करू शकतात.” केरळ मधील एकाच क्रीडा संकुलातून या दोघींनीही आपल्या धावण्याचा सराव केला होता.

 

 

भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकणाऱ्या ‘एम डी वलसम्मा’ यांनी सुद्धा केरळमधील याच क्रीडा संकुलातून प्रशिक्षण घेतलं होतं. शायनी अब्राहम विल्सन यांचं करिअर हे तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं कारण हे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जाणून घेतल्यावरच लक्षात येऊ शकतं.

शायनी अब्राहम विल्सन यांचा जन्म ८ मे १९६५ रोजी केरळ मधील ‘थोडूपूझा’ जिल्ह्यातील ‘लाडुकी’ या गावात झाला होता. लहानपणीच त्यांनी धावपटू होण्याचं ठरवलं होतं.

केरळ मधील क्रीडा संकुलात शायनी, पीटी उषा आणि एमडी वलासम्मा यांना ‘देवसेला’ या एकाच प्रशिक्षकाने धावण्यचं प्रशिक्षण दिलं होतं. शालेय शिक्षण कोत्तयम येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पलई येथील ‘अल्फोन्सा कॉलेज’ मधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि तिथेच त्यांना क्रीडापटू होण्याची पहिली संधी मिळाली होती.

१९८० च्या दशकात महिला खेळाडूंचं करिअर हे लग्न, आई होइपर्यंतच असायचं, पण शायनी यांनी आपल्या कर्तृत्वाने हा समज मोडून काढला होता. १९८८ मध्ये शायनी अब्राहम यांचा अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू ‘विल्सन चेरीयन’ यांच्यासोबत विवाह झाला.

१९८९ मध्ये त्यांना शिल्पा नावाची मुलगी झाली. मुलीला जन्म दिल्यानंतर शायनी अब्राहम विल्सन या केवळ ३ महिन्यात खेळाकडे परतल्या होत्या आणि त्यांनी ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्या आधीचा राष्ट्रीय विक्रम मोडत काढत विक्रमी वेळेत धावल्या होत्या.

लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये त्यांनी ४०० मीटर धावण्याची स्पर्धा १ मिनिटांत पूर्ण करत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मेहनतीने लोकांची मनं जिंकली होती.

१९९५ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी चेन्नई येथे ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी स्वतःचा विक्रम मोडला. यावेळी त्यांनी हे अंतर केवळ १.५९.८५ मिनिटांत पार केलं होतं.

८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत २ मिनिटांच्या आत हे अंतर पार करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. शायनी अब्राहम विल्सन यांचा हा विक्रम १५ वर्ष अबाधित होता.

२०१० मध्ये हा टिन्टू लुका या महिला खेळाडूने हा विक्रम मोडीत काढला होता. त्यांनी ही स्पर्धा १.५९.१७ मिनिटांत पूर्ण केला होता.

शायनी अब्राहम विल्सन यांनी धावपटू म्हणून आपल्या करिअरमध्ये आशियायी खेळांमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली होती. त्याशिवाय, ‘एशियन ट्रॅक अँड फिल्ड मीट’ या स्पर्धेत त्यांनी ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली होती.

 

 

ऑलम्पिक स्पर्धांमध्ये केवळ त्यांना पदक जिंकता आलं नाही हे त्यांचं आणि देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल. शायनी अब्राहम विल्सन यांना ऑलम्पिक स्पर्धेत पदक जिंकता आलं नाही, तरीही त्यांना ऑलम्पिक उदघाटन समारंभात झेंडा घेऊन मैदानात पाठवण्याची संधी देणाऱ्या क्रीडा मंत्रालयाचा हा योग्य निर्णय म्हणावा लागेल.

१९९५ मध्ये शायनी अब्राहम विल्सन यांना भारत सरकारने क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९९८ मध्ये शायनी अब्राहम विल्सन यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version