Site icon InMarathi

भरती-ओहोटी मागचं विज्ञान आपण शाळेत शिकलो त्यापेक्षा बरंच वेगळं आहे!

tide feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

समुद्र हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्यांच्याकडे समुद्र आहे, त्यांना त्या वातावरणाचा निवांतपण आवडतो, ज्यांच्याकडे समुद्र नाही त्यांना त्याच्याविषयी आकर्षण असतंच.

अगदी एवढंच नाही, तर ‘तुमच्याकडे समुद्र आहे का?’ असं पुणेकरांना मुंबईकरांनी चिडवणं, किंवा तशाप्रकारचे मिम्स बनवणं या सगळ्या गोष्टी सुद्धा अनेकांसाठी नवीन नसतील.

या समुद्राच्या लाटांशी निगडित आणखी महत्त्वाच्या आणि चर्चिल्या जाणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे भरती आणि ओहोटी! समुद्र म्हटलं की भरती-ओहोटी, म्हणजेच हाय टाइड आणि लो टाइड या गोष्टी अगदी सहज ऐकलेल्या असतात.

हे शब्द माहित असले, तरीही भरती-ओहोटी नेमकी कशामुळे येते, यामागचं शास्त्र काय असतं, हे मात्र अनेकांना माहित नसतं. हो म्हणजे, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा याच्याशी संबंध आहे, यापलीकडे फारसं काही माहित नसतंच बहुदा.. आज याविषयीच काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

 

 

जगातील ४०% जनता…

जगातील थोडीथोडकी नव्हे तर जवळपास ४०% जनता ही समुद्रकिनाऱ्यापासून केवळ १०० किमी अंतराच्या परिसरात राहते. म्हणजेच समुद्राला रोज येणाऱ्या भरती आणि ओहोटीपासून १०० किमी किंवा त्याहून कमी अंतरावर राहणार मोठा वर्ग आहे असं म्हणायला हवं. मात्र दिवसातून दोन वेळा घडणाऱ्या या निसर्गाच्या चमत्काराबद्दल त्यांच्यापैकी सुद्धा सगळ्यांना माहित नसेल, नाही का!

गेल्या काही वर्षात झालेली वाढती पूरस्थिती, ग्लोबल वॉर्मिंगममुळे समुद्राच्या आसपासच्या सखल भागात असणाऱ्या लोकवस्तींना भरतीच्या काळात होणारा त्रास, या सगळ्याचा विचार केला तर भरती-ओहोटीविषयीची उत्सुकता वाढली असेल, हे मात्र नक्की!

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे…

पृथ्वीच्या भूभागावरील बहुतांश भाग हा पाण्याने, विशेषतः महासागरांनी व्यापलेला आहे, हे तर आपल्याला ठाऊकच असतं. भरती-ओहोटीच्या खेळामागे हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे, असं सांगितलं तर? होय मंडळी, हेसुद्धा याचं एक कारण आहे.

आता असं पहा. की पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना, तिचा केवळ अर्धाच भाग चंद्राकडे असतो. दुसरा अर्धा भाग मात्र त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच चंद्रपासून तुलनेनं अधिक लांब असतो.

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती या पाण्याला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते. यावेळी दोन प्रकारचे फोर्सेस या पाण्यावर आपला प्रभाव टाकत असतात.

 

 

 

एक फोर्स पृथ्वीच्या भूभागाच्या काटकोनात म्हणजेच ज्याला परपेंडीकुलर म्हणतात, त्या पद्धतीने तर दुसरा फोर्स हा भूभागाच्या समांतर प्रभाव पाडत असतो.

आता या सगळ्या खेचाखेचीत पाण्याची हालचाल झाली नाही, तरच नवल! म्हणजे काहीसं असं पहा की यामुळे पाण्याची अशाप्रकारे हालचाल होते, की गोलाकार आकार असणारी पृथ्वी या पाण्याच्या आकारामुळे रग्बीच्या चेंडूसारखी भासू शकते.

…आणि अशी सुरु होते गंमत

चंद्राच्या थेट खाली असणारा भाग किंवा आपण त्याला चंद्राच्या समोर असणारा भाग म्हणूयात, त्याला सबलुनार असं म्हटलं जातं. तर त्याच्या विरुद्ध दिशेला असणारा भूभाग अँटिपोडल पॉईंट मानला जातो.

समुद्राच्या पाण्याला येणारा फुगवटा हा त्याच दोन टोकांना जास्त असणार, हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. त्याभागातच गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सर्वाधिक किंवा सर्वात कमी असतो. या दोन्ही टोकांना नव्वद अंशात असणाऱ्या पृथ्वीच्या इतर दोन्ही ध्रुवांवर सुद्धा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणातून निर्माण होणारा समांतर फोर्स नसतो. त्यामुळेच हा आकार बदलतो.

पृथ्वीच्या इतर भागात मात्र हा समांतर असणारा फोर्स अस्तित्वता असतो. त्यामुळेच पाण्याचे थेंब, किंवा अगदीच वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं, तर पाण्याचे रेणू सुद्धा सबलुनार किंवा अँटिपोडल पॉईंटकडे ढकलले जात असतात. त्यामुळेच या भागांमध्ये फुगवटा निर्माण होतो.

त्यानंतर होते सूर्याची एंट्री…

चोवीस तासात पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजेच या वेळात पृथ्वीवरील कोणतेही ठिकाण हे दोन्ही टोकांच्या फुगवट्याकडून एकदा तरी जातंच.

आता असं पहा, की ज्यावेळी तुम्ही जिथे राहता ते ठिकाण या फुगवट्याच्या भागात असेल, त्यावेळी समुद्राला भरती येणार आणि हा फुगवटा सोडून इतर ठिकाणी तुमचा भूभाग असेल, तर तिथे ओहोटी असणार.

यात गंमतीचा भाग असा आहे, की नेहमीच हे असंच घडतं असं नाहीये. भरती-ओहोटीवर प्रभाव पाडणारं आणखीही एक कारण आहे. चंद्र जसा त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवर पाडतो, तसाच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा सुद्धा प्रभाव पडत असतो.

चंद्र तुलनेनं लहान असला, तरी पृथ्वीपासून जवळ आणि भरीव आहे. त्यामुळे वायू आणि प्लास्मा पदार्थ असणाऱ्या सूर्यापेक्षा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अधिक असतो. असं असलं, तरीही सूर्य त्याचा प्रभाव दाखवून देतोच.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण होणारे पाण्याचे फुगवटे मोठे करण्यात सूर्याचाही वाटा महत्त्वपूर्ण ठरतो. सूर्य आणि चंद्र एका रांगेत असतील, त्यावेळी पाण्याच्या फुगवट्याचा परिणाम सर्वाधिक असतो. कारण एकाचवेळी दोन्ही फोर्स त्यांचा प्रभाव पाडत असतात. साहजिकपणे यावेळी अधिक फुगवटा निर्माण होणं आणि त्यामुळेच अधिक मोठी भरती येणं घडत असतं.

 

 

आता भरती जेवढी मोठी असेल, तेवढीच त्यावेळी येणारी ओहोटी सुद्धा अधिक प्रमाणात असणार हे वेगळं सांगायला नको. पाणी जेवढं अधिक प्रमाणात पुढे येतं, तितकंच अधिक प्रमाणात मागेही जातं. त्यामुळे अशा ओहोटीच्या वेळी पाणी किनाऱ्यापासून खूप दूर गेलेलं असणार हेही स्पष्टच आहे.

मग मंडळी भरती आणि ओहोटीबद्दल ही माहिती कशी वाटली? कमेंटमधून नक्की कळवा. हो आणि तुम्हाला आणखी अशा कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल हेसुद्धा आम्हाला नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version